गहिरे पाणी… (भाग – ८)
मुख्य रस्त्यापासून गाडी डावीकडे गेलेल्या फाट्यावरती वळली. हा रस्ता तुलनेने थोडा अरुंद होता आणि इथे अजिबात कोणतेही वाहन येताजाताना दिसत नव्हते. सर्वत्र पूर्णतः शुकशुकाट होता. दोन्ही बाजूंना कमरेइतक्या उंचीचे हिरव्यागार झुडुपांचे गचपण माजलेले होते. त्यांच्या गळ्यात बाहुपाश अडकवून काही रानफुलांच्या वेलीदेखील अस्ताव्यस्त पसरलेल्या होत्या. त्यांच्या सुंदर आणि मधुर मकरंद भरलेल्या फुलांवर अनेक प्रकारचे कीटक व मधमाशा भुणभुणत होते. या नैसर्गिक कुंपणाच्या थोडे पलिकडेच, काही अंतरावर, गूढ गहन काळ्या अरण्याची सीमा हलके हलके सुरु होत होती.
गाडी साधारण अर्धा एक किलोमीटर पुढे आली असेल. हवेत सर्वत्र एक दमटपणा व थंड आणि जडपणा जाणवत होता. अचानक संपदाची नजर उजवीकडे गेली. लोखंडी तारेच्या कुंपणाने बंदिस्त केलेली एक स्मशानभूमी तिला दिसली. चुन्याची रंगसफेती केलेल्या एकाकी व चैतन्यहीन कबरींच्या काही ओळी तिला दिसल्या. त्यांच्यावरती एक थंडगार मरणप्राय शांतता जणू चादरीसारखी ओढून घेतलेली होती. सततच्या मुसळधार पावसाने त्यांच्यावर शेवाळाचे जाडजूड थर पसरलेले होते. पत्थरांचे जोड किंचीतसे उकलले जाऊन गवताचे लवलव करणारे तुरे बाहेर डोकावत होते आणी पिवळ्या रंगाची एक दोन दगडीची फुले त्यांच्यामधूनच आपले अस्तित्व प्रकट करीत होती.
आणि अचानक त्याच वेळीस तिला ‘तो’ सर्वप्रथम दिसला. एका कबरीपाशी शांतपणे उभा. अंगावर पूर्ण काळा पेहराव. सायंकाळीच्या गदळ प्रकाशात नीटसे काहीच दिसत नव्हते. परंतु तो कोण आहे व असा एकाकी का उभा आहे? हा प्रश्न तिला पडला. भयचकित होऊन तिने आपल्या सासूबाईंकडे पाहिले. परंतु वसुधाचे तिकडे लक्ष नव्हते. ती हातातील एक मासिक वाचण्यात मग्न होती. संपदाने परत त्या कबरस्थानाकडे वळून पाहिले. अर्ध्या सेकंदाहून देखील कमीच वेळ लागला असेल. परंतु तितक्या वेळातच ती काळी सावली तिथून अक्षरशः नाहीशी झालेली होती. घाबरलेल्या संपदाने सरळ डोळे मिटून घेतले.
काही वेळातच गाडी मुख्य गावठाणात प्रवेश करती झाली. आता रस्ता अधिक अरुंद झालेला होता. दोन्ही बाजूला कौलारू छपरांची बुटकीशी व अंधारी भासणारी घरे. पुढची पडवी स्वच्छ शेणाने सारवलेली. जुन्या अस्सल सागवानी लाकडाचे खांब घराचा सगळा भार तोलून धरणारे. त्यांना पाठ टेकवून भकास मुद्रेने व शून्य नजरेने बाहेर पहात बसलेले घरोघरीचे म्हातारे कोतारे लोक. त्यांच्या शेजारीच भकभक जळणारे फडफडत्या ज्योतीचे कंदिल. छपराच्या पागोळ्यांवरून पाण्याची अखंड धार खाली गळत असलेली. शहरी आयुष्याची सवय झालेल्या संपदा आणि वरुणला आता इथे आपला निभाव लागणार का? या चिंतेने ग्रासले.
मध्येच एक दोन ठिकाणी थांबून वरुणने सरदेसायांच्या वाड्याबाबत लोकांना विचारणा केली आणि त्यांनी दिलेल्या सूचनांनुसार गाडी चालवीत चालवीत तो आता गावाच्या थोडेसे बाहेरच व एका उंच टेकडीच्या पायथ्याशी पोहोचला. एव्हाना अंधार चांगलाच दाटलेला होता आणि मुसळधार पाऊस कोसळायला सुरुवात झालेली होती. गाडीच्या हेडलाईट्सच्या प्रकाशात देखील रस्ता नीट दिसत नव्हता. तरी देखील शिताफीने गाडी चालवीत वरुण त्या छोट्याशा टेकडीवर पोहोचला. समोर काही अंतरावरतीच वाड्याची बाह्यरेखा धूसर धूसर दिसू लागलेली होती. आत प्रकाश देखील होता. म्हणजे भास्कर वसुधाबाईंनी सूचना दिल्याप्रमाणे अगोदरच तयारी करण्यासाठी आलेला होता. त्या खडकाळ वाटेवरुन हादरत व आदळत शेवटी एकदाची गाडी त्या वाड्यासमोर पोहोचली.
त्यासरशी वाड्याचे भलेभक्कम दार करकरत उघडले आणि हातातील कंदिल उंचावत भास्कर पडवीमध्ये आला. गाडीच्या आत पहात पहात त्याने थोडा अदमास घेतला. एवढ्या वेळात वसुधा आणि संपदा दोघीसुद्धा गाडीतून उतरलेल्या होत्या व मुसळधार पावसात एखाद्या मांजरीसारखे आपल्या छत्रीखाली अंग चोरत उभे राहण्याचा प्रयत्न करीत होत्या. वसुधाला पाहताच भास्करच्या कपाळावरील आठ्यांचे जाळे थोडेसे सैलावले.
“या मालकीणबाई…”
“भास्कर… डिकीतलं सर्व सामान खाली उतरव.” लगोलग वसुधा व संपदा पडवीवरती आल्या.
वरुणने गाडीचे चारही दरवाजे बंद करून डिकी उघडली. आतील सामान उतरवण्यास त्याने भास्करला थोडी मदत केली. पण भास्करने त्याला काहीही काम करण्यास मना केले. काही मिनिटांतच ते सर्वजण आत आले.
आत बैठकीची मुख्य खोली. झाडून पुसून व शेण सारवून स्वच्छ केलेली. मध्यभागी एक कंदिल पेटवलेला. बाहेरच्या थंड हवेच्या तुलनेत आत खूप उबदार आणि चैतन्यमयी वाटत होतं.
“भास्कर उद्याच्या उद्या वरुणला गावात घेऊन जा आणि लाईट व फोन कनेक्शन सुरु करुन घ्या.”
“होय मालकीणबाई. पण तसाही लाईट आणि फोनचा इथे फारसा उपयोग होत नाही. लाईट अलिकडे सारखी जात असते. परत कधी येईल याचा काही भरवसा नसतो. फोनसुद्धा तसाच बंद पडतो. कधी चालू असतो तर कधी दोन दोन दिवस बंद असतो.”
“तरीपण शेवटी या आवश्यक गोष्टी आहेतच. उद्या तू आणि वरुण पहिले हे काम करा.”
“ठीक आहे मालकीणबाई. तुम्ही आता पहिले हात पाय धुवून घ्या. मी स्वयंपाकघरात पाणी गरम करायला ठेवलेलं आहे. माझी बायको पण आली आहे इथे स्वयंपाक करायला. अर्ध्या एक तासात गरमागरम भात आमटी तयार होईल. मग लगेच जेवण करून घ्या आणि भरपूर झोप काढा. राहिलेली कामं व साफसफाई उद्या सुरु करता येईल.”
“ठीक आहे.” वसुधाबाई इतकंच बोलून आत स्वयंपाकघराकडे वळल्या.
इकडे संपदा आणि वरुण बाहेर पडवीत जाऊन उभे राहिले. मुसळधार कोसळणाऱ्या पावसाप्रमाणेच त्यांच्या मनात पुढील भविष्यातील विचारांचं वादळ थैमान घालत होतं.
वरुणच्या खांद्यावर अलगद डोके टेकवून संपदा मूकपणे तो अनोखा पाऊस अनुभवीत राहिली.
(क्रमशः)
(संपूर्णतः काल्पनिक कथा)
© विजुभाऊ वाटेगांवकर
मुख्य रस्त्यापासून गाडी डावीकडे गेलेल्या फाट्यावरती वळली. हा रस्ता तुलनेने थोडा अरुंद होता आणि इथे अजिबात कोणतेही वाहन येताजाताना दिसत नव्हते. सर्वत्र पूर्णतः शुकशुकाट होता. दोन्ही बाजूंना कमरेइतक्या उंचीचे हिरव्यागार झुडुपांचे गचपण माजलेले होते. त्यांच्या गळ्यात बाहुपाश अडकवून काही रानफुलांच्या वेलीदेखील अस्ताव्यस्त पसरलेल्या होत्या. त्यांच्या सुंदर आणि मधुर मकरंद भरलेल्या फुलांवर अनेक प्रकारचे कीटक व मधमाशा भुणभुणत होते. या नैसर्गिक कुंपणाच्या थोडे पलिकडेच, काही अंतरावर, गूढ गहन काळ्या अरण्याची सीमा हलके हलके सुरु होत होती.
गाडी साधारण अर्धा एक किलोमीटर पुढे आली असेल. हवेत सर्वत्र एक दमटपणा व थंड आणि जडपणा जाणवत होता. अचानक संपदाची नजर उजवीकडे गेली. लोखंडी तारेच्या कुंपणाने बंदिस्त केलेली एक स्मशानभूमी तिला दिसली. चुन्याची रंगसफेती केलेल्या एकाकी व चैतन्यहीन कबरींच्या काही ओळी तिला दिसल्या. त्यांच्यावरती एक थंडगार मरणप्राय शांतता जणू चादरीसारखी ओढून घेतलेली होती. सततच्या मुसळधार पावसाने त्यांच्यावर शेवाळाचे जाडजूड थर पसरलेले होते. पत्थरांचे जोड किंचीतसे उकलले जाऊन गवताचे लवलव करणारे तुरे बाहेर डोकावत होते आणी पिवळ्या रंगाची एक दोन दगडीची फुले त्यांच्यामधूनच आपले अस्तित्व प्रकट करीत होती.
आणि अचानक त्याच वेळीस तिला ‘तो’ सर्वप्रथम दिसला. एका कबरीपाशी शांतपणे उभा. अंगावर पूर्ण काळा पेहराव. सायंकाळीच्या गदळ प्रकाशात नीटसे काहीच दिसत नव्हते. परंतु तो कोण आहे व असा एकाकी का उभा आहे? हा प्रश्न तिला पडला. भयचकित होऊन तिने आपल्या सासूबाईंकडे पाहिले. परंतु वसुधाचे तिकडे लक्ष नव्हते. ती हातातील एक मासिक वाचण्यात मग्न होती. संपदाने परत त्या कबरस्थानाकडे वळून पाहिले. अर्ध्या सेकंदाहून देखील कमीच वेळ लागला असेल. परंतु तितक्या वेळातच ती काळी सावली तिथून अक्षरशः नाहीशी झालेली होती. घाबरलेल्या संपदाने सरळ डोळे मिटून घेतले.
काही वेळातच गाडी मुख्य गावठाणात प्रवेश करती झाली. आता रस्ता अधिक अरुंद झालेला होता. दोन्ही बाजूला कौलारू छपरांची बुटकीशी व अंधारी भासणारी घरे. पुढची पडवी स्वच्छ शेणाने सारवलेली. जुन्या अस्सल सागवानी लाकडाचे खांब घराचा सगळा भार तोलून धरणारे. त्यांना पाठ टेकवून भकास मुद्रेने व शून्य नजरेने बाहेर पहात बसलेले घरोघरीचे म्हातारे कोतारे लोक. त्यांच्या शेजारीच भकभक जळणारे फडफडत्या ज्योतीचे कंदिल. छपराच्या पागोळ्यांवरून पाण्याची अखंड धार खाली गळत असलेली. शहरी आयुष्याची सवय झालेल्या संपदा आणि वरुणला आता इथे आपला निभाव लागणार का? या चिंतेने ग्रासले.
मध्येच एक दोन ठिकाणी थांबून वरुणने सरदेसायांच्या वाड्याबाबत लोकांना विचारणा केली आणि त्यांनी दिलेल्या सूचनांनुसार गाडी चालवीत चालवीत तो आता गावाच्या थोडेसे बाहेरच व एका उंच टेकडीच्या पायथ्याशी पोहोचला. एव्हाना अंधार चांगलाच दाटलेला होता आणि मुसळधार पाऊस कोसळायला सुरुवात झालेली होती. गाडीच्या हेडलाईट्सच्या प्रकाशात देखील रस्ता नीट दिसत नव्हता. तरी देखील शिताफीने गाडी चालवीत वरुण त्या छोट्याशा टेकडीवर पोहोचला. समोर काही अंतरावरतीच वाड्याची बाह्यरेखा धूसर धूसर दिसू लागलेली होती. आत प्रकाश देखील होता. म्हणजे भास्कर वसुधाबाईंनी सूचना दिल्याप्रमाणे अगोदरच तयारी करण्यासाठी आलेला होता. त्या खडकाळ वाटेवरुन हादरत व आदळत शेवटी एकदाची गाडी त्या वाड्यासमोर पोहोचली.
त्यासरशी वाड्याचे भलेभक्कम दार करकरत उघडले आणि हातातील कंदिल उंचावत भास्कर पडवीमध्ये आला. गाडीच्या आत पहात पहात त्याने थोडा अदमास घेतला. एवढ्या वेळात वसुधा आणि संपदा दोघीसुद्धा गाडीतून उतरलेल्या होत्या व मुसळधार पावसात एखाद्या मांजरीसारखे आपल्या छत्रीखाली अंग चोरत उभे राहण्याचा प्रयत्न करीत होत्या. वसुधाला पाहताच भास्करच्या कपाळावरील आठ्यांचे जाळे थोडेसे सैलावले.
“या मालकीणबाई…”
“भास्कर… डिकीतलं सर्व सामान खाली उतरव.” लगोलग वसुधा व संपदा पडवीवरती आल्या.
वरुणने गाडीचे चारही दरवाजे बंद करून डिकी उघडली. आतील सामान उतरवण्यास त्याने भास्करला थोडी मदत केली. पण भास्करने त्याला काहीही काम करण्यास मना केले. काही मिनिटांतच ते सर्वजण आत आले.
आत बैठकीची मुख्य खोली. झाडून पुसून व शेण सारवून स्वच्छ केलेली. मध्यभागी एक कंदिल पेटवलेला. बाहेरच्या थंड हवेच्या तुलनेत आत खूप उबदार आणि चैतन्यमयी वाटत होतं.
“भास्कर उद्याच्या उद्या वरुणला गावात घेऊन जा आणि लाईट व फोन कनेक्शन सुरु करुन घ्या.”
“होय मालकीणबाई. पण तसाही लाईट आणि फोनचा इथे फारसा उपयोग होत नाही. लाईट अलिकडे सारखी जात असते. परत कधी येईल याचा काही भरवसा नसतो. फोनसुद्धा तसाच बंद पडतो. कधी चालू असतो तर कधी दोन दोन दिवस बंद असतो.”
“तरीपण शेवटी या आवश्यक गोष्टी आहेतच. उद्या तू आणि वरुण पहिले हे काम करा.”
“ठीक आहे मालकीणबाई. तुम्ही आता पहिले हात पाय धुवून घ्या. मी स्वयंपाकघरात पाणी गरम करायला ठेवलेलं आहे. माझी बायको पण आली आहे इथे स्वयंपाक करायला. अर्ध्या एक तासात गरमागरम भात आमटी तयार होईल. मग लगेच जेवण करून घ्या आणि भरपूर झोप काढा. राहिलेली कामं व साफसफाई उद्या सुरु करता येईल.”
“ठीक आहे.” वसुधाबाई इतकंच बोलून आत स्वयंपाकघराकडे वळल्या.
इकडे संपदा आणि वरुण बाहेर पडवीत जाऊन उभे राहिले. मुसळधार कोसळणाऱ्या पावसाप्रमाणेच त्यांच्या मनात पुढील भविष्यातील विचारांचं वादळ थैमान घालत होतं.
वरुणच्या खांद्यावर अलगद डोके टेकवून संपदा मूकपणे तो अनोखा पाऊस अनुभवीत राहिली.
(क्रमशः)
(संपूर्णतः काल्पनिक कथा)
© विजुभाऊ वाटेगांवकर