ती काळरात्र 3
3 पट भय… 3 पट रहस्य… 3 पट थरार…
भाग : २
भाग १ पासून पुढे सुरु…
त्या बाळाने त्याची मान १८०° कोनात मागे फिरवली… म्हणजेच त्याचे संपूर्ण धड पुढे पण मान तेवढीच मागे… त्याहूनही भयानक गोष्ट म्हणजे त्या बाळाला डोळे नव्हते… होत्या त्या फक्त रिकामी खोबण्या… टॉर्चच्या प्रकाशझोतात समोरील ते काळीज पिळवटून टाकणारे दृश्य पाहून कांचनची अवस्था बर्फाने गारठलेल्या एखाद्या वस्तूसारखी झाली… डोळ्यांची पापणी लवते न लवते तोच त्या बाळाने एक क्रूर हास्य केले व थेट कित्येक फुट खोल असलेल्या त्या विहीरीत उडी मारली…
परंतु विहीरीत उडी मारल्यानंतर त्याच्या पाण्यात पडण्याचा कोणताही आवाज कांचनला आला नाही… उलट आता त्या विहीरीतून अनेक लहान बाळांचे हसण्याचे व रडण्याचे असे दोन्ही आवाज एकत्रितपणे येऊ लागले… आता मात्र त्या विहीरीत पुन्हा डोकावून पाहण्याची हिंमत कांचनमध्ये नव्हती… तिचे हात-पाय लटपटू लागले होते… तरीही शेवटी हिंमत करून तिने हातातील टॉर्चच्या साहाय्याने विहीरीत डोकावून पाहीले… काळ्याकुट्ट अंधाराने व्यापून गेलेली ती विहीर अगदीच भकास वाटत होती… त्या अक्राळविक्राळ विहीरीत वाकून बघताना क्षणाक्षणाला त्यातील नकारात्मकतेची जाणीव तिला प्रकर्षाने होत होती… जणूकाही ती सर्व गिळंकृतच करण्यास तेथे वसली आहे, असे भासत होते…
टॉर्चचा प्रकाश इतका प्रभावशाली नसल्याने कांचनला विहीरीच्या आतील चित्र धूसर दिसत होते… त्यात पावसानेही आता बराच जोर धरला होता, त्यामुळे तिला नीट काही दिसत नव्हते… अजूनही विहीरीतून ते चित्र-विचित्र आवाज येतच होते… डोळ्यांत प्राण आणून कांचन विहीरीत काही दिसतेय का ते पाहत होती, इतक्यात आकाशात एक वीज चमकली आणि त्या विजेच्या लख्ख प्रकाशात तिने जे काही पाहीले ते काळजाचा थरकाप उडवेल असेच होते…
विहीरीच्या आतील प्रत्येक कोपऱ्यातून बरीचशी लहान मुले वर येण्याचा प्रयत्न करत होती… परंतु त्यातील कोणतेही मुलं हे सर्वसामान्य मुलासारखे नव्हते… कोणाच्या डोळ्यांतून रक्त येत होते, तर कोणाच्या नाकातून, तर कोणाच्या मानेतून… काहींना तर डोळेही नव्हते… त्यांचा तो रडण्याचा आवाज अगदीच किळसवाणा वाटत होता… काळीज छाती चिरून बाहेर येईल असेच ते दृश्य होते…
पुन्हा एकदा आसमंतात एक वीज चमकली व ढगांच्या गडगडाटासह मुसळधार पाऊस पडू लागला… घडलेला प्रकार पाहून कांचन प्रचंड घाबरली होती… तिला खूप जोरात किंचाळावेसे वाटत होते, परंतु तिच्या तोंडून आवाजच फुटत नव्हता… शरीरातील सारे बळ एकवटून ती घराच्या दिशेने पळू लागली… काहीही करून तिला आता लवकरात लवकर घरात शिरायचे होते… मागे असलेल्या त्या विहीरीतून पुन्हा एकदा चित्र-विचित्र आवाज येऊ लागले… जीव मुठीत घेऊन कांचन पळत होती… खळ्यातील लोखंडी दार उघडून ती आत आली… दाट साचलेल्या अंधारामुळे तिला पुढल्या दाराला असलेल्या पायऱ्यांचा अंदाज आला नाही… चिखलाने माखलेल्या पायांमुळे जिने चढताना तिचा पाय घसरला व ती जमिनीवर कोसळली… तिच्या हातात असलेली टॉर्चसुद्धा जमिनीवर जोरात आदळल्यामुळे फुटली व त्याच्या काचा सर्वत्र पसरल्या… तो आवाज इतका तीव्र होता की, इंदुमती व आप्पांची झोप खाडकन उघडली… खळ्यातील लाईट लावत लगबगीनेच ते दोघे बाहेर आले… बाहेर आल्यानंतर समोरील ते दृश्य पाहून त्यांच्या काळजाचा ठोकाच चुकला…
मुकामार बसल्याने कांचन खळ्यात बेशुद्ध अवस्थेत पडली होती… तिच्या मनगटाला तसेच डोक्याला मार बसला होता व त्यातून रक्त येत होते…
इंदुमती : कांचन!! गे बाय…. उठ!! अहो… बघा ना हिका काय झाला ता…
आप्पा : राणी!! गो राणी… किती ता रगात व्हावता हा…
इंदुमती : पण ती हयसर इलीच कित्याक हुती, इतक्या रातच्याक??
आप्पा : आता ती हयसर कधी इली हुती… कित्याक इली हुती… यावर चर्चा करण्यापेक्षा तिका तातडीन डाक्टरांकडे घेवन जाना गरजेचा हा…
त्या दोघांचा तो गदारोळ ऐकून नयन व कस्तुरीही तेथे आले… कांचनची अवस्था पाहून त्यांनाही धक्का बसला…
नयन : कांचन!! अग आई काय झालं हिला?? आणि एवढा मार कसला लागलाय हिला??
इंदुमती : अरे आमकाव नाय म्हाईती तिच्यावांगडा काय झाला ता…
आप्पा : ही येळ बोलत बसूची नाय हा, तुमका कळत कसा नाय… लवकरात लवकर डाक्टरांका बोलवूक वह्या…
नयन : पण आता इतक्या रात्री डॉक्टर कुठे भेटणार??
इंदुमती : अरे आपल्या बाजूक परबीन र्हवता ना, तिच्या ओळखीचो कोणतरी डाक्टर हा… तेरोजा ती सांगत हुती… तिका जावन इचार…
इंदुमतींचे बोलणे ऐकून नयन तातडीनेच बाहेर जाण्यास निघाला…
कस्तुरी : थांबा !! मीसुद्धा येते तुमच्यासोबत…
नयन : नको… तू इथेच थांब आई-बाबांसोबत… मी येतो लगेचच…
इतके म्हणून नयन घराबाहेर पडला… शेजारी राहत असलेल्या परबांना जेव्हा कांचनबद्दल समजले तेव्हा त्यांनी लगेचच मदतीसाठी पुढाकार घेतला… त्यांच्या मुलाने लगेचच त्याच्याकडील दुचाकीवरून नयनला थेट डॉक्टरांच्या घरी नेले…
ईथे आप्पा, इंदुमती व कस्तुरी असे तिघेही मिळून कांचनची काळजी घेत होते… काहीवेळातच नयन डॉक्टरांना घेऊन घरी आला… डॉक्टरांनी कांचनला तपासले व मलमपट्टी करून औषधे दिली… तसेच ३ ते ४ तासात तिला शुद्ध येईल अशी हमीही दिली…
काळजीपोटी सर्वजण रात्रभर कांचनच्या बाजूलाच बसून राहीले…
दुसऱ्या दिवशी (३१ जुलै, २०१७) :-
रात्रभर झोप न झाल्याने पहाटे केव्हा झोप लागली ते कोणालाच कळले नाही… सकाळी साधारण ८ च्या सुमारास कांचनला शुद्ध आली…
कांचन : आई !! आई…
शुद्ध येताच सर्वप्रथम तिने इंदुमतींना हाक दिली… लाडक्या लेकीची हाक ऐकताच इंदुमतींना लगेचच जाग आली…
इंदुमती : बायो !!
इंदुमतींना समोर पाहताच कांचनला रडू कोसळले… दोघीही एकमेकींना कवटाळून रडू लागल्या… त्यांचा आवाज ऐकून ईतर सर्वही जागे झाले व कांचनजवळ येऊन तिला धीर देऊ लागले…
कांचन : आई… आपण घराशेजारील ती विहीर बुजवून टाकुयात ना…
कांचनचे हे वाक्य ऐकून इंदुमतींसोबतच सर्वांनाच काहीसे आश्चर्य वाटले… सर्वजण तिच्याकडे एकटक पाहू लागले…
इंदुमती : कित्याक गे बाय??
कांचन : अग त्या विहीरीत बरीच लहान मुलं आहेत… पण ती सामान्य मुलांसारखी नाहीयत…
इंदुमती : मंजे?? माका काय कळना नाय…
कांचन : म्हणजे त्यांना पाहीले तरी काळजात धडकी भरेल… काहींच्या डोळ्यांतून रक्त येत होते, तर काहींच्या नाकातून, तर काहींना डोळेही नव्हते… माझी अशी अवस्था त्यामुळेच झालीय…
कांचनचे ते बोलणे ऐकून सर्वच अगदी निःशब्द झाले… परंतु नयनला मात्र काही तिचे म्हणणे पटत नव्हते, ते त्याच्या चेहऱ्यावरून स्पष्ट दिसत होते…
इंदुमती : बायो… कल रात्री तुझ्यावांगडा नेमका काय झाला ता जरा आमका सविस्तर सांग…
कांचनने घडलेला सर्व प्रकार एकेक करून त्यांना सांगितला… तिचा तो भयानक अनुभव ऐकून कोणाला काय बोलावे ते काही सुचतच नव्हते…
नयन : अग तुला भास झाला असेल… आणि तसही तुला झोपेत चालण्याची सवय आहे माहीत आहे ना??
कांचन : दादा !! भास आणि वास्तव यातील फरक न समजण्याएवढी लहान नाहीय मी…
नयन : म्हणजे तुला काय म्हणायचंय, तू रात्री जे पाहीलंस ती भूत होती??
कांचन : अगदी भूतच असं नाही, परंतु जे काही होते ते सामान्य नव्हते…
नयन : कांचन, आता आपण २१ व्या शतकात आहोत आणि अजूनही या असल्या गोष्टींवर विश्वास ठेवणे म्हणजे मूर्खपणाचे लक्षण आहे…
कांचन : म्हणजे?? मी खोटं बोलतेय का??
नयन : मी असे केव्हा म्हटले??
कांचन : त्यादिवशी वहीनीसोबत जे काही घडले त्यावरही तू विश्वास ठेवला नाहीस… तेव्हाही तू असेच म्हणाला होतास, आणि आताही…
नयनला उत्तर देता देताच कांचन रडू लागली…
आप्पा : अरे बस करा तुमची भांडणा… बाबू, तुकापण कळत नाय तिका बरा नाय हा ता?? तिका आता आरामाची गरज हा…
नयन : अहो आबा, पण ती काय बोलतेय तुम्हाला तरी पटतंय का??
आप्पा : आता गप र्हव… आणि बाहेर खळ्यात ये… माका बोलुचा हा तुझ्यावांगडा… इंदू तूपण बाहेर ये…
असे बोलून आप्पा तडक खळ्याच्या दिशेने निघून गेले… त्यांनी बोलावल्याप्रमाणे नयन व इंदुमती दोघेही खळ्यात आले…
नयन : काय झालं आबा, तुम्ही आम्हाला ईथे का बोलावलत??
आप्पा : ह्या बघ, आता मी काय सांगतय ता नीट कान देऊन ऐक… माका म्हाईत नाय तुका ह्या कितीसा पटतला ता…
नयन : नाही, बोला तुम्ही जे काही आहे ते…
आप्पा : माका वाटता तेदिवस कस्तुरीसोबत किंवा कल कांचनसोबत जा काय घडला ते तेंचे भास नव्हते…
नयन : भास नव्हते?? तर मग काय होते??
आप्पा : अरे तेंका काय खूळ लागला हा काय असा सांगूक?? तू त्या दोघावल्यांका खोटा ठरवलंस… तेंचा कायेक ऐकान नाय घेतलंस…
नयन : हे बघा, तुम्ही मला त्या भाकडकथांवर विश्वास ठेवण्यास सांगणार असाल तर मला त्यात काडीचाही रस नाहीय मी आधीच सांगतोय…
आप्पा : अरे बाबू, माझा म्हणणा तरी ऐक आधी… माका म्हाईत हुता तुका नाय पटणार, पण त्या दोघींवांगडा जा काय घडला ता साधासुधा प्रकरण नाय हा… माका वाटता या वास्तूत कोणत्यातरी अमानवीय शक्तीचो वास हा…
नयन : अहो आबा, काय बरंळताय तुम्ही??
आप्पा : प्रत्येक जागेचो कायतरी भूतकाळ असताच… कधी चांगलो तर कधी वाईट… म्हणान तर नवीन वास्तूत गेल्यार लोका वास्तुशांती करतत… कारण वास्तुशांती केल्यार त्या वास्तुतील जी काय नकारात्मक शक्ती असता तेचो नायनाट होता… आपण ही वास्तू बांधलाव पण तेची शांती नाय केली, म्हणान या नकारात्मक ऊर्जा अशाच आपल्याक त्रास देत र्हवतल्या… तेरोजा इंदुपण तुका ह्याच सांगत हुती, पण तू ऐकलंस नाय…
नयन : हे असं काहीही नसत… आपण काय ईथे कायम राहणार आहोत का?? ती वास्तुशांती वैगेरे करू आपण पुढच्यावेळेस, पण त्याचा आणि त्या दोघींसोबत घडलेल्या प्रकाराचा ईथे काहीही संबंध नाही… माणूस चंद्रावर पोहोचला आणि तुमचे हे काय वास्तुशांती आणि नकारात्मक शक्ती??
इंदुमती : आमी काय खुळे म्हणान नाय सांगत तुका… तुझ्यापेक्षा चार पावसाळे जास्त बघलाव आमी… चार बुका जास्त वाचलंस म्हणान तू सोताक लय हुशार समजत असशीत… तुमच्या या जनरेशनचो ह्योच प्रॉब्लेम हा, शिक्षण घेतला कि तुमका लय मॉडर्न झाल्यासारा वाटता… मगे तुमी असल्या गोष्टींवर विश्वास ठेवूक मागत नाय…
नयन : हे बघा, तुम्ही मला या गोष्टी कितीही जरी पटवून दिलात तरी माझा त्यावर विश्वास बसणार नाही… कारण ज्या गोष्टी मी कधी पाहिल्या नाहीत, त्यावर मी कधी विश्वास ठेवत नाही… त्यामुळे मी तुमच्यासमोर हात जोडतो, पुन्हा पुन्हा या गोष्टींसाठी मला फोर्स करू नका…
इतके म्हणून नयन तेथून तडकाफडकी निघून गेला…
अशारीतीने पुन्हा एकदा नयनने आप्पा व इंदुमतींचे म्हणणे डावलले… परंतु त्याचा हा निर्णय त्याच्यासाठी व त्याच्या घरासाठी लाभदायक ठरणार होता, की त्यांच्या घरावर येणारी संकटांची ही मालिका अशीच सुरु राहणार होती… हे तर "ती काळरात्र" च ठरवणार होती…
त्या भयावह घटनेला उलटून आता ४-५ दिवस झाले होते… कांचनच्या तब्येतीतदेखील आता बऱ्यापैकी सुधारणा झाली होती… तरीही त्या जीवघेण्या काळरात्रींच्या जखमा त्या चौघांच्या मनात आजही ताज्याच होत्या… परंतु नयनच्या दराऱ्यामुळे कोणीही पुन्हा त्या गोष्टींवर भाष्य करण्यास धजावले नाही…
५ ऑगस्ट, २०१७ :-
गेल्या बऱ्याच दिवसांपासून मुक्काम करून बसलेला पाऊस अजूनही थांबण्याचे नाव घेत नव्हता… खळ्यातून दिसणाऱ्या पावसाच्या हलक्याशा सरी… काहीच अंतरावर असलेला हिरवागार डोंगर… जणूकाही त्याने हिरवी शालच पांघरली असेल… आणि त्या हिरव्यागार डोंगरावर पांढऱ्याशुभ्र धुक्यांची पसरलेली चादर… असे एकूणच आल्हाददायक वातावरण होते… पावसाचे थेंब लाल मातीत मिसळल्याने हवेत दरवळणाऱ्या त्या सुगंधाला कोणत्याही महागड्या अत्तराचीही सर आली नसती…
खळ्यात बसून मातीचा तो सुगंध नाकात साठवत व बाहेरील त्या आल्हाददायक वातावरणाचा आस्वाद घेत नयन चहाचे झुरके घेत होता… तेथील एकेक क्षण डोळ्यांत साठवता साठवता त्याची नजर एका ठिकाणी स्थिरावली… त्याच्या घरापासून अगदी काहीच अंतरावर एक भलेमोठे वडाचे झाड होते… त्या वडाच्या पारंब्यांना लटकून बरीच लहान मुले झोके घेत होती… झाडाच्या आकारावरून ते बऱ्याच वर्षांपासून तेथे असावे हे लक्षात येत होते… त्याला बऱ्याच पारंब्या होत्या व त्यातील बहुतांश पारंब्या ह्या जमिनीतदेखील रुतल्या होत्या… पावसाचे थेंब अंगावर झेलत झोके घेताना त्या मुलांच्या चेहऱ्यांवरील आनंद अगदी स्पष्टपणे दिसत होता… नयन एकटकच त्या सर्व मुलांकडे पाहत होता…
कस्तुरी : काय ओ, असे एकटक काय पाहताय??
नयन : अग ते बघ ना… ती मुलं कशी त्या वडाच्या पारंब्यांना लटकून मस्त पावसाचा आनंद घेत आहेत…
कस्तुरी : हो… खरंच !! बालपण किती रम्य असतं ना??
नयन : हो ना… आणि कोकणातील पावसाळा म्हणजे अगदी स्वर्गसुखच !! बघ ना समोर तो हिरवागार डोंगर… त्यावर पसरलेले ते गर्द धुके… मातीचा दरवळणारा हा सुगंध आणि चोहीकडे पसरलेली ही शांतता… मुंबईत हे सर्व कुठे अनुभवायला मिळते आपल्याला??
कस्तुरी : Actually !!
नयन : मला तर असं वाटत या खळ्यात असंच बसून तासनतास या प्रसन्न वातावरणाचा आस्वाद घेत राहावा… किंवा आपण एक काम करूयात ना... आज रात्री आपण इथेच झोपूयात या खळ्यात…
कस्तुरी : काय?? ईथे झोपायचे??
नयन : हो !! का, तुला काही प्रॉब्लेम आहे का??
कस्तुरी : अहो ईथे किती ओलावा आहे… आणि पावसाचे दिवस असल्याने रात्री अनेक तऱ्हेतऱ्हेचे किटक ईथे फिरत असतील…
नयन : अग वेडाबाई !! आपल्याला जमिनीवर नाही झोपायचेय…
कस्तुरी : मग??
नयन : मी आबांसाठी मुंबईहून येताना एक लोखंडी खाट आणलीय, पण सध्यातरी ते खालीच झोपण्यास प्राधान्य देतात… त्यामुळे ती खाट ईथे आणूयात… मस्तपैकी त्यावर गादी वैगेरे टाकुयात… बस्स्स मग, अजून काय हवं??
कस्तुरी : हो, ते सर्व ठीक आहे… पण तरीही मला वाटत आपण आतच झोपायला हवं…
नयन : वेडी आहेस तू… काय प्रॉब्लेम आहे तुला??
कस्तुरी : मला अंधाराची भीती वाटते…
नयन : अग काय एवढी घाबरतेस तू?? मी तर असणारच आहे ना तुझ्यासोबत?? आणि उजेडाच म्हणशील तर रात्री मस्त चांदणे पडते ईथे… एक दिवस निसर्गाच्या सानिध्यात झोपून तर बघ…
नयन बराच फोर्स करत होता, परंतु त्या काळरात्रीचा अनुभव गाठीशी असल्याने कस्तुरीच्या मनात एक प्रकारचे 'भय' निर्माण झाले होते… पण नयनच्या हट्टापायी तिने त्यास होकार दिला… आप्पा व इंदुमतींनीही त्याला बाहेर झोपण्यावरून बराच विरोध केला, परंतु ऐकेल तर तो नयन कसला?? त्या दोघांच्या विरोधाला न जुमानता शेवटी रात्री त्याने खळ्यात झोपण्याची तयारी केलीच…
वेळ : रात्री १२ वाजून ०३ मिनिटे :-
पावसाची रिपरिप सुरूच होती… आप्पा, इंदुमती व कांचन तिघेही हॉलमध्ये झोपले होते… तर ईथे नयन व कस्तुरी बाहेरील वातावरणाची मजा घेत खळ्यात झोपले होते…
कस्तुरी : अहो, किती अंधार आहे ईथे… मला खूप भीती वाटतेय…
नयन : मी असताना कसली एवढी भीती वाटतेय तुला?? भित्रेपणा सोड आता हा… त्या आई आणि आबांनी मिळून ना नको नको ते तुझ्या डोक्यात भरलं आहे, म्हणून तू अशी घाबरट झालीयस… असो… रात्री तुला वॉशरूमला जावे लागलेच तर पुढच्या दरवाज्याला मी फक्त बाहेरून कडी लावलेली आहे आणि ही बघ ईथे उशीपाशी ही टॉर्च ठेवली आहे… Ok???
कस्तुरी : हो, ठीक आहे…
संपूर्ण परिसरात काळाकुट्ट अंधार पसरला होता… अगदी डोळ्यांत बोट घातले तरी कळणार नाही इतका… डोक्यापासून पायापर्यंत सर्व अंग झाकले जाईल अशाप्रकारे चादर घेऊन कस्तुरी झोपी गेली… तर दुसरीकडे नयन मात्र बाहेर पडणाऱ्या पावसाचा आनंद घेत अंथरुणात पहुडला होता… पावसाच्या आवाजासोबतच रातकीड्यांची "किर्रकिर्र"... बेडकांचा "डरावss डरावss" व असे ईतर अनेक प्रकारचे आवाज त्या वातावरणात एकमेकांची साथ करत होते… दुरवरच एखाद दुसरे काजवे लुकलूकताना दिसे… रात्रीच्या त्या गडद अंधारात त्यांचे ते लुकलूकणे अधिकच आकर्षक वाटत होते… वातावरणातील त्या सर्व गोष्टींचा आनंद घेता घेता नयन कधी निद्रेच्या अधीन गेला हे त्याचे त्यालाही समजले नाही…
रात्री कसल्याशा आवाजाने त्याला जाग आली… नीट ऐकले असता तो कोणाच्यातरी चालण्याचा आवाज आहे हे त्याच्या लक्षात आले… तो आवाज अगदी त्याच्यापासून काही अंतरावरूनच येत होता… कानांत प्राण आणून नयन तो आवाज ऐकत होता… त्याने मोबाईलमध्ये वेळ पाहीली, तर रात्रीचे १ : ३३ झाले होते… "इतक्या रात्री कोण बरं चालत असेल??" नयनने स्वतःशीच प्रश्न केला… त्याच्या डोक्यात प्रश्नांची सरबत्ती सुरूच असेल इतक्यात, मघासपासून येणारा तो चालण्याचा आवाज आता त्याच्या खळ्यातून येऊ लागला… आता मात्र तो काहीसा चक्रावून गेला… त्या मिट्ट काळोखात त्याला फक्त त्या चालण्याचा आवाजच ऐकू येत होता… हाताने चाचपडतच नयन उशीपाशी असलेली टॉर्च शोधू लागला, परंतु बराचवेळ प्रयत्न करूनही ती काही त्याच्या हाती लागत नव्हती… शेवटी बऱ्याच प्रयत्नानंतर ती टॉर्च त्याला सापडली, पण त्याचवेळी कस्तुरीने कूस बदलली व तिच्या धक्क्याने त्याच्या हातून टॉर्च निसटून ती खाटेखाली पडली…
अंधारात खाटेखाली हात घालून पुन्हा एकदा तो टॉर्च शोधू लागला की अचानक पुढल्या दाराची कडी खोलण्याचा आवाज त्याला येऊ लागला… नेमके काय घडत आहे याची काहीच कल्पना नयनला येत नव्हती… "कोण आहे??" त्याने काहीशा भारदस्त आवाजातच विचारले… समोरून कोणताच प्रतिसाद आला नाही… "कर्रर्रर्रर्रर्रर्रsss" असा आवाज होऊन दरवाजा उघडला गेला आणि त्याच क्षणाला खाटेखाली असलेली टॉर्च नयनच्या हाती लागली… क्षणाचाही विलंब न लावता त्याने टॉर्चचा प्रकाशझोत पुढील दारावर मारला आणि काय आश्चर्य… ना त्या दरवाज्यापाशी कोणी होते व ना त्या दरवाज्याची कडी कोणी उघडली होती… समोरील ते अनाकलनीय दृश्य पाहून नयन काहीसा भांबावलाच… घडलेल्या प्रकरणाची शहानिशा करण्यासाठी तो टॉर्च घेऊन खाटेवरून खाली उतरला… पुढल्या दाराची कडी उघडून तो खोलीत शिरला… आत आप्पा, इंदुमती व कांचन तिघेही निद्रावस्थेत होते… टॉर्चच्या प्रकाशाच्या साहाय्याने नयनने संपूर्ण खोली पिंजून काढली, परंतु त्याला संशयास्पद असे काहीच आढळले नाही…
पुढल्या दाराची कडी लावून त्याने घराच्या आसपासही सर्व तपासून पाहीले, पण तेथेही कोणीच नव्हते… "कमाल आहे… पुढले दार उघडण्याचा आवाज तर मला आला होता… आणि इतक्या क्षणार्धात कोणी कसे पळून जाऊ शकते??" नयन स्वतःशीच बोलत होता… गोंधळलेल्या अवस्थेतील नयन पुन्हा एकदा खाटेवर येऊन पहुडला…
बाहेरील परिसरात काही क्षणांसाठी चंद्राचे मंद चांदणे पसरले होते… अचानक चंद्रावर आलेल्या ढगांच्या आच्छादनाने पुन्हा एकदा सर्वत्र अंधार पसरला… काहीवेळ तरी हा अंधार व उजेडाचा खेळ असाच सुरु होता… खाटेवर झोपून नयन घडलेल्या प्रकाराचा विचार करत होता… त्याच्या डोक्यात विचारांचे चक्र सुरु असतानाच त्याची नजर समोर असलेल्या बैठकीवर स्थिरावली व अनामिक भीतीची एक लहर त्याच्या सर्वांगातून सळसळली… खळ्यातील त्या बैठकीवर कोणीतरी बसले असल्याचे त्याला जाणवले… चंद्राच्या मंद प्रकाशात फक्त त्याची काळी आकृतीच त्याला दिसत होती… नयनने वेळ न दवडता उशाशी असलेली टॉर्च घेतली व त्यादिशेने प्रकाशझोत फिरवला… परंतु तेथे कोणीही नव्हते…
"कोणी असे मुद्दाम तर करत नसेल ना?? पण मुळात असं कोणी का करेल?? की मलाच भास होत आहेत?? भासच असावेत बहुतेक… खरंच या लोकांसोबत राहून राहून मलाही वेडा लागायची वेळ आलीय आता" नयन स्वतःशीच बोलत होता… बाहेर पुन्हा एकदा मुसळधार पावसाला सुरुवात झाली होती… वातावरणातील त्या गारव्यामुळे नयनला झोप लागण्यास जास्त वेळ लागला नाही…
वेळ : मध्यरात्री ३ वाजून ३३ मिनिटे :-
पाऊस पूर्णतः थांबला होता… संपूर्ण परिसरात गर्द धुके पसरले होते… जणूकाही नभच खाली उतरले असावेत… नयन व कस्तुरी अगदी गाढ झोपी गेले होते… अचानक एका आवाजाने नयनची पुन्हा एकदा झोपमोड झाली… परंतु तो आवाज ऐकून मात्र त्याची उरलीसुरली झोपही उडाली… लहान मुलांच्या खेळण्याचा आवाज होता तो… "हा काय प्रकार आहे?? लहान मुलं इतक्या रात्री खेळतायत?? आणि हा आवाज तर वडाच्या झाडाकडून येतोय… म्हणजे सकाळी जी मुलं खेळत होती ती आता यावेळी खेळायला आलीयत??" नयनच्या डोक्यात असंख्य प्रश्नांचे वादळ उठू लागले… मध्यरात्रीच्या त्या भयाण शांततेत त्या मुलांचा तो आवाज अधिकच घुमत होता… त्या गोंगाटात नयनला झोप लागणे काही शक्य नव्हते… शेवटी वैतागतच तो उठला… उशीजवळ असलेली टॉर्च घेत पायात चपला सरकवल्या व त्या आवाजाच्या दिशेने जाण्यास निघाला…
हवेत प्रचंड शीतलता निर्माण झाली होती… खळ्याला असलेले लोखंडी दार उघडताच थंड हवेची एक झुळूक त्याच्या सर्वांगाला स्पर्शून गेली… ती वाहती हवाही जणू त्याच्या कानात काहीतरी सांगण्याचा प्रयत्न करत होती… संपूर्ण परिसरात पसरलेल्या घनदाट धुक्यांमुळे नयनला अगदी काही अंतरावरीलही स्पष्ट दिसत नव्हते… पांढऱ्याशुभ्र धुक्यांतून टॉर्चच्या पिवळसर प्रकाशाच्या आधारे नयन वडाच्या झाडाच्या दिशेने वाटचाल करत होता…
क्रमशः