कथा :- रामसेतू
लेखक :- स्वानंद गोगटे
भाग 06 :-
फोन वर समोरच्या बाजूला सुर्या होता, "வணக்கம் மூத்த அண்ணன் ( नमस्कार अण्णा ), तुम्ही सांगितल्या प्रमाणे मी त्या सहा जणांचा पाठलाग केला रामेश्वरम मंदिराच्या आवारात. त्यानंतर त्यातले 4 जण एका बोटीत बसून निघून गेले आणि 2 जण चालत दुसऱ्या दिशेने गेले."
शिवा स्वतःशीच हसला. प्रोफेसर म्हणजेच शिवा आहे ही गोष्ट शिवा सोडून दुसऱ्या कुणालाही माहीत नव्हती. अगदी सुर्या ला देखील. स्वतःचा खरा चेहरा शिवा ने कधीच त्याच्या कमांडोनपर्यंत देखील येऊन दिला नव्हता, मग पोलीस तर दूरची बाब. त्यामुळे च तर शिवा प्रोफेसर राजशेखर बनून एवढी वर्ष निर्विघ्नपणे राहत होता. त्याने दाखवलेल्या इतिहासामधील कुतुहलामागचा हेतू हा इतिहास शोधणे हा नसून काही मौल्यवान खजिना किंवा वस्तू हाती लागते का हे बघणे होते. आता सुद्धा राजवीर च्या टीम ला शिवाच खेळवत होता. शिवा ला नकाशाच्या अर्थाचा उलगडा झाला नव्हता. हा नकाशा त्याने अश्याच एका इतिहासाच्या प्रोफेसरांना ठार करून मिळवला होता.
अनायसे राजवीर च्या मोहीम बद्दल त्याच्या कानावर आल्यावर त्याला ही आयती संधी मिळाली, रामसेतू बद्दल जाणून घ्यायची. त्याला आशा होती काहीतरी मौल्यवान वस्तू किंवा काही खजिना त्याला मिळू शकेल. म्हणूनच त्याने सुंदरन च्या बरोबर संपर्कात राहून मोहिमेत सहभागी होण्याची इच्छा प्रकट केली. या आधी देखील तो सुंदरन बरोबर वेगवेगळ्या उत्खननात सहभागी झाला होता. भारतीय सरकारी यंत्रणेच्या ढिसाळ कारभाराचा त्याने तेव्हा फायदा करून घेऊन बऱ्याच मौल्यवान वस्तू आंतरराष्ट्रीय बाजारात विकल्या होत्या. आता सुद्धा असे काही आपल्या पदरात पडेल असे त्याला वाटत होते.
शिवा ने सुर्या ला सांगायला सुरुवात केली, "ते जे दोघे जण चालत निघाले ते धनुष्यकोडी ला गेले आहेत, तू ताबडतोब तिकडे जा आणि त्यांच्या पैकी प्रोफेसर ला जिवंत पकड आणि दुसऱ्याला संपवलस तरी चालेल" असं बोलून शिवा ने फोन कट केला आणि मागे वळला, समोर राघव उभा होता. आपले सर्व बोलणे राघव ने ऐकले आहे याची शिवा ला खात्री होती. राघव ला हा मोठा धक्का होता. जो माणूस आपल्या जीवावर उठला आहे त्यालाच सोबत घेऊन आपण फिरतोय हे किती भयानक आहे हे राघव च्या लक्षात आले. राघव ने आजूबाजूला पाहिलं, सकाळची वेळ असल्याने गर्दी फारशी नव्हती. त्याने शिवा पासून लांब पळण्यासाठी मान फिरवली आणि त्याला बंदुकीच्या गोळीचा आवाज ऐकू आला. पाठोपाठ त्याच्या छातीतून एक तीव्र कळ डोक्यात गेली आणि त्यापुढच्या गोष्टींचे आकलन होण्या आधीच राघव खाली कोसळला. शिवाच्या नेमबाजीत माहिर हातांनी आपले काम चोख केले होते. राजवीर च्या टीम मधला त्याचा एक जुना सहकारी आज राजवीर ने गमावला होता.
शिवा ने आपली बंदूक समुद्रात फेकून दिली, आणि शांतपणे एक सिगरेट काढून शिलगाऊन पिऊ लागला, ओठांवर शीळ घालत एक जुने तामिळ गाणे गुणगुणत एका बाकड्यावर बसला. आता त्याला फक्त राजवीर येई पर्यंत वेळ काढायचा होता.
सुमारे अर्ध्यातासात त्याला दूरवर एक बोट दिसू लागली. त्याचवेळी सुर्या सुद्धा धनुष्यकोडी ला पोहचला. राघव ला जमिनीवर पडलेले पाहून तो चकित झाला, पण त्याचवेळी त्याला दिलेल्या सूचना त्याने आठवल्या आणि जाऊन राघवशेजारीच भांबावून बसलेल्या प्रोफेसर ला ताब्यात घेतले. प्रोफेसर च्या कानावर बंदुकीची नळी ठेऊन तो राजवीर ची वाट पाहू लागला.
जशी राजवीर ची बोट धक्क्यावर लागली आणि चौघही खाली उतरले, त्यांना समोरच दृश्य बघून धक्का बसला. रागावला समोर निपचित पडलेलं पाहून राजवीर चा राग अनावर झाला पण त्याचवेळी प्रोफेसर ला पाहून त्याने तो आटोक्यात आणला. आता प्रोफेसर चा जीव वाचवणे आवश्यक आहे हे त्याने ओळखले.
इकडे प्रोफेसर आपल्या कानावर ठेवलेल्या बंदुकीच्या नळीच्या धाकाने थरथरत होता. शिवाला अभिनय सुद्धा चांगला करता येतो हे त्याने सिद्ध केले होते. आता त्याच्यासमोर प्रश्न होता, सूर्यापासून कसे सोडवायचे हा, तशीही सूर्याची गरज आता संपली होती. नकाशाचा अर्थ राजवीर आणि सुंदरन लावत होते, आणि या पुढे गरज लागली तर शिवा स्वतः तिथे असणारच होता.
शिवा ने म्हणजेच प्रोफेसर ने राजवीर ला हळूच इशारा केला. राजवीर ने सावध पवित्रा घेतला आणि हर्षल आणि हरीश ला इशारा केला. शिवा ने एका झटक्यात सूर्याचा बंदूक धरलेला हात हवेत ढकलला आणि स्वतः खाली बसला. त्याचवेळी हरीश ने आपल्याकडची गन राजवीर कडे फेकली आणि राजवीर ने ती पकडून सुर्या च्या गन असलेल्या हातावर गोळी चालवली. राजवीर ची गोळी सूर्याच्या तळहातामधून आरपार गेली आणि सुर्या कळवळून जमिनीवर बसला. हीच संधी साधून हरीश आणि हर्षल ने धावत जाऊन त्याला पकडले. राजवीर ने आपली गन सूर्यावर रोखली. राजवीर प्रश्न विचारण्यासाठी सुर्याजवळ आला पण त्याच वेळी सूर्याने आपल्या दातात लपवलेले विष खाल्ले आणि काही क्षणात तो खाली कोसळला.
आता राजवीर ने त्याच्या जवळ जाऊन सुर्या च्या प्रेताची तपासणी केली पण त्याच्या हातात काहीच लागले नाही. इकडे शिवा उर्फ प्रोफेसर मनातल्या मनात खुश झाला होता की त्याने शिकवलेले सूर्याने तंतोतंत अमलात आणले होते आणि शत्रूच्या हातात जिवंतपणे न सापडण्याचे वचन पाळले होते.
इकडे सुंदरन ने हातातला तो दगडी दांडा प्रोफेसर ला दाखवला आणि आता पुढे काय असं विचारलं. या सर्व गडबडीत काही क्षण त्या दगडी दांड्याबद्दल सगळेच विसरले होते. राजवीर ने स्थानिक पोलिसांना फोन करून धनुष्यकोडी ची परिस्थिती सांगितली आणि स्वतः आणि उरलेले चौघे परत बोटीत बसले आणि थोडे दूर जाऊन बोटीतून उतरले आणि परत सामान्य पर्यटकांसारखे धनुष्यकोडी ला आले.
सुंदरन ने तो नकाशा परत एकदा हातात घेतला. नकाशात ती काळी रेषा धनुष्यकोडी पर्यंत दाखवली होती आणि तिथून पुढे ती रामसेतू च्या दिशेने वळली होती. आता सुंदरन ने अंदाज लावला की ज्याप्रमाणे तो दगडी खांब समुद्रात उभा केला होता तश्याच पद्धतीचे काही आसपास असण्याची शक्यता होती. म्हणून त्यांनी पाहायला सुरवात केली. पण तसे काहीच त्यांना दिसत नव्हते.
सुंदरन ने परत एकदा ज्या दिशेने ते आले होते त्या दिशेला पाहिले. दगडी खांबावरून परावर्तित होणारे किरण आणि त्यांच्या चमकण्यामुळे त्या खांबाची जागा त्यांना दिसत होती. पण ते किरण नक्की तिथे जात आहेत हे कळत नव्हते. सुंदरन ने परत एकदा नकाशा उघडला. त्यांना राघवची तीव्रतेने आठवण आली. नकाशा विषयात राघव तज्ञ होता. पण आता शोक करत बसायला वेळ नव्हता. त्यांनाच स्वतःला काहीतरी डोकं लावणं गरजेचे होते.
हर्षल सुद्धा एवढा वेळ नकाशा पाहत होता. तो म्हणाला, "ज्या जागेवरून हे किरण रामसेतूचा दिशेने वळत आहेत ती जागा या ठिकाणी नसेलच तर ?"
कुणालाच हर्षल च हे बोलणं नक्की कळलं नाही.
परत एकदा हर्षल म्हणाला, "आपण नीट पाहिलंत तर नकाशात धनुष्यकोडी दाखवलं आहे पण ती काळी रेषा त्यापासून काही अंतरावर रामसेतू कडे वळत आहे. कदाचित याचा अर्थ ज्या ठिकाणाहून हे किरण वळतात ती जागा समुद्रात असेल का?"
आता सर्वांना हर्षल च्या बोलण्याचा अर्थ कळला. राजवीर ने समोर समुद्रात पाहिलं. रामसेतूचा काही भाग जो अजूनही जमिनीच्या वर होता तो त्याला दिसत होता आणि काही अंतरावर तो पाण्याच्या खाली गेला होता. राजवीर ला त्या ठिकाणी पाण्यात काहीतरी चमकताना दिसलं लांबून.
त्याने जवळ जाऊन बघायचं ठरवलं. नौदलाचे रिसोर्स त्यांच्या जवळ आता असते तर त्यांनी नक्कीच एखादी छोटी पाणबुडी तिकडे पाठवली असती. पण आता त्यांना स्वतःलाच जीव धोक्यात घालून हे जोखमीचे काम करणे गरजेचे होते. तशी त्याला समुद्राची भीती नव्हती पण या वेळी त्यांच्या जवळ ऑक्सिजन सिलेंडर सुद्धा नव्हता, त्यामुळे राजवीर ला काळजी वाटत होती.
हरीश ने नेहमीप्रमाणे तयारी दाखवली समुद्रात जायची, पण या वेळी राजवीर ने त्याला अडवलं. या वेळी राजवीर स्वतःच जाणार होता. राजवीर ने तो दगडी दांडा हातात घेतला आणि आजुबाजूला कोणी नाहीये हे पाहून चालायला सुरुवात केली.
रामसेतू जरी पाण्याच्या खाली असला तरी त्याचा काही भाग पाण्याच्या वर नक्की आहे आणि त्या वाळूवरून माणूस आरामात चालू शकतो. राजवीर चालत चालत अश्या ठिकाणी पोहचला जिथे वाळू संपून पाणी चालू होतं होत. त्याने मागे वळून पाहिलं तर ते चौघेही राजवीर च्या पाठोपाठ आले होते. राजवीर ने त्यांना याच ठिकाणी थांबायला सांगितले आणि स्वतः पाण्यात चालायला लागला. त्याची नजर मगाशी त्याला दिसणारी चमक शोधत होती.
आता राजवीर साधारण कमरे एवढ्या पाण्यात होता आणि त्याने एकदा पाण्यात डोकं घालून चेक केलं. आणि अहो आश्चर्यम, पाण्यात त्याला ते किरण दिसले जे त्या दगडी खांबावरून परावर्तित होत होते. पण ते सरळ जमिनीवर पडत होते. कदाचित ज्या आरश्या सारख्या वास्तूवरून ते किरण परावर्तित होत होते, ती वस्तू एखाद्या विशिष्ट कोनात असल्याने हे किरण जमिनीला समांतर न येता थोडे तिरके येत होते आणि पाण्यात घुसून पाण्याखालील जमिनीवर पडत होते.
राजवीर ने पाण्याच्या वर येऊन जमिनीवर उभ्या असलेल्या चौघांना इशारा केला. आणि तो परत पाण्याखाली गेला. एव्हाना राजवीर पाच फूट खोल पाण्यात होता. त्याने परत एकदा खोल श्वास घेऊन पाण्यात बुडी मारली आणि ते किरण पडत होते त्याजागेच्या आजूबाजूला शोधले.
तिकडे सर्वत्र समुद्राखालची वाळू होती त्यामुळे काही असण्याचा आणि असले तरी दिसण्याच्या शक्यतेला त्याने केव्हाच तिलांजली दिली होती. तरी सुद्धा तो सगळीकडे शोधत होता. सुमारे पाच ते सहा वेळा डुबकी मारून शोधूनही राजवीर ला काहीच हाती लागले नाही.
शेवटी एकदा शेवटचा प्रयत्न करून पाहू म्हणून त्याने हातातला दगडी दांडा पाण्याखालच्या जमिनीवर टेकवला. ज्या भागावर फिरकीच्या खुणा होत्या तीच बाजू त्याने जमिनीला टेकवली होती. तो आता त्या दांड्याच्या आधाराने चालत त्या सेतूच्या एका बाजूला आला. साधारण 50 फुटाचे अंतर होते ते, पूर्णपणे सपाट आणि कुठेही उंचवटा नसलेले आणि त्या नंतर मात्र ते अचानकपणे खोल गेले होते. हे 50 फूट रुंद असलेले स्ट्रक्चर मात्र राजवीर ला गोंधळात टाकत होते. या ठिकाणी पाण्याची खोली ही सुमारे 5 फूट होती.
राजवीर ने तो दांडा स्ट्रक्चर च्या एका बाजूने दुसऱ्या बाजूकडे अलगद सरकवत न्यायला सुरवात केली. पाहिले काही अंतर तो एकदम सुरळीत आला पण एका ठिकाणी तो अडला. जणू एखाद्या फटीत तो अडकला होता. राजवीर ने लगेच पाण्याखाली डुबकी मारून चेक केले. ज्या ठिकाणी दांडा अडला होता त्या ठिकाणची वाळू अलगद बाजूला केली. तेव्हा त्याला एक भोक त्या ठिकाणी दिसले. वरकरणी ते नैसर्गिकरित्या दगडाला पडलेले भोक वाटत होते. पण तो दांडा आश्चर्यकारक रित्या त्या भोकात एकदम परफेक्ट अडकला होता. राजवीर ने तो दांडा सरळ उभा करून फिरकीच्या बाजूने फिरवायला सुरवात केली. एखादा स्क्रू ज्या पद्धतीने लाकडात घुसतो त्या पद्धतीने हा दांडा खालच्या दगडात अलगद घुसत होता आणि फिरकीच्या शेवटी एकदम पक्का उभा राहिला.
आता ते परावर्तित किरण त्या दांड्यावर पडत होते आणि ज्या ठिकाणी ते पडत होते त्या ठिकाणी राजवीर ला अचानक लाल प्रकाश दिसायला लागला. कदाचित थोड्याश्या सुद्धा केंद्रित म्हणजे च concentrated प्रकाशाने तो भाग प्रकाशित होत होता. राजवीर ने तो दांडा त्या लाल प्रकाशाच्या इथे धरून फिरवला. आता त्या दांड्याचा फक्त वरचा भाग फिरत होता , तो भाग काही विशिष्ट कोनात फिरून थांबला आणि नकाशात दाखवल्या प्रमाणे त्या दांड्यावरून ते लाल रंगाचे प्रकाशकिरण सरळ रामसेतू च्या दिशेने गेले.
राजवीर ने पाण्याच्या वर येऊन श्वास घेतला. आणि परत या चौघांच्या इथे आला आणि त्यांना सर्व हकीकत सांगितली. आता या पाचही जणांची इच्छा होती पण सुंदरन च्या पाण्याच्या भीतीमुळे तो जाण्यास असमर्थ होता. प्रोफेसर ची यायची इच्छा होती पण त्यांचे वय बघून राजवीर ने नकार दिला. शेवटी हरीश आणि राजवीर परत एकदा निघाले. हर्षल ला त्यांनी किनाऱ्यावरच ठेवले होते.
त्या दांड्याच्या जागी आल्यावर पाण्यात डुबकी मारून राजवीर ने हरीश ला सर्व दाखवले. त्या नंतर ते परत एकदा पाण्याच्या वर येऊन चर्चा करायला लागले. हरीश ने राजवीर ला सांगितले की आपण त्या दांड्याच्या आजूबाजूची जागा देखील साफ करून पाहूया. कदाचित काहीतरी हाती लागेल.
त्या प्रमाणे एकदा राजवीर आणि एकदा हरीश असे क्रमाक्रमाने पाण्याखाली जाऊन त्या दांड्याच्या आजूबाजूचा परिसर वाळूपासून मुक्त करायला लागले.
शेवटी आजूबाजूचा सुमारे दोन मीटर चा परिसर साफ झाल्यावर दोघंही एकदम पाण्याखाली जाऊन बघायला लागले. हरीश ने राजवीर ला खुणेने बोलावून घेतले आणि दाखवले. ज्या ठिकाणी तो दगडी दांडा उभा होता त्या च्या पुढे आणि मागे अशी एक खाच होती. जणू तो दांडा म्हणजेच आधुनिक गाडीचा गिअर होता आणि त्या खाचेत तो दांडा पुढे किंवा मागे होते असण्याची शक्यता होती.
राजवीर आणि हरीश परत पाण्यावर आले. जोरात आणि मोठा श्वास घेऊन ते परत पाण्याखाली गेले आणि दोघांनी एकत्र जोर लावून तो दांडा ढकलला, आधी काहीच परिणाम त्या दांड्यावर झाला नाही, पण अचानक त्यांना पाण्यात कंपने जाणवू लागली आणि त्या 50 फूट रुंद स्ट्रक्चर च्या दोन्ही बाजूने हवेचे बुडबुडे बाहेर पडू लागले.
इकडे बाहेर जमिनीवर असलेल्या तिघांनाही कळत नव्हते की राजवीर आणि हरीश चे काय चालू आहे. त्याचवेळी त्यांना जमीन थरथरते आहे असं जाणवले. तिघांनीही घाबरून एकमेकांना घट्ट धरले. त्याचवेळी हर्षल ने त्यांना खुणेने रामसेतुकडे बघायला सांगितले. रामसेतूचा संपूर्ण मार्गावर हवेचे बुडबुडे पाण्यातून वर येत होते. जणूकाही बरेच वर्ष कोंडून ठेवलेली हवा कोणीतरी बाहेर काढत होत.
क्रमशः