गहिरे पाणी… (भाग – ५)
क्रिस्टीनाच्या घरातून जेव्हां वरुण, संपदा आणि वसुधाबाई बाहेर पडले, तेव्हां रात्रीचे एक वाजून गेलेले होते. पाऊस पूर्णतः थांबलेला होता. आकाश थोडंसं मोकळं झालेलं होतं आणि पौर्णिमेचा चंद्र हलकेच काळसर ढगांच्या आवरणामागून प्रकाशित होत होता. खिडकीतून बाहरचे गार वारे आत येऊन किंचीत हुडहुडी भरत होती.
गाडीत कुणीच कुणाशी बोलत नव्हतं. एक प्रकारची विचित्र शांतता पसरलेली होती. परंतु वरुण व संपदा दोघेही मघाच्याच घटनेचा मनातल्या मनात विचार करीत होते. अधून मधून ते एक चोरटी नजर वसुधाबाईंकडे देखील फिरवीत होते. काय झालं असेल नक्की मघाशी? याचा विचार त्यांना पोखरून टाकत होता. परंतु वसुधाबाईंना मात्र यापैकी कशाशीच घेणंदेणं नसावं असं त्यांच्याकडे पाहून वाटत होतं.
वरुणच्या डोक्यात अखंड विचारचक्र चालूच होतं. मघाशी आपण जे पाहिलं ते खरोखरीच आईला एखाद्या भुताने झपाटलेलं होतं का? हा विचार त्याच्या मनात आला आणि क्षणभर वरुणला स्वतःचीच लाज वाटली. आपण तर नास्तिक आहोत ना? मग आपण भीत का आहोत नक्की?
जर ईश्वर पण नाही तर मग भूत तरी कुठून येणार? पण मग मघाशी जे घडलं ते नक्की काय होतं? आपल्या या अनेक वर्षे डिप्रेशनमध्ये गेलेल्या आईमध्ये इतकी ताकद कुठून आली? आपण तर कायम तिला चैतन्यहीन, निरुत्साही आणि अँटीडिप्रेशनच्या गोळ्या खाऊन सुम्म पडलेलं पाहिलंय! मग आज अचानक तिच्यात इतका आत्मविश्वास… इतकी स्फूर्ती… इतका बेडरपणा कुठून आला? की ही आता आणखी कुठल्या एका नवीन रोगाची सुरुवात आहे?
हा विचार मनात आल्या आल्या वरुणला एकदम रिलॅक्स वाटलं. नक्कीच तिचं डिप्रेशन आता आणखी
कोणत्यातरी गुंतागुतीच्या मानसिक रोगामध्ये बदलत चाललेलं आहे! ते मघाचं झपाटणं वगैरे सगळं सगळं त्या मानसिक रोगाचाच परीणाम असावा.
या शक्यतेवर विचार करून त्याला एकाच वेळीस थोडंसं बरं पण वाटलं आणि त्याच वेळीस थोडीशी चिंता पण वाटली. मूल होत नाही म्हणून झुरणाऱ्या बायकोला सांभाळायचं की मानसिक वेडसरपणाकडे झुकत चाललेल्या आईची काळजी करायची?
शेवटी कधीतरी त्यांची गाडी विश्रामबाग परिसरातील त्यांच्या ‘आनंद’ या छोट्याश्या बंगल्यासमोर पोहोचली. अद्यापि लाईट्स आलेले नव्हते. सर्वत्र काळोख साचलेला होता. फाटकापासून आतपर्यंत अभेद्य अंधाराचा समुद्र हेलकावे खात होता. न जाणो काय काय दडून बसलेलं असेल या अंधारात?
मघाचा प्रसंग आठवून वरुण व संपदा यांच्या अंगावर एक जोरदार शहारा येऊन गेला. पण अचानक एक आश्चर्यकारक घटना घडली. वसुधाने पटकन कारचा दरवाजा उघडला आणि तशीच एकदम घनदाट अंधारात ती फाटक उघडून त्या बंगल्याकडे एकटीच चालत निघाली! जवळ किंवा आजूबाजूला कोणतेही प्रकाशाचे साधन नव्हते.
वरुण व संपदा यांनी एकमेकांकडे सूचकतेने पाहिले. वरुणने पटकन गाडी स्टार्ट केली आणी थोडी उजवीकडे वळवून तिच्या हेडलाईटचा प्रकाश समोर टाकला.
“संपदा तू जा पटकन आईसोबत पुढे. ही माझी टॉर्च पण ठेव सोबत. आईला दरवाजा उघडून आत बसव. मेणबत्त्या लाव. मी तोवर इथे हेडलाईट चालूच ठेवतो. तुमची कामं आटोपली की मग मी येतो.”
“ठीक आहे.” असं बोलून संपदा लगेच आपल्या सासूच्या दिशेने धावत सुटली.
वरुणने गाडीचे इंजिन व हेडलाईट चालू ठेवले आणि तो सहज टाईमपास करायला शीळ वाजवू लागला. अचानक त्याला मागून कोणतीतरी गाडी आल्यासारखे वाटले म्हणून त्याने मागे पाहिले. परंतु मागे तर काहीच नव्हते.
अचानक त्याची नजर समोर कशाकडे तरी खेचली गेली आणि तो आश्चर्याने एकदम थरारला. समोर पाहतो तो काय! गाडीच्या पिवळ्या हेडलाईटच्या प्रकाशात त्याची आई, वसुधाबाई, तिची उंची एकदम ताडमाड झालेली! लांबलांब पावले टाकीत ती एखाद्या वादळवाऱ्यात झुलणाऱ्या नारळाच्या झाडासारखी झुलत होती. आणि तिच्या शेजारूनच चालणाऱ्या संपदाला याचे काहीही भान नव्हते. ती जणूकाही मंतरल्यासारखी समोर बंगल्याच्या दिशेने एकटक चालत होती.
वरुणने घाबरून जाऊन संपदाला जोरदार हाक मारली. त्यासरशी तिने मागे वळून पाहिले व हातानेच “काय झाले?” अशी खूण केली. त्यासरशी अचानक जोरदार एक वावडी उठली आणि वरुणच्या डोळ्यांत बारीकसा कचरा गेला. पटकन त्याने डोळे झाकून घेतले आणि पालथ्या मुठींनी जोरजोरात चोळले.
डोळे थोडेसे स्थिर झाल्यानंतर त्याने चटकन पुढे बघितले. काही क्षणच गेले असतील. पण समोर पाहतो तो त्याची आई वसुधाबाई… अगदी पूर्ववत… अगदी सामान्य… आणि संपदा व ती... या दोघीही मागे वळून त्याच्याकडे आश्चर्याने पाहत आहेत व त्याला “काय झाले?” म्हणून खुणेने विचारत आहेत.
“काही नाही. ठिक आहे. जा तुम्ही पुढे.”
वरुण आता वैतागलेला होता. आजचा दिवस असा का जात होता कळत नव्हते. आईसोबत त्याला सुद्धा मानसिक आजार सुरु झाला की काय अशी त्याला शंका येऊ लागली. त्या दोघी घरात गेल्यानंतर गाडी बंद करून तो घरात गेला, ते थेट आपल्या खोलीत जाऊन कुणाशीही न बोलता सरळ झोपी गेला.
दुसऱ्या दिवशी संपदाने त्याला उठवले तेव्हां नऊ वाजून गेलेले होते. ऑफीसला 'सिक नोट' पाठवायची आणि आजचा दिवस निवांत घरी घालवायचा असा त्याने निश्चय केला. सुट्टी मिळणार या विचाराने त्याला थोडा आनंद वाटला.
पण तितक्यात कालच्या भयावह आठवणींनी पुन्हा एकदा नव्या सोनेरी दिवसावर नैराश्याचे अभद्र मळभ आणले.
बाहेर हॉलमध्ये तो आला तेव्हां वसुधाबाई खिडकीपाशी चहा पीत निवांत बसलेल्या होत्या. त्यांचं हे वागणं अनपेक्षित होतं. स्वतःची अंधारी खोली सोडली तर त्या इतर कुठे फारसे जात नसत.
“आई तुला ठीक वाटतंय?”
“हं… ठीक आहे मी.” वसुधाचं तुटक उत्तर.
वरुणने संपदाकडे सूचक पाहिले. तितक्यात वसुधा शांत व ठाम आवाजात बोलू लागली.
“आपण उद्याच अंधारबावला निघायचंय.”
“अंधारबाव???” वरुण आणि संपदा एकदम आश्चर्याने मोठ्या आवाजात ओरडले.
(क्रमशः)
(संपूर्णतः काल्पनिक कथा)
© विजुभाऊ वाटेगांवकर
क्रिस्टीनाच्या घरातून जेव्हां वरुण, संपदा आणि वसुधाबाई बाहेर पडले, तेव्हां रात्रीचे एक वाजून गेलेले होते. पाऊस पूर्णतः थांबलेला होता. आकाश थोडंसं मोकळं झालेलं होतं आणि पौर्णिमेचा चंद्र हलकेच काळसर ढगांच्या आवरणामागून प्रकाशित होत होता. खिडकीतून बाहरचे गार वारे आत येऊन किंचीत हुडहुडी भरत होती.
गाडीत कुणीच कुणाशी बोलत नव्हतं. एक प्रकारची विचित्र शांतता पसरलेली होती. परंतु वरुण व संपदा दोघेही मघाच्याच घटनेचा मनातल्या मनात विचार करीत होते. अधून मधून ते एक चोरटी नजर वसुधाबाईंकडे देखील फिरवीत होते. काय झालं असेल नक्की मघाशी? याचा विचार त्यांना पोखरून टाकत होता. परंतु वसुधाबाईंना मात्र यापैकी कशाशीच घेणंदेणं नसावं असं त्यांच्याकडे पाहून वाटत होतं.
वरुणच्या डोक्यात अखंड विचारचक्र चालूच होतं. मघाशी आपण जे पाहिलं ते खरोखरीच आईला एखाद्या भुताने झपाटलेलं होतं का? हा विचार त्याच्या मनात आला आणि क्षणभर वरुणला स्वतःचीच लाज वाटली. आपण तर नास्तिक आहोत ना? मग आपण भीत का आहोत नक्की?
जर ईश्वर पण नाही तर मग भूत तरी कुठून येणार? पण मग मघाशी जे घडलं ते नक्की काय होतं? आपल्या या अनेक वर्षे डिप्रेशनमध्ये गेलेल्या आईमध्ये इतकी ताकद कुठून आली? आपण तर कायम तिला चैतन्यहीन, निरुत्साही आणि अँटीडिप्रेशनच्या गोळ्या खाऊन सुम्म पडलेलं पाहिलंय! मग आज अचानक तिच्यात इतका आत्मविश्वास… इतकी स्फूर्ती… इतका बेडरपणा कुठून आला? की ही आता आणखी कुठल्या एका नवीन रोगाची सुरुवात आहे?
हा विचार मनात आल्या आल्या वरुणला एकदम रिलॅक्स वाटलं. नक्कीच तिचं डिप्रेशन आता आणखी
कोणत्यातरी गुंतागुतीच्या मानसिक रोगामध्ये बदलत चाललेलं आहे! ते मघाचं झपाटणं वगैरे सगळं सगळं त्या मानसिक रोगाचाच परीणाम असावा.
या शक्यतेवर विचार करून त्याला एकाच वेळीस थोडंसं बरं पण वाटलं आणि त्याच वेळीस थोडीशी चिंता पण वाटली. मूल होत नाही म्हणून झुरणाऱ्या बायकोला सांभाळायचं की मानसिक वेडसरपणाकडे झुकत चाललेल्या आईची काळजी करायची?
शेवटी कधीतरी त्यांची गाडी विश्रामबाग परिसरातील त्यांच्या ‘आनंद’ या छोट्याश्या बंगल्यासमोर पोहोचली. अद्यापि लाईट्स आलेले नव्हते. सर्वत्र काळोख साचलेला होता. फाटकापासून आतपर्यंत अभेद्य अंधाराचा समुद्र हेलकावे खात होता. न जाणो काय काय दडून बसलेलं असेल या अंधारात?
मघाचा प्रसंग आठवून वरुण व संपदा यांच्या अंगावर एक जोरदार शहारा येऊन गेला. पण अचानक एक आश्चर्यकारक घटना घडली. वसुधाने पटकन कारचा दरवाजा उघडला आणि तशीच एकदम घनदाट अंधारात ती फाटक उघडून त्या बंगल्याकडे एकटीच चालत निघाली! जवळ किंवा आजूबाजूला कोणतेही प्रकाशाचे साधन नव्हते.
वरुण व संपदा यांनी एकमेकांकडे सूचकतेने पाहिले. वरुणने पटकन गाडी स्टार्ट केली आणी थोडी उजवीकडे वळवून तिच्या हेडलाईटचा प्रकाश समोर टाकला.
“संपदा तू जा पटकन आईसोबत पुढे. ही माझी टॉर्च पण ठेव सोबत. आईला दरवाजा उघडून आत बसव. मेणबत्त्या लाव. मी तोवर इथे हेडलाईट चालूच ठेवतो. तुमची कामं आटोपली की मग मी येतो.”
“ठीक आहे.” असं बोलून संपदा लगेच आपल्या सासूच्या दिशेने धावत सुटली.
वरुणने गाडीचे इंजिन व हेडलाईट चालू ठेवले आणि तो सहज टाईमपास करायला शीळ वाजवू लागला. अचानक त्याला मागून कोणतीतरी गाडी आल्यासारखे वाटले म्हणून त्याने मागे पाहिले. परंतु मागे तर काहीच नव्हते.
अचानक त्याची नजर समोर कशाकडे तरी खेचली गेली आणि तो आश्चर्याने एकदम थरारला. समोर पाहतो तो काय! गाडीच्या पिवळ्या हेडलाईटच्या प्रकाशात त्याची आई, वसुधाबाई, तिची उंची एकदम ताडमाड झालेली! लांबलांब पावले टाकीत ती एखाद्या वादळवाऱ्यात झुलणाऱ्या नारळाच्या झाडासारखी झुलत होती. आणि तिच्या शेजारूनच चालणाऱ्या संपदाला याचे काहीही भान नव्हते. ती जणूकाही मंतरल्यासारखी समोर बंगल्याच्या दिशेने एकटक चालत होती.
वरुणने घाबरून जाऊन संपदाला जोरदार हाक मारली. त्यासरशी तिने मागे वळून पाहिले व हातानेच “काय झाले?” अशी खूण केली. त्यासरशी अचानक जोरदार एक वावडी उठली आणि वरुणच्या डोळ्यांत बारीकसा कचरा गेला. पटकन त्याने डोळे झाकून घेतले आणि पालथ्या मुठींनी जोरजोरात चोळले.
डोळे थोडेसे स्थिर झाल्यानंतर त्याने चटकन पुढे बघितले. काही क्षणच गेले असतील. पण समोर पाहतो तो त्याची आई वसुधाबाई… अगदी पूर्ववत… अगदी सामान्य… आणि संपदा व ती... या दोघीही मागे वळून त्याच्याकडे आश्चर्याने पाहत आहेत व त्याला “काय झाले?” म्हणून खुणेने विचारत आहेत.
“काही नाही. ठिक आहे. जा तुम्ही पुढे.”
वरुण आता वैतागलेला होता. आजचा दिवस असा का जात होता कळत नव्हते. आईसोबत त्याला सुद्धा मानसिक आजार सुरु झाला की काय अशी त्याला शंका येऊ लागली. त्या दोघी घरात गेल्यानंतर गाडी बंद करून तो घरात गेला, ते थेट आपल्या खोलीत जाऊन कुणाशीही न बोलता सरळ झोपी गेला.
दुसऱ्या दिवशी संपदाने त्याला उठवले तेव्हां नऊ वाजून गेलेले होते. ऑफीसला 'सिक नोट' पाठवायची आणि आजचा दिवस निवांत घरी घालवायचा असा त्याने निश्चय केला. सुट्टी मिळणार या विचाराने त्याला थोडा आनंद वाटला.
पण तितक्यात कालच्या भयावह आठवणींनी पुन्हा एकदा नव्या सोनेरी दिवसावर नैराश्याचे अभद्र मळभ आणले.
बाहेर हॉलमध्ये तो आला तेव्हां वसुधाबाई खिडकीपाशी चहा पीत निवांत बसलेल्या होत्या. त्यांचं हे वागणं अनपेक्षित होतं. स्वतःची अंधारी खोली सोडली तर त्या इतर कुठे फारसे जात नसत.
“आई तुला ठीक वाटतंय?”
“हं… ठीक आहे मी.” वसुधाचं तुटक उत्तर.
वरुणने संपदाकडे सूचक पाहिले. तितक्यात वसुधा शांत व ठाम आवाजात बोलू लागली.
“आपण उद्याच अंधारबावला निघायचंय.”
“अंधारबाव???” वरुण आणि संपदा एकदम आश्चर्याने मोठ्या आवाजात ओरडले.
(क्रमशः)
(संपूर्णतः काल्पनिक कथा)
© विजुभाऊ वाटेगांवकर