गहिरे पाणी… (भाग – ९)
दुसऱ्या दिवशी सकाळीच वरुण आणि भास्कर लाईट व टेलीफोनच्या कामासाठी गावात गेले. कामं उरकून परत येण्यास त्यांना बराच वेळ झाला. ते दोघे परत आल्यावर संपदाने पाहिले तर वरुणचा चेहरा बराच तणावात होता.
“काय झालं? कामं झाली नाहीत का?”
“नाही. तसं काही नाही.”
“मी सांगतो.” भास्कर पुढे येत बोलला. “बाईसाहेब, कामं तर सगळी झाली ठीकठाक. पण गावातील लोकांत मात्र तुम्ही परत आल्यामुळे फार खळबळ उडालेली आहे. त्यांना असं वाटतंय की सरदेसायांची जमीन परत ताब्यात घेण्यासाठीच तुम्ही सर्वजण येथे आलेले आहात. आम्ही गावातून फिरत असताना लोक साहेबांकडे रागाने व संशयाने बघत होते. आता माझं एक म्हणणं गंभीरपणे ऐका… की थोडे दिवस साहेबांना अजिबात बाहेर एकटे जाऊ देऊ नका. उगाच कुणाशी वादावादी झाली तर नको तो प्रसंग उभा रहायचा.”
सर्वांना जेवणासाठी पाने मांडता मांडता संपदा शांतपणे, भास्कर सांगत असलेल्या, गावातील अंतर्गत घडामोडी ऐकत राहिली.
आणि या दिवसानंतर सुरु झाला… त्या सर्वांची परीक्षा पाहणारा काळ…
दिवसभर त्या शापित गावात कायम अंधारलेलं ढगाळ वातावरण असे. आजूबाजूच्या उंच उंच डोंगररांगांमुळे दिवसातून सूर्यप्रकाश फार कमी वेळ मिळत असे. दिवसाचे चोवीस तास घरे अंधारात बुडालेली असत. सकाळी उठल्यापासून घरात चिमण्या अथवा कंदिल लावावे लागत असत. त्याशिवाय ते अवकळेचं वातावरण दूर होत नसे.
संपदा आणि वरुणला शहरी जीवनशैलीची सवय झालेली होती. या आडवळणी गावात येऊन त्यांना अक्षरशः तुरुंगात डांबल्यासारखं झालेलं होतं. गावातील लोकांनी त्यांच्यावर एक अघोषित बहिष्कारच जणू टाकलेला होता! त्यामुळे कुणाच्या घरी जाणे येणे पण शक्य नव्हते. संपदा केवळ वसुधाबाईंच्या शब्दांवर विश्वास टाकून इथे आलेली होती. तिच्या मनातील एक अंधुकशी आशाच तिला त्या खडतर काळात टिकून राहण्यास मदत करत होती. याउलट वरुण मात्र इथे आल्यापासून चिडचिडा व अस्वस्थ झालेला होता. त्याची समजूत काढता काढता संपदाला स्वतःलाच खूप मनस्ताप होत होता.
या सर्व निराशाजनक वातावरणात एक व्यक्ती मात्र काहीही काळजी नसल्यासारखी वागत होती. ती व्यक्ती म्हणजे वसुधाबाई. त्यांच्या वागण्यात आता पूर्वीचाच अलिप्तपणा परतून आलेला होता. त्या दिवसचे दिवस एका अंधाऱ्या खोलीत स्वतःला कोंडून घेत असत. कुणाशीही काहीही बोलणे होत नसे. त्या खोलीत एखाद्या कोपऱ्यात एक उदासवाणा धुरकट कंदिल पेटवून ठेवलेला असे. त्याच्याकडे पहात त्या अगम्य भाषेत काहीतरी बडबडत तासनतास बसत असत. संपदाला त्या खोलीत जायची देखील भीति वाटत असे. वसुधाबाईंची विचित्र भाषा पण तिला कमालीची भयकारक वाटत असे. कुठून शिकल्या आहेत त्या ही असली विचित्र भाषा? अंगावर शेकडो कृमीकीटक वळवळत जावेत तसं काहीसं वाटत असे ती भाषा ऐकून!
एक गोष्ट मात्र फार आश्चर्यकारक घडत होती. दर शनीवारी वसुधाबाई सायंकाळी घराबाहेर पडत. त्यांच्या हातात कसली तरी पिशवी असे. त्या पिशवीत काहीतरी कोंबल्यासारखं दिसत असे. त्या पिशवीतून ‘त्या’ कुणीतरी जीवाच्या आकांताने पाय फडफडलेले दिसत असत. घरातून निघताना एक मोठा चाकू सुद्धा त्यांच्यासोबत घेतलेला असे. देवघरातील उदबत्ती, रांगोळी, हळद कुंकू, काडीपेटी या सर्व गोष्टी पुडीत बांधून घेतलेल्या असत. संध्याकाळी बाहेर पडले की त्यांना परत येण्यास खूप रात्र होत असे. वरुण आणि संपदाने त्यांना याबाबत प्रश्न विचारण्याचे अनेक प्रयत्न केले. परंतु त्यांना कोणतेही समाधानकारक उत्तर मात्र कधीच मिळाले नाही. शेवटी एखाद्या स्थानिक देवतेची पूजा वगैरे करण्यासाठी त्या जात असाव्यात, असा समज करून घेऊन वरुण व संपदाने तिकडे दुर्लक्ष केले.
अंधारबावला आलेल्यास आता सहा महिने उलटून गेलेले होते. संपदाला गर्भधारणेची चाहूल लागलेली होती. ही बातमी तिने वसुधा आणी वरुण दोघांना सांगितली. वरुण त्या दिवशी खूप आनंदी होता. परंतु ही बातमी ऐकून वसुधाच्या चेहेऱ्यावर मात्र कसलेतरी विचित्र पाशवी भाव झळकले. आपल्याच आनंदात डुबक्या घेत असलेल्या वरुण व संपदा दोघांच्याही ते लक्षात आले नाही.
संध्याकाळची जेवणाची वेळ. खोलीच्या मध्यभागी ठेवलेला एक धुरकट कंदिल. त्याच्यासभोवती कोंडाळे करून बसलेले ते चौघे आणि जेवण वाढणारी भास्करची पत्नी. त्यावेळीस मात्र त्यांच्यात बरेच वादविवाद झाले.
वरुणला आता इथून निघून जायचं होतं. त्याला आता या गावात अधिक काळ थांबण्याची अजिबात इच्छा नव्हती. परंतु वसुधाबाई मात्र इथून कोणत्याही परिस्थितीत शहरात निघून जायला तयार होत नव्हत्या.
“मी कारण सांगू शकत नाही. परंतु संपदाचं बाळंतपण इथेच होईल. शहराकडे निघून जाण्याचा प्रयत्न केलात तर संपदा व बाळाच्या जिवाला धोका आहे हे लक्षात ठेवा.” एवढेच बोलून त्यांनी ओठ घट्ट मिटले.
“पण मला हे खरंच काही समजत नाही. हा काय प्रकार आहे? तुझ्या सांगण्यावरून आम्ही आलो ना इथे? राहिलो ना चारपाच महिने? तू कोणत्या तरी देवाला बलि द्यायला रानावनात जात होतीस. मी कधी घेतला का आक्षेप?” संतापलेल्या वरुणने प्रश्न केला.
यावर वसुधाबाईंची प्रतिक्रिया एकदम खुनशी व थंड होती. त्यांनी थंड नजरेने त्या दोघांकडे पाहिले आणि त्या बोलू लागल्या… “संपदाचे बाळंतपण इथेच होणार. का? ते मी सांगू शकत नाही! तुला जर नोकरीसाठी शहरात परत जायचे असेल तर तू जा इथून निघून! जर संपदाने इथून बाहेर जाण्याचा विचार जरी केला तरी तिच्या बाळाला धोका होईल हे लक्षात ठेव.”
संपदा आणि वरुण दोघांनीही एकमेकांकडे एकदम भयचकित नजरेने पाहिले. कंदिल जोरजोरात फडफडत होता. आकाश मुसळधार कोसळतच होतं. हॉलचा दरवाजा पूर्णतः उघडून बाहेरचे जोरदार वारे आणि पाण्याचे थेंब आत येत होते.
“आपण उद्या सकाळी बोललो तर चालणार नाही का वरुण?” संपदाने विचारले.
“ठीक आहे. मी तर उद्या सांगलीस परत जातोय. मला आता अधिक वेळ इथे थांबता येणार नाही. तुम्ही दोघी मात्र इथे थांबू शकता. माझी काही हरकत नाही. दर वीकेंडला मी रात्रीच इकडे येत जाईन.” वरुण बोलला.
पुन्हा कुणीच कुणाशी न बोलता जेवण चालत राहिलं. भेसूर वारा शीळ घालीत राहिला. पागोळ्या रात्रभर गळत राहिल्या. दिव्याच्या ज्योतीवर उडी मारून पतंग रात्रभर मरत राहिले.
(क्रमशः)
(संपूर्णतः काल्पनिक कथा)
© विजुभाऊ वाटेगांवकर
दुसऱ्या दिवशी सकाळीच वरुण आणि भास्कर लाईट व टेलीफोनच्या कामासाठी गावात गेले. कामं उरकून परत येण्यास त्यांना बराच वेळ झाला. ते दोघे परत आल्यावर संपदाने पाहिले तर वरुणचा चेहरा बराच तणावात होता.
“काय झालं? कामं झाली नाहीत का?”
“नाही. तसं काही नाही.”
“मी सांगतो.” भास्कर पुढे येत बोलला. “बाईसाहेब, कामं तर सगळी झाली ठीकठाक. पण गावातील लोकांत मात्र तुम्ही परत आल्यामुळे फार खळबळ उडालेली आहे. त्यांना असं वाटतंय की सरदेसायांची जमीन परत ताब्यात घेण्यासाठीच तुम्ही सर्वजण येथे आलेले आहात. आम्ही गावातून फिरत असताना लोक साहेबांकडे रागाने व संशयाने बघत होते. आता माझं एक म्हणणं गंभीरपणे ऐका… की थोडे दिवस साहेबांना अजिबात बाहेर एकटे जाऊ देऊ नका. उगाच कुणाशी वादावादी झाली तर नको तो प्रसंग उभा रहायचा.”
सर्वांना जेवणासाठी पाने मांडता मांडता संपदा शांतपणे, भास्कर सांगत असलेल्या, गावातील अंतर्गत घडामोडी ऐकत राहिली.
आणि या दिवसानंतर सुरु झाला… त्या सर्वांची परीक्षा पाहणारा काळ…
दिवसभर त्या शापित गावात कायम अंधारलेलं ढगाळ वातावरण असे. आजूबाजूच्या उंच उंच डोंगररांगांमुळे दिवसातून सूर्यप्रकाश फार कमी वेळ मिळत असे. दिवसाचे चोवीस तास घरे अंधारात बुडालेली असत. सकाळी उठल्यापासून घरात चिमण्या अथवा कंदिल लावावे लागत असत. त्याशिवाय ते अवकळेचं वातावरण दूर होत नसे.
संपदा आणि वरुणला शहरी जीवनशैलीची सवय झालेली होती. या आडवळणी गावात येऊन त्यांना अक्षरशः तुरुंगात डांबल्यासारखं झालेलं होतं. गावातील लोकांनी त्यांच्यावर एक अघोषित बहिष्कारच जणू टाकलेला होता! त्यामुळे कुणाच्या घरी जाणे येणे पण शक्य नव्हते. संपदा केवळ वसुधाबाईंच्या शब्दांवर विश्वास टाकून इथे आलेली होती. तिच्या मनातील एक अंधुकशी आशाच तिला त्या खडतर काळात टिकून राहण्यास मदत करत होती. याउलट वरुण मात्र इथे आल्यापासून चिडचिडा व अस्वस्थ झालेला होता. त्याची समजूत काढता काढता संपदाला स्वतःलाच खूप मनस्ताप होत होता.
या सर्व निराशाजनक वातावरणात एक व्यक्ती मात्र काहीही काळजी नसल्यासारखी वागत होती. ती व्यक्ती म्हणजे वसुधाबाई. त्यांच्या वागण्यात आता पूर्वीचाच अलिप्तपणा परतून आलेला होता. त्या दिवसचे दिवस एका अंधाऱ्या खोलीत स्वतःला कोंडून घेत असत. कुणाशीही काहीही बोलणे होत नसे. त्या खोलीत एखाद्या कोपऱ्यात एक उदासवाणा धुरकट कंदिल पेटवून ठेवलेला असे. त्याच्याकडे पहात त्या अगम्य भाषेत काहीतरी बडबडत तासनतास बसत असत. संपदाला त्या खोलीत जायची देखील भीति वाटत असे. वसुधाबाईंची विचित्र भाषा पण तिला कमालीची भयकारक वाटत असे. कुठून शिकल्या आहेत त्या ही असली विचित्र भाषा? अंगावर शेकडो कृमीकीटक वळवळत जावेत तसं काहीसं वाटत असे ती भाषा ऐकून!
एक गोष्ट मात्र फार आश्चर्यकारक घडत होती. दर शनीवारी वसुधाबाई सायंकाळी घराबाहेर पडत. त्यांच्या हातात कसली तरी पिशवी असे. त्या पिशवीत काहीतरी कोंबल्यासारखं दिसत असे. त्या पिशवीतून ‘त्या’ कुणीतरी जीवाच्या आकांताने पाय फडफडलेले दिसत असत. घरातून निघताना एक मोठा चाकू सुद्धा त्यांच्यासोबत घेतलेला असे. देवघरातील उदबत्ती, रांगोळी, हळद कुंकू, काडीपेटी या सर्व गोष्टी पुडीत बांधून घेतलेल्या असत. संध्याकाळी बाहेर पडले की त्यांना परत येण्यास खूप रात्र होत असे. वरुण आणि संपदाने त्यांना याबाबत प्रश्न विचारण्याचे अनेक प्रयत्न केले. परंतु त्यांना कोणतेही समाधानकारक उत्तर मात्र कधीच मिळाले नाही. शेवटी एखाद्या स्थानिक देवतेची पूजा वगैरे करण्यासाठी त्या जात असाव्यात, असा समज करून घेऊन वरुण व संपदाने तिकडे दुर्लक्ष केले.
अंधारबावला आलेल्यास आता सहा महिने उलटून गेलेले होते. संपदाला गर्भधारणेची चाहूल लागलेली होती. ही बातमी तिने वसुधा आणी वरुण दोघांना सांगितली. वरुण त्या दिवशी खूप आनंदी होता. परंतु ही बातमी ऐकून वसुधाच्या चेहेऱ्यावर मात्र कसलेतरी विचित्र पाशवी भाव झळकले. आपल्याच आनंदात डुबक्या घेत असलेल्या वरुण व संपदा दोघांच्याही ते लक्षात आले नाही.
संध्याकाळची जेवणाची वेळ. खोलीच्या मध्यभागी ठेवलेला एक धुरकट कंदिल. त्याच्यासभोवती कोंडाळे करून बसलेले ते चौघे आणि जेवण वाढणारी भास्करची पत्नी. त्यावेळीस मात्र त्यांच्यात बरेच वादविवाद झाले.
वरुणला आता इथून निघून जायचं होतं. त्याला आता या गावात अधिक काळ थांबण्याची अजिबात इच्छा नव्हती. परंतु वसुधाबाई मात्र इथून कोणत्याही परिस्थितीत शहरात निघून जायला तयार होत नव्हत्या.
“मी कारण सांगू शकत नाही. परंतु संपदाचं बाळंतपण इथेच होईल. शहराकडे निघून जाण्याचा प्रयत्न केलात तर संपदा व बाळाच्या जिवाला धोका आहे हे लक्षात ठेवा.” एवढेच बोलून त्यांनी ओठ घट्ट मिटले.
“पण मला हे खरंच काही समजत नाही. हा काय प्रकार आहे? तुझ्या सांगण्यावरून आम्ही आलो ना इथे? राहिलो ना चारपाच महिने? तू कोणत्या तरी देवाला बलि द्यायला रानावनात जात होतीस. मी कधी घेतला का आक्षेप?” संतापलेल्या वरुणने प्रश्न केला.
यावर वसुधाबाईंची प्रतिक्रिया एकदम खुनशी व थंड होती. त्यांनी थंड नजरेने त्या दोघांकडे पाहिले आणि त्या बोलू लागल्या… “संपदाचे बाळंतपण इथेच होणार. का? ते मी सांगू शकत नाही! तुला जर नोकरीसाठी शहरात परत जायचे असेल तर तू जा इथून निघून! जर संपदाने इथून बाहेर जाण्याचा विचार जरी केला तरी तिच्या बाळाला धोका होईल हे लक्षात ठेव.”
संपदा आणि वरुण दोघांनीही एकमेकांकडे एकदम भयचकित नजरेने पाहिले. कंदिल जोरजोरात फडफडत होता. आकाश मुसळधार कोसळतच होतं. हॉलचा दरवाजा पूर्णतः उघडून बाहेरचे जोरदार वारे आणि पाण्याचे थेंब आत येत होते.
“आपण उद्या सकाळी बोललो तर चालणार नाही का वरुण?” संपदाने विचारले.
“ठीक आहे. मी तर उद्या सांगलीस परत जातोय. मला आता अधिक वेळ इथे थांबता येणार नाही. तुम्ही दोघी मात्र इथे थांबू शकता. माझी काही हरकत नाही. दर वीकेंडला मी रात्रीच इकडे येत जाईन.” वरुण बोलला.
पुन्हा कुणीच कुणाशी न बोलता जेवण चालत राहिलं. भेसूर वारा शीळ घालीत राहिला. पागोळ्या रात्रभर गळत राहिल्या. दिव्याच्या ज्योतीवर उडी मारून पतंग रात्रभर मरत राहिले.
(क्रमशः)
(संपूर्णतः काल्पनिक कथा)
© विजुभाऊ वाटेगांवकर