फुटूवाला
नुकताच बारावीच्या परीक्षेचा निकाल लागला व्हता.दोन विषयात मी नापास झालतो. त्यामुळे आता पुढचं वर्ष वाया जाणार व्हतं. आता ऑक्टोबरला नाय तं मार्च आश्या मह्या वार्या सुरू व्हणार व्हत्या.तव्हरोक काय काम करावं हा प्रश्न मलं पडला.मलं तं शेतीतलं कामबी येतं नवतं.बाबा तं सारके मह्यावर खारं खाऊनच राहायचे.महे दोन विषय राहिल्यानं ते मलं सारखे डाफरायचे.मंग कायतरी धंदा पाणी करावं मणलं. मलं कोणत्याच धंद्याचा अनुभव नवता.मह्या मामाकडं फोटो स्टुडिओ व्हता. मी सुट्ट्यांत मामाकडं गेलो की कॅमेरा हाताळणं,फुटू काढणं, अशा कामात मामालं मदत करायचो.त्यामुळं नाही म्हणलं तरी धंदा टाकता येईल इतका फोटोग्राफीचा अभ्यास तरी मव्हा व्हताच. मंग मी मनोमन ठरवलं की आपणबी फोटो स्टुडिओ टाकूया मनून..!
मी रातच्यालं घाबरतं घाबरतचं मह्या बापालं फोटो स्टुडिओ टाकायचा मणून सांगतलं.बापाने फनफनतचं मनलं की,तुलं काय करायचं ते कर,“मह्याकडून पैशाची आशा ठुवू नको.लय तं लयं पाचेक हजारं भेटतीलं तुलं.” बापानं तर मलं पहिल्या चेंडूतचं आउट केलं व्हतं.मह्या मामाकडं एक जुना कॅमेरा व स्पॉटलाईट होते.मी ते आणले.बाबानं देलेल्या पैश्यातं एक सेकंड हॅन्ड ट्रायपॉड,पडदे,रीळ,आशे सामायन खरेदी केलं. थोडं फार भांडवल मित्र कंपनीकडून तर काही आईकडून घेतलं व्हतं.एक चांगली जागा पाहूनं मी तिथं फोटो स्टुडिओ थाटला.आमच्या गावंच्या बजारालं आजूबाजूच्या आठ दहा खेड्यातले लोकं यायचे.त्या एरीयातं फक्तं मव्हाच तेव्हडा एक फोटो स्टुडिओ व्हता.त्यामुळं जवळपासच्या खेड्यापाड्यायचे लोक तिथं फुटू काढाया यायचे.आताच्या सारखे डिजिटल कॅमेरे त्या काळी नवते.कॅमेर्यालं फुटू काढायसाटी रोल वापरायचे.रोल डेव्हलप करावा लागायचा त्याच्या प्रिंटिंग चे काम त्यायेळी हिंगोलीलं व्हयाचं. त्यामुळं कोणी फुटू काढला तरी त्यालं ते फुटू मिळायलं दोन-तीन दिवस तरी लागायचेच.तं फुटूच्या धंद्यातं मव्हा हाळूहाळू जम बसतं व्हता. आमच्या आठ दहा खेड्यातला मी एकटा फुटूग्राफर असल्यानं आता मलं लोकंबी फुटूवाला महादा मनून वळखू लागले.मी काही विशेष करतोय असं तेह्यलं वाटायचं.एक चांगली बाजारपेठ व आजूबाजूच्या खेड्यातील लोक येत असल्यानं अन् धंद्यात कॉम्पिटेशन नसल्यानं मव्हा धंदा जोरात चालला व्हता. गोरेगावच्या स्टुडीओसंगटच मी आजूबाजूच्या खेड्यातबी चकरा मारायचो.गावात जाण्याचा असा फायदा व्हयाचा की जेह्यलं फुटू काढायचे नाहीत आशेबी हावसे नवसे फुटू काढतं. त्यामुळं आपोआपच मव्हा धंदा वाढू लागला.
त्या दिवशीही नेहमीसारखं मी पाहाटं दहा वाजताच्या गाडीवर हिंगोलीवूनं आलेलं फुटूचं पार्सल घेतलं अनं दुकान उघडून झाडझुडं करू लागलो.तेवढ्यात वारकाचा रम्या पळत पळतच मह्याकडं आला अन मलं मनला की,“अयं,महादा दा ठेसणातल्या चूपसायबांनं तुलं ठेसनातं बलावलयं.” मलं आन ठेसनात बलवलयं हे ऐकुनं मह्या तं काळजात धसकनचं झालं.आपल्यालं अन् पोलीस ठेसनात कशालं बुवा बलवलं आसलं.मी नाना प्रकारे ईचार करू लागलो.आपलं काही चुकलं तं नाही नं ! मह्या डोस्क्यातले ईचार काय थांबत नवते.मी मागील आठ दहा दिवसातले परसंग आठवू लागलो.मह्या हातूनं तं काहीचं चूक झाली नवती.मंग मलं कशालं पोलीस ठेसनातं बलवलं आसलं,मलं भला मोठा प्रश्न पडला व्हता. रम्या अजून बी उभाच व्हता. मी रम्यालं मनलं ,“तु पुढं व्हयं. मी फोटो स्टुडिओ बंद करून येतो.” तसं “लवकर ये चूपसायेब साहेब तुही वाट पाहायलेतं” असा आगावचा सल्ला देऊन रम्या आल्या पावली परतला. मलं पोलीस स्टेशनलं बलावलय हे मह्या घरी मव्हा बाप, भाऊ अन घरचे समद्यायलचं कळालं व्हतं.घरच्या बाया बापड्यायनं तं रडायलंबी सुरवात केलती.शेजारीपाजारी,गल्लीतले लोकं आता आमच्या घरी जमा व्हवू लागले. कोणालचं माईत नव्हतं की काय झालयं ते,अन मलं ठेसणात काहून बोलवलं ते..! इकडं बापानं भावकीतल्या एक दोन प्रतिष्ठित माणसायलं संग घेऊन पोलीस ठाणं गाठलं व्हतं.
त्याकाळात आतासारके वाहानं नवते.शेतकऱ्यांयसाठी बैलगाड्या,हौशी लोकायसाठी डमन्या व्हत्या,तं गोरगरीबायलं आपलं पायपीट करत फिरावं लागायचं.सकाळ,दुपार,संध्याकाळ आशी तिन टाईम एष्टी व्हती. याउपर जरं कोणालं जवळपासच्या गावालं जायाचं आसलं तं एक तं पैदलं नायं तं सायकलनं आसं जावं लागायचं. त्या जमान्यात गावात एखादी दोनच मोटर सायकल असायची,अन् लय झालं तर पाच सहा जनांकडं सायकल आसलं.खाजगी वाहनगाड्याबी फारश्या नवत्या.
आमच्या घरची परिस्थिती बेताचीच असल्यानं मह्याकडं सायकलबीक नवती. आता चुपसाहेबांनं लवकर बोलवलेलं असल्यानं मंग म्या गावातल्या सायकल स्टोअर्सवुन एक सायकल भाड्यानं घेतली. वळख वगैरे द्यायचा काही प्रश्नच नवता कारण फुटूवाला महादा मणून मलं सगळं गावचं वळखायचं. मी सायकलवर टांग टाकली अन थेट पोलीस ठेसनाकडं निंघालो. रस्त्यानं जातानी मह्या मनात वेगवेगळे ईचार येत व्हते.आपल्यालं कशालं बोलावलं असल ब्वा पोलीस ठेसनातं, आसं राहून राहून मह्या मनातं येयाचं.ईचाराच्या तंद्रीतच पोलीस स्टेशन आलं.मी झाडाखाली सायकल लावून तिलं कुलूप लावलं.घाबरतचं पोलीस ठेसनातं गेलो. तिथं जाऊन बघतो तं काय मव्हा बाप अन भावकितले दोन तीन परतिष्टीत माणसं मह्या आंधीपासूनच तिथं येऊन झाडाखाली बसले व्हते.मह्या मनात धसकन झालं.काही भावकीत तं भांडण फिंडण झालं नाही नं असं मलं वाटू लागलं. मी आमच्या मानसायकडं पाहूनं तेह्यलं आत्ता सायबालं बोलून येतो मनुन आतं सायबाकडं गेलो.तिथं खुडचीवरं एक भला मोठा चूप साहेब मंजे पोलीस इनसपेक्टरं बसलेला व्हता.मलं पाहताक्षणी तं ते लय रगेल वाटला.त्यो सायब उचापुरा आन धिप्पाड व्हता.तेह्यच्याकडं पाहून कोणालबी जरब बसावी असं त्यांचं व्यक्तिमत्व व्हतं.त्यांचे डोळे मोठाले व लालसर तर आकडेबाज व जाडजूड मिश्या व्हत्या.मी सायबाजवळ जाऊन मनालो, “सायब मी महादा फुटूवाला,तुम्ही मलं बलवलं व्हतं.काय झालं सायेबं,मव्ह काय चुकलं का?” मी फुटूवाला हाये हे समजल्यावर ईतका येळ कठोरपणे मह्याकडं पाहणारा सायेब मलं जरासा नरम झाल्यासारखा वाटला.तेह्यनं मलं खुडचीवर बसायचा इशारा केला. शिपायालं बलवून चहा मागवला. चहा पिल्यावर सायब मलं मणले की,“कसं हे महादा,शेजारच्या गावात एक नरबळीसारखं प्रकरण घडलेलं आहे.शेतात बॉडी पडलेली आहे.आपल्याला तिथं जाऊन फोटो घ्यायचेतं. आपल्या गावात फोटो स्टुडिओ आहे हे समजलं म्हणून तुलं बलवलं नायतर आम्हालं तालुक्यावून फोटो वाला बोलावावं लागायचा”.साहेबांनं आसं म्हणताच मलं हायसं वाटलं.मी सुटकेचा निःश्वास सोडला.मी म्हनलं ठीक हाये सायब.तुम्ही म्हणाल तव्हा येतो.सायबांनं ड्रायव्हरलं गाडी काढायलं सांगतलं.आत्ताच जायचयं आसे ते मलं मनले.मलं पण ते गाडीतचं चालं मणले.पण मी म्हणलं,“नाही साहेब,मलं कॅमेरा आना लागते.तसेच मल त्या गावात उधारी पाधारी पण वसुलं करायचीयं.तुम्ही मव्हरं व्हा मी लगेच तुमच्या मांघच सायकलवर येतो बघा.”तेह्यनं मलं ज्या शेतात बॉडी पडलेली व्हती ती जागा समजून सांगली अन तिथं लवकरं पोचं आसं सांगीतलं. मीबी तेह्यलं हो म्हणलं. खरं तं मलं त्या गावातं काहीचं काम नवतं.पण त्यांच्या गाडीमध्ये बसून जायालं मलं बुजल्यावाणी वाटतं व्हतं.मी सायकलवरचं जायाचं ठरवलं.मी बाहेर येऊन मह्या बापालं अन भावकीतल्या माणसायलं सगळी हाकीकत सांगतली.तव्हा तेह्यलबी लय बर वाटलं.आता मह्या बापालं तं मव्हा लय आभिमान वाटू लागला.आता पोलिसासंगबी मी काम करायलो याचा तेह्यलं आभिमानं वाटतोय आसं मलं तेह्यच्या डोळ्यात दिसतं व्हतं.
ते हिवाळ्याचे दिवस व्हते. पोलीस ठाण्यावून निघायलचं दुपारचं तीन साडेतीनं वाजले आसतीलं.मर्डरच्या ठिकाणी पोचायलं अर्धा तरी घंटा लागणार व्हता.मी आपला रस्त्यानं सायकल घेऊन जात व्हतो.सगळा रस्ता सुनसान व्हता.त्या काळात रस्त्यांवर लय कमी वरदळ आसायची. कुठंतरी एखांद दुसरा माणूस दिसायचा.मी आपला विचाराच्या तंद्रीत सायकल चालवू लागलो. रस्त्यानं एक कवटाच झाड व्हतं त्या कवटाच्या झाडावर एक कठाळ्या दिसतो असं मी ऐकलं व्हतं.मी त्या झाडाकडं पाह्यलं आण शाहारून गेलो.मह्या मनातं थोडी थोडी भीती वाटाया लागली व्हती.तरीपण मंग देवाचं नाव घेवून मी तसचं सायकल दामटायलं लागलो.सायकल चालवतांनी एखांदा खडा उडला किंवा काही आवाज आला तरी मलं काळजातं धसकन करायचं.आंगाच़ पाणी पाणी व्हयाचं.कसा बसा मी साडेचार वाजेपर्यंत मर्डरच्या ठिकाणी पव्हचलो.तिथं आंधीच गर्दी जमली व्हती.त्या काळात पोलिसायचा विशेष असा दरारा असायचा. लोकं साध्या पोलिस शिपायायलंसुध्दा बोलायलं घाबरायचे.त्यामुळं गर्दीतले लोकंसुध्दा दुरूनच बॉडीलं पाहत व्हते. एवढ्यात मी गर्दीतल्या लोकांयच्या नजरेस पडलो.तसं फुटूवाला आलाऽऽ फुटूवाला आला ऽऽ म्हणून त्यांच्यात कुजबुज झाली.मी बॉडी जवळ गेलो.तिथं खुप घानं सडल्यासारका वास येतं व्हता.म्या तोंडालं रूमालं बांधला अन् चुपसायबाकडं गेलो.सायबानं मलं फुटू काढण्यासंबंधी काही सुचना केल्या.मी चुपसायबाजवळ बसलो व्हतो.बोलता बोलता मंधात एक दोनदा तेह्यनं मह्या पाठीवरबी हातं ठुला व्हता.मी सायबाच्या लयचं जवळचा हाये आसं गर्दीतल्या लोकायलं वाटू लागलं.लोक मह्याकडं नवलानं पाहू लागले.त्याह्यलं वाटलं की हे आत्ता सायबाच्या लय जवळचा माणूस हाये.त्या परसंगानंतर मंग आपोआपचं लोकायमध्ये मव्हा रिस्पेक्ट वाढला व्हता.दोन ते तीन दिवसाची बॉडी आसल्यानं सगळीकडं कुमट वास सुटला व्हता.बॉडी कुजायलं सुरुवात झालती.एक पोलीस शिपाई मलं बॉडीजवळ घेऊन गेला.त्यानं बॉडीवरील कपडा बाजूलं केला तसा मी थरथरतचं दोन पावलं माग गेलो.म्या धडपडून पडलो. आयुष्यात मी कव्हाचं असा भीषण प्रकार पाह्यला नवता.मव्ह डोस्कं गरगरू लागलं. मी मटकन खालीच बसलो.तेवढयातं सायब मणाले,“अरे त्यालं सवय नसल आसं काही पाह्याची,थोडं पाणी दे आणि दोन तीन मिनिटं शांत बस म्हणाव मग फुटू काढं मनाव त्यालं....!” आतापर्यंत गंध पावडर लावून आलेले,ईन फीन करणारे, हिप्पीवाले आशे लय गिऱ्हाईकं मी पाह्यले व्हते.त्याह्यचे चांगले चांगले फुटू म्या काढायचो.ईथ मात्र विस्कटलेले केसं, विद्रूप झालेला चेहरा, सुटलेला वास अशा परिस्थितीत मी पहिल्यांदाच फुटू काढत व्हतो. शिपायानं पाणी आणून दिलं तसं मी ढसाढसा पाणी पिऊन टाकलं.मह्या आंगाचं पाणी पाणी झालं व्हतं.भीतीनं मव्ह काळीज धडधडत व्हतं.दोन चार मिनिटानंतर शांत बसल्यावर मी जरा थार्यावर आलो. अजूनबी काळीज जाग्यावर आलं नवत़.तरीबीक मी त्या बॉडीचे फुटू काढायलं गेलो. त्या बॉडीचा चेहरा पाहिला तं प्रचंड भयानक दिसत व्हता. दोन-तीन दिवसांपूर्वीचा असल्यामुळं त्यावर किडे,मुंग्यांनी हल्ला केला होता जंगली प्राण्यायनं ठिकठिकाणी त्या बॉडीचे लचके तोडलेले व्हते.त्यामुळं ते दृश्य खूपच विद्रूप ,भयानक दिसत व्हतं. फुटू काढत असतानी मलं आळ्याबी दिसत व्हत्या. त्या बॉडीच्या एका खोबनी मधला डोळ्याचं बुब्बुळं गायप झालं व्हतं. एक डोळा बाहेर लोंबकळत व्हता. मलं एकदम मळमळून आलं मी कसं बसं आठ दहा फुटू काढले अन बाजूलं गेलो.मलं भडभडं उलट्या झाल्या.पोलिसायलं मात्र याचं काहीच वाटलं नव्हतं.तेह्यलं आशा घटना नेहमीच्याचं आसल्यानं त्याह्यची नजर मेलेली असते आसं मणतात.मव्हा तं पह्यलाच परसंग व्हता.म्या चुपसायबाजवळ गेलो आन सायबालं मणलो,“सायब दहा-बारा फुटू काढलेत,उद्या सांच्यालं नायं तं परवाल़ पहाटं तुम्हालं फुटू आणून देतो.” सायब मह्या भेदरलेल्या चेहऱ्याकडं पाहत व्हते. अजूनही मह्या डोळ्यातलं भेव तेह्यलं दिसत व्हतं.मी कलून सायकलकडं जाणार ईतक्यातचं सायब मलं मनले,“अरे महादा, घाबरू नको.पहिल्यांदा पहिल्यांदा असं व्हतचं आसते.तुलं आता आमच्यासंगट बर्याचदा यावं लागलं तव्हा मनाची तयारी कर,एकदा का नजर मेली की मंग तुलं कायबी वाटणार नाही बघं”. “ठीक हे सायब...!” आसं मनुन मी तिथुनं निंघालो. तेवढ्यात साहेबानं मलं पुन्ह्यांदा आवाज देला.तेह्यनं खिशातून पन्नास रुपयाची नोट काढली अन,“हे अॅडव्हान्सचे पैसे घे,अन फोटो आणून देतानी बिल घेवून ये व राह्यलेला हीसाब घेउन जायं”आसं ते मलं मनाले.सायबालं पैसे मांघायची मह्यातं तं हिम्मतं नवती. साहेबांनी स्वतःहूनच मलं पैसे देले याचं मलं नवल वाटलं.म्या मह्या मनालचं मणलो “चला तं पोलिसबी बिलं देतात मनायच तर!”
मलं गावात काम हाये असं मी साहेबस्नी फेकलं व्हतं.पण आता रस्त्यावरून गावाकडं कलनं बी शक्य नवतं.त्या घटनास्थळापसूनं रस्ता नजरंच्या टप्प्यात व्हता.मंग मी बळबळचं त्या गावात उधारी मागायलं गेलो.फुटू काढायलं एखादा घंटा तरी गेला व्हता.त्यामुळं आता साडेपाचं सहा तरी वाजले असावेत.सूर्य पुर्ण मावळतीलं गेला व्हता.दिवे लागणीची येळं झाली व्हती.लोकं शेतातून घराकडं येत होती गाई,म्हशी, बैलांच्या गळ्यातल्या घंटा वाजत व्हत्या. घराघरातून धुराचे लोळ निघत व्हते. चुली पेटल्या व्हत्या.बाया बापड्या तुळशीपुढं दिवे लावून सयपाकाच्या तयारीलं लागल्या व्हत्या.गडी माणसं संध्याकाळचे जनावरांचं चारापाणी व दूध काढायच्या तयारीला लागले व्हते.गावातल्या मंदिरावरील भोंग्यात हरीपाठ वाजतं व्हता.मी गावात प्रवेश केला तसे चावडीवर खेळणाऱ्या पोर्हायनं हेऽऽ हेऽऽ फुटूवाले मामा आलेऽऽ हेऽऽ हेऽऽ फुटूवाले मामा आलेऽऽ असं मनतं गलका करायं लागले. मी एक दोन घरी जावून उधार्या वसुल केल्या. आंधार पडला व्हता मनुन आता मलं पण वापस जायाची गडबड झाली व्हती.जास्त न फिरता मी सायकलवर टांग मारली आणि गावाच्या दिशेनं निंघालो.
सूर्यमावळून बराच वेळ झालता, त्यामुळं अंधारानं आपलं साम्राज्य वाढवलं व्हतं.रस्त्यानं आंधुक आंधुक दिसत व्हतं.मी अंदाजा अंदाजानं सायकल चालवत व्हतो.पांधनीचा कच्चा रस्ता व्हता.त्या जमान्यात डांबरी रस्ते नवते.पांदनीच्या दोन्ही बाजूलं झाड झुडपं व्हते.तेवढ्या अंधारात त्या झाडा झुडपायच्या हालचालीनं पानायनं सळसळ केलं की एक विचित्र आवाज याचा.त्या आवाजाची पण मलं भीती वाटू लागली. मी तं बापजन्मी कव्हा एवढ्या अंधाराचं एकट्यानं प्रवास केला नवता.मही फाटारून गेलती.रस्त्यानं जातानी मंधातच एखाद्या जंगली जनावराचा आवाज ऐकला की मंग मह्या आ़ंगावरं काटे उभे राहायचे.म्या लय घाबरून गेलतो. राहून राहून सारखं मलं दुपारा पाह्यलेल्या त्या बॉडीचा चेहराचं आठवू लागायचा.त्यो भीषण चेहरा आठवला की मलं आंजूकचं भेव वाटू लागायचं. मह्या पायातून ते मस्तकापस्तोरं अंगावूनं जोराची शिसारी जायची.मव्हं काळीज आंधीच पाणी पाणी झालतं.मलं लय भेव वाटू लागलं.तोच मह्या सायकलनं एकदाची शिव वलांडली व्हती.आजून पंधरा-सोळा मिनटांचा रस्ता बाकी व्हता. त्यानंतर मव्ह गाव होतं. थोडं का होईनं पण गावाजवळ आल्यानं मलं जरा बरं वाटू लागलं.तरीबीक राहून राहून त्या बॉडीचा चेहरा मह्या नजरंपुढं यायचाचं आन मंग अंगाचा थरकाप उडायचा.सायकल चालवत चालवत नेमकं मी त्या भूतानं झपाटलेल्या कवठाच्या झाडाजवळ आलो व्हतो.तिथं रातच्यालं कठाळ्या दिसतयं मनं..? मी त्या कवटावरच्या भुताच्या लय गोष्टी आईकल्या व्हत्या.आता मही तं लय पकारली व्हती.मी तिरकस तिरकस नजरनं त्या झाडाकडं पाहातं सायकल चालवू लागलो.जोराचं वारं सुटलं व्हतं.वावधनामुळं ते झाड आटोळे पिटोळे घेतं जोरात हालत व्हतं.वार्यानं हालायल्यामुळं तं ते झाडं आणखीनचं भयान दिसत व्हतं.निबीड आंधारामुऴं आत्ता खुपचं आंदक दिसतं व्हतं, मलं जाणवू लाघलं की त्या झाडावर कोणतरी उभं राहून त्या फांट्या धरून जोरजोरात हलवायलं का काय ते...! मनातलं भेव आता मह्या डोस्क्यात़ शिरलं व्हतं. अंगावरचा केस न केस कव्हाचाच उभा राह्यला व्हता.काळजाचं तं कव्हाचचं पाणी झालं व्हतं.मह्या हारदयाचे ठोके जोर जोरात धडधडतं व्हते.मी हवेत तं उडत नाही नं आस मल़ं वाटू लागलं. मव्ह सगऴ शरीर हलकं झालं व्हतं.आता मलं म्या हवेतं तरंगायल्यासारका वाटू लागलो.मह्या अंगातली सगळी ताकत निंघून गेली व्हती. मी जोर लावून सायकलचे पेंडल मारत व्हतो. पण सायकल काय पळत नवती मह्या डोळ्यासमोर तीनतीनदा त्या बॉडीचा चेहरा अन लचके तोडलेलं शरीरं येत व्हतं. आन मनात इच्छा नसतानाबी मही तिरपी नजर तीनदा तीनदा त्या कवठाच्या झाडाकडं जात व्हती
मी भीतीच्या आहारी गेलतो. जराक्सा जरी आवाज आला तरी मी घाबरून जायचो.तेवढ्यात वरं आभाळात एक टिटवी टिटीव टीऽऽ टिटीव टीऽऽ आसं काही बाही वरडतं व्हती.. म्या मह्या सायकललंच़ पायंडलं आजूकचं जोरानं दाबाया लागलो,पण सायकलं काय जागची हालतं नवती.मव्ह तं सगळं शरीर शक्तीहीन झालं व्हतं.एवढ्यात मी त्या कवठाच्या झाडाकडं पाह्यलं.ते झाड जोर जोरातं आटुळे वेढुळे घेतं व्हतं. मनुन.मी तं प्रचंड घाबरलो व्हतो.मी सगळ्या ताकतीनं पायंडलं दाबाया लागलो. पायंडलं काय दबतं नवतं.सायकल जाग्याऊन तीळभरंबी हालत नवती.मागचा चक्का कोणीतरी पक्का पकडलाय अशी जाणीव मलं व्हायलं लागली. मी खूप घायबरलो व्हतो. आता आपलं काय खरं नाही आसं मलं वाटू लागलं.आता आपण मरतोच याची मलं खात्री झाली व्हती. घामानं मव्ह सगळं आंग लथपथ झालं व्हतं.सायकल पुढं जातच नवती.त्यामुऴ मी सायकलवून खाली पडलो,आन पळाया लागलो.मव्हा पाय कोणतरी पकडून ठेवलाय आसं मलं वाटू लागलं.तेवढ्यातं धाडऽऽ धाडऽऽधाडऽऽ रानडुडुकरायचा कळप मह्या पुढून पळून गेला. अचानकच्या या परसंगानं मंग मही व्हती नवती ती ताकतबी संपली व्हती.मी आरडतं वरडतंचं जमिनीवर पडलो.जीवाच्या आकांतानं मी मोठमोठ्यानं वरडाया लागलो. म्या पळायचा प्रयत्न करत व्हतो पन महे पाय कोणतरी धरलेयतं आसं मलं जानवू लागलं.
तिथं बाजूलच वडरायचा आखाडा व्हता. जागलीवर आलेले जागलकरी अन दोन-चार गडी आवाजाच्या दिशेनं कंदिल घेऊनं पळतच आले.तेह्यनं पाहिलं तं मी रस्त्याच्या बाजूच्या खड्ड्यात गारं व्हवून पडलो व्हतो.महे डोळे वासलेलेच व्हते.म्या मोठ मोठ्यानं श्वास घेवू लागलो.महे हातपायं थरथर कापत व्हते.सगळ्यात आंधी त्या गड्यायनं मलं त्या खड्ड्यातून बाहेर काढूनं बसवलं.मलं काहीचं समजत नवतं.मी आरबळल्यावाणी करू लागलो.मी त्या माणसायलबी वळखलं नवतं.पण त्या गड्यायनं मलं वळखलं व्हतं. हे आपल्याच गावचा महादा फुटूवाला हाये आसं ते मनतं व्हते.त्यातल्या एका गड्यांनं आखाड्यावर आरूळी देली. आरूळी देवूनं त्यानं एक बिनगीभर पाणी आणायलं सांगितलं. तसं एक जण तिथं बिनगीभर पाणी घेऊन आलं.त्या गड्यांयऩ थोडं पाणी हातावर घेतलं आन दोन-चार सपकारं मह्या चेहऱ्यावर मारले.सपकार्यानिशी म्या भानावरं आलो. म्या भानावर आलो तसं सगळ्यायलचं ईचारलं की म्या कुठं हायं मनूनं...!तेंह्यनं घडलेली सगळी हकीकत सांगतली.आजूबाजूलं मानसं पाहूनं म्या आता हळूहळू नॉर्मल व्हत व्हतो. काळजाचे ठोके नॉर्मल व्हायलं लागले व्हते.म्या मव्हा पाय वळवला आन मांडी घालून बसलो, पाहतो त़ं कायं पाजजम्याच्या पायाकडच्या बाजूचा पत्याचं नवता.. पायजमा सायकलच्या चैनमध्ये अडकल्यामुळे हे सगळं घडलं व्हतं. मह्या डोस्क्यात लख्ख प्रकाश पडला. आता सायकल का पळत नव्हती आणि कोणीतरी माघं पकडल्यासारकं का वाटत होतं याचा उलगडा झाला व्हता.मनातल्या मनात मी खुप हासलो.मी जोरात हसलो तसं गड्यायल़ वाटलं की हे काय सरकलं का काय ब्वा?
आज घडीलं पॅन्टचा तो तुकडा म्या मह्या लग्नाच्या अल्बममध्ये मह्या बायकोच्या फुटुच्या बाजूलचं लावला व्हता. कोणी त्यो कपडा तिथं का लावलाय आसं ईचारलं की मी मंग लगेच मिश्कीलपणे सांगतो की ब्वा ह्या मह्या आयुष्यातल्या घडलेल्या सगळ्यातं खतरनाक आठवणी हायेतं मनुनं म्या त्या या अल्बममध्ये जपून ठेवलेल्या हायेतं......!!!
© गोडाती बबनराव काळे
9405807079