"नामस्मरणाची महती"
आज मला एखादी भयकथा नाही तर, मला आलेला "नामस्मरणाचा" एक अनुभव तुमच्या सोबत शेअर करायचा आहे. नुकताच ग्रुपमध्ये रस्त्यावर ठेवलेला उतारा ओलांडल्या नंतर आलेला आपला अनुभव आपल्या एका दादाने मांडला होता. मलाही अगदी तसाच अनुभव काही वर्षांपूर्वी आला होता. माझ्या कॉलेजच्या शेवटच्या वर्षातली ही घटना.
वांद्रे, मुंबई मधल्या चेतना कॉलेजमध्ये मी शिकत होते आणि तेव्हाचं आमचं घर कालीना युनिव्हर्सिटी पासून अगदीच दोन मिनिटांवर. तसं तर बसने अगदी बांद्रा गव्हर्नमेंट कॉलनी- खार- सांताक्रूझला विळखा मारून कालीना म्हणजे जवळपास अर्ध्या तासावर.. पण, तेच अंतर मधल्या रस्त्याने चालत पार करायला जेमतेम पंधरा मिनिटं.. मग, उगाचच बसला पैसे खर्च करून फिरून जर मध्ये ट्रॅफिक असेल तर अजून अर्धा पाऊण तास वाया घालवण्यापेक्षा बसच्या तिकिटाचे पैसे वाचवून गरमागरम वडा- पाव हादडत मैत्रिणींसोबत गप्पा मारत चालत चालत कालीना गाठणं अगदीच उत्तम. हा अगदी रोजचाच दिनक्रम. कॉलेज सुटल्यानंतर पंधरा मिनिटात घरात हजर म्हणून घरातूनही वक्तशीरपणाचं कौतुकच.
शाळा- कॉलेजमध्ये कधीही निबंध स्पर्धेचं बक्षीस न चुकवलेली मी त्या दिवशी तर अगदीच खुशीत होते कारण, निबंध स्पर्धेचं बक्षीस मिळवलेलं होतं ना... तेही कॉलेजच्या सिल्वर ज्युबली वर्षामध्येच.. खूप दणक्यात समारंभ केला गेला होता... सुंदर सर्टिफिकेट आणि बक्षीसाचं पाचशे- एक रुपयांचं पाकीट घेऊन स्वारी भलत्याच खुशीत चालली होती. मैत्रिणींकडून, खुद्द शिक्षकांकडून अभिनंदनपर कौतुक ऐकल्यानंतर कोण खुश होणार नाही ? बरं, अजूनही सोबत असलेल्या मैत्रीणींकडून कौतुकाचा वर्षाव सुरूच होता. मध्येच बांद्रा कॉलनीमध्ये एका वाचनालयात माझी आई सदस्य होती. तिने चार दिवस वाचून परत दिलेली कादंबरी बदलून पुन्हा दुसरी नवी कादंबरी घ्यायची तसा नियमितच माझा कार्यक्रम. त्या नुसार पुस्तक बदलून घेतलं पण, आज स्वारी अतिशयच खुशीत होती. एका हातात छोटासा तीन गुलाबांचा पुष्पगुच्छ तर दुसऱ्या हातात बदलून घेतलेली कादंबरी. आज मला त्या कादंबरीपेक्षा माझ्या सर्टिफिकेटचं आणि बक्षिसाच्या पाकिटाचं जास्त कौतुक वाटत होतं. कधी एकदा घरी जाऊन सगळ्यांना आपलं सर्टिफिकेट दाखवतेय असं झालं होतं पण, कालीना येण्यापूर्वी खार- रोडच्या एका वळणावर अर्थात एका तीन- तीठ्यावर रस्त्याच्या कोपऱ्यात एक उतारा ठेवलेला मला आणि माझ्या मैत्रिणीला दिसला. माझ्या सोबत असलेल्या मैत्रिणीने माझा हात धरून मला जवळ जवळ ढकललंच कारण, खुशीत आज मी दुर्लक्षामुळे तो उतारा ओलांडला होता. आपल्या मैत्रिणीने आपल्याला इतकं का ढकललं म्हणून मी मागे वळून पाहिलं आणि क्षणभर मी तिथेच थबकून राहिले. नेहमीच नियमित तिथे उतारे ठेवलेले असायचे पण, आज मात्र मी तिथेच थांबून तो उतारा न्याहाळून पाहत होते कारण, नेहमीच्या उताऱ्यांपेक्षा मला तो उतारा जरा वेगळा वाटला. का ?
अरे, बापरे !! त्या उताऱ्यामध्ये अबीर- गुलालच्या बुक्क्याने माखलेल्या कोहळ्यासोबत चक्क लिपस्टिक, नेल पॉलिशची बाटली, काजळाची डबी, टिकल्यांचं पाकीट असं बायकांच्या सौंदर्य प्रसाधनाचं साहित्य ठेवलेलं होतं. हे काय ? अंगावर सरसरून काटा आला. नेहमीच हे असे उतारे त्या तीन तिठ्यावर बघत होतो मग, आज आपण इतकं का भेदरलोय ? ठाऊक नाही पण, हे सगळं बघितल्यानंतर मिळवलेलं सर्टिफिकेट- बक्षीसाचं पाकीट या सगळ्या नशेतून कुठं तरी बाहेर आल्याची जाणीव झाली कारण, हा उतारा आपण ओलांडलाय... आता या पुढे काय होईल ? अडनिड्या वयात झालेली तेव्हाची ती मनाची अवस्था आजही आठवली तरी अंगावर काटाच उभा राहतो. सोबत असलेल्या मैत्रिणीला विचारलं..
"हे असं का ? लिपस्टिक- नेल पॉलिश- टिकल्या ?" "काळजी करू नकोस. डोक्यातून काढून टाक." तिने मला समजवायचा प्रयत्न केला.
घरी आले पण, या सगळ्या विमनस्क अवस्थेत माझ्या हातून एक दुर्दैवी घटना घडली. आईचं वाचनालयातून बदलून घेतलेलं नवीन पुस्तक हातातून रस्त्यातच कुठं तरी पडलं असावं. दुर्दैवी घटना यासाठी म्हटलं कारण, त्या पुढचा माझा दिवस फक्त कडक शिस्तीच्याच नव्हे तर, जमदग्नी स्वभावाच्या आईने मला त्या जाणत्या वयात दिलेला बेदम चोप आठवला तर अजूनही वाईटच वाटतं.
"वाचनालयाचं तीनशे रुपयांचं पुस्तक सांडलं... हरवलं... लक्ष कुठं होतं "? पासून सुरू झालेली तोफ धडधडत माझ्या हातातल्या सर्टिफिकेट पर्यंत आली. माझ्या हातातून ते सर्टिफिकेट घेऊन त्याचे चक्क चार तुकडे केले गेले आणि "आत्ताच्या आत्ता तडक वाचनालयात जाऊन त्या पुस्तकाचे पैसे तसंच दंड तुझ्या मिळालेल्या बक्षीसाच्या पैशांतूनच भरून यायचं त्या शिवाय जबाबदारीने काम कसं करायचं ते कळणार नाही" हे फर्मान मिळालं. क्षणभर मी बक्षीस मिळवलेल्या आनंदाच्या नशेतून जमिनीवर आले.. आले नव्हे दाणकण आपटलेच. पुढच्या फक्त अर्ध्या तासात बक्षीसाच्या पाकिटातून ३५० रुपये वाचनालयात पोहोचले होते.....
काय चूक ? काय बरोबर ? ठाऊक नाही पण, वाचनालयात भरण्यासाठी तेच पैसे वापरावेत हा आईचा निर्णय तसंच सर्टिफिकेटचे केलेले तुकडे त्या वयाच्या त्या संवेदनशील माझ्या मनात अगदी आयुष्यभरासाठी अढी बनून गेला. या बाबतीत माझ्या भावना आजही तशाच आहेत.. संताप नाही पण, दुःख जरूर.
या सगळ्या प्रकारानंतर आईसोबत माझा जवळ जवळ पंधरा दिवस अबोला राहिला. जो मला आज मी स्वतः एका मुलाची आई झाल्यानंतरही योग्यच वाटतोय. माझे बक्षीसाचे "लकी पैसे"- ती नोट मला आयुष्यभर जपून ठेवायची होती पण, कुठं तरी मला आईकडून असलेली संयमाची अपेक्षा पायदळी तुडवली गेल्याची भावना झाली.
असो.... तो दिवस माझ्यासाठी विलक्षण दुःखद गेला. बक्षीस समारंभाची ती उत्स्फूर्त झिंग, तीन तिठ्यावर नकळत ओलांडलेल्या त्या विचित्र उताऱ्यामुळे मनात निर्माण झालेली विलक्षण भीती क्षणात गायब झाली होती पण, आपल्या हातून पुस्तक गहाळ झाल्यामुळे हातून गेलेलं बक्षीसाच्या पैशांचं पाकीट आणि सर्टिफिकेटच्या आता या पुढे कधीही एकसंघ न होणाऱ्या त्या चार तुकड्यांमुळे मन अगदीच विदीर्ण झालं होतं. त्या रात्री शांत मनानं झोप येणं केवळ अशक्य..
असंच कधी तरी उशिरा रात्री झोप लागली पण, मध्यरात्री अचानक हृदयावर भयानक दाब जाणवला. शरीर झोपलेल्या अवस्थेतच हवेत या रूममधून त्या रूममध्ये अधांतरी तरंगत फिरतंय असं जाणवलं. ओरडायचा प्रयत्न केला तर तोंडातून आवाजच फुटत नाहीये. मरावं म्हटलं तर संपूर्ण शरीर लुळं पडलेलं पण, समोर प्रेमा आणि सुधीर दोघेही दिसताहेत. प्रेमा आणि सुधीर.... ( नावं बदललेलं ) माझ्याच गावातले, वडिलांच्या चुलत कुटुंबातले. प्रेमाने स्वतःच्या विवाहबाह्य संबंधांमुळे स्वतःला जाळून घेऊन आत्महत्या केलेली आणि सुधीरला वेडाच्या झटक्यामुळे भयानक अपघात होऊन त्यात संपूर्ण शरीरावर काचांमुळे प्रचंड जखमा होऊन सेप्टिक होऊन मृत्यू झालेला पण, ते दोघेही सध्या गावात त्रास देतायेत ( त्यांच्या बद्दलही लिहायचं आहे ) हे ठाऊक होतं पण, मला माझ्या समोर हे असं त्यांचं दिसणं का ? हा असा त्रास मला जवळ जवळ पंधरा दिवस झाला. दुर्दैवाने आईसोबत अबोला, कडक शिस्तीच्या भावांसोबत बोलणं नसल्यामुळे आणि कडक स्वभावाच्या वडिलांसोबत तसं बोलणंच होत नसल्यामुळे ही गोष्ट कोणासोबतही व्यक्त करता येत नव्हती. अजूनही हे लिहितानाही डोळ्यांत पाणीच आहे.
कॉलेजचं शेवटचं वर्ष... कसं होणार आपलं ? पण, सुदैवाने शेजारी राहणाऱ्या काकूंसोबत माझे खूप जिव्हाळ्याचे संबंध असल्यामुळे या सगळ्या घटना- बक्षीस समारंभापासून आईचं वाचनालयातलं पुस्तक नकळत माझ्या हातून हरवणं आणि त्याचे पैसे दंड म्हणून माझ्याच बक्षिसाच्या रकमेतून भरणं, सोबत रात्री झोपल्यानंतर होणारा हा भयानक भीतीदायक विचित्र त्रास सगळंच विस्कटून काकूंना सांगितलं.
काकूंनी मला सुचवलं, "देवाचा धावा कर.. गणपती बाप्पाचं नामस्मरण कर. गणपती बाप्पा बुद्धी दाता आहे. रोज न चुकता रात्री झोपताना गणपती स्तोत्राचा नियमित जप कर. सगळं ठीक होईल." आणि मी त्या नुसार रोज रात्री झोपण्यापूर्वी नियमित गणपती स्तोत्राचं पठण करायला सुरुवात केली आणि खरंच चमत्कार झाला. माझा त्रास बंद झाला.
काकूंनी आईला सुद्धा खडसावलं.
"पोरीनं बऱ्याच गोष्टी मनाला लावून घेतल्या आहेत. सांभाळा तिला.. शेवटचं वर्ष आहे. तुमच्या घरातल्या सगळ्यांच्याच शिस्तीच्या बडग्यामुळे काही विपरीत नको घडायला. पोरीचं वर्ष वाया जाईल आणि त्याहूनही जास्त भयानक म्हणजे पोरगी मनाने खचेल" त्यानंतर आई किंचितशी मवाळ झाली.
सांगायचा मुद्दा असा की, खरंच नामस्मरणात खूप ताकद आहे. आपल्या कुलस्वामिनीच्या नामाचा जप, आठवणीने तिला मारलेली हाक तिला ऐकू जाते. ती आपल्या भक्ताच्या हाकेला धावून जाते. श्री स्वामी समर्थांच्या तारक मंत्राच्या जपाची महती मी सांगण्याची गरज नाही. खरंच, आयुष्य कधी कधी कठोर असेल पण, नामस्मरणामध्ये आपल्याला त्या संकटातून तारून नेण्याची क्षमता असते. त्यामुळे केवळ संकटातच नव्हे तर आपल्या रोजच्या दैनंदिन आयुष्यातही जर आपण नामस्मरणाला आपल्या आयुष्याचा महत्वपूर्ण भाग बनवला तर आयुष्यात येणारी संकटं अर्थात आपली परीक्षा पार करायला बळं येतं. संकटं म्हणजे खरं तर आपली परीक्षाच असते.. आयुष्यात पुढे जाण्यासाठी आपण किती योग्य आहोत हे सिद्ध करण्याची एक संधी. ती संधी मिळवण्याची ताकद.. अर्थात सकारात्मक बुद्धी आपल्याला नामस्मरणातून मिळत जाते... हा आयुष्यात मला आलेला नामस्मरणाचा चमत्कारिक आणि सुखद अनुभव...
जरी या झोपेत घडणाऱ्या विचित्र अवस्थेला आज आपण "स्लीपिंग पॅरालिसीस" किंवा अशीच काही तत्सम नावं दिली तरीही हे नाकारता येत नाही की, त्या विचित्र भीतीदायक अवस्थेतून मनाला सावरण्याचं बळ हे केवळ नामस्मरणामुळे मिळालं...
!! ओम गं गणपतये नमः !!
!! श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी !!
©® सौ. आशा आशिष चव्हाण...