"ती"
सव्वीस जुलै २००५.. मुंबईवर कोसळलेले अस्मानी संकट.. मध्य मुंबईतील नामांकित कॉलेजमध्ये रात्रीचे मॅनेजमेंटचे वर्ग सुरू होते. डिग्री घेतलेले विद्यार्थी दिवसा नोकरी करुन संध्याकाळी पाच ते आठ या वेळेत हे वर्ग अटेंड करतात.
मुसळधार पाऊस पडतोय, थांबण्याची चिन्हं दिसत नाही आहेत.. त्यातच मुंबईत सर्वत्र पाणी भरल्याच्या बातम्या येऊ लागल्याने प्राचार्य महोदयांनी आज वर्ग इथंच थांबवून सर्व मॅनेजमेंटच्या विद्यार्थ्यांना घरी परतण्याची मुभा दिली. वर्ग महत्त्वाचे असतात म्हणून भर पावसात मुंबई तुंबली आहे हे पाहताही थोड्या फार जवळचे विद्यार्थीच कॉलेजमध्ये आले होते. प्रत्येक लेक्चर महत्त्वाचे तर पटावर हजेरीही महत्त्वाची पण प्राचार्यांच्या घरी परतण्याच्या परवानगीमुळे आलेले थोडे फार विद्यार्थी खूश झाले.
मानसी.. कॉलेजचा आवार कसाबसा पार करून मुख्य रस्त्यावर आली. प्रचंड पावसामुळे सगळीकडे तुडुंब पाणी भरले होते. ढग गडगडत होते. भर संध्याकाळी सर्वत्र अंधारुन आले होते त्यातच भयाण शुकशुकाट जिथे नजर फिरवावी तिथे पाणीच पाणी.
थोड्या निर्जन जागी मानसी आली आणि प्रचंड घाबरली. नेहमीचा हा रस्ता बसने पार करतानासुद्धा तिथल्या वातावरणाने घाबरणारी मानसी आज मुंबापुरीत पाणी तुंबल्यामुळे बस बंद असल्यामुळे पायीच पाणी कापत कापत वेगाने चालण्याचा प्रयत्न करत होती पण, पाण्यामुळे रस्तेच नाही तर रस्त्यातील नालेसुद्धा तुडुंब भरल्यामुळे तिच्या चालण्याच्या वेगाला मर्यादा येत होत्या. एका ठराविक ठिकाणी काही गर्दुल्ल्यांनी केलेला अड्डा बघून मानसीच्या काळजात धस्स झालं.. हा रस्ता आपण कसा पार करू ? या विचारानेच तिच्या हातापायाला कापरं भरलं. तिने मागे वळून पाहिलं जवळजवळ पाच- सात गर्दुल्ले तिच्या मागूनच येत होते. त्यांनी तिच्याबद्दल विभत्स भाषा बोलायला सुरूवात केली. हा एक ठराविक पट्टा त्या विभागात गर्दुल्ल्यांच्या गुंडगिरीसाठी कुप्रसिध्दच आहे.
भर सुमसाम रस्त्यात, पाण्याच्या डोहात एकटी मानसी. मनातून खूपच घाबरली होती. जरी आपण ओरडलो तरीही दूरवर फक्त एकांत.. कुणीही मदतीला येणार नाही त्यातच मागून पाच- सात गर्दुल्ले..'आज आपला आयुष्यातला शेवटचाच दिवस असावा' असं समजून ती मनातून देवाचा धावा करू लागली. ते सर्व गर्दुल्ले मानसीपासून काही पावलांच्याच अंतरावर असतील या जाणीवेने मानसी अर्धमेली झाली होती. इतक्यात कुणास ठाऊक कुठून पण समोरून "ती" आली. "तिने" मानसीकडे पाहिले मानसीला एक गोड स्मितहास्य देऊन तिने मानसीचा हात आपल्या एका हातात धरला आणि आपला दुसरा हात मानसीच्या खांद्यावर ठेवला. तिच्या नजरेतला आश्वासक भाव पाहून आता मात्र मानसीला बऱ्यापैकी धीर आला पण "ती" सुद्धा मुलगीच आणि मागून येणारे ते पाच सात गुंड- गर्दुल्ले- मवाली. आज आपले दोघींचेही काही खरे नाही' असे भाव मानसीच्या डोळ्यांत 'तिने' स्पष्ट पाहिले पण, 'तू घाबरू नकोस मी आहे ना' असे नजरेनेच खुणावून तिने मानसीच्या खांद्यावर ठेवलेला आपला हात जरा घट्टच केला जणू तिने मानसीला आपल्या लहान बहिणीप्रमाणे कवेतच घेतले असावे. तिच्या या तरल मुलायम कृतीमुळे मानसीला थोडा धीर आला. मानसीने आणि 'तिने' जरा जरबेनेच मागे वळून त्या गर्दुल्ल्यांकडे पाहिले. का कुणास ठाऊक पण अचानक ते सर्वजण पाण्यातच थबकले आणि आपले विभत्स संवाद थांबवून मागे वळून आल्या पावली परत निघून गेले. मानसीचा जीव भांड्यात पडला. अजून थोडा रस्ता बाकी होता. 'तिने' मानसीचा हात आपल्या हातात धरून तिला हमरस्त्यांपर्यंत आणून सोडले. आता मानसी अगदी निर्धास्तपणे पुढे जाऊ शकत होती. पुढे मुख्य रस्त्यावर मात्र माणसांची बर्यापैकी गर्दी होती. सर्व जण पाण्यातून वाट काढत चालले होते. मानसीसुद्धा त्या गर्दीत मिसळली आणि 'तिने' मानसीचा हात अलगद सोडला. मानसीने तिला तिचे नाव विचारले पण फक्त एक गोड स्मितहास्य देऊन "ती" परत मागे फिरुन निघूनही गेली. 'ती' दिसेनाशी होईपर्यंत मानसी भर रस्त्यात, पाण्यात उभी राहून 'तिची' पाठमोरी आकृती 'ती' दिसेनाशी होईपर्यंत भरल्या डोळ्यांनी पाहतच होती. मनातून देवाचे आणि देवाने पाठवलेल्या 'तिचे' आभार मानून मानसी पाण्यातून रस्ता कापत घरी निघून गेली.
पुढचे चार दिवस मुंबईसाठी आणि मुंबईकरांसाठी अतिशय भयप्रद असेच गेले. न भूतो न भविष्यती असा नरसंहार पावसाने केला होता.
चार दिवसांनी मानसी कॉलेजमध्ये गेली. तिने आपल्या मित्र मैत्रिणींना घडलेली हकीगत- आपली आपबिती सांगितली. 'ती' कोण होती याचं मात्र उत्तर मानसीकडे नव्हतं. बरं, तिचे आभारही मानायचे राहूनच गेले होते म्हणून मानसीचं मनही तिला आतून खात होतं. परीक्षेचं वेळापत्रक नोटीस बोर्डवर लावलं हाेतं ते पाहण्यासाठी मानसी आणि तिच्या मैत्रिणी नोटीस बोर्डजवळ गेल्या तिथेच मानसीला पुरस्कर्त्या विद्यार्थ्यांच्या फोटोंमध्ये तिचा फोटो दिसला. मॅनेजमेंटच्या प्रथम वर्षांत डिस्टिंक्शन घेऊन पास झालेली 'ती'.. कॉलेजच्या ऑफिसमधून 'तिचे' नाव आणि पत्ता घेऊन मानसी आपल्या एका मैत्रिणीला सोबत घेऊन तिच्या घरी जायला निघाली.. तिचे आभार मानण्यासाठी. आज निर्धास्त मनाने मानसी 'तिला' घट्ट मिठी मारणार होती..
******************************************
सखी.. सखी गोडबोले. अतिशय हुशार- देखणी आणि चुणचुणीत मुलगी. कॉलेजमधलं डिग्रीपर्यंतचं शिक्षण पूर्ण करून त्याच कॉलेजमध्ये मॅनेजमेंटचं शिक्षण घेत होती. दिवसा नोकरी आणि संध्याकाळी कॉलेज असा सखीचा दिनक्रम.. सखी नेहमीप्रमाणे कॉलेजमध्ये आली पण, बसचा संप असल्यामुळे आज कॉलेज सुटल्यावर बस नसल्यामुळे सखी चालतच हमरस्त्यांपर्यंत पायी जायला निघाली. रात्रीचे आठ वाजले असतील. सगळीकडे दिव्यांचा लखलखाट पण बस नसल्यामुळे वर्दळ कमीच. सखीच्या मनात भीतीनं काहूर माजलं. हा थोडासा निर्जन पट्टा तसा बदनामच आहे- गर्दुल्ल्यांच्या गुंडागर्दीसाठी. आल्या गेल्या बाया- बापड्यांना छेडणे, नशा करणे हाच यांचा मुख्य उद्योग. सखी भराभर पावलं उचलून चालू लागली पण, तिला जाणवलं की, आपल्या मागून एक- दोन नव्हे तर पाच- सहा मवाली गर्दुल्ल्याचा घोळका येत आहेत. सखीला त्यांचा आवाज आपल्या अगदी जवळ आल्या सारखा जाणवला म्हणून सखी प्राण हातात घेऊन धावू लागली. सहा गुंड आणि एकटी सखी. किती धावणार ? दुर्दैवाने अचानकच समोरून एक भरधाव ट्रक आला आणि क्षणार्धात सखीला उडवून निघूनही गेला. डोळ्यांची पापणी लवते न लवते इतक्या वेगात घडलेलं ते भीषण दृश्य पाहून ते गर्दुल्लेसुद्धा भयभीत होऊन पळून गेले. सखी तिथेच गतप्राण झाली होती. ती घटना होती वर्ष 2003 मधली !!
मानसी अजूनही धक्क्यातून सावरली नव्हती. मग 'ती' नक्की कोण होती जिला पाहताच ते गर्दुल्ले आल्या पावली परत निघून गेले होते ??
©® सौ. आशा आशिष चव्हाण...