ही गोष्ट माझ्या चुलत आजीकडून ऐकलेली. सुमारे पन्नास वर्षापुर्वीची गोष्ट.कणकवली जवळच्या एका खेडेगावात रहात होती ही आजी.तेव्हा कणकवली सुध्दा फारसे पुढारलेले नव्हते.तर त्याच्या जवळच्या खेडेगावाची गोष्टच बोलायला नको.गावात वीजेचे दिवे नव्हते.रस्त्ते धुळीने भरलेले. घराघरातला उजेड रॅाकेलच्या चिमण्या आणि देवघरात लावलेल्या तेलाच्या दिव्यावर कमीजास्त व्हायचा.अंगणात तुळशीवृंदावनात लावलेल्या दिव्याचा प्रकाश असायचा. रस्त्यावर तर दिवेच नव्हते. रस्ते कसले पायवाटाच त्या.प्रत्येक घरात घड्याळ पण नसे.काही प्रतिष्ठीत घरातच घड्याळ असायचे सकाळी सुर्याकडे आणि उन्हाची तिरीप बघून आणि रात्री चंद्राच्या प्रकाशाकडे बघून घरच्या स्त्रिया घड्याळाचे अंदाज बांधत.तर पहाटेच आजीला जाग आली.बाहेर चांगला प्रकाश पडल्यासारखा दिसत होता. विहिरीवरून पाणी भरून आणायचे म्हणून आजी पटकन उठली . परसदारचा दरवाजा उघडला आणि पायऱ्या उतरून जरा खाली असलेल्या बावीवर( काठ न बांधलेली विहीर) कमरेवर कळशी घेउन निघाली.रोज दिवसभरात सकाळपासून दुपारभर बावीवर अनेक फेऱ्या होत. रोजचा पायाखालचा रस्ता. उताराचा रस्ता असल्याने थोड्या पायऱ्या उतरल्या की समोर विहीर दिसायचीच. विहीरीतल्या पाण्यावर चंद्रप्रकाश पडला होता.पाणी चमकत होते.आजी बघते तर काय समोर विहीरीजवळ बऱ्याच बायका गप्पा करत, हसत खिदळत होत्या. कोणीही गावातल्या ओळखीच्या बायका नव्हत्या. चंद्रप्रकाशात बायकांचे चेहेरे उजळून दिसत होते. अविश्वासाने आजी डोळे चोळत चोळत बघायला लागली.तेवढ्यात आजी भानावर आली. येवढ्या रात्री बावीजवळ बायका एकत्र जमून काय करताहेत हे कळेना.हा काहीतरी वेगळाच प्रकार आहे हे तिच्या लक्षात आले. पटकन मागे वळून धावत धावत घरात आली. परसदाराचा दरवाजा बंद करायचे पण भान राहिले नाही.घामाने भिजली होती.आजोबांना उठवले. आजोबांना झाला प्रकार सांगितला. आजोबांनी मनगटावरचं घड्याळ पाहिले तर रात्रीचे दोन वाजले होते.पहाटेचे पाच वाजले असे समजून आजी रात्री दिडदोनलाच पाणी भरायला बावीवर गेली होती.ती पौर्णिमेची रात्र होती आणि आजीला चंद्रप्रकाशामुळे घड्याळाची कल्पनाच आली नाही.
विद्या.२५/२/२०१८.
(ही ऐकीव गोष्ट आहे याची वाचकांनी कृपया नोंद घ्यावी.)