ही गोष्ट आहे साधारण चाळीस वर्षापुर्वीची. माझा एक मित्र एका सरकारी इस्पितळात लॅब टेक्निशियनचे काम करत होता.पूरूष वंध्यत्वासंबंधीचे विर्य तपासणीचे काम तो करत असे.तेव्हा आतासारखी सगळीकडे ह्या तपासणीची सोय नव्हती.त्याच्या विभागप्रमुख डॅाक्टरांनी त्याला ताकीद दिली होती की कुठल्याही पेशंटला त्याच्या रिपोर्टची माहिती परस्पर द्यायची नाही.डॅाक्टरांच्या उपस्थितीतच ती माहिती द्यायची. पेशंट रिपोर्टची माहिती घेण्यासाठी लॅब मध्ये अधीरतेने येत.लॅब दुसऱ्या मजल्यावर होती.त्याकाळी वंध्यत्व निवारण केंद्र अगदी हाताच्या बोटावर मोजता येतील एवढीच होती.लांबून लांबून लोक उपचारासाठी येत. त्या दिवशी जास्त काम असल्याने तो रात्री उशिरा नउ वाजता निघाला. पेशंटना भेटण्याची वेळ संपल्याने आता हॅास्पिटलमध्ये एकदम शांतता होती. सगळे विभागप्रमुख केव्हाच घरी गेले होते. सगळा शुकशुकाट. सगळ्या लॅब बंद.त्याच्या लॅबच्या बाजूला गॅलेरी होती. त्या गॅलेरीच्या कट्ट्यावर एक माणूस खाली उडी मारण्याच्या पवित्र्यात बसला होता.त्याला पकडायला हा धावला तर त्याने खाली उडी मारली.मित्राने खाली वाकून पाहिले . खाली काही दिसत नव्हते. तो दोन जिने धडधड उतरून खाली पोहोचला तर सगळा शुकशुकाट. तो माणूस कुठेही पडलेला दिसेना. घाबरून तो तिथून तडक निघाला आणि घरी पोहोचला. रात्रभर आधीचा प्रसंग आठवून त्याला झोप आली नाही.
सकाळी लवकरच लॅबमध्ये पोहोचला.काल असा काही प्रकार घडलाय अस कुठे ऐकू आले नाही.मग विभागप्रमुखांना भेटून सगळी हकिगत सांगितली.त्यांनी जे सांगीतले त्याच्यावर त्याला विश्वास ठेवावाच लागला.ते म्हणाले, म्हणून मी तुला सांगीतले की रिपोर्ट कोणालाही सांगायचा नाही की द्यायचा नाही परस्पर. चार पाच वर्षांपुर्वी एका पेशंटने रिपोर्ट निगेटिव्ह आला आहे हे ऐकल्याबरोबर डॅाक्टरांना न भेटताच आपल्याला कधीच स्वत:चे मुल होणार नाही ह्या नैराश्यापोटी त्या गॅलेरीतून आत्महत्या केली होती.तो अधूनमधून लोकांना रात्रीच्या वेळी दिसतो.त्याचा काही त्रास नाही.पण त्याचा आत्मा अजून इकडेच घोटाळतोय.
आता त्या हॅास्पिटलमध्ये दिवसरात्र माणसांची चहलपहल असते.दिवसरात्र जन्ममृत्यूचे तांडव चालू असते इतकी गर्दी वाढली आहे.माणसांना सुध्दा उभे रहायला जागा नाही. तिथे अतृप्त आत्म्यांची काय कथा.
विद्या.
२९/३/२०१८.