ती काळरात्र 3
3 पट भय… 3 पट रहस्य… 3 पट थरार…
भाग : ३ (अंतिम भाग)
भाग २ पासून पुढे सुरु…
एव्हाना त्या मुलांच्या आवाजाची तीव्रता बऱ्यापैकी कमी झाली होती… ओल्या मातीतून चालताना नयनच्या चपलांचा "कर्रर्रर्र… कर्रर्रर्र…" असा आवाज येत होता… टॉर्चच्या पिवळसर प्रकाशाभोवती बरीच पावसाळी पाखर घिरट्या घालत होती… गर्द धुक्यांतून वाट काढत नयन एकेक पाऊल त्या झाडाच्या दिशेने टाकत होता… पुढील काही क्षणांतच तो त्या भल्यामोठ्या वटवृक्षापाशी येऊन पोहोचला… परंतु तेथे कोणीही नव्हते… रात्रीच्या गडद अंधारात ते वटवृक्ष अगदी अक्राळविक्राळ दिसत होते… झाडाभोवतीचा संपूर्ण परिसर पिंजून काढल्यानंतरही नयनला तेथे कोणीही दृष्टीस पडले नाही…
रात्री झोपल्यापासून एका मागोमाग एक घडणाऱ्या या चित्र-विचित्र घटनांचा काहीच अंदाज त्याला येत नव्हता… "इतकावेळ त्या मुलांच्या खेळण्याचा आवाज तर येत होता, आणि आता अचानक सर्व गायब?? खरंच ईथे ती मुलं खेळत होती, की मघासप्रमाणेच हा माझा भास होता?? असो… कस्तुरी तिथे एकटीच आहे… मला गेले पाहिजे" मनातल्या मनात स्वतःच्या शंकेचे निरसन करत नयन पुन्हा घरी जाण्यास निघाला आणि तोच वडाच्या झाडाच्या पारंबीला गळफास घेतलेल्या अवस्थेतील एक लहान मुलं त्याच्यासमोर येऊन लटकू लागले… जेमतेम अडीच ते तीन वर्षांचे मुलं असेल ते… परंतु ते मुलं सर्वसामान्य मुलासारखे नव्हते… त्याच्या अंगावर एकही कापड नव्हते… डोक्यापासून पायापर्यंत संपूर्ण शरीर कुजले होते… संपूर्ण अंग लाल मातीने माखले होते… शरीरावरील चामडी कुजल्यामुळे ती फाटून अक्षरशः लोंबकळत होती… एक डोळा बंद होता तर दुसरा डोळा किड्यांनी पूर्णतः पोखरून काढला होता…
काळीज पिळवटून टाकणारे ते दृश्य पाहून नयनच्या शरीरातील सगळा त्राणच संपला… तो पुढे काही हालचाल करणार इतक्यात तशाच गळफास लावलेल्या अवस्थेतील अनेक लहान मुलांची प्रेत एकामागोमाग एक त्या गर्द पारंब्यांच्या जाळ्यातून खाली येऊन लटकू लागली… संपूर्ण वडाभोवती त्या लहान मुलांच्या प्रेतांचा अगदी खच जमा झाला… ती प्रेत कुजलेल्या अवस्थेत असल्याने सभोवतालच्या वातावरणात त्यांचा कुबट वास पसरू लागला…
घडत असलेला सर्व प्रकार पाहून नयनची दातखिळीच बसली… तेथून पळून जाण्याचा त्याने बराच प्रयत्न केला, परंतु त्याचे पाय चिखलात रुतल्याप्रमाणे अगदी एकाच जागी स्थिर झाले होते… प्राण अगदी कंठाशी आला होता… त्याच्या डोळ्यांची पापणी लवते न लवते तोच त्या लटकत्या प्रेतांनी डोळ्यांची उघडझाप सुरु केली व अगदी भेसूर आवाजात ते सर्व रडू लागले… रडताना त्यांच्या डोळ्यांतून अश्रुंऐवजी लालभडक रक्त वाहत होते… जे काही घडतेय ते पाहण्याशिवाय नयन आता काहीच करू शकत नव्हता… त्याची अवस्था आता जीवंत प्रेतासारखी झाली होती… त्या मुलांचे ते विव्हळून रडणे त्याला आता सहन होत नव्हते… दोन्ही हात कानांवर ठेवून तो खाली बसला… त्याच्या पुढच्याच क्षणी विजेच्या तीव्र गतीने त्यातील एका बाळाने नयनवर झडप घातली आणि संपूर्ण परिसरात एकच किंकाळी घुमली…
दुसऱ्या दिवशी (६ ऑगस्ट, २०१७)
अलगदच नयनने डोळ्यांच्या पापण्या उघडल्या… सुरुवातीस त्याला सर्वकाही धूसर दिसत होते, परंतु नंतर हळूहळू सर्व स्पष्ट दिसू लागले…
तो एका रुग्णालयात होता… त्याच्या डोक्याला, मानेला तसेच हाता-पायाला ठिकठिकाणी पट्ट्या लावण्यात आल्या होत्या… शुद्ध आल्यावर त्याला त्या जखमांची जाणीव होऊ लागली… त्याला प्रचंड ताप भरला होता… वेदनांच्या जाणीवेने तो विव्हळू लागला… त्या आवाजाने शेजारीच बेडवर डोके टेकून झोपलेली कस्तुरी जागी झाली…
कस्तुरी : अहो, काय वाटतंय तुम्हांला??
कस्तुरीने काळजीच्या स्वरातच विचारले… परंतु नयनने काहीच प्रतिसाद दिला नाही… उलट त्याचे विव्हळणे अधिकच वाढले…
कस्तुरी : नर्स !! नर्स !!
वॉर्डबाहेर धावत जाऊन कस्तुरी नर्सला आवाज देऊ लागली… तिचे ते ओरडणे ऐकून तिथेच बसलेले आप्पा, इंदुमती व कांचन धावतच तिथे आले…
इंदुमती : काय झाला गे बाय??
कस्तुरी : अहो आई, ते बघा ना कसे करतायत…
नयनची ती अवस्था पाहून आप्पा व इंदुमती धावतच त्याच्याजवळ आले, तर कांचन व कस्तुरी नर्सला बोलविण्यासाठी गेल्या…
इंदुमती : अरे बाबू, काय वाटता हा तुका?? ह्या बघ मी आसय… तुझी आवस… सांग माका…
नयन : आई….. त्या…. वडाच्या झाडाकडे….
आणि बोलता बोलता पुन्हा त्याला ग्लानी आली व तो बेशुद्ध पडला… ईतक्यात नर्स धावतच वॉर्डमध्ये आल्या…
नर्स : पेशंटजवळ ईतकी गर्दी करू नका… चला बाहेर बसा सर्व…
असे म्हणून नर्सने तिच्या हातात असलेले इंजेक्शन डोळ्यांसमोर धरत त्यावर टिचकी मारली आणि अलगदच नयनच्या दंडात घुसवले…
आप्पा : अहो… आमचो नयन बरो होतलो ना??
नर्स : नक्की बरे होतील ते… तुम्ही काळजी करू नका… डॉक्टर येतीलच ईतक्यात त्यांना तपासायला…
इतके म्हणून नर्स तेथून निघून गेल्या… परंतु त्यांच्या त्या उत्तराने मात्र आप्पा व इंदुमतींच्या निस्तेज चेहऱ्यावर आता काहीशी सकारात्मकता आली होती… आपल्या लाडक्या दादाची ती अवस्था पाहून कांचनलाही अश्रू आवरत नव्हते…
इंदुमती : अहो !! एक गोष्ट तुमच्या ध्यानात इली काय??
आप्पा : खयची गोष्ट??
इंदुमती : मघाशी बाबू शुद्धीवर इलेलो तेवा तो वडाच्या झाडाचा कायतरी बोलत हुतो…
आप्पा : होय ऐकलंय ता मी… कल रात्री तेच्यावांगडा नेमका काय घडला ता कळूक वह्या हुता… पण एकमात्र नक्की हा… त्या संपूर्ण जागेत खयचीतरी नकारात्मक शक्ती हा… आणि आतातागत ३ येळा तिना आपल्याक सूचित केलेला हा…
इंदुमती : खराच !! माकापन असाच वाटता… आणि आपण बाबूक कधीचा सांगित हुतव तेच्याबद्दल, पण तेका आपला बोलना कधी पटलाच नाय…
आप्पा : आपल्या बाजूक परब र्हवतत तेंच्याकडसून काय माहिती गावता काय ती बघुक व्हयी…
इंदुमती : व्हय… ते थयसरले जुने रहिवाशी हत… तेंका नक्कीच कायतरी म्हाईत असतला…
अशाप्रकारे आप्पा व इंदुमती यांनी ते रहस्य उलगडण्याच्या दिशेने पावले टाकण्यास सुरुवात केली…
पुढच्याच दिवशी नयनची प्रकृती अधिकच खालावली… त्याचे शरीर कोणत्याच औषधांना प्रतिसाद देत नव्हते… डॉक्टर व त्यांची टीम त्यांच्या परीने संपूर्ण प्रयत्न करत होते… पुढील दोन दिवस त्याच्या तब्येतीत कोणतीच सुधारणा झाली नाही… नयनची अवस्था पाहून घरातील सर्वांचा जीव तीळतीळ तुटत होता… त्याला पाहण्यासाठी शेजारी राहणाऱ्या सुमनताई परब (परबीन) त्यांच्या संपूर्ण कुटुंबासहीत तेथे आल्या होत्या… नयनची अवस्था पाहून त्यांनीही हळहळ व्यक्त केली…
सुमनताई : झारपकरनी !! हयसर ये वायच सर्वांका घेवन… माका बोलुचा हा तुमच्यावांगडा…
वॉर्डबाहेर जातच सुमनताई इंदुमतींना म्हणाल्या… तसे सर्वजण एकेक करून वॉर्डबाहेर आले…
सुमनताई : ह्या बघा… आता मी काय सांगतय ता नीट ऐकान घेवा… माका म्हाईत नाय तुमचो हेच्यार कितीसो विश्वास बसतलो… पण तुमची एक शेजारी म्हणान माका तुमका ह्या सांगुसारा वाटता…
इंदुमती : सांग गे बाय… आमच्या अडी-अडचणीच्या येळेक तुमी सगळे धावन इलास… वेळ नाय बगलास की काळ नाय बगलास… सांग तू काय सांगूचा हा तुका ता…
इंदुमतींच्या या शब्दांनी सुमनताई भारावून गेल्या व पुढे सांगू लागल्या…
सुमनताई : तुमी सर्व मुंबईचे चाकरमनी… तेच्यात नवीन वास्तूत इल्यापास्ना नको ती साडेसाती तुमच्या मागे लागली हा… ह्यो गाव… ही जागा तुमच्यासाठी नवीन हा… आणि गावच्या ठिकाणी अशा काही जागा असतत जिथे नकारात्मक शक्तींचो वास असता… तेंच्या टाईमाक कोणी गावला की मगे ते लवकर त्या शरीराक सोडीत नाय…
इंदुमती : मंजे, नक्की तुका काय म्हणूचा हा??
सुमनताई : माका वाटता ह्या साधासुधा प्रकरण नाय हा… कारण ज्या जागेर नयन पडलो हुतो ती जागा… ती येळ चांगली नव्हती…
इंदुमती : मगे आता काय उपाय हा हेच्यार??
सुमनताई : आता एकच व्यक्ती हा जी तुमका यावर उपाय सांगू शकते…
आप्पा : कोण??
सुमनताई : हैसून ५ कि. मी. लांब "रंकसाळे" गावात एक मठ हा… त्या मठात "वासुंधरनाथ" नावाचे एक सिद्धपुरुष हत… त्यांका या बाबतीत बरीच विद्या अवगत हा… मागल्या येळेक माझ्या नंदेच्या घरातपण असाच विपरीत घडत हुता… तेवा आमी तेंकाच बोलवला हुता…
एवढे बोलून सुमनताई बोलायच्या थांबल्या… गोंधळलेल्या अवस्थेतील झारपकर कुटुंबीय एकमेकांकडे पाहत होते…
सुमनताई : तुमका माझा म्हणणा पटला नायसा वाटता…
त्या सर्वांच्या त्या गोंधळलेल्या चेहऱ्यांकडे पाहतच सुमनताई म्हणाल्या…
कस्तुरी : पटलेय तुमचे म्हणणे मला !! माझ्या नवऱ्याचे प्राण वाचविण्यासाठी आता कोणताही उपाय करावा लागला तरी चालेल…
इंदुमती : व्हय !! माकापन पटला ह्या… नी सुमन काय आपल्या वाईटाचा तर सांगणार नाय… तुमका काय वाटता??
आप्पा : आपल्या बाबुसाठी नी आपल्या वास्तुसाठी कायो करूक लागला तरी चालात…
कांचननेही यासाठी सहमती दर्शवली व अशाप्रकारे या गोष्टीवर त्या सर्वांचे एकमत झाले…
कांचन : पण त्यांना आणायला जावे लागेल ना??
सुमनताई : अग माझो झील तेंका उद्या सकाळी बाईकवरसून घेवन येतलो…
आप्पा : खरंच तुमचे किती नी कसे आभार मानू ताच कळत नाय… रक्ताची माणसापण आजकल इतक्या करीत नाय ओ…
सुमनताई : अहो आभार कसले मानतास?? शेजारधर्म पयलो निभावुक व्हयो… आपल्या सुख-दुःखाक पयलो शेजारीच धावन येता… रक्ताची माणसा तर नंतर येतत… काय बरोबर ना??
आप्पा : व्हय, अगदी बरोबर…
आणि अशारीतीने झारपकर कुटुंबियांनी नयन व आपल्या वास्तूच्या रक्षणासाठी सुमनताईंचा सल्ला ऐकला… परंतु हा उपाय कितपत प्रभावशाली ठरणार होता, हे तर येणारा काळच ठरवणार होता…
पुढच्या दिवशी (१0 ऑगस्ट, २०१७) :-
ठरल्याप्रमाणे सुमनताईंचा मुलगा सकाळी 'वासुंधरनाथांना' घेऊन आला… आप्पा व इंदुमती दारातच त्यांची वाट पाहत उभे राहिले होते…
सडपातळ देहयष्टी… संपूर्ण शरीरावर सुरकुत्या पडलेल्या… परंतु चेहऱ्यावर तसेच डोळ्यांत दिसणारे तेज… अंगावर भगवे वस्त्र… मानेपर्यंत वाढलेले पांढरेशुभ्र केस व छातीपर्यंत लांब अशी दाढी… कपाळाला भस्म फासलेले… गळ्यात तसेच हातात रुद्राक्षाच्या माळा… खांद्याला अडकवलेली झोळी… अशारीतीने एखाद्या सिद्धपुरुषाला शोभेल अशीच त्यांची वेशभूषा होती…
पायांतील पादुका खळ्याबाहेर काढतच वासुंधरनाथ आत आले… आप्पा व इंदुमतींनी हात जोडतच त्यांना वंदन केले व पाण्याने भरलेला तांब्या त्यांच्या हाती दिला… खळ्यातील बैठकीवर बसून त्यांनी संपूर्ण तांब्यातील पाणी पटापट घशाखाली रिचवले… त्यांची भेदक नजर संपूर्ण घरावर व आसपासच्या परिसरावर फिरत होती…
आप्पा : आमच्या नयनचो जीव वाचवा बाबा !! मी हात जोडतंय तुमच्याजवळ…
वासुंधरनाथांसमोर हात जोडतच आप्पा विनंती करू लागले…
वासुंधरनाथ : अहो, काळजी करू नका… मी त्यासाठीच आलोय ना?? माझ्यावर विश्वास ठेवा… तस सुमनताईंच्या मुलाने मला वाटेत नयनबद्दल सांगितलेच, परंतु तुम्ही ईथे राहायला आपल्यापासून तुमच्यासोबत नेमके काय घडले ते मला एकदा सविस्तररीत्या सांगा…
वासुंधरनाथांनी विचारल्यावर आप्पा व इंदुमतींनी घडलेल्या सर्व घटना त्यांना सविस्तररीत्या सांगितल्या…
वासुंधरनाथ : बरं… सर्व प्रकार आलाय माझ्या लक्षात… सर्वप्रथम मला त्या वडाच्या झाडाजवळ घेऊन चला, ज्याठिकाणी नयन तुम्हाला जखमी अवस्थेत सापडला होता…
आप्पा : व्हय, ता बघा सामनीच हा ता झाड…
वासुंधरनाथ : चला… या माझ्या मागून…
असे म्हणून वासुंधरनाथांनी त्यांच्या पादुका पायात सरकवल्या… पुढे ते तर मागून आप्पा व इंदुमती त्या भल्यामोठ्या वडाच्या झाडाकडे मार्गक्रमण करू लागले… पुढील काहीच क्षणांत ते त्या झाडापाशी पोहोचले…
वासुंधरनाथ : तुम्ही दोघे या झाडापासून थोडे दुर उभे राहा… आणि माझे संपूर्ण विधी जोपर्यंत पार पडत नाहीत तोपर्यत तुम्ही माझ्याशी काहीही बोलू नका…
त्या दोघांनाही सूचनावजा इशारा देतच वासुंधरनाथ म्हणाले… त्यांनी सांगितल्याप्रमाणे ते दोघेही त्या झाडापासून लांब उभे राहिले… परंतु त्यांच्या त्या म्हणण्याचा अर्थ मात्र त्या दोघांना समजला नाही…
वासुंधरनाथांनी संपूर्ण झाडाचे नीट निरीक्षण केले व त्या झाडाखालील थोडीशी माती हातात घेतली… त्या मातीत आपल्या झोळीतील अंगारा मिसळला व ते मिश्रण मुठीत घट्ट आवळले… आप्पा व इंदुमती त्यांच्या त्या विधींकडे अगदी लक्षपूर्वकरीत्या पाहत होते…
हातातील मिश्रणावरील पकड अधिकच मजबूत करत वासुंधरनाथांनी डोळे बंद केले व तोंडातल्या तोंडात काहीतरी मंत्र पुटपुटू लागले… त्यांचा हा विधी सुरूच असेल इतक्यात वातावरणात काहीसे बदल जाणवू लागले… आतापर्यंत मंद वाहणाऱ्या वाऱ्यांनी अचानक वेग पकडला व क्षणार्धात त्या शांत वाऱ्यांची जागा आता सोसाट्याच्या वाऱ्याने घेतली… मातीचे लोटच्या लोट हवेत उडू लागले… जणूकाही एखादे वादळच येत असावे… त्या वेगवान वाऱ्यांमुळे ते अजस्त्र असे वडाचे झाड व त्याच्या गर्द पारंब्या तीव्र गतीने डुलू लागल्या… ईथे आप्पा व इंदुमती डोळ्यांत धूळ जात असल्याने डोळ्यांवर हात धरून उभे राहीले होते… परंतु वासुंधरनाथांना मात्र त्या वातावरणाचा कोणताही परिणाम जाणवत नव्हता…
अचानक वडाच्या झाडाची एक भलीमोठी फांदी तुटून खाली कोसळली… सुदैवाने ती वासुंधरनाथांपासून बरीच लांब पडली… हळूहळू वाऱ्याची गती कमी होऊ लागली व काहीवेळाने सर्वकाही अगदी पूर्ववत झाले…
अलगदच वासुंधरनाथांनी डोळे उघडले व मंत्रोच्चारांचा जपदेखील थांबवला… त्यानंतर हातात असलेले मिश्रण त्यांच्याकडे असलेल्या कमंडलूत टाकले… पुढच्याच क्षणी त्यांनी त्यांच्या झोळीतून एक धारदार शस्त्र बाहेर काढले व त्याच्या साहाय्याने वडाच्या झाडाची एक पारंबी मधूनच छाटली…. आणि त्यापुढे जे काही घडले ते आश्चर्यचकित करणारेच होते… वासुंधरनाथांनी छाटलेल्या त्या वडाच्या पारंबीतून घळाघळा रक्त वाहू लागले… आप्पा व इंदुमती समोर घडत असलेला प्रकार आ वासून पाहत होते… वडाच्या झाडाकडील विधी पूर्ण करत वासुंधरनाथ विहिरीच्या दिशेने निघाले…
घडलेल्या घटनेबाबत आप्पा व इंदुमतींना बरेच प्रश्न पडले होते, परंतु वासुंधरनाथांनी ताकीद दिली असल्याने त्यांनी काहीच विचारले नाही… हातातील कमंडलू विहिरीच्या कठड्यावर ठेवत वासुंधरनाथ विहीरीचे निरीक्षण करू लागले… मागील बऱ्याच दिवसांपासून पडत असलेल्या पावसाने विहीर तशी बऱ्यापैकी भरली होती… पाणीही अगदी नितळ होते… वासुंधरनाथांनी पुन्हा एकदा त्यांच्या झोळीतील अंगारा काढला व काही मंत्र पुटपुटून तो विहीरीच्या दिशेने फुंकला…
विहिरीतून पाणी काढण्यासाठी रहाट बसवले होते व त्याला एक कळशी लावली होती… विहिरीतून पाणी काढण्यासाठी वासुंधरनाथांनी त्या रहाटाचे चक्र जोरात फिरवले, तसा त्याचा आवाज होऊन रहाटाला असलेली कळशी पाण्याच्या पृष्ठभागावर जोरात आदळली व नंतर अलगदच पाण्यात बुडाली… कळशी पूर्ण भरल्यानंतर त्यांनी रहाटाचे चक्र पुन्हा उलट दिशेने फिरवण्यास सुरुवात केली, तशी हळूहळू ती कळशी वर येऊ लागली… काहीच क्षणांत कळशी वर आली व त्यानंतर वासुंधरनाथांनी त्यातील थोडेसे पाणी तिथेच विहीरीच्या बाजूस असलेल्या जागेत ओतले… ते पाणी पाहून तिथेच उभे असलेले आप्पा व इंदुमतींचे डोळे पांढरे पडण्याची वेळ आली… अवाक होऊनच ते दोघेजण समोरील ते दृश्य पाहत राहीले… कारण कळशीतील त्या पाण्याचा रंग लाल झाला होता… जणूकाही त्यात रक्तच भरले असावे असा..
अर्धी कळशी रिकामी केल्यानंतर वासुंधरनाथांनी त्या कळशीतील थोडेसे पाणी ओंजळीत घेतले व त्यांच्या कमंडलूतील त्या मिश्रणात टाकले… अशाप्रकारे त्यांचा विहिरीजवळील विधीही पूर्ण झाला व पुन्हा ते घराकडे येऊ लागले… आप्पा व इंदुमती यांच्या चेहऱ्यावर साचलेले भय स्पष्टपणे दिसत होते…
विहीरीकडील विधी उरकून वासुंधरनाथ खळ्यात आले… आता त्यांची पुढील कृती काय असेल यावर सर्वांचे लक्ष लागून राहीले होते… खळ्यातच उभे राहून वासुंधरनाथ सर्वत्र पाहू लागले… पाहता - पाहता त्यांचे लक्ष खळ्यातील एका कोपऱ्यात इंदुमतींनी झाडून जमा करून ठेवलेल्या कचऱ्यावर पडले… पुढच्याच क्षणी त्यांनी त्यातील थोडासा कचरा उचलला व कमंडलूतील मिश्रणात मिसळला… तो कमंडलू घेऊन ते मागच्या दाराशी आले… त्यांच्या पाठोपाठ आप्पा व इंदुमतीही आले…
मागच्या दारापाशी असलेल्या चुलीतील निखारे अजूनही धगधगत होते… वासुंधरनाथांनी क्षणाचाही विलंब न लावता त्यांच्या कमंडलूतील ते मिश्रण त्या धगधगत्या निखऱ्यांवर टाकले… डोळ्यांची पापणी लवते न लवते तोच त्या मिश्रणाने पेट घेतला… पेटताना त्याचा "फट्ट… फट्ट…" असा आवाज होऊ लागला व त्यातून काळ्याकुट्ट धुराचे लोट बाहेर येऊ लागले… संपूर्ण परिसरात अगदी दुर्गंधयुक्त वास पसरला… जणूकाही एखादे कुजलेले प्रेतच जळत असावे… आप्पा व इंदुमतींना तो वास सहन न झाल्याने त्यांनी नाकावर हात धरला…
वासुंधरनाथ : दोघांनीही खळ्यात या !!
असे म्हणून वासुंधरनाथ तडक खळ्याच्या दिशेने निघून गेले… त्यांनी बोलवल्याप्रमाणे आप्पा व इंदुमती खळ्यात आले…
आप्पा : बाबा… ह्या सगळा काय हुता?? त्या वडाच्या पारंबीतसून इलेला ता रगात… बावडीचा लाल झालेला पाणी नी आता चुलीतसून इलेलो तो काळो धूर…
वासुंधरनाथ : सांगतो… सर्व सांगतो… वडाच्या पारंबीतून आलेले ते रक्त… विहिरीतील ते लालभडक पाणी किंवा आता चुलीतून आलेला तो काळाकुट्ट धूर आणि दुर्गंधयुक्त वास या सर्व गोष्टींवरून हेच प्रतीत होते की तुमची वास्तू, ते वडाचे झाड आणि तुमच्या घरालगतची ती विहीर या सर्व ठिकाणी नकारात्मक ऊर्जाचा भयंकर वास आहे… हे सर्व घडण्यामागे या जागेचा इतिहासच कारणीभूत आहे… आणि तो इतिहास काय आहे हे ही मला ज्ञात झाले आहे…
इंदुमती : मंजे?? माका काय समजना नाय??
वासुंधरनाथ : तुम्ही हे घर आणि ती विहीर बांधण्याच्या बऱ्याच वर्षांपूर्वी याठिकाणी एक तांत्रिक वास्तव्य करत होता… गावातील लोकांचा त्या तांत्रिकावर खूप विश्वास होता, परंतु त्यांच्या याच विश्वासाचा गैरफायदा घेऊन त्याने गावातील लोकांना लुबाडण्यास सुरुवात केली… पुढे नरबळीच्या नावाखाली येथे बऱ्याच लहान-लहान निष्पाप जीवांचे बळी देण्यात आले… त्या सर्व लहान मुलांना त्याने याच जागी पुरून ठेवले… नंतर काही दिवसांनी त्याचा खरा मुखवटा गावाकऱ्यांसमोर आला… त्यावेळेस सर्वांनी मिळून त्याला बेदम मारहाण केली… ईतकी की त्यातच त्याचा मृत्यु झाला…
त्याने पुरलेल्या त्या लहान मुलांच्या आत्म्यांस मुक्ती मिळाली नाही, त्यामुळेच आजही या सर्व जागांवर ते आपले अस्तित्व दाखवत आहेत… त्या सर्व वाईट शक्तींनी फक्त तुमच्या वास्तूवरच नव्हे, तर नयनच्या आत्म्यावरही कब्जा केला आहे…
आप्पा : मगे आता यावर कायतरी उपाय असतलो ना??
वासुंधरनाथ : उपाय एकच, तो म्हणजे 'वास्तुशांती'... कारण ती केल्याशिवाय या नकारात्मक शक्तींचा नाश होणार नाही…
इंदुमती : पण नयन बरो होवन इल्याशिवाय आमी वास्तुशांती करू शकना नाय ना??
वासुंधरनाथ : हम्म… बरोबर…
असे म्हणून वासुंधरनाथांनी त्यांच्या झोळीतून एक नारळ, लाल रंगाचे कापड व एक पुडी काढली… लाल कापडात नारळ नीट गुंडाळला व तो हातात पकडून तोंडातल्या तोंडात काहीतरी मंत्र म्हणाले…
वासुंधरनाथ : हे घ्या… तुम्ही वास्तुशांती करत नाही, तोपर्यंत हा नारळ तुमच्या घराच्या पुढच्या दाराला बांधा… परंतु तो बांधण्याअगोदर घरातील प्रमुखाने हा नारळ घेऊन प्रथम संपूर्ण वास्तूला, त्यानंतर विहीरीला व शेवटी वडाच्या झाडाला एकेक प्रदक्षिणा घालून मगच तो बांधणे गरजेचे आहे… आणि ज्यादिवशी वास्तुशांती कराल त्यादिवशी तुम्हाला या नारळाचे विसर्जन करावे लागेल… आणि या पुडीत अंगारा आहे, तो दररोज ग्लासभर पाण्यात टाकून नयनला पिण्यास सांगा…
आप्पा : व्हय… तुमी सांगितला ता सगळा आमी करतलाव बाबा…
इंदुमती : तुमचे लय उपकार झाले आमच्यार खरंच…
इतके म्हणून आप्पा व इंदुमती वासुंधरनाथांच्या पाया पडले व शेवटी त्यांना दक्षिणा देऊन त्या दोघांनीही त्यांचा निरोप घेतला…
वासुंधरनाथांनी सांगितल्याप्रमाणे आप्पा व इंदुमतींनी पुढच्याच दिवसापासून ते उपाय करण्यास सुरुवात केली व त्याचे सकारात्मक परिणाम त्या सर्वांना दिसू लागले…
पुढील काहीच दिवसांत नयन पूर्णपणे बरा होऊन घरी परतला… त्याला बरे झालेले पाहून त्या सर्वांच्या आनंदाला पारावर उरला नव्हता… बरे झाल्यानंतर ५-६ दिवसांनीच त्याने गावातील एका भटजींना बोलवून एक लहानशी वास्तुशांती करून घेतली…
त्यानंतर मात्र कधीही त्यांना त्या घरात नकारात्मकता जाणवली नाही… आता पुन्हा एकदा त्या घरातून हसण्या-खिदळण्याचे आवाज येऊ लागले… पुन्हा एकदा त्या वास्तूत सकारात्मकता नांदू लागली…
परंतु त्या ३ काळरात्रींनी मात्र नयनला नकारात्मक शक्तींचे अस्तित्व मान्य करण्यास भाग पाडले होते आणि त्याचसोबत वास्तूशांती करणे किंबहुना ती योग्य वेळेत करणे किती गरजेचे आहे याचेही महत्त्व पटवून दिले होते…
~~~~~~~~~~ समाप्त ~~~~~~~~~~