गहिरे पाणी… (भाग – ६)
“होय… आपल्या पूर्वजांचं गाव… अंधारबाव…” वसुधा ठामपणे उद्गारली.
“वरुण व संपदा दोघेही तिच्याकडे अविश्वासाने पाहू लागले.
कदाचित आईला आजपण काही वेडाचा झटका नाही ना आलेला?
“आई? तू ठीक तर आहेस ना? आपण ते गांव सोडलेल्यास किती वर्षे होऊन गेली? खुद्द बाबांचा किती विरोध होता गावी परत जायला? आपली जमीन सुद्धा आता तिथल्या लोकांनी आपापसात वाटून खाऊन टाकली असेल. काय मिळणार आहे आपल्याला तिथे जाऊन?”
“वरुण, आपण तिथे जमीनीसाठी नाहीये जात. मला तितकं नक्कीच समजतं….. संपदा! तुला मूल हवं आहे ना?” वसुधाने संपदाकडे रोखून बघत प्रश्न केला.
“हो… पण गावी जाणे काही कळलं नाही मला?” संपदाने चाचरत विचारले.
“संबंध आहे संपदा! मी तुला आत्ता या क्षणी तरी काही सांगू शकत नाही. योग्य वेळ येताच तुला पुढचे सर्व खुलासे आपोआप होत जातील. परंतु तिथे गेल्यावर तुम्हा दोघांचं तुमच्या स्वतःच्या मुलाचं स्वप्न नक्कीच पूर्णत्वास जाईल हे मी ठामपणे सांगते.”
“खरंच असं होऊ शकतं? कालसुद्धा तुम्हाला एका आत्म्याचा संचार झालेला असताना तुम्ही हेच म्हणत होतात…” संपदाच्या चेहऱ्यावर आता एक नवीनच आशेचा किरण दिसू लागलेला होता.
“होय संपदा. तुम्हा दोघांना जर स्वतःचं मूल हवं असेल तर आपल्याला अंधारबावला जावेच लागेल. मी तुला पूर्ण खात्री देते की मी सांगते तसं ऐकलंत तर तुमच्या दोघांच्या आईबाप होण्याच्या मार्गातील एक मोठीच धोंड आपसूक बाजूला होणार आहे.”
“आई पण या दोन्ही गोष्टींचा काय संबंध तरी आहे का?” वरुणने वैतागून विचारले.
“वरुण तुला सध्या तरी मी काहीच सांगू शकत नाही. माझे ऐकायचे की नाही हे तुम्ही आजच्या आज ठरवा आणि मला सांगा. आपण मग उद्या सकाळी बाहेर पडूयात.”
वरुणने वैतागून जाऊन मान हलवली. "मी नोकरी सोडून तिथं कसा येऊन राहू?"
"एकदीड वर्षं ही काही फार मोठी किंमत नाहीये आपल्या स्वतःच्या मुलासाठी! बघा... विचार करा आणि मला संध्याकाळपर्यंत सांगा.” एवढे बोलून वसुधा तिथून निघून गेली.
वरुण तिथेच सोफ्यावर हताश होऊन बसलेला होता. संपदा आतून चहा घेऊन आली. तिचा चेहरा पाहूनच तिला खूप काही बोलायचे आहे याची वरुणला कल्पना आली.
“बोल संपदा. तुला काहीतरी विचारायचे आहे.”
“होय वरुण. हे अंधारबाव काय प्रकरण आहे?”
“संपदा, हे आमच्या पूर्वजांचं गांव. मी खूप लहान असताना आम्ही तिथे राहत होतो. मी काहीतरी सात की आठ वर्षांचा असताना बाबांनी अचानक एका रात्रीत ते गाव सोडलं आणि मला व आईला घेऊन सांगलीला आले. बास त्यानंतर त्या गावाशी फारसा संपर्क नाही. परंतु अधूनमधून बाबांच्याकडून त्या गावाविषयी काही ऐकायला मिळत असे.”
“म्हणजे काय ऐकलंय नक्की?”
“अंधारबाव पूर्वी खूप खूप समृद्ध आणि सुखी गांव होतं. गावातील लोक एकमेकांना अडीअडचणीच्या प्रसंगी धावून जाऊन मदत करीत समाधानी जीवन जगत होते. पण या सगळ्याला कशी कोण जाणे वाईट नजर लागली. पावसाळ्याच्या एका रात्री त्या गावात एका अघोरी साधूचा फेरा पडला. भयानक पाऊस कोसळत होता. त्या साधूने गावातील अनेक दारे खटखटवली. परंतु त्याचा भीषण अवतार पाहून त्याला कुणी आश्रय तर सोडाच, परंतु एखादे पांघरुण किंवा घासभर भाजीभाकरी देखील दिली नाही. अपमानित झालेल्या साधूने गावाला शाप दिला की “हे गांव कायम अंधारात राहील.” आणि भूक व थंडीने व्याकूळ झालेल्या साधूने प्राण सोडला. जुने लोक असं सांगतात की त्याच पहाटेला गावाच्या मावळतीकडून उंचच उंच पर्वत जमिनीतून वर आले आणि त्यांनी सगळ्या गावावर अंधःकार पसरवला. तेव्हांपासून त्या गावाचं नाव पडलं अंधारबाव. अशी ही थोडक्यात कथा.”
संपदा डोळे विस्फारून त्याच्याकडे पहात होती.
वरुण हसून पुढे बोलू लागला, “अर्थात या सर्व भाकडकथा. माझा त्यांच्यावर अजिबात विश्वास नाही. परंतु काहीतरी विचित्र आहे खरं त्या गावाच्या बाबतीत! बाबा त्या गावची आठवण काढली तरी दचकायचे. एवढं काय आहे तिथे ते समजत नाही. असो. पण आता आपण काय निर्णय घेऊयात?"
“वरुण, मला तिथे जायचं आहे. मी आई सांगतील ते करायला तयार आहे. आणि तुला सुद्धा माझ्यासाठी हो म्हणावेच लागेल.”
“बरं ठीक आहे. तुझ्या इच्छेपुढे मला नोकरी फारशी महत्वाची नाही. आपण उद्या सकाळीच निघूयात. मग तर ठीक आहे ना?” तो संपदाकडे पाहून हसला.
तिच्या प्रसन्न चेहेऱ्यावरील लाखो लाखो चिंता अलगद विरघळून जाताना पाहून त्याला खूप बरं वाटलं.
(क्रमशः)
(संपूर्णतः काल्पनिक कथा)
© विजुभाऊ वाटेगांवकर
“होय… आपल्या पूर्वजांचं गाव… अंधारबाव…” वसुधा ठामपणे उद्गारली.
“वरुण व संपदा दोघेही तिच्याकडे अविश्वासाने पाहू लागले.
कदाचित आईला आजपण काही वेडाचा झटका नाही ना आलेला?
“आई? तू ठीक तर आहेस ना? आपण ते गांव सोडलेल्यास किती वर्षे होऊन गेली? खुद्द बाबांचा किती विरोध होता गावी परत जायला? आपली जमीन सुद्धा आता तिथल्या लोकांनी आपापसात वाटून खाऊन टाकली असेल. काय मिळणार आहे आपल्याला तिथे जाऊन?”
“वरुण, आपण तिथे जमीनीसाठी नाहीये जात. मला तितकं नक्कीच समजतं….. संपदा! तुला मूल हवं आहे ना?” वसुधाने संपदाकडे रोखून बघत प्रश्न केला.
“हो… पण गावी जाणे काही कळलं नाही मला?” संपदाने चाचरत विचारले.
“संबंध आहे संपदा! मी तुला आत्ता या क्षणी तरी काही सांगू शकत नाही. योग्य वेळ येताच तुला पुढचे सर्व खुलासे आपोआप होत जातील. परंतु तिथे गेल्यावर तुम्हा दोघांचं तुमच्या स्वतःच्या मुलाचं स्वप्न नक्कीच पूर्णत्वास जाईल हे मी ठामपणे सांगते.”
“खरंच असं होऊ शकतं? कालसुद्धा तुम्हाला एका आत्म्याचा संचार झालेला असताना तुम्ही हेच म्हणत होतात…” संपदाच्या चेहऱ्यावर आता एक नवीनच आशेचा किरण दिसू लागलेला होता.
“होय संपदा. तुम्हा दोघांना जर स्वतःचं मूल हवं असेल तर आपल्याला अंधारबावला जावेच लागेल. मी तुला पूर्ण खात्री देते की मी सांगते तसं ऐकलंत तर तुमच्या दोघांच्या आईबाप होण्याच्या मार्गातील एक मोठीच धोंड आपसूक बाजूला होणार आहे.”
“आई पण या दोन्ही गोष्टींचा काय संबंध तरी आहे का?” वरुणने वैतागून विचारले.
“वरुण तुला सध्या तरी मी काहीच सांगू शकत नाही. माझे ऐकायचे की नाही हे तुम्ही आजच्या आज ठरवा आणि मला सांगा. आपण मग उद्या सकाळी बाहेर पडूयात.”
वरुणने वैतागून जाऊन मान हलवली. "मी नोकरी सोडून तिथं कसा येऊन राहू?"
"एकदीड वर्षं ही काही फार मोठी किंमत नाहीये आपल्या स्वतःच्या मुलासाठी! बघा... विचार करा आणि मला संध्याकाळपर्यंत सांगा.” एवढे बोलून वसुधा तिथून निघून गेली.
वरुण तिथेच सोफ्यावर हताश होऊन बसलेला होता. संपदा आतून चहा घेऊन आली. तिचा चेहरा पाहूनच तिला खूप काही बोलायचे आहे याची वरुणला कल्पना आली.
“बोल संपदा. तुला काहीतरी विचारायचे आहे.”
“होय वरुण. हे अंधारबाव काय प्रकरण आहे?”
“संपदा, हे आमच्या पूर्वजांचं गांव. मी खूप लहान असताना आम्ही तिथे राहत होतो. मी काहीतरी सात की आठ वर्षांचा असताना बाबांनी अचानक एका रात्रीत ते गाव सोडलं आणि मला व आईला घेऊन सांगलीला आले. बास त्यानंतर त्या गावाशी फारसा संपर्क नाही. परंतु अधूनमधून बाबांच्याकडून त्या गावाविषयी काही ऐकायला मिळत असे.”
“म्हणजे काय ऐकलंय नक्की?”
“अंधारबाव पूर्वी खूप खूप समृद्ध आणि सुखी गांव होतं. गावातील लोक एकमेकांना अडीअडचणीच्या प्रसंगी धावून जाऊन मदत करीत समाधानी जीवन जगत होते. पण या सगळ्याला कशी कोण जाणे वाईट नजर लागली. पावसाळ्याच्या एका रात्री त्या गावात एका अघोरी साधूचा फेरा पडला. भयानक पाऊस कोसळत होता. त्या साधूने गावातील अनेक दारे खटखटवली. परंतु त्याचा भीषण अवतार पाहून त्याला कुणी आश्रय तर सोडाच, परंतु एखादे पांघरुण किंवा घासभर भाजीभाकरी देखील दिली नाही. अपमानित झालेल्या साधूने गावाला शाप दिला की “हे गांव कायम अंधारात राहील.” आणि भूक व थंडीने व्याकूळ झालेल्या साधूने प्राण सोडला. जुने लोक असं सांगतात की त्याच पहाटेला गावाच्या मावळतीकडून उंचच उंच पर्वत जमिनीतून वर आले आणि त्यांनी सगळ्या गावावर अंधःकार पसरवला. तेव्हांपासून त्या गावाचं नाव पडलं अंधारबाव. अशी ही थोडक्यात कथा.”
संपदा डोळे विस्फारून त्याच्याकडे पहात होती.
वरुण हसून पुढे बोलू लागला, “अर्थात या सर्व भाकडकथा. माझा त्यांच्यावर अजिबात विश्वास नाही. परंतु काहीतरी विचित्र आहे खरं त्या गावाच्या बाबतीत! बाबा त्या गावची आठवण काढली तरी दचकायचे. एवढं काय आहे तिथे ते समजत नाही. असो. पण आता आपण काय निर्णय घेऊयात?"
“वरुण, मला तिथे जायचं आहे. मी आई सांगतील ते करायला तयार आहे. आणि तुला सुद्धा माझ्यासाठी हो म्हणावेच लागेल.”
“बरं ठीक आहे. तुझ्या इच्छेपुढे मला नोकरी फारशी महत्वाची नाही. आपण उद्या सकाळीच निघूयात. मग तर ठीक आहे ना?” तो संपदाकडे पाहून हसला.
तिच्या प्रसन्न चेहेऱ्यावरील लाखो लाखो चिंता अलगद विरघळून जाताना पाहून त्याला खूप बरं वाटलं.
(क्रमशः)
(संपूर्णतः काल्पनिक कथा)
© विजुभाऊ वाटेगांवकर