"रोहन मित्रा, तू असं करायला नाही पाहिजे होतंस"...
( सत्यकथा )
पृथ्वीतलावर भूतं असतात किंवा नसतात, त्यांना शरीर असतं की, त्या केवळ संवेदनाच असतात, त्यांना स्पर्श असतो का ? ते कदाचित भास- आभासच असतात ? असे अनेक विचार आपल्या मनात येऊन जातात पण, या प्रश्नांना बगल देत बऱ्याचदा काही घटना आपल्या सोबत अशा घडून जातात की, त्यांची उकल करताना मात्र आपला मेंदू भंजाळून जातो. अनेकदा या अशा सत्यकथा या भीतीदायक असतातच पण दुःखद जास्त असतात. एक लेखनवेडी म्हणून मला सस्पेन्स कथा लिहायला आवडतात पण, खरा कस तेव्हा लागतो जेव्हा आपण एखादी "सत्य" कथा लिहायला घेतो आणि त्या सत्य घटनेला एक दुःखद कीनार असते तेव्हा त्याची सुरुवात ती कथा लिहिताना नक्की कुठून करावी.. आपण अनुभवलेल्या त्या घटनेच्या शेवटापासून की सुरुवातीपासून- जेव्हा खरं तर त्या घटनेच्या दु:खद बांधणीला सुरुवात झालेली असते.. असे अनेक प्रश्न ती कथा नव्हे घटना लिहिताना पडतात तसेच ती "सत्यघटना" असते ज्याचे सगळे दाखले लिखाणात नमून करणं गरजेचं असतं. एखादाही दाखला नमूद करायचा राहून गेला तर त्या घटनेकडे पाहण्याचा, घटनेला समजून घेण्याचा लोकांचा दृष्टिकोन बदलू शकतो.. थोडक्यात त्या घटनेचं गांभीर्यच नष्ट होऊ शकतं. बऱ्याचदा माझ्या मनात मी जवळून पाहिलेल्या- अनुभवलेल्या काही "सत्यघटना" लिहिण्याचा मोह मला झाला पण, त्या घटना कशा रीतीने मांडाव्यात हे मला कळत नव्हतं कारण, या घटनेमध्ये पीडित व्यक्तीवर तसूभरही अन्याय होऊ नये ही माझी मनापासून इच्छा होती. माझ्या नजरेत ही घटना लिहिताना माझा उद्देश "ही एक अतिशय दुःखद घटना आहे" असाच होता आणि म्हणून वाचकांना ही घटना वाचताना कदाचित भय वाटणार नाही पण म्हणूनच माझं लेखन समजून घ्यावं ही नम्र विनंती.
आता या घटनेला जवळजवळ विसेक वर्षे झाली असावीत. त्या रात्री आम्ही पाच मैत्रिणींनी आमच्याच बिल्डिंगमध्ये राहणार्या सावंत मामींच्या घरी पार्टी करायची ठरवली. कदाचित कोजागिरी पौर्णिमा होती. साधासा मेनू केला होता झणझणीत बिर्याणी आणि छोलेपुरी. सावंत मामी दहा दिवसांसाठी गावी गेल्यामुळे मामींचं घर रिकामं होतं. खाणंपिणं झाल्यानंतर रात्री दोनच्या सुमाराला आम्ही झोपायला सावंत मामींच्या बेडरूममध्ये गेलो. जवळजवळ अडीचच्या सुमाराला मामींच्या बाजूच्या फ्लॅटमधून खूडबुड खूडबुड असा आवाज यायला सुरुवात झाली. मामींच्या बेडरूम मागेच कदम काकांच्या फ्लॅटचं स्वयंपाक घर होतं पण, गेल्या वर्षभरापूर्वीच कदम काका चेंबूरला राहायला गेल्या पासून त्यांचं घर बंदच होतं. मग किचनमध्ये ही खुडबुड कोण करतंय ? कदाचित बंद घरात उंदीर झाले असावेत असा समज करून आम्ही झोपण्याचा प्रयत्न केला पण, मनात मात्र भीतीने जाळं विणायला सुरुवात केली होती. आम्ही पाचही जणी तीन जणांच्या त्या बेडवर दाटीवाटीने एकमेकांना चिकटून झोपलो तशा आम्ही बऱ्यापैकी विशिच्या आसपासच्या पण तरीही ऊर फुटेस्तोवर घाबरलेल्या. थोड्या वेळाने छोट्या खलबत्त्यामध्ये काही तरी कुटण्याचा आवाज यायला सुरुवात झाली आणि त्या नंतर थोड्या वेळाने सावंत मामींच्या बेडरूमच्या बंद खिडकीच्या फटीमधून सुंदर सुवासिक खमंग आल्याच्या चहाचा दरवळ खिडकीमधून आत आला. चहाचा तो सुगंध इतका पक्का होता की, नक्कीच कदम काकांच्या किचनमध्ये कोणीतरी फक्कड चहा बनवला आहे याची आम्हा पाचही जणींना पक्की खात्री झाली पण, मग बंद घरात एखादा चोर शिरला असावा का ? म्हणून आम्ही दरवाज्याच्या होलमधून समोरच असलेल्या कदम काकांच्या फ्लॅटकडे डोकावून पाहिलं. दरवाजाला भलं मोठं धुळीने माखलेलं कुलूप जसंच्या तसं होतं. मग कोणी खिडकीतून आत आलं असावं का ? पण, ते कसं शक्य आहे चौथ्या मजल्यावरच्या खिडकीचे मजबूत गज तोडून आत शिरण्याची हिंमत कोण करणार ? अंधारातच लाईटचा उजेड पडू नये म्हणून आम्ही दरवाज्याच्या होलमधून बाहेर नजर ठेवण्याचं काम करत होतो. आत जर कोणी त्रयस्थ असेल तर कदाचित तो पहाटेपूर्वी घरा बाहेर निघेलच या उद्देशाने पण, आम्हाला जास्त प्रतीक्षा करावी लागली नाही. अगदीच दहा मिनिटात म्हणजे पहाटे तीनच्या सुमाराला घरातून रोहन बाहेर आला. रोहनला समोर बघताच सध्या दरवाज्याच्या होलमधून लक्ष ठेवण्याची पाळी असलेली शितल जवळजवळ फेफरं येऊन मागे सरकली नंतर मात्र आम्ही पाचही जणींनी हे सुनिश्चित केले की, हो.. तो रोहनच आहे. रोहन !! पण, कसं शक्य आहे ? सहा महिन्यांपूर्वीच चेंबूर स्टेशनवर धावत्या ट्रेन समोर आडवा येऊन आत्महत्या केलेला आमचा लाडका बालमित्र रोहन !! दुःखद.. पण हो.. तो रोहनच होता.. नक्कीच. आवाज न करता पण, आम्ही पाचही जणींनी अस्पूट असा हुंदका दिला. नक्कीच !! तो रोहनच होता. रोहन... असं का केलंस मित्रा ? तू आमचा लाडका मित्र होतास. बाबांचा लाडका लेक. कॉलनीतल्या सगळ्या काकूंचा लाडका रौनी.. दुःखद !! मित्रा, आजही हे लिहिताना डोळ्यांत अश्रू आहेत. तू चुकलास मित्रा......
रोहन..... ( नाव बदललेलं ) आमच्या चार बिल्डिंग्सच्या कॉलनी मधला अगदी सभ्य आणि सुशील मुलगा.. आमचा बालमित्र. रोहनचे वडील म्हणजेच आमचे कदम काका मिलिटरीमध्ये ड्रायव्हरच्या पोस्टवर. प्रेमळ पण कडक शिस्तीचे. मोठा मुलगा अभ्यासात कमजोर म्हणून लहानग्या रोहनला लहानपणीच शिक्षणासाठी होस्टेलवर ठेवलं. रोहन हुशारच होता. आई- वेडा, ताई- वेडा थोडक्यात कुटुंब वेडा आणि मित्रमंडळींमध्ये रमणारा असा गोड स्वभावाचा दिलदार मुलगा. शिक्षण पूर्ण झालं आणि लवकरच एका मोठ्या नामांकित कंपनीत रोहन रग्गड पगारावर नोकरीला लागला. कारूण्याची किनार म्हणजे या नंतर लवकरच रोहनची बरीच वर्षे कॅन्सरने गलितगात्र झालेली आई देवा घरी गेली तर लाडकी ताई दूर गावी साताऱ्याला लग्न होऊन मोठ्या संयुक्त कुटुंबात गेली आणि रोहन एकाकी झाला. आईच्या मागे दुःखी झालेल्या रोहनला बघून कॉलनीतल्या सगळ्या काकू रोहनला सावरायला सरसावल्या. सगळे मित्र जवळ आले. बरीच वर्षे शिक्षणासाठी घरापासून दूर राहिलेला रोहन लोकांचं प्रेम बघून भारावला. उपकाराची जाणीव मनात ठेवून अजूनच मवाळ झाला. त्याच्या मनात सगळ्यांबद्दलचा आदर- प्रेम- जिव्हाळा- जवळीक अजूनच वाढली. घरात बाबा, मोठा भाऊ आणि रोहन. तसे कदम काका आता बऱ्यापैकी गावी जाऊन येऊन असतं. कामावरून घरी आल्यावर रोज शेजारचे मित्र घरी येऊन रोहनला सोबत देऊ लागले. या शेजारच्या मित्रांमध्ये माझाही मोठा भाऊ ( भाई ) असायचा. थोड्या दिवसांनी रोहनच्या बाबांनी त्याच्यासाठी एका प्राथमिक शाळेत चित्रकला हा विषय शिकवणारी एक मुलगी वधू म्हणून पाहिली. वडिलांची मर्जी सांभाळण्यासाठी रोहननेही तिला पसंत केली. कॉलनीतल्या चार पाच मुलींची हृदयं नक्कीच तुटली असतील. रोहन होताच असा देखणा रुबाबदार सज्जन आणि संवेदनशील.. आणि आमच्या रोहनचं आयुष्य आता स्थिरस्थावर होतंय असं वाटू लागलं. आईच्या निधनानंतर आता रोहन बऱ्यापैकी सावरू लागलाय हे आम्ही बघत होतो. संध्याकाळी कामावरून घरी परत आल्यानंतर घरातच बायकोच्या हातचा आल्याचा खमंग चहा सोबत मित्रांची मैफल.. रोहन खुश !! आल्याचा चहा म्हणजे रोहनचा जिव्हाळ्याचा विषय. हळूहळू रोहनला त्याच्या आयुष्यात त्याच्या वैवाहिक आयुष्याचा आनंद घेता यावा म्हणून बाकीच्या मित्रांनी त्याच्या घरी जमणं बंद केलं पण, मैत्री मात्र कायम होती. तेव्हा आजच्या सारखे मोबाईल सर्रास सगळ्यांच्याच हातात नव्हते पण, मनातला जिव्हाळा प्रेम आपुलकी मात्र कायम असायची. एक दोन मित्र मात्र न चुकता रोहनच्या घरी कधी रोहनच्या बाबांची चौकशी करण्यासाठी तर कधी रोहनच्या बायकोला काही हवं नको ते पाहण्यासाठी जात. आपल्या अनुपस्थितीत आपल्या कुटुंबाला त्याचे मित्र मदत करत असलेली उमगून रोहन दिवसेंदिवस अजूनच मनाने मवाळ होत होता पण, खरं तर रोहन तिथंच चुकत होता. त्याच्या मागे त्याचा घात केला जात होता. यातलाच एक मित्र आमच्याच कॉलनीत राहणारा दुसरा मुलगा मनिष आणि रोहनच्या बायकोमध्ये गोष्टी बदलत होत्या. रोहन घरात नसताना त्याच्या मागे त्याच्या फ्लॅटमध्ये लपून- छपून येणारा मनिष आम्ही अनेकदा बघत होतो. दिसायला साळसूद मनीष आणि रोहनची बायको दोघं मिळून रोहनचा विश्वासघात करत होते. अनेकदा माझ्या भाईने रोहनला समजावण्याचा प्रयत्न केला. "मित्रा, घरापासून या मित्रांचा गोतावळा दूर कर" पण, मावळ स्वभावाच्या आमच्या रोहनला मात्र यावर काही ठोस उपाय घेता आला नाही किंवा या मित्रांपासून संबंधही तोडता आले नाहीत म्हणून रोहन चुपचाप आपल्या या राहत्या घराला कुलूप लावून चेंबूरला नवीन घरात राहायला निघून गेला. रोहन चेंबूरला गेल्या नंतर मात्र या सर्व गोष्टी आमच्या दृष्टीआड गेल्या. माझाही भाई राहायला महाड येथे स्थिरस्थावर झाला पण, गणपती उत्सव किंवा दिवाळीला मात्र हे दूर गावी गेलेले आमचे चाकरमानी भाऊ एकत्र यायचे.
एकदा रात्री अकरा वाजता माझ्या भावाला तो महाडमध्ये असताना रोहनने कॉल केला आणि त्याला म्हणाला, "विनय, मला तुला खूप महत्त्वाचं काही तरी सांगायचं आहे. तू लवकर मुंबईत ये. प्लीज उशीर करू नकोस." "मी परवाच येतोय.. तसंही शनिवार- रविवारची सुट्टी आहे. भेटून खूप बोलू. काळजी करू नकोस." इतकं बोलून माझ्या भावाने कॉल कट केला आणि थोड्या वेळाने त्याने मुंबईत आम्हाला कॉल केला आणि रोहनची चौकशी केली पण, आता राहायला आमच्यापासून दूर चेंबूरला असल्यामुळे रोहनबद्दल आम्हाला काहीही माहिती नसल्यामुळे "बघू आल्यानंतर" असं बोलून माझ्या भावाने फोन कट केला पण तिथे महाडमध्ये माझा भाईसुद्धा तसा अस्वस्थच झाला कारण, रोहनच्या बायकोचे आणि मनीषचे प्रताप माहीत असल्यामुळे... रोहनच्या लग्नाला जेमतेम वर्षही झालं नसेल.. दुर्दैवी होतं.. बायकोच्या विवाह बाह्य संबंधांमध्ये रोहन पुरता खचून गेला होता.
दुसऱ्याच दिवशी दुपारी भाई दारात हजर. परवा येणारा भाई मित्राच्या काळजीने आजच हजार झाला. उद्या रोहनला कधी भेटतोय असं त्याला झालं होतं. इतक्यात रात्री आठ वाजता आमच्या घरातला फोन खणखणला. बातमी रोहनने चेंबूरला ट्रेनखाली आत्महत्या केल्याची होती. "मी उद्याची वाट पाहायला नाही पाहिजे होती. आजच जाऊन रोहनला भेटलं पाहिजे होतं. "रोहन.. मित्रा, तू असं करायला नाही पाहिजे होतंस. कुटुंब टिकवणं जितकं महत्त्वाचं असतं तितकंच कुटुंबात जर घाण असेल तर ती स्वच्छ करणंही योग्यच ठरलं असतं. घटस्फोट देऊन मी तर म्हणेन तिला लाथ मारून घराबाहेर हाकलून जरी दिलं असतंस तरी तुझ्या आयुष्यात तुला भरभरून प्रेम करणारी सखी- जीवनसाथी मिळालीच असती. स्वतःचं आयुष्य, तुझ्या वडिलांचं आयुष्य हे या टुकार तत्वांपेक्षा शुल्लक नव्हतं. तू चुकला मित्रा.. तू असं करायला नाही पाहिजे होतंस."
आज आमची पार्टी संपली ती या भयभीत करणार्या अनुभवानंतर. सकाळ झाली तेव्हा रात्रीची आपबिती घरातल्यांना सांगितल्यानंतर कॉलनीतले अनेक आवाज बोलू लागले. पहाटे तीन वाजता रोहनने तावडे काकांना हाका मारून त्यांच्या घराबाहेर बोलावलं होतं. तावडे काकांच्या खांद्यावर डोकं ठेवून रोहन ढसाढसा रडला. तिथून रोहन गेल्यानंतर तावडे काका भानावर आले. तेव्हा पासून तावडे काका तापाने फणफणू लागले. तिथून रोहन गेला सुनिलदादाकडे. सुनिलदादा एकटाच राहत होता. त्याच्या घरी जाऊन दोघांनी काही वेळ गप्पा मारल्या. रोहनने सुनिलदादाला सर्व हकीगत सांगितली. तिथून रोहन निघून गेल्यानंतर सुनिलदादाही तापाने फणफणू लागला. रोहनने आपल्यावर झालेल्या अन्यायावर वाचा फोडण्याचा प्रयत्न केला पण, दुर्दैवाने खूपच उशिरा...
रोहन... तू चुकलास मित्रा..
राक्षसगण, देवगण, मनुष्यगण.. आमचे पाचही जणींचे कोणते गण होते ठाऊक नाही पण, आम्ही पाचही जणींनी रोहनच्या मृतात्म्याला पाहिलं... हो... तो नक्की रोहनच होता.. कारण त्या दिवशी फक्त आम्हालाच रोहन दिसला नव्हता तर तावडे काका आणि सुनिलदादा तर त्या नंतर बरेच दिवस अक्षरशः आजारीच पडले होते. रोहनने त्याचं दुःख जगासमोर आणण्याचा प्रयत्न केला पण, बराच उशीरा. त्या नंतर काही दिवस सुनिलदादा आणि तावडे काकांना रात्री रोहन हाका मारून घराबाहेर बोलवायचा जे फक्त त्यांनाच ऐकू येत होतं पण, ते भास नक्कीच नसावेत पण, आता जागरूक झालेले तावडे काका आणि सुनिलदादा आपल्या घराचा बंद दरवाजाही उघडायला घाबरू लागले.. कदाचित तेव्हाही रोहनची घुसमटच झाली असेल.. कारण...
लवकरच चेंबूरहून रोहनच्या बाबांना बोलावून काही विधी करून रोहनच्या मृतात्म्याला शांत केलं गेलं.
शांत !! खरंच.. रोहनचा आत्मा शांत झाला असेल का ? की, मरणानंतरही अघोरी पद्धतीने त्याची मुस्कटदाबीच झाली असेल ? ठाऊक नाही.. रोहनच्या आत्महत्येनंतर रोहनच्या बायकोला बराच पैसा मिळाला. लग्नात रोहनने प्रेमाने केलेले बक्कळ दागिने मिळाले, तिच्या नावाने त्यानेच घेतलेला फ्लॅट तिने भांडून बळकावला.. आज रोहनची बायको आणि मनिष लग्न करून त्याच फ्लॅटमध्ये सुखाने नांदत आहेत. त्यांना एक मुलगा आणि एक मुलगी आहे. रोहनचे बाबा आज हयात नाहीत. दुर्दैवाने काही वर्षांपूर्वी माझा भाई सुद्धा कॅन्सरने हे जग सोडून गेला. आज इतक्या वर्षानंतर अजूनही रोहनची किंवा माझ्या भाई सोबतच्या त्याच्या मैत्रीची आठवण आली की मनातलं वादळ साधं सरळ आयुष्य अस्ताव्यस्त करून जातं.
"रोहन... मित्रा, तू असं करायला नाही पाहिजे होतंस. त्या वेळी तू किती एकटा पडला असशील, तुझी किती घुसमट झाली असेल याचा विचार केला तरी आज आम्हा सगळ्यांचं मन होरपळून जातंय आणि तुझ्यासाठी आम्ही काहीही करू शकलो नाही याची खंत वाटते. रोहन मित्रा, अशा नीच चांडाळांना तू सुख- वैभव भरभरून देऊन गेलास पण, आमच्या पासून आमचा जिवलग मित्र मात्र कायमचा हिरावून घेतलास"....







©® सौ. आशा आशिष चव्हाण...