पोतराज- काल्पनिक भयकथा -Kalpanik bhaykatha |
" पोतराज "
लेखक - प्राध्यापक - दयानंद सोरटे.
माझ्या वाचक मित्र आणि मैत्रिणींनो , मी प्रथमच आज आपल्यासमोर काल्पनिक भयकथा सादर करत आहे. मला आशा आहे कि ती तुम्हाला नक्की आवडेल. या कथेद्वारे मला कोणत्याही प्रकारची अंधश्रद्धा किंवा भीती पसरवायची नाही. वाचकांनी केवळ मनोरंजनाच्या आणि समाजाच्या सद्य परिस्थितीच्या दृष्टीनेच हि कथा वाचावी हि विनंती.
गावापासून दूर ओसाड माळरानावर तो राहत होता. जिथे कुणाचाही वावर नव्हता. तो आणि त्याची पत्नी एवढाच त्याचा परिवार. डोक्यावर मरीआईचा डेरा उचलायचा आणि गावामध्ये जाऊन दारोदारी भिक्षा मागायची हा त्याचा नित्यक्रम. कधी पोटापुरतं मिळायचं तर कधी उपाशी झोपायचं. सणासुदीला कधीतरी गोड - धोड पोटात जायचं. लांबच लांब वाढलेल्या केसांच्या जटा , अंगावर चाबकाने फटके मारून झालेल्या जखमा, दंडावर दाताने चावे घेऊन रुतलेल्या दाताने झालेल्या जखमांचे व्रण , पायामधे मोठाले तोडे आणि कमरेखाली रंगबिरंगी झग्याप्रमाणे दिसणारे वस्त्र अशा एकंदरीत पोशाखात तो वावरायचा. पण मरण्यापूर्वी त्याचा म्हातारा एक विद्या शिकवून गेला होता त्याला. कधीतरी पोट भरायला कामी येईल म्हणून ती विद्या त्याच्या म्हाताऱ्याने त्याला शिकविली होती.
एके दिवशी असाच तो आणि त्याची पत्नी गावामध्ये भिक्षा मागण्याकरिता गेले होते. त्यांनी पाहिलं कि गावच्या पाटलाच्या वाड्याभोवती खूपच गर्दी जमा झालेली. म्हणून त्यानं पुढे होऊन काय झालं ते जाणून घेण्याचा प्रयत्न केला होता. पाटील म्हणजे गावातील मोठं प्रस्थ. पंचक्रोशीत मोठा मान होता त्यांना. त्यांना दोन मुलं. एक हनुमंता आणि दुसरा जयवंता. जयवंत शहराकडे जाऊन शिक्षण घेऊन मोठा माणूस झालेला. हनुमंता मात्र आपल्या वडिलांप्रमाणेच वाडवडिलांनी मिळवून ठेवलेल्या दौलतीचे रक्षण करीत होता. दोनच महिन्यापूर्वी जयवंताने प्रेमविवाह करून परजातीच्या मुलीला घरी आणल्यामुळे पाटील आणि घरातील इतर जयवंतावर नाराजच होते. तेव्हापासून घरामध्ये छोटेमोठे घटके उडू लागले होते. मुलगी दिसायला सुंदर होती शिवाय सुशिक्षित होती. पण तिला जवळचं असं कुणीही नव्हतं. अनाथ आश्रमातच वाढली ती . त्यामुळे सुखी संसाराची स्वप्न उराशी बाळगून ती मोठ्या आशेने जयवंताच्या घरी आली होती. पण सकाळी सकाळी ते दृश्य नजरेस पडलं आणि गावात एकच बोभाटा झाला पाटलाच्या धाकट्या सुनेनं फास लावून घेतला. साऱ्या गावात हि बातमी वाऱ्यासारखी पसरली. जयवंत तिच्या प्रेताकडे बघून उर बडवून रडत होता. हनुमंता त्याची समजूत काढत होता.
गावातील लोकं वेगवेगळी चर्चा करू लागली.
"भरल्या कपाळांन सवाशीण म्हणून आली आणि हे अवघ्या दोनच महिन्यात असं कसं घडलं."
सगळ्यांच्या चेहऱ्यावर एकच प्रश्नचिन्ह होतं , हे कशामुळे झालं ? कुणी म्हणू लागले, " ती परजातीची होती म्हणून त्यांना पसंत नव्हती " तर कुणी म्हणाले, " ती मोकळ्या हातानं आली हुंडा बिंडा काहीच आणला नाही म्हणून तिचा जाच चालू हो
असेच दोन चार महिने उलटले. जयवंताची पत्नी गेल्यापासून तो गप्पगप्पच राहायचा. कुणाशी जास्त बोलत नसे. शिवाय त्याच्या खोलीतही कुणाचं जास्त येणं जाणं नव्हतं. त्या दिवशी जयवंता काही कामानिमित्त तालुक्याच्या गावी गेला होता. त्याच्या खोलीला नुसतीच कडी लावलेली होती. काम करणाऱ्या बाईने घर झाडून घेतले पण तितक्यात तिला कुणीतरी हाक मारल्यामुळे ती दाराची कडी लावायला विसरली आणि तशीच गडबडीने निघून गेली. जयवंताचा मोठा भाऊ हणमंता त्याला एक १० वर्षाची मुलगी होती. ती एकटीच खेळत खेळत त्या दिवशी नेमकी जयवंताच्या खोलीत गेली. खोलीमध्ये अंधारच होता. आणि काही वेळाने तिचा मोठ्याने किंचाळल्याचा आवाज आला. आवाजाच्या दिशेने घरातील सगळेजण धावत गेले तर ती मुलगी बेशुद्ध होऊन जयवंताच्या खोलीत पडली होती. तिला उचलून बाहेर आणले. तिला शुद्धीवर आणण्याचा प्रयत्न केला जाऊ लागला. खूप वेळाने त्या मुलीने डोळे उघडले. तो दिवस कसाबसा पार पडला.
दुसऱ्या दिवशी आठवड्याचा बाजार असल्यामुळे घरी मटण आणलेले होते. नुकतेच मटण आणून पिशवी स्वयंपाकघरात ठेवलेली होती. तितक्यात तिथे कुणी नाही हे बघून हणमंताची मुलगी तिथे शिरली आणि तिने कच्चेच ते मटण खायला सुरुवात केली. घरात माणसांची संख्या जास्त असल्यामुळे मटणही भरपूर होते. तेवढ्यात हनुमंताची पत्नी स्वयंपाक घरात आली आणि तिने तिच्या मुलीला कच्चे मटण खाताना स्वतःच्या डोळ्याने पाहीले. तिच्या तोंडाला त्या मटणाचे रक्त लागले होते. हे पाहून ती खूपच घाबरून गेली. तिने ती मटणाची पिशवी तिच्याकडून हिसकावून घेतली. आणि कुणाला कळायच्या आत तिचे तोंड पाण्याने स्वच्छ केले. पण त्या रात्री तिला रात्रभर झोप आली नाही. ती रात्रभर विचारातच होती. पहाटे पहाटे तिला थोडा डोळा लागला. असेच थोड्या दिवसानंतर आजूबाजूच्या कोंबड्या मारल्याचे कानावर येऊ लागले. पण त्या दिवशीतर कहरच झाला. अंगणामध्ये एक छोटंसं शेळीचं करडू उद्या मारत आलं. लहान मुलांना त्यांच्याशी खेळायला खूप आवडतं. पण हनुमंताच्या मुलीनं त्याला पाहिलं आणि धावत जाऊन त्याचं नरडंचं पकडलं आपल्या दातात आणि तेव्हा मात्र सगळ्यांचं धाबं दणाणलं. हे काहीतरी वेगळंच आहे याची प्रत्येकाला खात्री पटली.
दुसऱ्या दिवशी पोतराजाला बोलावणं पाठवण्यात आलं . तो घरी आला त्यानं त्या पोरीला पाहिलं. आता खरी त्याची पण कसोटी होती. त्याच्या म्हाताऱ्याने शिकवलेली विद्या आता त्याच्या कामी येणार होती. त्यांनं पोरीकडं पाहिलं आणि " म्हणाला,
" येत्या पुनवला पोरीला घेऊन या माळावर तिथंच बंदोबस्त करूया." ठरलेल्या दिवशी पाटील , हनुमंता मुलीला घेऊन पोतराजाकडे पोहचले. जयवंताला त्यांनी या गोष्टीचा मागमूस लागू दिला नाही. पौर्णिमा असल्यामुळे माळरानावर लक्ख चांदणं पडलं होतं. गार वारा चांगलाच अंगाला झोम्बत होता. झाडांमधून वाहणाऱ्या वाऱ्याची सळसळ कानावर पडत होती. हातामध्ये कंदील घेऊन दबक्या पावलांनी हि लोकं पोरीला सोबत घेऊन पोतराजाच्या घरावर पोहचली. ठरल्याप्रमाणे पोतराजाने सगळी तयारी करूनच ठेवली होती. त्याने पोरीला मांडी घालून पाटावर बसवलं . होम पेटवला आणि मंत्र म्हणत त्याने घुमायला सुरुवात केली. थोड्या वेळाने पोरगी बोलती झाली.
का बोलावलं मला ?, पोरगी म्हणाली,
तसा पोतराज म्हणाला, " कोण हाईस तू ? का धरलंस पोरीला ? पोरीनं तुज काय वाईट केलंय ?"
तशी ती म्हणाली " मला तहान लागलीय रक्ताची , मला रक्त दे! पाटलाच्या वाड्यातील कुणालाच मी सोडणार नाही .
त्यावर पोतराज म्हणाला, पाटलानं तुझं काय वाईट केलंय ?
तशी ती म्हणाली, मोठ्या आशेने मी आले होते लग्न करून या घरामध्ये. सुखी संसाराची खूप स्वप्न रंगवली होती मी. लहान पणापासून अनाथाश्रमात वाढले. आई - वडिलांचं प्रेम मिळालं नाही. विचार केला जयवंताशी लग्न केल्यानंतर सासू - सासऱ्यांनाच आई - वडील मानायचं , त्यांची सेवा करायची. खरं तर मी या प्रेमाला आतुरले होते. पण घरात पाय ठेवताच मला इथे खूप वाईट अनुभव आहे. घरातील लोक माझ्याशी परक्यासारखी वागू लागले. मला माझ्या जातीवरून हिणवू लागले.मी परजातीची होते. कारण जेव्हा मला आई - बाबांनी सोडले तेव्हा माझ्या गळ्यात एक देवाचे चे लॉकेट होते. पण मग परजातीची म्हणून जन्म घेणे हा काय गुन्हा आहे का ? मी अनाथ होते यात माझा काय गुन्हा ? त्यादिवशी अशीच माझ्यावरून घरामध्ये खूप भांडणं झाली. रागाच्या भरात पाटील म्हणाले, हि कुणाची पैदास हाय कुणास ठाऊक , हिच्या आईचा पत्ता नाही ना बापाचा. उगीच नाल्यातील घाण आपल्या घरात आणलीस. कुणाचं पाप आहे हे कुणास ठाऊक , उगीच आपलं घर नासवायला घेऊन आलास हिला. हि वाक्य ऐकून मला असं वाटलं कि जणूकाही कुणीतरी तापलेल्या शिशाचा रसच ओतलाय माझ्या कानात. मला अपमान सहन झाला नाही. आणि मध्यरात्री सगळे झोपलेले असताना मी स्वतःच मला फास लावून घेतला.
हे ऐकून पोतराजाचे डोळेही पाणावले. पाटलांनाही त्यांनी तिच्यासोबत केलेल्या वर्तणुकीचा पश्चताप झाला. त्यांनी तिला हात जोडून माफी मागितली.
त्यावर ती म्हणाली, मला तुम्हाला मारायचंच असतं तर केव्हाच मारलं असतं , उगीच कोंबड्या बकरी मारत बसले नसते मी. पण तुम्ही माझ्यावर जो अन्याय केला तसा पुन्हा कुणावर करू नये म्हणून मला हे असं करावं जातात . मी आता जाते पण पुन्हा असं कुणा निष्पाप जीवाला त्रास देऊ नका. मी तुमच्याकडून फक्त प्रेमाची अपेक्षा केली होती. जाती - धर्म हे सगळं माणसाने निर्माण केल्या आहेत. पण तुम्ही असल्या संकुचित भावना बाळगून जर हुंड्यावरून किंवा जातीवरून एखाद्या जीवाला त्रास द्याल हे बरोबर नाही. हे बोलताना तिच्या डोळ्यातून पाण्याच्या धारा लागल्या होत्या.
शेवटी ती म्हणाली, जयवंताला जपा , खूप चांगला आहे तो, एखादी चांगली मुलगी पाहून त्याचा विवाह लावून द्या. हे ऐकून पाटीलही ढसाढसा रडू लागले. ते म्हणाले पोरी, आमासनी माफी कर, आम्ही तुला वळखू शकलो न्हाई ! ... एवढ बोलून झाल्यावर मुलीच्या शरीरामधून कसलातरी पांढरा प्रकाश बाहेर पडला आणि मुलगी बेशुद्ध पडली . घडला प्रकार कुठंही न सांगण्याचे पाटलांनी पोतराजाकडून वचन घेतले. आणि हा किस्सा इथेच संपला .
,माझ्या वाचक मित्र आणि मैत्रिणींनो , अशा कितीतरी घटना आपल्या देशामध्ये दररोज घडत असतात, दररोज वृत्तपत्रामध्ये अशी एकतरी बातमी वाचावयास मिळतेच. आज अशा अनिष्ठ प्रथा बंद व्हाव्यात म्हणून अनेक कायदे करण्यात आले आहेत. तरी देखील गुप्त पद्धतीने अशा प्रथा जोपासल्या जातात. आणि त्यात निरागस आणि निष्पाप मुलींचे बळी जातात. हे कुठेतरी थांबणे गरजेचे आहे.या कथेद्वारे सामाजिक प्रबोधनाचा हा एक छोटासा प्रयत्न मी केलेला आहे. नमस्कार ! हि कथा नुसती वाचून सोडू नका. तर याची अवश्य दखल घ्या. हि विनंती,