भाग :: -- पाचवा
भाद्रपद लागला तसं उन्हानं ज्वारी, बाजरी, मका तयार होऊ लागला. पाऊस आता जाईलच अशा अंदाजानं शेतकरी कामास लागले. पावसाळ्यात खोललेल्या मोटारी विहीरीत बसवत कापसास, मिरचीस पाणी सुरू झालं. काहींनी बाजरी कापावयास सुरुवात ही केली. तोच जाणारा पाऊस परतला .
सुरुवातीस वातावरणात अचानक बदल होतं भादी ऊन अचानक गायब होत आभाळानं घुरमट धरलं. झगार पांघरली जात बुंदाबांदी होऊ लागली. अभ्र घाऱ्याघुऱ्या करत मेघांची दाटी करू लागलं. दोन दिवसांपासून सूर्य नारायणाचं दर्शन होईना. ऐन कणसात दाणे पक्व होतांनाच परतीचा पाऊस घोळ घालतोय म्हणून जो तो चिंतेत पडला. धड पाऊस ही नाही व धड थंडी ही नाही अशी स्थिती आभाळात होती. सूर्याला कोंडी फोडताच येईना.
घरात बसत आढ्याकडं पाहत राहणारी मंजा कालपासूनच अस्वस्थ होती. दहाच्या सुमारास ती उठली व बाहेर जाऊ लागली.
" मंजा! कुठं निघालीस बाई, मागं फिर! पावसात भिजून आजारी पडशील!" अंजा बहिणीस टोकू लागली. शून्यात अस्तित्व हरवलेली मंजा तशीच निघाली. अंजाही स्वयंपाकात बुडाली. भाना काॅलेजला गेलेला. बंकट बापू आज भडगावहून उशीरा परतणार होते.
बारा वाजण्याच्या आसपास मंजा थरथरत व काही तरी असंबंध बडबडत व हातवारे करत घरात घुसली.
" काय झालं मंजे? एवढी कुणावर संतापते गं! अंजाबाई तिचं ताट रोजच्या जागी झाकत शेतात म्हशींना चारापाणी करण्यासाठी निघतांना म्हणाली.
मंजा आरसा घेऊन करंड्यातला कुंकू भांगेत भरत होती व पुसत होती.
अंजाला घाई असल्यानं ती त्राग्यानंच " मंजे ठेव तो करंडा, का नसले उद्योग करतेय आज? ताट झाकलाय खाऊन घे! मी मळ्यात चाललीय" म्हणत निघून गेली.
अंजाबाईनं म्हशींना चारा टाकत पावसाचे थेंब थांबलेत पाहत भुईमुगात टाकलेल्या फुटकळ चवळीच्या शेंगा तोडायला लागली. पिवळ्या शेंगा पावसानं वातड झाल्या होत्या. शेतात पायाला गारा बिलगत असतांना ही जास्त पाऊस लागला तर चवळी वाया जाईल म्हणून अंजाबाई शेंगा तोडत राहिली.
भाना घरी येत जेवण करुन तो ही मळ्यात आला. झोपडीतच तो अभ्यास करत बसला. पाचच्या आसपास बंकट बापू परत आले. तोवर भानानं म्हशी धुतल्या व सायंकाळी तोच दूध पोहोचवायला निघाला. सायंकाळी घरी परतलेल्या अंजाबाईस मंजा दिसली नाही. असेल इथेच आस पास म्हणत त्या स्वयंपाकाला लागल्या. अंधार पडला तरी मंजाचा सासूल लागेना. तोच बंकट बापू ही आले.
" अहो ही मंजा दिसत नाही! चौकाकडं पाहता का जरा?"
" भडगावहून आलो तेव्हा ही दिसली नाही! असेल चौकात, जाऊन आणतो" म्हणत बापू निघाले. बापूनं सहसा बाहेर न निघणारी मंजा निघालीच बाहेर तर मंदीरात व जिथे जिथे थांबे त्या जागा पाहिल्या. मंजा दिसली नाही म्हणून ते परतले. एकट्या परतलेल्या बापूंना पाहताच अंजाबाई चिंतेत पडल्या व त्या ही शोधण्यासाठी निघाल्या. नऊच्या आसपास भाना परत आला.तो पावेतो चौक, गल्ली शोधून झाली पण मंजाचा तपास लागेना.
अंजाबाईच्या डोळ्यात पाणी आलं.
" अहो सकाळी बाहेर गेली व दुपारी परत आली तेव्हा काही तरी बडबडत होती. आरशात पाहून कुंकू लावत पुसत होती. मी तिचं जेवणाचं ताट झाकून निघून गेली शेतात!" म्हणत अंजाबाई गलबलल्या.
" अंजे! असेल गावातच कुठं तरी! येईल ती! रडू नको!"
" मी दुपारी काॅलेजमधून आलो तेव्हा ही आई नव्हती घरी!" भाना बोलला.
सर्वांनी थोडं फार जेवण उरकत बंकट बापू व भाना पुन्हा गावात गल्लोगल्ली मंजास शोधू लागले. पण मंजा मिळेच ना!
सकाळी उठून बापू दूध घेऊन भडगावला गेले. सकाळी जोरदार पावसाला सुरुवात झाली. अंजाबाई व भाना कुणाला काहीच न सांगता मंजास शोधू लागले. गाव, मळा, विहीरी, पाटाची चारी सर्व शोधून झालं. बापूही भडगावचं स्टॅण्ड, बाजार शोधून आले. पाचच्या सुमारास सकाळी गेलेला काशीमामा गोंडगावहून परतला. परस्पर मळ्यात येताच बंकट बापू व अंजाताईचा सुतकी चेहरा पाहताच काय झालं म्हणून विचारलं. का कु करत बापूनं सांगितलं.
" काशी, कालपासून मंजा दिसत नाही रे!"
"बापू काल केव्हापासून?"
" दुपारी पर्यंत ती घरी होती हे अंजानं पाहिलंय! सकाळी बाहेर गेली व बडबडतच घरी आली होती म्हणे!"
" बापू काल अकराच्या आसपास मंजाताई मळ्यातल्या त्या समोरच्या पोलजवळ बराच वेळ बसली होती. मी मिरचीला खत मारत होतो. मंजाताई का बसलीय गं इथं पावसात! जा घरी म्हणून मी दटावलंही! पण नुसतीच खांबाकडं पाहत होती. मी ही खत मारायला लागलो. नंतर बाजी दादा आला. मी मिरचीतच न्याहरी करत बसलेलो. दादाचं माझ्यावर लक्षच नव्हतं. तेव्हा बाजी दादा मंजा ताईला बरच बोलला!"
" काय बोलला?" अंजा व बापूनं धडधडत विचारलं
"........." काशीमामा अडखडू लागला.
" काश्या सांग ना!" बापूंनी दरडावून विचारल्यावर काशी सर्व सांगू लागला.
.
.
" काय गं मंजा! का बसलीय इथं?"
मंजा काहीच बोलेना.
" त्या खांबाकडं काय बघतेय सारखी टक लावून! अजून हौस नाही फिटली का! अशाच खांब्यावर तो सदा बोंबलासारखा भाजून गेला ना! तुला ही जायचं का त्याच्या जवळ!"
मंजाताईनं हे ऐकलं व जवळ पडलेला दगड उचलत बाजी दादा वर नेम धरला पण दादा निघून गेला. मंजाताईनं उचललेला दगड खांब्यावरच मारला नी गावाकडं निघाली.
काशीनं हे सांगताच अंजाबाईच्या ध्यानात आलं.
" अहो म्हणून ती बडबडत व हातवारे करतच घरी आली होती व आरशात पाहत कुंकू लावत होती व पुसत होती."
"पण मग मंजा कुठं गेली असावी?"
बापू विचार करू लागले. तोच मळ्यातली गाडी घेण्यासाठी भाना पळतच आला.
" काय झालं रे भाना? लागला का तपास?" बापूंनी भानाला विचारलं
भाना घाबरत घाबरतच तत पप करू लागला. त्यानं गावातल्या चौकात जी चर्चा ऐकली ते ऐकून त्याला वेगळीच भिती वाटत होती.
" काय रे, काय झालं ते तर सांग?"
"काही नाही आजूबाजूच्या गावात जाऊन आईचा तपास करण्यासाठी जातोय म्हणून गाडी घ्यायला आलोय!" त्यानं बापू व मावशीला कसं सांगावं म्हणून खोटंच सांगितलं.
" भाना थांब! मी येतो सोबत!"
" नका आधी मीच जातो!" सांगत भाना निघू लागला पण तरी बापूनं काशीला सोबत पाठवलं.
भानानं काशीमामाला बसवलं व किक मारली. गाव टाकताच रस्त्यात गाडी उभी करत तो रडू लागला.
" भाना, काय झालं ते तर सांग! रडतोस कशाला!"
" मामा.... डोंगरातील फाॅरेस्टमध्ये कुणी तरी बाईचं .....प्रेत.....सापडलंय...." तो रडू लागला.
" भाना, अरे मंजाताई कुठं तरी असेल तू घाबरू नको! उगाच मनात काहीही आणू नको! शंका काढण्यासाठी हवंतर तिथं जाऊन येऊ पण रडू नको!" काशीमामानं धीर देत दहा पंधरा-वीस किमी दूर ओसाड डोंगराकडं गाडी न्यायला लावली. डोंगरात नुसतं सुक्कय उगायचं पण तेवढ्या भागात गावच नसल्यानं तीन तालुक्याच्या सिमेवरील हा दुर्गम डोंगराळ भाग फाॅरेस्टच्या अखत्यारीत होता. काशी मामानं घरी देखील कळवलं नाही. सुगंधाला आई व बाबा गोंडगावला गेलेत व बाबा रात्री परतणार एवढंच माहीत.
अंधार पडू लागला. गावातील चर्चेतून समजलेल्या ठिकाणी पोहोचायला त्यांना नऊ वाजले. तेवढा भाग त्यांनी अंधारात पिंजून काढला.पण प्रेत गावेना. ओसाड भागात कुणाचा तपास ही नाही कुणाला विचारायचा संबंधच नाही.
शोधून शोधून बेजार झाले.
" भाना, आता इथं आपणास काहीच सापडणार नाही चल गाडी काढ! जवळच्या गावात तपास करू!"
सांगितलेल्या ठिकाणापासून जवळचं गाव त्यांनी गाठलं. पाऊस झिम झिम पडत होता. लोक जेवणं उरकून ज्याच्या त्याच्या घरात. काशीबाबानं सरळ पोलीस पाटलाचं घर गाठलं. चौकशी केली असता गुराख्यांकडून कळताच पोलीसांना वर्दी देण्यात आल्यानं सायंकाळी पंचनामा करत प्रेत चाळीसगावला नेल्याचं कळालं.
काशीबाबानं हात जोडत घाबरत घाबरत वर्णन विचारलं.
" बाई होती. चाळीस पंचेचाळीसीच्या आसपास! गौर वर्ण "
भाना ढासळत रडू लागला.
काशीनं दटावत " भाना चूप बैस! अजून काहीच कळायला मार्ग नाही! चल चाळीसगावला जाऊ!"
पोलीस पाटलांनी चहाचा आग्रह केला पण भाना व काशीनं नम्रपणे नकार देत चाळीसगावकडं गाडी काढली. पोलीस स्टेशन गाठत काशीमामानं घाबरत घाबरत मंजाबाबत सारं थोडक्यात कथन केलं.
मंजा...मनोरुग्ण... कालपासून गायब... फाॅरेस्ट मधील प्रेत..शंका... पहायला आलोत.
पोलीसांनी सिव्हील मध्ये नेत शवागाराकडं नेलं.
पोलीसांनी मध्ये येण्याचा इशारा करताच भाना रडतच खाली बसला
" मामा....मामा... मी नाही येत...माझ्याकडून पाहणं..नाही शक्य!"
काशीमामानं त्यास शांत केलं व एकटा निघाला. तोच भानास काय वाटलं तो ही निघाला.
काशीमामा पुढं व भाना मागं
तोडावरचं कापड बाजूला केलं गेलं. भानानं डोळे गच्च बंद केले.काशीमामाचीही छाती लोहाराच्या भात्यागत हाफू लागली. ओल्या कपड्यात घाम फुटू लागला. तोंडाकडं पाहताच काशी आनंदला. त्यानं डोळे मिटलेल्या भानास हातानं खुणावत "भाना बघ! घाबरू नकोस!"
माणसाला दु:खातही कधी कधी समाधान लाभतं. ते थोडं असलं तरी माणसाला एकदम उभारी देऊन जातं पुढच्या संकटाशी जोमानं लढण्यासाठी! अजुन मंजाबाईचा तपास तर नव्हताच पण तरी सापडलेलं प्रेत आईचं नाही ही बाब दोघांना एकदम निर्धास्त करून गेली. सारी भयभितता क्षणात पळाली व हलकं वाटू लागलं.
दोघे बाहेर आले. नळाच्या स्टॅण्डपोष्टवर येत भानानं पावसात भिजलेलं असतांनाही घटाघटा पाणी घोटलं. पाणी घेताच त्याला तरतरी आली. पण नंतर लगेच आई कुठं असेल ही भिती प्रकटली. त्यानं भडगाव रस्त्याला गाडी लावली.
भानाचा मोबाईल वाजला. बंका बापूचा होता.
" भाना कुठं आहेत!"
" बापू आता भडगावला पोहोचू!"
" इतका उशीर का रे! परत या लवकर, आपली मंजा सापडली! ती खुर्दाण्याला गेलीय! आताच तेथून गणाजीचा फोन आला!"
भाना क्षणात आनंदला व तिथं आई कशी व का गेली हे विचारू लागला.
" भाना आता ते महत्वाचं नाही. सापडली हे महत्वाचं! बरं आता भडगावलाच हाॅटेलवाल्या गजा तात्याकडं निवांत थांबा! एवढ्या रात्री नका येऊ पावसाच्या रातीचं!" सांगत बापूनं फोन ठेवला.
भाना व काशीचा सारा थकवा जात जीव भांड्यात पडला.
भडगाव येताच जेमतेम उघडं एक हाॅटेल शोधलं. भानाच्या पोटात सकाळपासून काहीच नव्हतं तरी त्याला ते जाणवलं नव्हतं पण आता आई सुखरूप आहे हे कळताच त्याला भूकेची जाणीव झाली. काशीही गोंडगावहून नाश्त्यावरच परतला होता. मालूबाईस गोंडगावला सोडत तो तसाच मळ्यात परतला होता.
दोघांनी भरपेट जेवण केलं.भाना गजा तात्याच्या घराकडं गाडी नेऊ लागला.
" भाना, घरी सुगंधा एकटी आहे इथं राहण्यापेक्षा घरीच परतू!" काशीमामानं सांगताच पाऊस थांबल्यानं व सकाळी दूधासाठी बापूस गाडी लागेलच म्हणून भानानं गाडी वळवत उमर्ठी रस्त्याला लावली. गाडीवरच्या हवेनं अंगातले कपडे अंगावरच वाळू लागले. गावात यायला दिड दोन वाजले.
काशी मामाचं घर येताच मागच्या अंगणात भानानं गाडी थांबवली.
" भाना , आता इथंच झोप एवढ्या रातीचं गावात गाडी वाजवत जाऊ नको. सकाळी जवळच खळ्यातून दूध ही घेता येईल."
भानूही थकला होताच. त्यानं गाडीची किल्ली सकाळी बापूकडं देण्यासाठी काशी मामाकडं सोपवली.
काशीमामानं मागच्या दारातून घरात झोपलेल्या सुगंधाला जास्तीचं अंथरुण काढून देण्यासाठी उठवण्याचा प्रयत्न केला. पण सुगंधाही अभ्यास करुन चालूच झोपली असावी ती धुंदीतच काही तरी बरडत तशीच झोपली. मामानंही झोपेतल्या पोरीस त्रास नको म्हणून भाना व ते पत्र्याच्या टपरात टाकलेल्या एकाच खाटेवर झोपले. दोन दिवसाच्या दगदगीने व पावसात भिजल्यानं अंगात गारवा मुरल्यानं गरम गोधडी अंगावर पडताच भाना घोरायला लागला.
पहाटे काशीला खळ्यातल्या झाडलोट व दूध काढण्यासाठी उठणं भाग होतंच. सवयीप्रमाणे जाग येताच थकवा असुनही तो उठला. त्यानं शांत झोपलेल्या भानाच्या अंगावर दुसरी गोधडीही टाकली व निघाला.
बापूकडं किल्ली देत रात्रीच आल्याच व भाना झोपलाय हे कळवलं.
पहाटे चारला उठत सुंगधानं अंघोळ केली. पत्र्याच्या टपरात झोपलेल्या बाबास तिनं उठवलं नाही. रात्री परतायला एवढा उशीर का झाला हा प्रश्न तिला पडलाच होता. पण आई गावालाच थांबणार होती म्हणून बाबानं रात्री दारू घेतली असावी म्हणूनच उशीरा आले असावेत, असा विचार करत ती अभ्यासाला बसली. सहा वाजले तरी बाबा उठत नाही म्हणून ती उठवायला आली. गोधडी पांघरलेल्या बाबास तिनं हाक मारत हलवत उठवलं. पण बाबा उठत नाही म्हणून ती लाडात गोधडी पांघरलेल्या बाबाच्या अंगावर झोपली.
बाबा सतत राबतात तरी केवळ दारुच्या एक दोन ग्लास साठी आईला किती घाबरतात! जरा आई कुठे गावाला गेली की एकदम दारु प्यायची हौस फेडायला पाहतात. या विचारात बाबावर पडल्या पडल्या तिला हसू आलं. तोच आपल्या ओझ्यानं बाबास जाग आल्याची तिनं हालचालीवरुन ओळखलं. ती उठत तोंडावरून गोधडी ओढणार तोच झोपलेला भाना उठला व तिला जोरात ढकलू लागला. गोधडीत भानाला पाहताच ती एकदम घाबरली.थरथर वाढली व तिनं क्षणात ओळखलं की रात्री बाबा परतलेच नाही तर झोपेत आपल्याला दार उघडायला लावणारे बाबा नव्हतेच तर हाच असावा! झोपेत आपण दार उघडलं नाही म्हणून इथंच झोपला. ती संतापली. ती उभी होती तिथंच मागच्या भितीच्या कोनाड्यात तिला मांडलेल्या उखळात उभी मुसळ दिसली. ती लपकली व मुसळ हातात घेत " भान्या मुडदा बसवला तुझा! आई बाबा गावाला गेलेत पाहून तुझी ही हिम्मत?" ओरडत मुसळ फेकली. भानाला गाढ झोपेत आपल्यावर कोण बसलं हे कळताच जागा होत तो पाहणार तोच तोंडावरची गोधडी ओढली गेली व त्याला सुगंधा दिसली. दुसरं काही कळायच्या आत तो झटकन खाटेवर उठून बसला पण तोवर मुसळ आडवी होत धपकन त्याच्या पायाच्या पंज्याला मुंदऱ्यात बसली.तो पाय धरतच कळवळला.
तोवर सुगंधा पुन्हा मुसळ उचलणार तोच " सुगंधा ऐक मारु नको मुसळ! ऐक तुझा काहीतरी गैरसमज होतोय....मी ..मी.."
" कुत्र्या आधी तू इथून चालता हो नाहीतर तुझं कंबरडच मोडते थांब! त्या शिवाय तू!..." त्याला काहीच बोलू न देता ती लालेलाल होत कडाडली
परत मुसळ खाण्यापेक्षा काशीमामा आल्यावर हिला कळेलच म्हणून स्पष्टीकरणाच्या भानगडीत न पडता तो लंगडत बाहेर आला. जेमतेम खळ्यात आला. तोवर बापू दूध टाकायला निघून गेलेले. त्यानं फोन करत सुशांतला बोलवलं.
" भाना, इतक्या सकाळमध्ये का रे!"
" तू आधी सरळ खळ्यात ये मग बाकी सांगतो तुला!"
सुशांत आल्यावर त्याचा आधार घेत तो घरी आला. त्याचा पाय तोवर सुजायला सुरुवात झालेली.
सुशांत व अंजा मावशीनं प्रश्नाची सरबत्ती केली.त्यानं
"रात्री भडगावहून आल्यावर गाडी उभी करतांना साईडस्टॅण्ड लावत उतरायला गेलो तर स्टॅण्ड लागलंच नसल्याने गाडीच पायावर आली व पाय सुजला" सांगत दोघांना शांत केलं.
" भाना काशी मामा पण होता ना सोबत? त्याला ही लागलं का?" अंजाबाईनं काळजीच्या स्वरात विचारलं.
" तो मामा आधीच उतरत बाजूला चालता झाला होता!" ज्या मामाच्या मुलीमुळं हे घडलं त्याच मामाची मावशी काळजी करतेय हे पाहत दात ओठ खात भाना कळवळला.
काशी मामा मात्र झाडलोट करून दूधाच्या बादल्या बाजी दादाकडं पोहोचवत अंघोळीसाठी घरी गेला. सुगंधा एकदम घाबरुन बसलेली.
बाबाला पाहताच तिनं आश्चर्यानं जोरात विचारलं.
" बाबा! तुम्ही केव्हा आलात?"
" रात्रीच आलो ! तुला उठवलंही पण तू झोपेत असल्यानं उठलीच नाही मग एकाच खाटेवर भाना व मी झोपलो"
सांगत ते मागे झोपलेल्या भानास उठवायला गेले.
संतापलेल्या घाबरलेल्या सुगंधाला थोडं थोडं लक्षात येत प्रकाश पडू लागला.
" सुगंधा ! भाना होता ना गं इथं झोपलेला? गेला का?"
पण सुगंधानं " हो" एवढंच उत्तर देत बाबास अंघोळीसाठी पाणी ठेवलं.
चुलीला जाळ लावतांना तिच्या काळजात पश्चात्ताप व स्वत:च्याच चीडेचा जाळ उठू लागला. तिला एका हातात पाय धरत लंगडत लंगडत जाणारा भाना दिसू लागला.
" सुगंधा ऐक, तुझा काहीतरी गैरसमज होतोय..!" हे त्याचं बोलणं आठवलं व तिच्या डोळ्यात पाणी आलं.
" अगं सुगंधा, परवापासून मंजाताई सापडत नव्हती. सर्वजण घाबरले होते. ताई तिच्या गावाला निघून गेलीय कुणाला काहीच न सांगता नी इकडे सर्वजण शोधत होते. काल तर मी व भाना पार फाॅरेस्टच्या डोंगरात, चाळीसगाव, भडगावला जाऊन आलो. रात्री परतायला दिड वाजले म्हणून त्याला इथंच झोपवलं! पण मंजाताई सापडली हे महत्वाचे"
बाबा काय बोलताय यातलं तिला निम्मं समजलं. कपाळावर आधीच आपल्यामुळं व्रण...चंद्राला डाग उठलाय नी आता पुन्हा त्याची चूक नसतांना पायावर मुसळ.....तिला स्वत:चा प्रचंड राग आला. त्याच संतापात उकळतं पाणी बादलीत टाकत " बाबा, कालपासून आलात तर निदान एका शब्दानं तरी घरी कळवून जायचं ना! घरी मी एकटी असल्याची ही काळजी वाटत नाही का तुम्हाला!" ती संतापली.
अंगातले कपडे काढत अंघोळीला बसत " पोरी, प्रसंग इतका बाका होता की फाॅरेस्टमध्ये प्रेत पडलंय व मंजाताई गायब हे ऐकताच सरळ निघून गेलो.
सुगंधानं हे ऐकलं व रांजणातून थंड पाणी बादलीत इसारत बाबासाठी चहा ठेवायला चुलीजवळ आली.
चहाचं आंधण उकळतंय तोवर ती उखळजवळ येत मुसळ घरात नेली. मुसळ जड लागताच ती मनात चरकली. संतापात सारी शक्ती एकवटून फेकलेली मुसळ किती जोरात लागली असेल याची कल्पना करत ती कळवळली. त्याची काहीच चूक नसतांना आपण असं वागायला नको होतं! पण बाबा नसतांना तो मागच्या अंगणात येऊन झोपूच कसा शकतो? यानंच आपला ताबा सुटला. त्यात बाबा समजून आपण लाडानं त्यावर झोपलो. पुन्हा ती मनात संतापली. आपण केलं तेच योग्य. लागली तर लागली मुसळ त्याचा आपण का विचार करावा! आपल्या जागी कुणीही असती तरी तशीच वागली असती! पण लगेच त्याची चूक नव्हतीच आपण खरच गैरसमज केला. निदान का झोपलाय हे विचारलं असतं तर खरं कारण कळलं असतं.
" सुगंधा चहा उतू जातोय लक्ष कुठं आहे तुझं?" अघोळ करुन घरात आलेल्या बाबानं आरोळी मारली.
सुगंधा विचारचक्रातून बाहेर आली व चहा गाळत बाबांना दिला.
बापू दुसऱ्याकडं दूध सोपवत लगोलग परतले.
त्यांनी गावातली ट्रॅक्स भाड्यानं केली. गंगामावशीनं काल गणाजीनं केलेल्या फोनवर जे त्यांना सांगितलं होतं त्यानं ते ही घाबरले होते. मंजा थेट खुर्दाण्याला जात सदा ज्या ठिकाणी खांबास चिकटून मेला होता तिथंच बसलीय. त्यांना कळल्यावर ते सारे तिला घ्यायला गेले होते तर ती त्यांच्यावर थेट दगडांचा मारा करत होती. फक्त गंगामावशीला तिनं काहीच केलं नसलं तरी मावशीचंही तिनं ऐकलं नाही व पावसात ती तिथंच बसलीय!
म्हणून गंगामावशीनं त्यांना लगेच बोलवलं होतं. बंकट बापूनं काशीला, अंजाबाईला भानालाही घेतलं. मालू घरी नसल्यानं सुगंधालाही घेतलं. सर्वजण अकरालाच ट्रॅक्सनं खुर्दाण्याकडं निघाले.
मधल्या सीटवर अंजाबाई, सुगंधा बसली. बापू व काशीमामा मागं बसले. भाना ड्रायव्हर जवळ पुढे बसला. अचानक ठरवत गोंडगावला फोन करत मालूबाईस पारोळ्याला बोलवून घेतलं व मालूबाईस ही नेलं. फोनवरून मंजास वेडेपणाचा मोठा झटका आल्यानं दगडफेक करतेय हे कळाल्यावर दोन तीन बाया माणसं हवीत म्हणून बापूनं मालूबाईसही सोबत घेतलं.
गाडीत अंजाबाईनं अचानक काशीला विचारलंच.
" काशी काल तू सोबत होता मग गाडी कशी पडली रे! बघ भानाचा पाय टम्म सुजला! तुला पण लागलं का?"
गाडीत भाना काशीमामा येण्या आधीच बसून गेल्यानं काशीमामाला भानाचा पाय सुजला हे माहीतच नव्हतं.
" ताई, गाडी पडली? कुठं? नाही. गाडी तर कुठंच पडली नाही"
" अरे मग त्याचा पाय कसा सुजला बघ!"
भानुच्या अगदी पाठीमागं अंजाताईजवळ बसलेली सुगंधा एकदम घाबरली. आता काय होईल या कल्पनेनेच तिनं खाली मान घातली.
" भाना! केव्हा पडली गाडी? नी कुठं लागलं तुला?
" जाऊ दे मामा थोडं जरी लागलं तरी मावशी आपली उगाच मोठं करून सांगते!'
मालुमामीनं पुढं झुकत भानूचा पाय पाहिला नी किंचाळलीच
" अगं बाई बाई...किती पाय तराठला नी तुम्ही थोडंच लागलं म्हणताय!"
सुगंधानं हळूच मान वर करत झुकत पाहिलं नी तिच्या छातीत धस्स झालं.
" अरे भानू पण गाडी कुठं पडली होती रे?" काशीमामा अधिरतेनं विचारू लागले.
आता आपली लबाडी उघडी पडेल म्हणून भानू आरशातून मागे पाहू लागला. घाऱ्या नजरेत कमालीची अस्वस्थता दिसली त्याला. त्यात आता सकाळचा राग, संताप अजिबात नव्हता.
" मामा, रात्री तुमच्या मागच्या दारी तु उतरला व घरात निघाला त्याचवेळी साईड स्टॅण्ड न लागल्यानं उतरतांना गाडीच अंगावर आली. तू पाठमोरा असल्यानं अंधारात तुझ्या लक्षात येण्या आधीच मी उचलली गाडी. तेव्हाच लागलं. पण मी तुला सांगितलंच नाही.एवढा पाय सुजेल असं वाटलंही नव्हतं!"
भानू उत्तरला पण घारी नजर आरशातून त्याच्या नजरेत खोल खोल उतरतांना दिसली. त्याच वेळी सीटवर ठेवलेल्या हाताच्या काही बोटाचा दाब आपल्या खांद्याच्याखाली पाठीवर पडत वाढतोय हे भानुला जाणवू लागताच खोल उतरलेल्या नजरेला नजर भिडवत त्यानं पुढं सरकत पाठ चोरली. त्याच वेळी घाऱ्या नजरेत टचकन थेंब तरारल्याचं त्याला आरशात दिसलं.
" अरे भानू मग एका शब्दानं तरी सांगायचं ना वेड्या!" काशीमामा काळजीनं भाबडेपणानं म्हणत विश्वास ठेवता झाला.
" भान्या कोणतंही काम सबुरीनं व शिस्तीनं करावं माणसानं! उथळपणा करू नये! गजा तात्याकडं थांबायला लावलं तर थांबावं ना! का घाई केली पाणीपावसाचं अपरात्रीला यायची! बरं झालं थोडक्यात निभावलं!" बंकट बापू सल्ला देत समजावू लागले.
सुगंधाची छातीतली धडकी कमी झाली. बरं झालं आपलं मुसळ चर्चेत आलं नाही. नाहीतर आई व बाबांनी आपल्याला इथंच झापलं असतं. ती हात मागे उचलत विचारात गुंतली. बाबा समजून यावर झोपतांना याच्या मनात काही काळंबेरं असतं तर यानं आपल्याला धरलं असतं हे आपल्या लक्षात यायला हवं होतं. आपण झोपताच याची गुंगी उघडली असावी.केवढं दचकून उठत यानं आपणास जोरात ढकलंल होतं! तरी आपल्या लक्षात ते आलंच नाही व संतापानं आपल्या विवेकाचा ताबा घेत आपणास मुसळ दिसलं. पण त्यातल्या त्यात बरं झालं की मुसळ डोक्यात बसलं नाही. चहा ठेवतांना आपण ते मुसळ उचलून पाहिलं तर किती जड वाटत होतं पण सकाळी तेच मुसळ आपण किती जोरात भिरकावलं! इतकी शक्ती आपणात कशी आली? स्त्रीला स्वसंरक्षणावेळी आपसुक ती येत असावी का? तर कधी कधी अलवार प्रेमात सारीच शक्ती विरत असावी.
चारच्या सुमारात खुर्दाण्यात गाडी घुसली गणाजी व सुभाणला घेत गाडी मंजा थांबली होती तिकडं नेली.
ती जागा जवळ येऊ लागली तशी एक कराल भयाणता व आक्रोश भानाच्या काळजात धुमसू लागला. त्यांच्या छातीत कळा उठल्यागत झालं. चार साडेचार वर्षांपूर्वी आपल्याला रात्रीच्या अंधारात इकडे असंच आणण्यात आलं होतं. बॅटरीचे झ्योत पावसात पुन्हा पुन्हा लिंबाच्या पाल्याच्या ढिगावर पडत होते. येणारा आला की आधीचे थांबलेले बॅटरीचा झ्योत टाकत त्याला दाखवत. रडून रडून टाहो फोडणाऱ्या आपणास मात्र विनंती करुनही जवळ जाऊ देत नव्हते.
" सोडा!, सोडा! मला माझ्या बाबास पाहायचं! म्हणत घट्ट पकडणाऱ्या हाताचा चावा घेत आपण सुटलो. पण तोच इतर हातही सरसावले
" भाना, ऐक बेटा! बाबांना तू पाहू शकणार नाही. ऐक ना!"
" मला पाहायचंय बाबांना! सोडा मला!" नुसता आकांत...
उशीरानं आलेल्या पोलीसांनी सवडीनं आपला आकांत व टाहो ऐकला व खाकी पाझरली.
" सोडा हो पोराला! पाहू द्या शेवटचं पोराला! "
पोलीस अधिकाऱ्यानं आपणास डोळ्यातले आसवं पुसत लिंबाच्या पाल्याजवळ नेलं. प्रेत गाडीत नेण्यासाठी पाला उचलला जात होता जसजसा पाला बाजुला होत होता तसतसा बॅटरीच्या उजेडात शिजून काळा पडलेला व काही कातडी सोललेला चमकणारा देह ओळखू येईना.
" नाही... नाही...माझा बाबा नाही हा...हे भलंतच काही तरी आहे..."
ड्रायव्हरने चमकून पाहिलं.
"काय झालं भाना?" घशातून शब्द बाहेर न पडल्यानं आपल्या विचीत्र होऊ पाहणाऱ्या चेहऱ्याकडं पाहत ड्रायव्हर विचारतोय हे पाहताच भाना तंद्रीतून शुद्धीवर आला. गाडीतले बाकी मंजाताई कुठं बसलीय हे पाहण्यात गुंग होते.
" काही नाही!" म्हणत भानानं स्वत:ला सावरलं.
गाडी उभी राहताच मंजानं आधीच गोळा करून ठेवलेल्या ढिगातून दगड भिरकावण्यास सुरुवात केली. एकालाही जवळ येऊ देईना. गणाजी व सुभाणला पाहताच तर दगड जोरानं येऊ लागले. अंजाबाई व बापू साऱ्यांना मागं उभं करत पुढे जाऊ लागले.
" मंजा ऐक ना! आम्हालाही ओळखत नाही का तू?" अंजा बोलली तोच सर्र.... दगड आला. अंजाबाई थोडक्यात बचावली. कुणालाच पुढं जाता येईना.
भानूला पुढं जायला लावलं.
भानूला पाहताच दगड खाली फेकले पण मंजा पुढं पुढं पळायला लागली. भानू "आईss...आईss..!" ओरडत एका पायावर लंगडत पाठलाग करू लागला. पण तोवर मंजा जवळच्या विहीरीपर्यंत पोहोचली. भानू पुढं येऊ लागला की मंजा विहीरीच्या काठावर सरके!
बापूनं भानास मागे फिरवलं! न जाणो विहीरीत अंग टाकलं तर! असा विचार करत रडणाऱ्या भानास मागे फिरवलं!
गणाजीनं गाडी नेत घरून गंगाबाईला परत आणलं. गंगाबाई व भाना दोघांना पाठवू असा विचार करत आणलेल्या गंगाआजीसोबत भानाला पाठवलं. पण तरी मंजा ऐकेचना असंबंध बडबडत विहीरीच्या काठावर पाय टाकून मध्ये उडी मारण्याच्या पावित्र्यात बसली.
सर्वांनी ओळखलं आता काही उपयोग नाही. उलट जास्त चिडेल म्हणून आजीनं सोबत आणलेला डबा तिला दिसेल असा ठेवत गाडीजवळ आले.
आता घरी परतू.एकदोन जणांना इथेच लपायला लावू. रात्री झोपली की येऊ व झोपलेल्या अवस्थेतच पकडत बांधून सरळ दवाखान्यात भर्ती करुयात .उमर्ठीला नेऊन ही उपयोग नाही. असा विचार करत सर्व जण परतले. गणाजीनं मुलांना पाठवलं.
"मंजा वर पाळत ठेवा. झोपली की सांगायला या!" बजावलं. गणाजीकडं साऱ्यांनी जेवण केलं.
भानाला जेवण गेलंच नाही. बापूस गणाजीच्या घरी सदाचा फोटो टांगलेला दिसला. बापूनं उजेडात तारीख पाहीली नऊ सप्टेंबर. त्यांनी आजची तारीख आठवली. त्यांनी मनातच आडाखा बांधला. चार वर्षांपूर्वी सदा नऊ तारखेला गेला तेव्हा ही असाच परतीचा पाऊस होता. आताही तीन चार दिवसांपासून तसाच पाऊस. तारीख व पाऊस यानंच मंजा बिथरली असावी. मागच्या तीन वर्षात असा परतीचा पाऊस एवढा नव्हता. पण या वर्षी तसाच पाऊस व तारीख तीच म्हणून ती मळ्यात सदाच्या आठवणीत खांबाजवळ बसली असावी. पण नेमकं बाजीनं तिला त्याचवेळी
" सदा बोंबलासारखा भाजून गेला! तुलाही जायचं का?" म्हणून डिवचल्यानंच तिचं संतुलन अधिकच बिघडलं असावं. त्याच स्थितीत ती इथं आली असावी. पण तरी ती अशा स्थितीत नेमकी कशी आली हे विशेष. याचा अर्थ तारीख लक्षात ठेवणं, इथं बरोबर येणं ती नक्कीच सुधरू शकते हेच दर्शवतं.
रात्री जेवण झाल्यावर सारे गणाजीच्या मुलाच्या निरोपाची वाट पाहत बसले. भाना ओट्यावर खाटेत बसला. पाय सणकून ठणकत होता.तीन दिवसाची दगदग त्यात पायाचा कन्हारा यानं त्याला ताप भरला. अंजाबाईनं घरात विषय काढताच गणाजीच्या सखूबाईनं पायास लावण्यासाठी मलम दिला.
अंजाबाई लावायला उठल्या तेवढ्यात " सुगंधा तू देऊन ये गं ! ताईला बसू दे!" मालूबाईनं सुगंधाला सांगितलं.
सुगंधा मलम घेत ओट्यावर आली.बंका बापू, बाबा, गणाजीरावासोबत समोरच्या राम मंदीरातल्या चौकात बसले होते.
" पाय दाखव मलम लावायचाय!" गोड स्वरांच्या तारा झंकारल्या.
" आण इकडं मी लावून घेईन स्वत: !"
अंगात उठणारं कापरं व छातीतली धडकी दाबत पाय मागे घेत भाना बोलला.
" अंजा आत्यानं मलाच लावायला सांगितलंय!"
सुगंधा हळू आवाजात मलमा इतकाच कोमल स्वरात म्हणाली.
"......."
सुगंधानं मौन हाच होकार धरत भानाचा पाय पुढे करत मलम लावायला सुरुवात केली.
मलम व हात दोघांची कोमलता फिरू लागताच भानाला वेगळीच थरथर जाणवू लागली.
राम मंदीरात भजन असावं त्याची तयारी सुरू होत टाळ व पखवाजचे सुरुवातीचे चुकार स्वर घुमले.
" माफ कर सकाळी मी चुकले!"
भानाला सुगंधाच्या जड झालेल्या स्वराचा जोरदार झटका बसला.
घरातील गर्दी व चौकातही गर्दी पाहून व आईनं फक्त मलम द्यायला पाठवलं होतं म्हणून सुगंधा घारी नजर टाकत घरात निघून गेली.
भानास शुद्धीत येण्याचं भानच राहिलं नाही. भजनाचे स्वर त्याच्या कानावर येऊ लागले. भजनामुळे की सुगंधाच्या जड कातर स्वरातल्या
" माफ कर सकाळी चुकले मी" शब्दांनी म्हणा तो लहानपणाच्या आठवणीच्या खोल डोहात क्षणात उतरता झाला.
.
.
बाबा वायरमन म्हणून लागण्यापूर्वी वायरमन लोकांजवळच फुटकळ कामे करी. पण त्यात दररोज पैसे मिळत नसत . कधी कधी आठ आठ दिवस कमाईच व्हायची नाही. सुरुवातीस बंकट बापूला बाजी मामा ही शेतीला पाणी देईना .पाटाचं पाण्याचं आवर्तन ही सुटेना. म्हणून म्हणावं तसं उत्पन्न बापूलाच होईना तर बापू सदाबाबास कोठून देणार. नंतर उत्पन्न येऊ लागलं नी बापूंची सतत मदत आली तो भाग वेगळा. सदा बाबास कमाई होईना त्यात बाबा भजन किर्तनाला बाहेर गावी ही जात. मग आई कातावे. घरात उपवास घडत. अशावेळी बाबा स्वत: उपाशी राहत पण आई , आजी व माझ्यासाठी काही तरी आणत. नाहीच काही मिळालं किंवा रागावलेल्या आईस शांत करण्यासाठी बाबा हार्मोनियम काढत व आईंची आवडती गवळण म्हणत. ती गवळण बाबा इतक्या काळजातून गात की आईचा राग क्षणात उडे व आई पाझरे. आईचे डोळे वाहायला लागत.
उपाशी पोटी रागावलेल्या राधेला विनवण्यासाठी, समजूत काढण्यासाठी कृष्णच गवळण गाई. उलटी रीत सारी!.
.
.
भानाला आठवलं व त्याच्या मनात काही तरी चमकलं. त्याचं भान परतलं. तो तसाच उठला व मंदीरात आला. मंदीरातल्या हार्मोनियम वाजवणाऱ्याला हात जोडत उठवलं व त्यानं स्वर घेतला. साऊंड सिस्टमचा आवाज मुद्दाम फुल करायला लावला. पखवाजवाल्यानं व टाळकऱ्यांनी पेटीचा स्वर पकडला.
भानाचा आवाज घुमला. गणाजीच्या मुलाचा निरोप आला की मंजास घ्यायला जाऊ यासाठी बसलेले बापू, मामा, काका ही आवाजानं आत आले.
भाना बेधुंद होत गाऊ लागला.
" मुरली वाजवितो कान्हा,
कशी जाऊ कशी जाऊ कशी जाऊ मी वृंदावना!
पैलतिरी हरी वाजवी मुरली
नदी भरली भरली जमुना
कासे पितांबर कस्तुरी तिलक
कुंडल शोभे काना
कशी जाऊ मी वृंदावना!!
काय करू बाई कुणाला सांगू
हरीनामाची सांगड आणा
नंदाच्या हरीने कौतुक केले
जाणे अंतरीच्या खुणा
कशी जाऊ मी वृंदावना!!"
भाना बेफान होत गात होता.
जमलेले लोक व भजनी मंडळ त्याला पुन्हा पुन्हा म्हणावयास लावत होते. भानाला ही तेच हवं होतं. तब्बल तीन वेळा त्यानं तीच गवळण जोशात गाईली. पण गातांना त्याचं लक्ष दाराकडंच होतं.
नंतर त्यानं हार्मोनियम दुसऱ्याकडे दिली व पखवाज घेत दुसरी गवळण म्हणायला सुरुवात केलीच तोवर गणाजी काकाचा 'सुना' धावतच आला.
" काकू पळतच गावाकडं येत आह?
भाग::-- सहावा
मंजाबाईस जळगावला मानसोपचार तज्ञानकडं दाखवलं. तेथून जनरल फिजीशियन कडं अॅडमीट करत रघू दवाखान्यात थांबू लागला. बंकट बापू व भाना उमर्ठीला परतले. पायाला डाॅक्टराने दिलेला बेल्ट लावत भाना लंगडत लंगडत काॅलेजला गेला. भिंतीकडंच्या रांगेत भाना बसला. शाळेच्या गेटमधून सुंगधा आवारात येतांना दिसताच भानानं सुशांतला सुंगधा बसत असलेल्या बेंच जवळची खिडकीला लावलेली बेंचची मोडकी फळी उचलावयास सांगितलं.
सुशांतलाही सुगंधा येतांना दिसत होती म्हणून भानानं सांगताच तो चक्रावला.
" भाना , तुझ्या पायावर गाडी नाही पडली. खरं सांग पायाला काय लागलं?"
" सुशा, आधी त्या खिडकीस लावलेली फळी उचलून आण मग सांगतो!"
" नाही .आधी सांग पायाला काय लागलं!"
" सुशांत ती आली बघ त्या आधी फळी उचलून आण इकडे!"
" भाना, खरं सांग पायाला लागलं यात जोशी मॅडम....!"
" सुशा आधी फळी आणतो का मार खातो! सांगितलं ना सांगतो सर्व ,पळ!"
सुशात मुलींच्या रांगेकडं जात खिडकीची फळी उचलत पलटू लागला तोच सुगंधा दरवाज्यातून बेंचकडे येऊ लागली.
तिनं सुशांतला फळी उचलतांना पाहिलं. तोवर तो फळ्याजवळ पोहोचला.
" सनेर, ती फळी आण इकडं, कुठं घेऊन चाललास! वाऱ्यानं ही खिडकी हालते म्हणून लावलीय इथं."
सुशांत फळ्याजवळ वर्गासमोर तोंड येईल असा पालटत पाहू लागला. वर्गात चार पाच मुली व आठ दहा मुलं होते.
" सुशा, ती फळी इकडं आण!" भाना सुशांतला दटावत म्हणाला.
सुगंधानं ऐकलं व ती समजली.
" सनेर ऐक, ती फळी इकडं आण!"
" सुशा, लेका हवंतर ती फळी बाहेर लपव पण तिथं नको ठेवू बाबा, जोशी मॅडमांचा नेम नाही!" भाना सुशांतकडं पाहत बोलला.
सुगंधाला जोरात हसू आलं. ती बेंचवर बसत खाली तोंड करत हसू दाबू लागली. सुशांत समजला काही तरी घडलंय नक्की. त्यानं खिडकीतून ती फळी मागच्या बाजूस फेकली.
" उगाच भांडू नका! इकडं नाही नी तिकडं नाही!"
तो जागेवर भानाजवळ बसला तेवढ्यात आपटे सर आले व वर्गात शांतता पसरली. आज इंग्रजीचे सर रजेवर असल्यानं इतिहासाचे आपटे सर आले होते.
" भान्या माकडा, तू केव्हापासून जोशी मॅडमांना घाबरायला लागला रे! खरं सांग तू ती फळी मारुन फेकेल या भितीनं उचलायला लावत होता ना? मुकाट्यानं पायाला काय लागलं व त्यात जोशी मॅडमांचा काय संबंध ते सांग?"
" सुशा, आपटे सर इकडंच पाहत आहे गप्प बैस! नाही तर जोशी मॅडमांनाच विचार"
" असं आहे का, थांब विचारतोच!"
" सनेर, देसले! काय खुसपूस चाललीय रे दोघात?" आपटे सरांना व्यत्यय येत होता म्हणून ते दरडावत विचारू लागले.
" काही नाही सर हा सनेर मस्तानी नेमकी कोण होती असं विचारतोय!" भानानं सुशांतकडं बोट दाखवत ठोकून दिलं.
" छान शंका! कोण सांगतंय याबाबत?" इतिहासाच्या आपटे सरांनी विचारलं व स्वत:च मग पूर्ण तास संपेपर्यंत बाजीरावाची दिल्ली धडक ऐवजी राहू व मस्तानी , मस्तानी कोण होती याबाबतचे प्रवाद स्पष्ट करत राहिले.
मधल्या सुट्टीत भानाला सुशांतच्या सवालांनी बेजार केलं. पण भाना गाडीच अंगावर पडल्यानं पाय दाबला गेला असंच ठासून सांगत राहिला व बाहेर पडला. मधल्या सुटीनंतर फळ्यावर बाला शंखपाळनं आपल्या हस्ताक्षरात सुशांतनं सांगितल्याप्रमाणं
' Breaking news
जोशी सरांना कंटाळून आज जोशी मॅडम अखेर वर्गात हसल्याच'
लिहून ठेवलं. सुटीनंतर जो तो फळा वाचत हसू लागला. भाना उठला व त्यानं डस्टर घेत फळा पुसला. तरी सुगंधा मात्र गालातल्या गालात हसत होती.
मंजाबाई बऱ्या होऊन घरी आल्या.आता त्या सगळ्यांना ओळखू लागल्या ,बोलू लागल्या. हळूहळू घरातली किरकोळ कामं करू लागल्या. अंजाबाईचा बराच भार हलका झाला. त्याही पेक्षा बहीण सुधारली हा खूप मोठा आनंद होता.
दुसऱ्या सत्रात भाना झपाटून अभ्यासाला लागला. बारावीच्या परीक्षा भडगावला होत्या. काही मुलं परीक्षेपुरतं तिथंच खोली घेत राहू लागले. सुगंधानं येजा करुन कमी खर्चात काम होईल म्हणून मुलींसोबत खोली केली नाही.
भाना दुधाच्या गाडीवरच ये जा करणार होता. बंकट बापू पहाटे लवकर उठत आठ पर्यंत दूध पोहोचवून गाडी परत आणू लागले. पहिल्या पेपरनंतर बंकट बापूच काशीमामास बोलला.
" काशी, सुगंधाला भानासोबतच गाडीवर पाठव, तेवढंच गाडीचं भाडं वाचेल तिचं व लवकर घरी पण येत जाईल ती!" काशीमामाला पोरीचा जाण्यायेण्याचा ताण कमी झाला म्हणून आनंद झाला. दुसऱ्या पेपरला बाबानं सांगताच सुगंधा नऊ वाजताच अंजा आत्याकडं आली. भानासोबतच ती भडगावला पेपरला जाऊ येऊ लागली. जातांना शक्य तेवढं अंतर ठेवत एक शब्द ही न बोलता ती शांत बसत जाई. येतांना फक्त
" कसा गेला पेपर?" जेमतेम एवढंच विचारी.भानाही
" चांगला गेला! तुझा?" विचारी. प्रत्येक पेपराच्या आधी भडगावला राहणाऱ्या पोरी तिला भडगावला किती मजा येतेय ,कुठं कुठं फिरतोय, काय काय खातोय, पितोय ते सांगत. ती फक्त
" अरे व्वा!" आश्चर्योद्गार काढी. खरं तर इथं खोली केल्यावर बराच वेळ यात जाणार व अभ्यासात व्यत्यय येणार हे तिला माहित होतं म्हणूनच तिनं येजा करण्याचा निर्णय घेतला होता व त्यात बापूंनी भानासोबत गाडीची सोय केली म्हणून तिचा घरी निवांत अभ्यास होई.
शेवटच्या पेपरला जातांना काहीच न बोलणाऱ्या सुगंधानं मात्र पेपराचा ताण कमी झाल्यानं मनात ठरवलंच.
" भाना, बारावीनंतर काय करणार आहे?"
भानाला एकदम धक्का बसला.
निवेदन करतांना भारदस्त बोलणाऱ्या सुगंधाला त्यानं असं बोलतांना पाहिलंच नव्हतं. यापूर्वी दोन वेळा तर थेट हल्लाच केला होता व खुर्दाण्यात मात्र पश्चात्ताप दर्शवत माफी एवढंच.
" बारावी नंतर सगळे करतात तेच आपलं आपलं तेरावी!" उगाच काही बोललं जावं व हिनं पुन्हा हल्ला करावा म्हणून तो घाबरतच बोलून गेला.
" मूर्ख माकडाला विचारलं तर शहाणपणा करतोय! जाऊ दे. आज वाटलं होतं पेपर देऊन मस्त बाजारात जाऊ! काही तरी नाश्ता वा थंड पिऊ. पण माकड शहाणपण करतंय!" ती मनातल्या मनात म्हणत संतापली.
सुगंधा शांत बसली म्हणून तो ही गप्प झाला. खरं तर दुसऱ्या पेपरला बापूंनी सांगितलं तेव्हा कुठं ही आफत बापू आपल्यावर लादत आहेत ! असं माहित असतं तर मुलांसोबतच खोलीवर राहिलो असतो , असाच विचार त्याचा मनात आला होता. पण आज ही चक्क बोलतेय म्हटल्यावर तो आरशात पाहत शब्दांची जुळवाजुळव करू लागला.
" तू काय करणार आहे बारावीनंतर?"
त्यानं धडधड छातीनं विचारलं व उत्तरासाठी आरशात पाहू लागला.
" मी का! मी थेट एम.ए.लाच अॅडमिशन घेणार आहे बारावीनंतर!" ती त्याच्यावरचा राग दाखवत म्हणाली.
" अरे वा! छान निर्णय घेतला!" धडधडत्या छातीनं लाल गालावरच्या खळीकडं पाहत तो अनाहूतपणे बोलून गेला.त्यानं तर ती अधिकच संतापली.
भानाला आपण 'ती काय म्हणतेय हे न ऐकताच काय बोलून गेलो!' हे लक्षात येताच आपल्या निर्बुद्ध पणावर मनात हसू आलं.
" सरळ सांग ना बी. ए. करायचंय असं! मला ही बी. ए.च करायचंय! तसं दादा बी.एस्सी सांगतोय पण मावशी सपशेल नाही म्हणतेय.मावशी बी. ए.चं करायचं म्हणतेय" भानाला आपण काय बोलतोय तेच कळेना.
" तेच, बाबा पण मला लाॅ करायला सांगत आहेत पण मी साफ नाही म्हटलं!"
काशी मामाच्या चार पिढ्यात कुणी 'लाॅ' हा शब्ददेखील उच्चारला नसेल पण आपण अंजामावशीचं बोललो म्हणून ही संतापतेय हे त्यानं ओळखलं व पुन्हा आपला बोलतांना ताबा सुटतोय हे त्यानं ओळखलं व गाडी उभी केली.
" मला घाम येतोय! पाण्याची बाटली दे!" त्यानं सरळ शरणागती पत्करली.
सुगंधानं पर्समधून छोटीशी बाटली काढली व त्याला दिली. त्याच वेळी बाटलीतलं पाणी सांडत पर्स ओली दिसल्यानं दुसऱ्या कप्प्यातलं हाॅल तिकीट ओलं झालं की काय म्हणून बाहेर काढू लागली व पाहू लागली. त्याचवेळी काही तरी तिच्या पर्समधून खाली पडलं. तिचं लक्षच नव्हतं. भानानं पाण्याचे घोट घोटतखाली पडलेला उचलला तर तो फोटो होता. तो तिला " हे काय पडलं गं!" बोलत तिच्याकडं दाखवतच होता की त्याचं फोटोवर लक्ष गेलं. तो फोटो पाहून चाट पडला. शिक्षक दिनाला काढलेला गृप फोटो होता जो न मिळाल्याने सुशांत व बाला बावचळले होते. फोटोत त्याचा हात तिच्या खांद्यावर होता.
सुगंधाचं लक्ष जाताच तिनं तो जोरात हिसकावला.
" सुगंधा, हा फोटो तुझ्याकडं कसा काय?"
" चल पटकन पेपरची वेळ झाली!" तिनं विषय टाळला. त्यानं गाडी स्टार्ट केली. केद्र येईपर्यंत ती शांतपणे विचार करत होती.
.
.
फोटो विचीत्र येईल हे तिनं ओळखलं होतं. म्हणून दुसऱ्याच दिवशी ती आईला घेत फोटोग्राफरकडं गेली. मालूबाईला पाहताच फोटोग्राफरनं सर्व फोटो तिच्या समोर ठेवले. त्यातले दोन फोटो भानाचा हात तिच्या खांद्यावर असल्याचे होते. तिनं एकमेकावर ठेवत एक काढल्याचं सांगत आईला पैसे द्यायला लावले. घरी येताच मालूबाईनं " चूलीत जाळून राख कर त्याची! या वयात असले उद्योग कसे सुचतात तुम्हा पोरांना!" संतापून खडसावलं होतं. सुगंधानं एक घरी येतांनाच दडवला होता. दुसरा आईसमोर फाडत चुलीत घातला. दडवलेला दहावीच्या पुस्तकातून अकरावीच्या पुस्तकात व नंतर बारावीच्या पुस्तकात आला होता. हल्ली पर्समध्येच दडवलेला असायचा.
भानानं शांतपणे केंद्राबाहेर गाडी उभी केली. ती उतरली व जाता जाता थांबली. आजुबाजुला ओळखीची मुलं नव्हती. पर्समधून फोटो काढला.
" ठेव हा तुझ्याकडेच! माझा भरपूर पाहून झाला!" गालाची डिम्पल रुंदावत ती हाॅलकडं निघून गेली.
भानानं मोठा खजिना मिळाल्यागत तो घेतला व पुन्हा पुन्हा पाहत हसत पेपरला निघाला.
पेपर संपला.
" भान्या, आज खोलीवर शेवटचा दिवस आहे.पेपर ही संपलाय, आज थांब रात्री! ' दुनियादारी' पिक्चरला जाऊ!" सुशांत व बाला जिन्यातून उतरत म्हणाले.
" सुशा सायंकाळी बापूस दूध टाकायला गाडी लागेल! मला नाही थांबता येणार!"
" जोशी मॅडम सोबत आहे म्हणून नाही थांबत, सरळ सांग माकडा! अरे आता कोण कुठं जाईल पुढच्या शिक्षणास काहीच पत्ता नाही! पुन्हा हे दिवस नाही येणार भान्या! " सुशांत एकदम गहिवरल्यागत म्हणाला.
भानालाही एकदम कंठ दाटल्यागत झाला. यांचा व आपला तीन वर्षाचाचा संबंध.आठवी पर्यंत एक नंबर मिळवत गेला व नंतर आपण याला दुसऱ्या क्रमांकावर ढकललं. सुगंधा आल्यावर तिसऱ्या क्रमांकावर गेला. हुशार असुनही यानं कधीच आपल्याशी खुन्नस केली नाही. उलट आपल्याला लागूनच राहिला.
" सुशा बस कर! घरी जाऊन सायंकाळी दूध घेऊन मीच येतो हवंतर ! मग रात्री मुक्काम करत नऊ ते बारा पाहू! पण आता टोमणे नको मारू! आणि हा घ्या पण कुणालाच दाखवू नका!"
फोटो पाहताच त्यांनाही जोराचा धक्का बसला व त्यांनी त्याची काॅलर धरत मारायला सुरुवात केली.
" म्हणजे माकडा, तुच हा फोटो लंपास केला होता व आता दाखवतोय!"
त्यानंही त्यांचा ग्रह तसाच राहू दिला
त्यांना सोडत भाना गाडीकडे आला. बारावी नंतर खरच सर्वांना फाटे फुटतील. कोण भडगाव, कोण जळगाव, कोण नाशीक तर कोण शिक्षण सोडत उमर्ठीतच राबतील. सुगंधाचं ही खरं नाही ! कोणी सांगावं पुन्हा शिक्षणासाठी एकत्र येतो की नाही? व पुढे ही? त्याला आता पेपर एकदम चांगले जाऊन ही एकदम भकास वाटू लागलं. तोच सुगंधा गाडीजवळ येत उभी राहिली.
त्यानं गाडी काढली.
" सुगंधा गजानन तात्याच्या हाॅटेलात जायचंय! थोडं थांबशील का?"
" जाऊन ये! तोवर थांबते मी इथं!"
तिला वाटलं काही काम असेल म्हणून ती बोलली.
भानाच्या तोंडाला कोरड पडली.आता हिला कसं सांगावं. तो थरथरला.छातीत धडधड वाढली.
" नाही तू ही चल सोबत! तिकडंच निघायचंही!"
सुगंधाला त्याची थरथर व बोलण्यातील अडखळणं जाणवलं.
" चल मग तिकडं काही तरी थंडही घेऊ!" सुगंधा बोलली नी याचा चेहरा आभाळ खुलल्यागत झाला. आता त्यानं गजानन तात्याच्या हाॅटेलात जाणं टाळलं व दुसऱ्याच अनोळखी कोल्ड ड्रिंक्सच्या दुकानात नेलं. दुकानापासुन मुद्दाम अंतरावर गाडी उभी करत तो पायऱ्या चढू लागला. कोणी पाहणार तर नाही म्हणून घाईत मध्ये घुसला. सुगंधालाही धडधड जाणवली.
" काय मागवू? चहा, काॅफी, लस्सी?"
" उन्हाळ्याचा चहाच बरा! " कोल्डड्रिंक्सच्या दुकानात चहा काॅफी नाही हे नजर मारत ती हसत म्हणाली.
तो पुन्हा ओशाळला.
" पंजाबी दोन!" भानानं वेटरला खुणावलं.
" साधी या स्पेशल?" वेटरनं गिऱ्हाईक ओळखलं.
" स्पेशल दोन!"
" हाफ या फुल?"
" फुल!"
वेटर हसला व त्यानं जोरात बांग देत "तीन नंबर कोनेमे दोन फुल स्पेशल पंजाबीsssssss!"
दोघांनी लस्सीला सुरुवात केली. समोरा समोर इतक्या जवळ आज पहिल्यांदाच ते भेटत होते. तसं अनेक कार्यक्रमात सुत्र संचालन करतांना जवळ असतच. पण आजची गोष्टच वेगळी होती.भानानं ग्लासातला चमचा बाजूला ठेवत घटाघटा लस्सी घोटली. सुगंधास हसू आलं. तिचं आपलं चमच्यानं हळूहळू चालू होतं. तिला आज ग्लासातली लस्सी संपूच नये असं वाटत होतं. हा पहेलवान ग्लासाच्या तळाशी असलेले काजू बदामाचे तुकडे काढू की नको या पेचात पडून ती काय करतेय तसंच आपण करू म्हणून तिची लस्सी संपण्याची वाट पाहू लागला.
" मुकाट्यानं ग्लास तोंडाला लावून वर करत हालव तुकडे येतील बरोबर तोंडात! माझी वाट नको पाहू! मी चमच्यानं काढीन!" ती हसतच म्हणाली.
" तुझी वाट कोण पाहतंय!"
" मग काय पाहतोय?"
" माझ्या ग्लासातल्या काचेत माझ्या कपाळावरची बादलीची खूण दिसतेय तसे तुझ्या ग्लासातल्या काचेत घारी नजर व गालावरचे डिम्पल दिसतात का ते पाहतोय!"
" माकड कुणीकडचा!" मी समजते तेवढा मूर्ख नाही!"
" उगाच इतरांपेक्षा एक दोन टक्क्याची शेंडी फोडतो का?"
" बारावीत पाहतेच कसे जास्त मिळवतो ते! "
तो काहीच बोलला नाही. त्यानं बील दिलं.
तो बाहेर येणार तोच गजानन तात्या पायऱ्या वर चढतांना दिसले.
" भाना! घरचं हाॅटेल सोडून इकडं का आलास रे!"
" तसं नाही तात्या! तिकडंच येत होतो पण पेपर सुटला व मित्रांनी आग्रह केला मग थांबलो इथं!"
" असं का! मित्रांना घेऊन ये घरच्या हाॅटेलात!" भानाच्या मित्राकडं पाहत तात्या बोलले.
भाना चपापला.
" तात्या मित्र लस्सी पिऊन निघून गेले! ही आपल्या काशीमामाची मुलगी सुगंधा!" सुगंधाकडं पाहणाऱ्या तात्यास भानानं समजावलं.
" बरं बरं! ठिक आहे जा बाबा!"
भानानं गाडी काढत उमर्ठी रस्त्याला लावली.
" तेरावीत रघू दादा जळगावलाच सांगतोय!"
" मी विचारलं का?" सुगंधाला इकडून जातांनाचा राग होताच व आपणास जळगाव शक्य नाही या वेदनेनं ती म्हणाली.
" तसं नाही पण तू कुठं घेणार अॅडमिशन? म्हणून विचारतोय"
" बहुतेक मामांनी मनावर घेतलं तर यावल किंवा नशिबात असेल तर जेमतेम भडगाव!" ती उदास स्वरात म्हणाली.
काशी मामाची परिस्थीती त्याला माहीत असल्यानं व आपल्या बापूंची परिस्थीतीही जेमतेमच म्हणून तो शांत झाला. तरी तिला बरं वाटावं म्हणून तो बोलला.
" तसं रघू दादा सांगतोय पण बापू अजून नाही म्हणत आहेत.
एखादवेळेस माझंही जळगाव रद्द होत भडगावलाच होईल"
आता ती शांत झाली. गाव जवळ येऊ लागलं तसं तिला अधिकच उदास वाटू लागलं.
गाव येणार तोच खुर्दाण्यात जातांना खांद्यावर दोन बोटांचा दाब वाढला होता तसाच आता खांद्यावर हाताचा दाब अलवार वाढतांना त्याला जाणवला. तो शहारला. आता मात्र त्यांनं खांदा चोरला नाही. तो आरशात पाहू लागला. घाऱ्या नजरेत त्याची काळीभोर खडी उतरली की काळ्याभोर नजरेत घारी खडी भिडली पण गालावर खळी पसरत गालावरचा लालीचा सागर वाढला.
" बघ आता आरशात दिसली बघ! जी दुकानात ग्लासाच्या काचेत दिसत नव्हती!"
" काय?" सुगंधानं हसत हळूच विचारलं.
तोच गाव आलं.
सायंकाळी तोच दूध घेऊन भडगावला गेला. रात्री सुशा, बाला व सर्वांना आधी गजानन तात्याच्या हाॅटेलात घेऊन गेला. तात्यांना खात्री पटली. त्यांनी साऱ्यांना गरमागरम दूध पाजलं. मग त्यानंच तिकीटाचे पैसे भरत 'दुनियादारी' दाखवला. व पहाटे गावास परतला.
उन्हाळ्यात भाना शेतातल्या कामात मग्न झाला. सुगंधा मामाच्या गावास हंबर्डीला गेली. यावर्षी पहिल्यांदा तिला मामाच्या गावाला जाणं जिवावर येत होतं.
सुटीत रघूचं पहिलं वर्ष संपलं व तो ही घरी आला.
तुळसाचे शंकरमामा अप्पा गितेंच्या सिनीअर काॅलेजला प्राध्यापक होते व एका राजकीय पक्षाचे जिल्हाध्यक्ष ही होते. मामी या आकाशवाणी केद्रात वृत्त (बातमी) निवेदिका होत्या. तुळसाला ही अॅकर व्हायचं असल्यानं सुटीचा सदुपयोग म्हणून मामानं तिला सुटीत (पर्सनॅलिटी डेव्हलपमेंट) व्यक्तीमत्व विकासच्या कोर्ससाठी मुंबईला पाठवलं. रघू सुटीत घरी जाणार म्हणून तिला ही उमर्ठीलाच परतायचं होतं. पण मामा मामी व घरून वडिलांचा दबाव म्हणून तिला नकार देताच आला नाही.
शेतीची कामं, आब्यांच्या कैऱ्या तोडणं, सातपुड्यातून बाजी मामानं माणसं आणून आमसुल बनवण्याचं ठरवलं होतं; त्या माणसामार्फत आमसुल करत ते विक्रीला पाठवणं, सोबत मंदिरात भजन किर्तन यातच सुट्या संपल्या.
पावसाळा लागला व निकाल जाहीर झाला.अपेक्षेप्रमाणं भानाच पहिला आला. सुगंधा दुसरी आली. तुलसाचं टक्क्यातलं अंतर या वेळेस अधिकच वधारलं.
सुटीत काशीमामा सुगंधास जळगावला पाठवण्याचं सपशेल नाही म्हणत असतांना रघूनं मालू मामी व मामास समजावत मनवलंच. 'मुलींच्या होस्टेलला प्रवेश मिळवण्याची माझी जबाबदारी ' असं पटवलं. इतर लागणारा खर्च ही आम्ही काही तरी करून अॅडजेस्ट करणार! त्याठी रघूनं बापूंनाही थोडीफार मदत करण्यास विनवलं. बापूंना जड तर जाणारच होतं, पण तिन्ही मुलं हुशार असुन एकत्र शिकली तर नक्कीच प्रगती करतील हे ते ओळखून होते .म्हणून त्यांनीही काशीमामास समजावलं.
रघूचं दुसरं वर्ष सुरू होताच त्यानं कला शाखेचे एस.एस. गिते काॅलजमध्ये दोघांचे फाॅर्म्स भरले. होस्टेलमध्ये ही अॅप्लीकेशन केलं.
तुळसा मुंबईहून परतली. शंकर मामानं कला शाखेत एस. एस. गिते काॅलेजलाच तिचं अॅडमिशन केलं.
पावसाळ्यात काॅलेज सुरू झालं. भानाचं मुलांचं व सुगंधाचं मुलीचं होस्टेल एकाच प्रिमायसेस मध्ये होतं.
काॅलेजला तर त्यांच्या सोबत तुळसाही आली फक्त रघूचं डि. एड काॅलेज मात्र बऱ्याच अंतरावर होतं.
क्रमशः