विद्या उत्तुरकर. २८/१/२०१८
मुळपुरूष.
आईकडून ऐकलेली तिच्या लहानपणीची गोष्ट.आईचे मुळ गाव.पिढ्यानपिढ्याचे जूने घर, शेती वाडी. गावातल्या ह्या घरात दरवर्षी सम्राज्ञा घातली जात असे.सम्राज्ञा म्हणजे आपल्या घराण्याचा पुर्वज, राखणदार किंवा मुळपुरूष याचा उत्सव.ह्या दिवशी खळ्यात (अंगणात) साग्रसंगीत जेवण करून ह्या मुळपुरूषाला सर्व कुळाचे रक्षण करण्यासाठी गाऱ्हाणे घातले जात असे.त्याची सर्व कुटूंबावर कृपादृष्टी राहावी म्हणून हा दिवस विशेष महत्वाचा.आईला विचारले की ‘तू मुळपुरूषाला पाहिलेस का???’ तर तिने गोष्टच सांगितली.
उन्हाळ्याचे दिवस होते.घरात उकडते, गरम होते म्हणून घरातले सगळेजण शेणाने गुळगुळीत सारवलेल्या अंगणात जाजमावर रांगेत झोपले होते.आई असेल दहा बारा वर्षाची.तिला खूप वेळ झोप येत नव्हती. मध्यरात्र उलटून गेली होती.आईचा डोळा लागतच होता की तिला घुंगूरांचा छुमछुम असा आवाज ऐकू आला. कंदिलाचा पिवळा प्रकाश पडला होता.डोक्यावर घेतलेल्या पांघरूणाच्या फटीतून आईला दिसले की सम्राज्ञेला खळ्यात पान ठेवले होते आणि नारळ फोडला होता त्या जागेकडून एक सहा फुट उंचीचा,पांढरे स्वच्छ धोतर नेसलेला, खांद्यावर घोंगडी घेतलेला, पांढऱ्याशुभ्र मिशा असलेला,पायात चामड्याच्या वहाणा घातलेला पुरूष येत होता. त्याच्या हातात काठी होती. त्या काठीला बांधलेल्या घुंगुरांचा छुमछुम आवाज आणि त्याच्या पायातल्या वहाणांचा कर्र कर्र आवाज रात्रीच्या शांततेचा भंग करत होता. घराच्या एका बाजूने निघून घराला पुर्ण फेरी घालून तो जिथून निघाला तिथे आला आणि दिसेनासा झाला.आईची खात्री पटली की दरवर्षी आपण पुजा करतो, जेवण घालतो, तो आपला मुळपुरूष आपल्या घराचे रक्षण करण्यासाठी घराभोवती प्रदक्षिणा घालतो आहे.आईने पांघरूणाच्या आतूनच आपले रक्षण करणाऱ्या आपल्या पुर्वजाला, मुळपुरूषाला ,राखणदाराला मनापासून नमस्कार केला आणि आपली राखण करायला आपले पुर्वज आहेत ह्या विश्वासाने शांतपणे झोपली.