प्लँचेट - एक थरारक अनुभव - Romanchak katha |
लेखक - प्राध्यापक - दयानंद सोरटे.
वाचक मित्रांनो आणि मैत्रिणींनो , मी जी सत्यकथा आपल्यासमोर सादर करत आहे. ती मी स्वतः अनुभवलेली आहे. या कथेद्वारे मला कोणत्याही प्रकारची अंधश्रद्धा किंवा भीती पसरवायची नाही. वाचकांनी केवळ मनोरंजनाच्या दृष्टीनेच हि कथा वाचावी हि विनंती.
उदय आणि मी बालपणाचे मित्र. लहानपणापासूनच आम्ही दोघेही अध्यात्मिक. दर गुरुवारी आम्ही शिवाजी पार्कच्या सद्गुरू श्री स्वामी समर्थांच्या मठात बैठकीला जायचो. श्री स्वामी समर्थांच्या कृपेने पुढे आम्हाला चांगले मार्ग सापडत गेले. गुढविद्येबद्दल आम्हा दोघांनाही लहानपणापासूनच खूप आकर्षण होते. त्यामुळे कॉलेजला असताना आम्ही ज्योतिषविद्या ( Astrology ), संमोहनविद्या ( Hypnotism ) , आणि मृतात्म्यांशी संपर्क साधणे ( planchette ) या सारख्या गूढविद्या आत्मसात केल्या होत्या. प्रा . मनोहर नाईक ,श्याम मानव यांच्या विचारांनी प्रभावित होऊन आम्ही संमोहनविद्या शिकलो. आणि प्रा. मधुकर दिघे , प्रा.अ.ल . देशपांडे यांची पुस्तके वाचून प्लँचेट शिकण्याची जिज्ञासा निर्माण झाली. त्यानंतर कॉलेज संपल्यानंतर आमच्याकडे भरपूर वेळ होता. मी कोचिंग क्लासेसला join झालो. सकाळी आणि संध्याकाळी मिळून माझे साधारणपणे १२ lectures असायचे. त्यामुळे मला टाच दुखीचा त्रास सुरु झाला होता. एका रविवारी मी असाच बेडवर विश्रांती घेत पडलो होतो. तितक्यात उदय आला. आणि मला म्हणाला तुला एक Surprise द्यायचे आहे. मी कुतूहलाने त्याला विचारले कोणते Surprise? त्यावर तो म्हणला , मी आणखी एक नवीन विद्या शिकलो आहे. तिचं नाव रेकी ( Reiki ) असे आहे. केवळ हाताच्या स्पर्शाने आपण कुणाच्याही शारिरीक वेदना आणि आजार बरे करू शकतो. मला हे ऐकून थोडे नवलच वाटले. त्याने रेकीची तशी दीक्षा (Attunement ) घेतली होती. मी मनात म्हटलं , " हातच्या कंकणाला ,आरसा कशाला?" त्याला मी म्हणालो, माझी टाच दोन आठवड्यापासून दुखत आहे जर तुझी हरकत नसेल तर माझ्या टाचेला रेकी देऊन बघ. दुखायचे राहिली तर बरेच होईल. असं म्हणून त्याने माझ्या शरीराला आणि टाचेला सुमारे १ तासभर रेकी दिली आणि आश्चर्य म्हणजे त्याने रेकी देऊन झाल्यावर माझी टाच पूर्णपणे दुखायचे थांबली आणि ती आजतागायत कधीही दुखली नाही. त्यामुळे मी देखील त्याच्याकडे रेकी शिकण्याची ईच्छा व्यक्त केली. पुढे त्याने रेकी ग्रँड मास्टरची डिग्री मिळवली आणि मी रेकीच्या तीन डिग्री प्राप्त केल्या.
आमचा सराव चांगल्या प्रकारे चालू होता. पण उदयाच्या आयुष्यात एक दुर्दैवी घटना घडली त्यामुळे तो पुरता हेलावून गेला. कॉलेजला असताना त्याचे एका मुलीवर प्रेम होते तिचे नाव अपर्णा असे होते. दुर्दैवाने अपर्णाच्या हृदयाला छिद्र असल्याचे समजले. त्यानंतर दिवसेंदिवस तिची तब्बेत खालावत गेली. अपर्णा मला दादा म्हणत असे. खूपच लाजाळू, निरागस आणि परोपकारी स्वभाव होता तिचा. पण तिच्याच वाट्याला हे दुःख आले होते. आणि एक दिवस काळाने डाव साधला अपर्णा आम्हाला सोडून गेली. तिच्या जाण्याने उदय पार कोलमडला. तो depression ला गेला. आजूबाजूला काय चाललंय हे त्याला कळेनासे झाले. रस्ता cross करतानाही त्याला भान राहत नसे. दिवसभर तो स्वतःला घरामध्ये कोंडून घेऊ लागला. रात्रीच्या वेळी तो एकटाच पुटपुटत बसतो असे त्याच्या घरातल्यांकडून कळले. घरातल्यांना त्याची खूप काळजी वाटू लागली. शेवटी त्याच्या बाबांनी त्याला एका मानसोपचारतज्ज्ञांना दाखविले. त्याच्यावर उपचार सुरु झाले. महिना - दीड महिन्यानंतर तो थोडा normal झाला. मित्रांमध्ये मिसळू लागला. त्याला बरे झालेला पाहून मलाहि खूप आनंद झाला.
पण एके दिवशी तो माझ्या घरी आला आणि मला म्हणाला , मला तुला काही सांगायचे आहे. म्हणून मग आम्ही दोघे आमच्या टेरेसवर गेलो. आणि त्यानंतर त्याने मला जे काही सांगितले ते ऐकून मी सुद्धा घाबरून गेलो. तो मला म्हणाला, रात्रीच्या वेळेस अपर्णा माझ्या सोबत गप्पा मारत असते. आणि मग पहाटे - पहाटे ती निघून जाते. पहिल्यांदा मला त्याच्या सांगण्यावर विश्वासच बसला नाही. पण तो खूपच seriously मला सांगू लागला. म्हणून मग मला त्याच्यावर विश्वास ठेवणे भाग पडले. त्यानंतर तो मला म्हणाला, तिने मला सांगितले आहे कि ती येत्या पौर्णिमेला माझ्या शरीरात प्रवेश करून माझ्या घरातील व माझ्या बाबतीत ज्या काही समस्या असतील त्यावर ती तोडगा सांगणार आहे. त्यासाठी मला तुझी मदत लागणार आहे. कारण ती जेव्हा माझ्या शरीरात प्रवेश करेल तेव्हा माझ्या काही प्रश्नांची उत्तरे ती मला सांगणार आहे तेव्हा तू जर ती ऐकलीस तर मला सांगू शकशील. प्लँचेट विद्या आम्ही करायचो पण शरीरातील आत्म्याशी संवाद साधण्याची हि पहिलीच वेळ होती. त्यामुळे मनात थोडी भीतीही होती.
नियोजित पौर्णिमेच्या दिवशी एका मित्राच्या रिकाम्या घरामध्ये तिला बोलावण्याचा कार्यक्रम आम्ही ठरविला. त्याप्रमाणे रात्रीच्या बरोबर १२ वाजता एक मेणबत्ती पेटवून घरातील सर्व लाईट्स बंद करून मी तिला बोलावण्याचा आवाहन मंत्र म्हटला . बाजूला ज्या मित्रांची रुम होती त्याला एक वही आणि पेन घेऊन बसविले. उदय माझ्या समोरच बसला होता. माझा आवाहन मंत्र म्हणून झाल्यावर थोडावेळ उदय शांत बसूनच होता. मग काही वेळाने त्याने आळोखे - पिळोखे द्यायला सुरुवात केली. आणि ज्याप्रमाणे मुली उपडी मांडी घालून आणि हात टेकून रेलून बसतात तसा तो अगदी एखाद्या मुलीप्रमाणे बसला. त्याची बोलण्याची लकबही एखाद्या मुलीप्रमाणे होती. त्याच्या चेहऱ्यावरील हावभाव अगदी एखाद्या मुलीप्रमाणे झाले. आणि आश्चर्य म्हणजे मी त्याला काही विचारायच्या आतच त्याने मला विचारले. कसा आहेस दादा ? हे ऐकून मी अवाकच झालो. पण मी स्वतःला सावरून बरा आहे असं म्हणालो. मी समजून गेलो कि हि अपर्णा आहे जीने उदयाच्या शरीरात प्रवेश केला आहे. मग मी तिला तिच्या संदर्भात तिच्या विश्वातील काही प्रश्न विचारले. पण तिने सांगितलेली माहिती मी याठिकाणी स्पष्ट करू शकत नाही. मग मी तिला उदयाच्या घरातील किंवा उदयच्या persnal अडचणी तिला सांगितल्या व त्यावरील उपाय विचारले. तिने त्याप्रमाणे काही तोडगे देखील सांगायला सुरुवात केली पण ती काहीतरी उलट सांगत आहे किंवा चुकीचे सांगत आहे हे माझ्या लक्षात आहे. म्हणून मी तिला तसे का सांगत आहे असे विचारले. तशी ती मला म्हणाली आपलं बोलणं कुणीतरी चोरून ऐकत आहे. मला तिच्या बोलण्याचा अर्थ कळला नाही. म्हणून तिला मी पुन्हा विचारले आपल्या चौघांशिवाय इथे अजून कुणी आहे का ? तेव्हा ती म्हणाली, होय बाहेर खिडकीवर एक नुसतच मुंडकं बराच वेळ आपलं बोलणं चोरून ऐकत आहे आणि त्या खिडकीला जोराने दाताने चावा घेत आहे. ते मुंडकं काही आम्हाला दिसलं नाही पण माझ्या लक्षात आले कि बराच वेळापासून बाहेरून खिडकीचा करकर असा आवाज येत होता. मला वाटलं वाऱ्याने खिडकी हलत असेल त्यामुळे तो आवाज होत असेल. मी आणि माझ्या बाजूला बसलेला मित्र दोघेही घाबरून गेलो. मग आता काय करायचे ? असे मी तिला विचारले. त्यावर ती म्हणाली एका पेल्यात पाणी घेऊन शिवपंचाक्षरीं मंत्र म्हणून घरात सगळीकडे ते पाणी शिंपडून बाहेरच्या खिडकीवर देखील ते पाणी टाका. तिने सांगितल्यानुसार मी ते केले. त्यानंतर ती म्हणाली हा आत्ता ठीक आहे. गेलं ते मुंडकं तिथून. आणि मग मी विचारलेल्या प्रश्नांची तिने अचूक उत्तरे दिली. त्यानंतर ती मला म्हणाली कि, थोड्याच दिवसात मला मोक्ष मिळणार आहे. त्यानंतर मला उदयाला भेटता येणार नाही. कारण अपर्णा हि एक पुण्यात्मा होती. आणि पुण्यात्म्यांना लगेच सद्गती प्राप्त होते. जाता - जाता उदयाला सर्व अडचणीतून बाहेर काढून जायचे होते तिला. म्हणून तिला हे शेवटचं सांगायचं होतं. माझ्या डोळ्यात हे ऐकून अश्रू उभे राहिले. कारण जिवंतपणी देखील लोकं इमानाने वागत नाहीत आणि हि बिच्चारी तिच्या प्रेमाला त्रास होऊ नये म्हणून मेल्यावरही तळमळत होती. त्यानंतर तिने आमचा निरोप घेतला. आणि तिने सांगितलेले उपाय केल्यानंतर खरोखरच उदयचे आणि त्याच्या घरातील सर्व Problem नष्ट झाले. त्यानंतर आम्ही तिला पुन्हा कधीही बोलावले नाही. बहुतेक तिला मोक्ष प्राप्ती झाली असावी असा मी मनाशीच तर्क बांधला.