प्रेमाचे_राजकारण -(लघुकथा)- Lover Story Laghukatha in Marathi
फटाक्यांची आतिषबाजी.....कार्यकर्त्यांच्या घोषणा.....मधेच उजव्या बाजूला बोट करून कुणाला तरी दिलेल्या घाण घाण शिव्या.....बाईकच्या हॉर्नचा कर्णकर्कश आवाज.....मधेच एकाने आपल्या खांद्यावर एका गुलालात रंगवलेल्या इसमाला घेऊन नाचवले जात होते......DJ जोरात दणाणत होता पण त्या दणदणाट करणाऱ्या DJ च्या आवाजाला छेदत त्या अर्वाच्य शिव्या वातावरणात घुमत होता.....गुलाल उडत होता....सगळा आसमंत गुलालाने लालभडक झाला होता......तिची नजर मात्र आपल्या निवडणुकीत निवडून आलेल्या नवर्यापेक्षा आकाशात उडणाऱ्या गुलालाकडे होती.....तो लालभडक रंग बघून ती काही आठवून रडत होती
दोन वर्षापूर्वी त्याचा कडक स्टार्चचा पांढरा सदरा असाच लालभडक रक्ताने माखला होता.....संतोष तिच्या गावातला तरुण......तिच्यासाठी तिचा होकार मिळवण्यासाठी त्याने आपल्या हातावर तिच्यासमोर ब्लेडने सपासप वार केले होते......अर्चना त्याला कित्येक दिवस टाळत होती पण आता मात्र तिचाही बांध फुटला होता.......सगळा विरोध झुगारून तिने आपल्या बाईक वरून तिला दवाखान्यात आणलं होतं......हॉस्पिटलमध्ये संतोषच्या हातातून सांडणारे रक्त त्याच बरोबर अर्चनाचे अश्रू एका वेगळ्या नात्याची कबुली देत होते.......त्या घटनेनंतर अर्चनाला मात्र घरी खूप मार खावा लागला होता......संतोष तिच्याच गावचा आणि धनाढ्यही होता शिवाय तिच्याच जातीचा होता.....पण त्या जातीत असलेल्या पोटजातीने माती खाल्ली होती.....ढेरेवाडी तस दोन तीन हजार लोकवस्ती असलेलं गाव तिथले सगळे गावकरी एकाच जातीचे होते......त्याबाबतीत त्यांनी खूप खबरदारी बाळगली होती.....दुसऱ्या भागातील किंवा दुसऱ्या जातीतील लोकांना इथे जमीन खरेदीस मज्जाव होता पण एकाच जातीत असून तो गाव दोन वेगवेगळ्या पोटजातीत विभागला गेला होता सहाजिक गावभाग आणि माळभाग असे दोन भाग पडले......दोन्ही जातीत एवढी खुन्नस होती की दर दोन महिन्याला आपापसातील भांडणातून एक ना एक मुडदा पडायचाच...मारामारी तर त्या गावच्या पाचवीला पुजली होती...त्यात निवडणूक आली की गावाला छावणीचे स्वरूप येई.......त्यात गावभागातील अर्चनाच्या कुटुंबियांना जेव्हा कळलं की आपल्या दुष्मन असलेल्या माळभागातील एका पोराची मदत आपल्या पोरीने केली आहे तेव्हा मात्र अर्चनाला खूप मार बसला होता कारण गावभागातील अर्चनाचे वडील गावचे सरपंच होते त्यामुळे गावभाग नेहमी माळभागापेक्षा वरचढ होताच...जाती जाती मधली भांडणे त्यात खूप रक्तपात होता...पण अर्चनाला मात्र कशाची फिकीर नव्हती कारण तिच्या गाडीवर रक्ताळलेल्या अवस्थेत असतानाच संतोषने तिला प्रपोझ केले होते आणि अर्चनानेही त्याला होकार दिला होता......
सुरवातीला दोन तीन चोरून भेटी झाल्या.....संतोष अगदी लडिवाळ बोलायचा...प्रेमाने वागायचा....त्याने तिच्या अंगाला हातही लावला नव्हता....."जे होईल ते लग्नानंतर"अस रोखठोक बोलून त्याने अर्चनाच्या मनातील आपली इज्जत वाढवून घेतली होती......इकडे संतोष सुद्धा आपली करूण कहाणी सांगू लागला आपापसातील वादामुळे त्यालाही खूप त्रास सहन करावा लागत आहे प्रसंगी त्यानेही वडिलांचा मार खाल्ला होता असे त्याने अर्चना समोर बोलून दाखवले होते.....शेवटी दोघांनी पळून जाऊन लग्न करायचा निर्णय घेतला.....आणि एका देवळात जाऊन लग्नही केले.....काही दिवस संतोष आणि अर्चना गावाबाहेर राहिले मात्र काही दिवसांनी संतोषच्या वडिलांनी त्याला आपल्या घरी परत येण्याची विनंती केली......अर्चना खूप खुश झाली......कारण तिला आपल्या हक्काचं घर मिळणार होतं.....पण तिथे मात्र चित्र वेगळंच होतं.....पहिल्या दिवशीच स्वागतासाठी उभारलेल्या लोकांच्या खुनशी नजरा तिच्याकडे रोखून बघत होत्या......तिकडे संतोषचे मात्र जल्लोषी स्वागत होत होते......अर्चना गोंधळली होती......पहिल्या दिवसापासून तिची सासू तिला पाण्यात बघू लागली......तिच्यासाठी अर्वाच्य शिव्या कायम तिच्या तोंडात असायच्या......सकाळपासून तिला कामाला जुंपलं जाई.....कामात चूक झाली की लाकडाच्या ओंडक्याने तिची धुलाई सुद्धा होत होती.....इकडे आपल्या प्रियकर अर्थात नवऱ्याला सांगावे तर तो ही आता बदलला होता......लहान सहान गोष्टीवरून त्याच्या तोंडातून आधीच्या लडिवाळ सुरापेक्षा अर्चनाला आणि तिच्या जातीला घाण घाण शिव्या असायच्या......दिवसा ती तऱ्हा आणि रात्री मात्र संतोष एखादा वाघ आपल्या शिकारीला हाताळतो तसा हाताळायचा.....ओरबाडून काढायचा....एक दोन वर्षे संतोष बरोबर अनेक दशकाच्या नरकाप्रमाणे वाटू लागली होती....एकदा न राहून अर्चनाने आपल्या घरी फोन केला होता तर
"मेलेल्या लोकांबरोबर आम्ही बात करत नाही"
अश्या उत्तराने कॉल कट झाला होता....अर्चनाचे मांडलेल्या खेळाला आता एकच दार होत आणि ते दार फक्त संतोषच होत.....दिवसभर कामाचा गराडा आणि मोकळ्या वेळेत त्यांची ती खोली....एकूणच एक वेगळी कैद अर्चना भोगत होती....त्या वर्ष दोन वर्षांत ती उंबरा पार करून घराबाहेर गेली नव्हती कारण तिला मारण्याचे ते लाकूड दाराच्या मागेच ठेवलं होतं.....तिला छळण्यात त्या घरच्या प्रत्येक सदस्याला एक वेगळाच अभिमान वाटत असे.....अर्चनाचे मात्र प्रेमाच्या नावावर फक्त दिवस ढकलणे चालू होते
दोन वर्षे निघून गेली संतोषच्या आधीच्या लाल रक्ताच्या शर्ट मध्ये आणि आताच्या लाल गुलालाच्या शर्ट मध्ये खूप फरक होता.....अर्चना खिडकीतून सगळं काही बघत होती......गेल्या आठवड्यात घडलेल्या घटनेमुळे ती अगदी पार खंगुण गेली होती......संतोष निवडणूक लढवत आहे हे तिला माहीत होतं.....एके दिवशी पांढऱ्या शुभ्र शर्टात संतोष आपल्या खोलीत आला आणि त्याने एक नविकोरी साडी अर्चनासमोर फेकली
"नेस लवकर आपल्याला बाहेर जायचं आहे"
अर्चना जाम खुश झाली....कित्येक दिवसांनी ती त्या घराबाहेर पडणार होती....तिने मस्त करड्या रंगाची साडी नेसली....."करडा" रंग का?? हा प्रश्न तिला पडला होता कारण करडा रंग तर गावभागातील लोकांच्या झेंड्याचा रंग होता.....पण अर्चनाने हा विचार बाजूला ठेवला आणि ती नटून तयार झाली.....गाडी बाहेर उभी होती.....गाडीत संतोष त्याचे वडील आणि त्याचा भाऊ आणि आई होते.....गाडी गावाबाहेर एका मोकळ्या मैदानात आली हजारो लोकांचा समूह उभा होता....समोर एक स्टेज उभा होता....एकच खुर्ची दिसत होती.....संतोष माईक जवळ गेला आणि खाली बसलेल्या आपल्या बायकोला म्हणाला
"अय ये इकडं बस ह्या खुर्चीवर"
सभेत एकच हशा आणि शिट्याचा आवाज घुमला
तशी अर्चना निमूटपणे खुर्चीवर येऊन बसली....तिने एकनजर सभेत असलेल्या लोकांवर मारली त्या सगळ्या गर्दीची नजर फक्त आणि फक्त अर्चनावर होती.....इकडे संतोष गरजला
"बघितलं का मंडळी.....सांगून माज उतरवलाय त्या गावभागाच्या सरपंचाचा.....लई मिरवत होता नव्ह....आता बघा त्यांच्या पोरी आमच्या घरच्या भांडी घासत आहेत"
ह्या एका वाक्याने अर्चनाच्या काळजात धस्स झालं......तिकडे सभेतून मोठ्या मोठ्या घोषणा ऐकू येऊ लागल्या.....सभेतील काहीजण अर्चनाकडे बघून नको ते इशारेही करू लागले.....पण संतोष आणि त्याच्या घरच्याची नजर फक्त त्या सभेकडे होती......स्टेजवर बसलेली ती अर्चना त्या लोकांच्या साठी फक्त एक विजयी ट्रॉफी होती....जी संतोषने जिंकून आणली होती....सहाजिक मॅन ऑफ मॅच संतोष होता.....त्याचा मान वाढला होता....मतेही वाढली होती...बाकी प्रेम वैगेरे ह्या गोष्टी फक्त आणि फक्त 4 दिवसाच्या होत्या.....पुढे होता तो फक्त नरक.....संतोष पक्का राजकारणी बनला होता आणि अर्चना एक फसलेली गंडलेली प्रेमवीर.......पण ह्या एकतर्फी प्रेमवीराने कधीच हार मानली होती आणि तिने शेतात फवारणी साठी आणलेल्या विषारी औषधाला जवळ केले होते......तिचे डोळे हळूहळू जड होऊ लागले.....dj चा आवाज मंद होऊ लागला.....पण तिच्या चेहऱ्यावर ह्या स्वार्थी नरकातून सुटल्याचं समाधान होतं....