"सूनबाईंचे भूत"
श्रीहरी.. गावच्या फॉरेस्ट ऑफिसमध्ये बदली ऑफिसर म्हणून आला आणि पंधरा दिवसांत जंगलाच्या वेशीवर तीन मृतदेह सापडून आले. हे नक्की काय गौडबंगाल आहे ? म्हणून श्रीहरी गावात जरा चौकशी करण्यासाठी म्हणून शिरला. तशी मोघम माहिती त्याला त्याच्या इतर सहकाऱ्यांनी दिलेली होतीच.
जंगलात वाघ, सिंह अशी श्वापदं असल्याची नोंद फॉरेस्ट ऑफिसमध्ये तरी नव्हती पण, इतर जनावरं मात्र विपुल प्रमाणात होती. गावातले तरुण हौस म्हणून गावठी कट्टा सोबत घेऊन जंगलात रानटी डुक्कर मिळालेच तर ससे, मोर असल्या जनावरांची शिकार करण्यासाठी जायचे. जंगलात बंदूक घेऊन शिरलेले हे गावचे हौशी शिकारी कधीही रिकाम्या हाताने परतत नसत. एखादं लहानसं जनावरही त्यांना मेजवानी करण्यासाठी मिळायचंच. जंगल इतर वनौषधींनीसुद्धा समृद्ध होतं. जंगलाच्या मध्यभागी अखंड बाराही महिने खळाळून वाहणारा प्रचंड मोठा धबधबा होता आणि धबधब्याच्या पाण्यावर संथ वाहणारी शितल नदीसुद्धा होती. अनेक तऱ्हेची फुलं तसंच मधुर रानच्या मेव्याने समृद्ध असं ते जंगल होतं पण म्हणतात न 'कधी कधी दैवाच्या मनात काही वेगळंच असतं'. शांत अशा या गावात एक अप्रिय घटना घडली आणि गावाचं आणि गावकऱ्यांचं नशीबच बदललं.
गावच्या सरपंचांची मुंबईहून आलेली नवीन सूनबाई आपल्या नवऱ्यासोबत आपल्या मुंबईच्या मित्र- मैत्रिणींना सोबत घेऊन फॉरेस्ट ऑफिसची ओपन जीप आणि गावठी बंदूक सोबत घेऊन एखादं रानटी डुक्कर किंवा एखादं जनावर चविष्ट मटणासाठी मिळेल म्हणून शिकारीसाठी जंगलात गेली.
सरपंचांचा मुलगा तसा मुंबईतच राहणारा. बेताल, बेशिस्त, उनाड, वाकड्या बुद्धीचा. बायकोला आणि इतर मित्र मैत्रिणींना सोबत घेऊन जीपने जंगलात वाऱ्याच्या वेगाने शिरला. ते जंगलात बराच वेळ फिरले. सगळं कसं छान चाललं होतं पण, संध्याकाळी मात्र गावात जीपमधून सरपंचांचा मुलगा आणि इतर मित्र मैत्रिणी धाय मोकलून रडत माघारी आले. सरपंचांच्या सुनेवर वाघाने झडप घातली होती आणि तिला ओढत अगदी जंगलाच्या मध्यभागी असलेल्या धबधब्यापर्यंत घेऊन गेला होता.. इथंपर्यंतच त्या सर्वांनी पाहिले. सोबत असणारे सर्व जण मनात असूनही तिला मदत करु शकले नाहीत कारण, वाघाच्या रौद्रावतारासमोर तिला वाचवण्याचे कोणाचेही धाडस झाले नाही.. फॉरेस्ट ऑफिसचा स्टाफ, गावच्या पोलिस ठाण्याचे सर्व अधिकारी जंगलात इन्व्हेस्टिगेशनसाठी गेले पण, त्यांना जंगलात कुठेही सरपंचांची सून किंवा तिच्या शरीराचे काहिही अवशेष सापडले नाहीत पण, धबधब्याजवळच्या खडकांवर भरभरून सांडलेले रक्त, सूनबाईंच्या साडीचे फाटलेले तुकडे, सुनबाईच्या चपला, हातातले चमचमणारे हिऱ्यांचे काकण, कानांतले चमचमणारे हिऱ्यांचे डूल हे मात्र सापडले.. इतक्या अस्ताव्यस्त पसरलेल्या ऐवजावरुन एवढे नक्की झाले की, वाघाने सूनबाईंना एकतर खाऊन टाकले असावे किंवा, नदीच्या प्रवाहात तिचे शव वाहून गेले असावे. अनेक दिवस तपास करूनही जेव्हा सूनबाईंचा काही मागमूसही लागला नाही तेव्हा मात्र पोलिसांनी नाइलाजाने तपास थांबवून सूनबाईंची फाईल बंद केली. सरपंचांनी आणि त्यांच्या उनाड मुलाने बायकोचे विधी ब्राह्मणाला विचारून पूर्ण केले कारण, सुनबाईच्या शवावर धार्मिक विधी शव न सापडल्याने करता आले नव्हते आणि विधी करणे गरजेचे असते त्याशिवाय तिच्या आत्म्याला मुक्ती मिळणं कठीण. तसंच सूनबाई आता परत कधीही येणार नाहीत असं स्वत:ला समजावून त्यांनी आपल्या रोजच्या दिनचर्येला सुरुवात केली.
मात्र असे काय बिनसले कोणास ठाऊक पण, काही दिवसांनंतर अचानकच जंगलातून जोरजोरात एका स्त्रीच्या रडण्याचा, विचित्र हसण्याचा आवाज ऐकू येऊ लागला. "मला वाचवा.. वाघ आला.. वाघ आला.. वाचवा वाचवा".. असा आवाज ऐकू येऊ लागला. जंगलातून बेफाम दगडांचा वर्षाव होऊ लागला. जंगलाची पाहणी करताना फॉरेस्ट अधिकारी जखमी होऊ लागले. रडण्याचा, हसण्याचा आवाज नक्कीच सरपंचांच्या सूनबाईंचाच आहे हे पक्के झाले मात्र, संपूर्ण जंगल पिंजूनही सूनबाईंचा मागमूसही सापडणे कठीण झाले होते. याचा सरळ सरळ असा अर्थ निघत होता की, सूनबाईंचंच भूत जंगलात रडत- हसत फिरतंय. सूनबाईंच्या या भूताची गावात दहशत निर्माण झाली. सतत रडण्याचा, हसण्याचा, पैंजणांचा आवाज ऐकून घाबरून हळूहळू गावकरी जंगलाच्या दिशेने जायचेच बंद झाले. एकच फॉरेस्ट ऑफिसर आणि एक त्याचा सहकारी.. ते दोघेही जंगलाची टेहळणी करण्यासाठी जंगलात शिरण्यास धजावत नव्हते. हळूहळू गावचे ते समृद्ध जंगल भुताटकीसाठी कुप्रसिद्ध झाले. जंगलात लाकूड तोडण्यासाठी किंवा औषधी झाडपाला आणण्यासाठी शिरणारी व्यक्ती नंतर जंगलाच्या वेशीजवळ मृत अवस्थेतच सापडू लागली त्यामुळे नंतर गावकर्यांनी जंगलाच्या दिशेने जायचे अगदीच बंदच केले.
त्या दिवशी अमावस्या होती.. तसेही गावातील लोक सरपंचांच्या सूनबाईंच्या आत्म्याच्या भितीने घराचा दरवाजाही उघडा ठेवत नसत जंगलात जाणे तर दूरच. पण, काही अतिशय महत्त्वाची कागदपत्र घेऊन तालुक्याच्या गावी गेलेल्या फॉरेस्ट ऑफिसरला अंमळ जरा उशीरच झाला. दुपार झाली. गावात संध्याकाळपर्यंत पोहचू असे निश्चित करून फॉरेस्ट ऑफिसर वेगात गाडी चालवू लागला. गावाच्या दुसऱ्या टोकाला आणि जंगलाच्या बाजुला आल्यावर फॉरेस्ट ऑफिसरची गाडी धडधड करू लागली.. पेट्रोल संपले की काय ? त्याला काय करावे ते सुचेनासे झाले. परत जावे तर आता त्याचा उपयोग नाही.. आणि इतक्यात सर्वत्र अचानक दाट धुकं पसरू लागलं. चित्रविचित्र रडण्याचा, विकट हसण्याचा आवाज ऐकू येऊ लागला. वाऱ्याचे प्रचंड झोत फॉरेस्ट ऑफिसरच्या अंगावरून जाऊ लागले. पानांची सळसळ वाढली. दाट धुक्यातून गाडी चालवणंही त्याला कठीण झालं. तो अर्धमेला झाला. त्याला दरदरून घाम सुटला. सर्वत्र धुकं आणि धुराच्या मार्याने प्रचंड अंधारुन आलं..
अमावस्येच्या भीतीने घरात दडून बसलेलं संपूर्ण गाव पहाटे कोंबड्याने बांग देताच जागं झालं. सूर्य उगवताच सगळे गावकरी आपापल्या घरातून बाहेर आले आणि हळूहळू गावभर बातमी पसरली की, सरपंचांच्या सूनबाईंच्या आत्म्याने आणखी एक बळी घेतलाय.. जंगलाच्या वेशीजवळ फॉरेस्ट ऑफिसरचे शव सापडले. नवीन फॉरेस्ट ऑफिसर आला, पोलिस पथक आले.. तपासण्या झाल्या.. उत्तर फक्त एकच- 'सूनबाईंनी आणखी एक बळी घेतलाय' आणि अशा रितीने सूनबाईंच्या आत्म्याची दहशत गावातच नाही तर पंचक्रोशीत पसरू लागली. गावकर्यांचे जंगलाच्या दिशेने जाणेच बंद झाले.. फॉरेस्ट अधिकारीसुद्धा बिनकामाचे झाले.
"श्रीहरी".. आलेला नवीन फॉरेस्ट ऑफिसर. हे सर्व ऐकूनच अतिशय घाबरला. अशातच त्यालाही एक दिवस तालुक्याच्या गावी जावं लागलं. सकाळी सूर्य उगवताच गावातून निघाला. सगळी कामं दुपारपर्यंत आटोपून थोडा बाजारहाट करून दुपारपर्यंत माघारी फिरु आणि संध्याकाळपूर्वी गावात परत येऊ या हिशोबाने निघाला पण, का कुणास ठाऊक आज त्याचंही नशीब बहुतेक बरं नसावं म्हणून की काय त्याच्या प्रत्येक कामात अडथळे येऊ लागले. नियोजित कामांची आवराआवर करेपर्यंतच दुपार झाली म्हणून बाजारहाट पटपटच आवरून तो गावात परतीच्या प्रवासाला लागला. आधीच उशीर झालाय जरा लवकर पोहोचू म्हणून 'जवळचा रस्ता' म्हणून तो जंगलाजवळच्या रस्त्याने निघाला. संध्याकाळ झाली. सूर्य मावळू लागला पण आता मात्र श्रीहरीला दरदरून घाम सुटला.'आजचा दिवस बहुतेक आपला आयुष्यातला शेवटचाच दिवस आहे' असं मनात म्हणत तो हळूहळू गाडी चालवू लागला आणि अचानक त्याला जंगलाच्या मध्यभागी जाणवलं की, गार वाऱ्याची झुळूक आपल्या शरीराला स्पर्शून जातेय. अचानक संध्याकाळच्या त्या अर्धवट उजेडात दाट धुकं पसरलं. सगळीकडे पानांची सळसळ सुरू झाली आणि अचानक जोरजोरात रडण्याचा, विकट हसण्याचा आवाज ऐकू येऊ लागला. नक्कीच !! आपल्या आजुबाजूला सरपंचांच्या सूनबाईंचा आत्मा असावा हे तो समजून चुकला. मिट्ट धुक्यात डोळे किलकिले करून त्याने समोर पाहिले तर त्या धुक्यात पांढरी शुभ्र साडी नेसलेली सरपंचांची सूनबाई उभी होती.. हो !! ती सरपंचांची सूनबाईच होती. मोकळे सोडलेले केस, पांढरी शुभ्र साडी, मंद प्रकाशातही चमचमणारे तिच्या हातात हिऱ्यांचे काकण, कानात हिऱ्यांचे चमचमणारे डूल.. नक्कीच !! हा सरपंचांच्या सुनेचाच आत्मा !! श्रीहरीच्या तर घशाला कोरडच पडली. इथून निसटायचे कसे ? ती तर गाडीच्या समोरच फक्त वीस पंचवीस फुटांवर उभी.. तिचं रडणं, मध्येच विकट हसणं आसमंत भेदून टाकत होता. काय करावे ? आत्माच तो.. आपण कितीही जिवाच्या आकांताने धावलो तरी कुठंवर धावणार ? आपल्या आयुष्याची दोर इथंवरच.. पण, बघू काय होतं ते असं म्हणत श्रीहरी वाऱ्याच्या वेगाने गाडी सूनबाईंना भेदून निघून गेला. तिने नंतर काय केले.. किंवा तिचे नंतर काय झाले.. हे सुद्धा मागे वळून न पाहता श्रीहरी वाऱ्याच्या वेगाने गाडी चालवत गावात निघून आला. गावात आल्यावर त्याने आपली आपबीती गावकऱ्यांना सांगितली आणि गावकऱ्यांनी 'निदान श्रीहरी गावात जिवंत परत आला, त्याच्या आयुष्याची दोर नक्कीच बळकट असणार' या विचाराने देवाचे आभार मानले. आलेल्या त्या भयानक भूताटकीच्या अनुभवाने अर्धमेल्या झालेल्या श्रीहरीचे भानच हरपले.
सकाळी डोळे उघडताच पाहतो तर काय पंचक्रोशीतल्या एकुलत्या एक हॉस्पीटलमध्ये सहकार्यांसोबत खाटेवर झोपलेला.. त्या लहानशा गावठी हॉस्पीटलमध्ये कधी नसते अशी लगबग- धावपळ आज चालली होती. बाजूच्याच खाटेवर सरपंचांच्या मुलावर उपचार सुरू होते तर दुसऱ्या खाटेवर रक्ताने माखलेली शुभ्र साडी नेसलेल्या सूनबाईंवर उपचार सुरू होते. आजूबाजूला गावकर्यांच्या आणि पोलिसांच्या बोलण्याने आता मात्र सर्व परिस्थिती श्रीहरीच्या लक्षात येऊ लागली होती.
सरपंचांचा मुलगा ऐष आरामी होता. जसा नवरा तशीच ऐतखाऊ त्याची बायको. गावातल्या घनदाट जंगलाचा, जंगलाच्या मध्यभागी असलेल्या बाराही महिने धो धो वाहणार्या धबधब्याचा आणि धबधब्याच्या पाण्यावर वाहणार्या नदीचा उपयोग आपण 'बनावट विदेशी मद्यनिर्मितीसाठी' करु शकतो आणि पाण्यासारखा बक्कळ पैसा कमावू शकतो पण त्यासाठी फॉरेस्ट ऑफिसची परवानगी मिळणे कठीण म्हणून जंगलात फॉरेस्ट ऑफिसचीच गाडी घेऊन मित्रांसोबत जंगल सफारीसाठी जाणे.. तिथे सूनबाईंचे गायब होणे, धबधब्याजवळच्या खडकाळ जागी क्रृत्रिम रक्ताचे डाग सोडणे, सूनबाईंचे चमचमणारे हिऱ्यांचे कांकण आणि चमचमणारे हिऱ्यांचे डुल.. पुढे नक्कीच वातावरणनिर्मितीसाठी उपयोगी पडू शकतात म्हणून तेही धबधब्याजवळच्या जंगलात सोडणे.. अशी योजना आखून सरपंचांच्या मुलाने, सुनेने आणि त्यांच्या मित्रपरिवाराने ती अमलातही आणली. त्यानंतर सूनबाईंच्या रडण्याचा, हसण्याचा आवाज ऐकवुन लोकांमध्ये भूताटकीची दहशत निर्माण केली गेली. हळूहळू गावकऱ्यांचेच नाही तर फॉरेस्ट ऑफिसरचेही भूताटकीच्या दहशतीने जंगलाकडे न फिरकणे हे पथ्यावर पडल्याने जंगलात अगदीच मध्यावर असलेल्या धबधब्याजवळ 'बनावट विदेशी मद्यनिर्मितीचा' छोटा कारखाना बनवला गेला. तसेही भुताटकीच्या भितीने धबधब्याजवळ कोणीही फिरकत नव्हतेच आणि कुणी जंगलात शिरला आणि सापडलाच तर नियोजनबद्ध रीतीने त्याला ठार मारले जाई आणि पुनश्च कुणीही जंगलात शिरण्याचे धाडस करु नये तसंच लोकांमधे सुनबाईच्या भूताची दहशत कायम रहावी म्हणून ते शव गावच्या वेशीवर फेकले जाई. लोकांच्या भीतीचा- अज्ञानाचा फायदा घेऊन सरपंचांचा मुलगा बनावट विदेशी मद्य शहरात विकून बक्कळ पैसा कमवु लागला पण, फॉरेस्ट ऑफिसर- श्रीहरीच्या एका कृतीने मात्र सगळाच कारभार उघड झाला आणि संपूर्ण गाव सरपंचांच्या सूनबाईंच्या भूताच्या दहशतीतून मुक्त झाला. आज सरपंचांची सूनबाई आणि मुलगा तुरुंगात खडी फोडत आहेत तर त्यांच्या कर्तृत्वाने सरपंचांनी अंथरुण धरले आहे. संपूर्ण गाव भीतीमुक्त जगत आहे. जंगलात गुरे ढोरे चरायला नेणं, लाकूडफाटा- वनौषधी या साठी जंगलात पुन्हा पूर्वीप्रमाणे बिनघोर जाणं परत सुरू झालं आहे.. तर, नवीन फॉरेस्ट ऑफिसर श्रीहरीचं त्याच्या हातून नकळत घडलेल्या कृतीमुळे बहादुरीसाठी पारितोषिक देऊन सन्मान केला गेला आहे.
©® सौ. आशा आशिष चव्हाण...