हिरवा चुडा
जळगावला अॅडमिशन होताच भोसले सर भाना व सुगंधास घेऊन शेगावला गेले. शेगावला विदर्भातील अमृतकर महाराज येणार होते. तसं त्यांचं अगोदरच बोलणं झालं होतं व महाराजांनीच भानास घेऊन येण्यास कळवलं होतं.
शेगावला भेट होताच महाराजांनी भानाची सारी विचारपूस करत बऱ्याच विषयावर त्याच्याशी बोलत त्यांनी भानाची चाचपणी केली.
" ग्रॅज्युएशन नंतर काय करायचं ठरवलं आहेस तू?"
" बाबा, सद्या तरी ग्रॅज्युएशनवरच लक्ष आहे. पण सोबतच एक चांगला निवेदक ( अॅंकर) होण्याकडं कल आहे" महाराजांना भाना नम्रपणे म्हणाला.
" ठिक आहे! अजुन तीन वर्ष आहेत तुझ्याकडं. तेवढ्यात त्या क्षेत्रात तुला काय करता येईल ते कर. पण सोबत मी जे सांगतोय ते ही सुरु ठेव. " महाराजांनी खूण करत जवळच्या माणसाला बोलावलं. त्यानं काढून ठेवलेले सारे ग्रंथ आणले.
" भाना, यात पुराणं, वेद, उपनिषदे, गीता, रामायण, महाभारत पासुन तर सर्व संत साहित्य आहे. पदवीच्या तीन वर्षात याचा सखोल अभ्यास कर. सोबत ग्रॅज्युएशन इंग्रजी विषयातच कर. लक्षात ठेव तीन वर्ष तू निवेदक म्हणून महाराष्ट्रात फिर परंतू नंतर मला महाराष्ट्रातला प्रसिद्ध किर्तनकार 'भाना महाराज' म्हणून पहायचंय तुला!" अमृतकर महाराज गंभीर होत बोलत होते.
भोसले सरांनी आठवण करुन देताच महाराजांनी जळगावच्या अप्पा गितेंना फोन लावला.
" जय हरी माऊली!" तिकडून अप्पा बोलले.
" जय हरी ! अप्पा तुमच्या गिते काॅलेजला प्रथम वर्षात दोन प्रवेश आहेत. 'भानुदास सदा देसले व सुगंधा काशीनाथ पवार' ! या दोघांना पुढील सर्व शिक्षणाची तोशीस लागणार नाही हे पहा! त्यांची होस्टेल, मेस इतर सर्व फी बाबत पहा. आमच्या प्रमाणंच तुमच्यावर ही कदमांचे उपकार आहेत हे विसरू नका!"
" महाराज, आपला शब्द प्रमाण! मी जातीनं लक्ष घालतो!" पलीकडून अप्पा गिते अदबीनं म्हणाले.
भोसले आता एकदम सुखावले. कारण महाराज सुगंधाचं मनावर घेतात की नाही याबाबत ते साशंक होते. पण बंकट रावांनी काशीच्या हलाखीच्या परिस्थिती बाबत सांगितल्यावर व सुगंधाची हुशारी पाहूनच त्यांनी महाराजाकडं भानाच्या विषयासोबतच सुगंधाचा शब्द टाकला होता. दोघांची पुढील शिक्षणाची सोय झाल्यानं भोसले सर दोघांना घेत समाधानानं परतले.
जळगावला येताच भोसले सर आपले संस्थाचालक अप्पासाहेबांना भेटले.भाना व सुगंधा बाबत महाराजांचा निरोप देत यांच्या शिक्षणाच्या सोईबाबत विनवलं.
" भोसले, असल्या किरकोळ गोष्टी साठी महाराजांना कशाला त्रास दिला. सरळ माझ्या कानावर घातलं असतं तरी काम झालं असतं!"
गिते अप्पा कदमांचा बाजी खाऊन पिऊन सुखी असल्यावर नातूसाठी मदत मागणं हे त्यांना पटलं नव्हतं म्हणून नाराजीच्या सुरात म्हणाले.
" अप्पासाहेब, तसं नव्हतं पण महाराजांनी भानास घेऊन भेटीला बोलवलं होतं.तिथे अचानक विषय निघाला व महाराजांनी आपल्या कानावर घातलं! बाकी काही नाही! आणि भाना हा राघो कदमांचा मुलीचा मुलगा आहे"
" असं आहे का! आता आलं लक्षात! राघो कदमांचा नातू म्हटल्यावर आम्ही त्याच्याकडं पाहणार नाही असं कसं होईल मग! कुठं आहे तो?"
भोसले सरांनी बाहेर उभ्या असलेल्या दोघांना आत बोलावलं.
भाना व सुगंधाला पाहताच अप्पा त्यांना निरखून पाहू लागले.
" भोसले, या जोडीस कुठं तरी पाहिलंय आधीही, पण आठवत नाही!"
" अप्पा उमर्ठीत आपल्या पक्षाच्या मेळाव्यात ...."
" बरोबर आठवलं, ह्याच जोडीनं सुत्र संचलन केलं होतं ना! अरे मग अशी गुणवान पोरं आपल्या काॅलेजात शिकू देत! त्यांची सर्व सोय होईलच. त्यांच्या कलागुणांचाही विकास करा. काॅलेजच्या उपक्रमात, पक्षाच्या सभेत, प्रचारातही यांची मदत होईल"
गिते अप्पांनी भोसलेंना संबंधितांना भेटावयास लावत त्यांची सोय केली.
गिते अप्पाचं जळगाव ,धुळे व नाशीक या तिन्ही जिल्ह्यात शैक्षणिक संस्थाचं जाळं होतं. सुरुवातीच्या हलाखीच्या काळात राघो कदमांनी त्यांना भरपूर मदत केली होती. म्हणूनच त्यांनी बाजी कदमांच्या शालकास ( शंकर शिंदे) आपल्या संस्थेत प्राध्यापक म्हणून लावलं होतं व नंतर तो पक्षाचा जिल्हाध्यक्ष ही झाला होता. आता ही शंकरराव व बाजी कदम अप्पांना भेटत आपल्या तुळसावर तालुका महिला आघाडीच्या युवा नेत्याची जबाबदारी सोपवण्याची विनंती करत होते. पण राघो कदमांच्या मुलींवर बाजीनं केलेला अन्याय त्यांना ही सलत होता.
जळगावला काॅलेजमध्ये कसल्या ना कसल्या कार्यक्रमाची सतत रेलचेल असे. भाना व सुगंधा या जोडीनं हळूहळू आपल्या गुणाची झलक दाखवायला सुरुवात केली. त्याच वेळी हायस्कुलपासून तुळसा तिथेच असल्यानं व मामाच्या मदतीनं ती ही सुत्र संचलन करी.
हिवाळा लागला नी काॅलेजमध्ये संस्थांतर्गत युवा महोत्सव सुरू झाला.
या वर्षी तिन्ही जिल्ह्यांतील संस्थेचा युवारंग जळगावलाच होणार होता. गायन, नृत्य, एकांकी, मिमीक्री, फॅन्सी ड्रेस, वादन व इतर अनेक कला प्रकार होणार होते.
अप्पांनी युवा महोत्सवासाठी जळगाव जिल्ह्यातील संस्थांच्या सर्व कर्मचाऱ्यांना बोलवत नियोजन करण्याच्या सुचना दिल्या. शंकरराव शिंदेकडंच सारी प्रमुख सुत्रे होती. त्यांनी सुत्रसंचलनाची जबाबदारी आपली भाची तुळसा व नाशीक काॅलेजमधील एका अॅंकरवर सोपवली. गित गायनाचा कार्यक्रम झाला झाला. नृत्य स्पर्धा झाल्या. पण तरी भाना व सुगंधास संधी मिळेना. भडगाव तालुक्यातल्या संस्थेतल्या कर्मचाऱ्यांनी व भोसले सरांनी गिते अप्पाच्या कानावर ही गोष्ट टाकली.
" शिंदे, काय ऐकतोय मी! पक्षमेळाव्यात सुत्रसंचलनास जी जोडी होती त्यांना संधी का देत नाही तुम्ही?"
" अप्पासाहेब, आपल्या स्थानिक काॅलेज मधून तुळसा सुत्रसंचलन सुंदर करतेय व जोडीला नाशीकचा मुलगा असल्यानं त्यांना संधी देता येत नाही!"
" ते काही माहीत नाही मला! त्या जोडीस लवकर संधी द्या!"
" आज एकांकी स्पर्धा आहे.हवंतर आज त्यांना संधी देतो!" शिंदेनं बाजू सावरली.
शंकर शिंदेनं आपल्या मित्राचा भाऊ जो वाहिनीसाठी वेगवेगळ्या सिरीअल्स व कार्यक्रमाचं निर्देशन करायचा त्यांना प्रमुख पाहुणे म्हणून आमंत्रीत केलं होतं. शंतनू शर्मा विविध लाईव्ह शो, पुरस्कार वितरण सोहळे ही निर्देशीत करायचे. ते अॅंकरींग साठी नव्या चेहऱ्याची जोडी शोधत होते. त्यासाठीच त्यांनी बिझी शेड्युल मध्ये हे आमंत्रण स्विकारलं होतं. त्यांनी तुळसा व नाशीकच्या सोहम जोशीचं अॅंकरींग पाहीलं पण जी भट्टी जमायला हवी तशी त्यांना भावलीच नाही. तुळसाची पर्सनॅलिटी व अभिनय त्यातल्या त्यात त्यांना बरा वाटला. म्हणून आणखी एक दिवस ते मुद्दाम थांबले. आजचे प्रमुख पाहुणे ते नसतांनाही.
आज एकांकी स्पर्धेत जळगाव शहराच्या संस्थेकडून 'राहु- मस्तानी' ही ऐतिहासिक एकांकी सादर होणार होती. रघू बाजीराव तर तुळसा मस्तानीच्या भुमिकेत होती.
शंकर शिंदेनं आज भाना व सुगंधास तयार रहायला लावलं. भाना व सुगंधानं सादर होणाऱ्या नाटीका, त्यांचे विषय व सादरकर्ते याबाबत माहिती घेत आधीच मनात जमवाजमव केली. शंकर शिंदेनं मात्र मुद्दाम सुरुवात तुळसा व सोहमलाच सुत्रसंचलन करायला लावलं. सुगंधाची घारी नजर काकुळतीला येत भानाकडं पाहू लागली. पाचव्या क्रमांकावर जळगावची एकांकी येणार होती. तेव्हा कुठे शंकर शिंदे सरांनी भाना व सुगंधाला स्टेजवर पाठवलं.
स्टेजवर येताच शिपाई काकाला सांगत सुगंधानं जवळ ठेवलेले स्पोडिअम मुद्दाम स्टेजवर डाव्या उजव्या कोपऱ्यात दूर अंतरावर तिरकस तोंड करत ठेवायला लावले. प्रेक्षकाकडे तोंड असतांना दोन्ही अॅंकर तिरकसपणे एकमेकांना पाऊ शकतील असं दुरावा असून नजरेत बांधल्यासारखंच. मग भाना व तिचा शेरोशायरीचा झंझावात सुरू झाला. एन्ट्रीच अशी धमाकेदार झाली की चौथी एकांकीका केव्हा संपेल व पुन्हा भाना व सुगंधाची जोडी केव्हा स्टेजवर येईल हेच प्रेक्षक वाट पाहू लागले.
रघू व तुळसाची ऐतिहासिक एकांकीका सुरू झाली .रघूनं राहू व तुळसानं मस्तानी जबरदस्त साकारली. रघूनं तर रणागणांत मदुर्मकी गाजवणारा बाजीराव, दिल्लीला धडक देणारा बाजीराव आपल्या संवादानं वेगळ्याच अंदाजात साकारला. मस्तानीसाठी वेडा होणारा राहू रघूनं प्रेक्षकाच्या ह्रदयात अप्रतिमरित्या साकारत कोरला. तुळसाच्या सौंदर्यानं व अदाकारीने मस्तानीच्या पात्रात चांद लावले. एकांकी संपताच सुगंधा व भाना स्टेजवर आले.
भानानं एकांकीच्या विषयानुरुप घाऱ्या नजरेज नजरेचा पसारा फैलवत गिताच्या ओळी छेडल्या
" मौसमे इश्क मे मचले हुए अरमान है हम,
दिल को लगता है दो जिस्म एक जान है हम!
ऐसा लगता है तो लगने मे कुछ बुराई नही,
दिल ये कहता है की आप अपनी है पराई नही!!"
साऱ्या मुलांनी एकच हुल्लडबाजी करत हाॅल डोक्यावर घेतला. तुळसानं संतापात मस्तानीचा वेश उतरवला. सारे प्रेक्षक मस्तानीत गुंग असतांना काही सेकंदात यानं प्रेक्षकांना त्या विश्वातून बाहेर काढत आपल्या विश्वास नेलं. प्रेक्षकात बसलेले भोसले सरांना महाराजांचं बोलणं आठवलं.
" हे पोर जिथं उभं राहिल तिथं सर्वांना झाकोळत आपली आभा पसरवेल!"
त्यानंतर एकांकीपेक्षा ती संपल्यावर भाना व सुगंधा केव्हा येतील याचीच प्रेक्षक वाट पाहू लागले.
शंतनू शर्मा एकदम भारावून गेला. आपला नव्या चेहऱ्याच्या जोडीचा शोध संपला याचा त्याला आनंद झाला. कार्यक्रम संपताच तो शिंदेस भेटला.
" शिंदे दोन दिवस यांना कुठं लपवून ठेवलं तुम्ही? गीतगायनाला व नृत्य स्पर्धेला ही जोडी असती तर कार्यक्रमात आणखीनच रंगत आली असती. मला अशीच जोडी हवीय! हातातलं काम संपलं की पाच सहा महिन्यांत यांना मुंबई ला पाठवा! धमाल आहे हे जोडी!"
शिंदे मात्र मनात संतापला!
" सरजी , तुळसापुढं हे कुठेच लागत नाही! हे तर असेच राखीव कलाकार आहेत!"
" शिंदे ,आमची नजर धोका देणार नाही! आम्हास असेच अॅंकर हवेत!'
" बरं पाहू आपण नंतर बोलू या विषयावर!" म्हणत शिंदेनं रजा घेतली. नंतर दोन दिवस सर्व कार्यक्रमाचं निवेदन भाना व सुगंधानंच केलं.
कार्यक्रम संपला. भाना व सुगंधा या जोडीस उत्कृष्ट अॅंकरींगचं विशेष बक्षीस मिळालं. एकांकीत रघूच्या राहू व तुळसाच्या मस्तानीनं क्रमांक पटकावला.
शंकर शिंदेनं आपल्या पारू बहिणीस व दाजीसाहेबांना बोलवून घेतलं.
" दाजीसाहेब! तुमची खानदानी दुश्मनी चुलीत घाला पण या भानास तुळसेसाठी गळाला लावाच. हा कला क्षेत्रातला सूर्य आहे! एक ना एक दिवस हा महाराष्ट्रात चमकल्याशिवाय राहणार नाही. म्हणून तुळसाला यानं सोबतीस घेतलं तर आपल्या तुळसेचंही कल्याण आहे!"
" शंकर! तुम्ही प्राध्यापक मंडळी अलग विचार करणारी पांढरपेशी माणसं! आम्ही वेगळ्या धाटणीची व मुसीची माणसं! आम्ही चमकणाऱ्या सूर्यालाच ग्रहण लावत गिळतो! तुळसा आमची लेक आहे!"
" दाजीसाहेब भ्रमात नका राहू! हा सूर्य कोणत्याच ग्रहणात जास्त वेळ झाकला जाणार नाही!"
" तुळसा! तुझा मामा काय म्हणतोय! बरं जाऊ दे, त्या रघूला राहू बनवलं ना मग आता पुढे?"
तुळसा हसली. बाजी कदमांनी शंकर शिंदे ना सबुरी घ्यायला लावत पुढे काय करायचं तेवढं सांगितलं.
भानानं महाराजांनी दिलेलं संत साहित्य व वेद पुराणे याच्या वाचनात व इंग्रजी लिटरेचर मध्ये स्वत:ला गुरफटवून घेतले. पहिलं वर्ष संपलं.
शंकर शिंदेनं भानास काॅलेजमधून बाहेर काढत दुसरीकडे अडकवण्याचं ठरवलं. त्यांनी अप्पासाहेबांची भेट घेतली.
" अप्पासाहेब, भाना देसलेसारख्यांचा आपल्या पक्ष बळकटीसाठी उपयोग करुन घ्यायला हवा आपण!"
" शिंदे, त्याचं शिक्षण तर होऊ दे! कदमांची नात महिला आघाडीची युवा अध्यक्ष घेतलीय ना! या नातूला ही घेऊच आम्ही!"
" तसं नाही अप्पासाहेब! पण नाशीकमध्ये आपल्या जावयांना पुढच्या वर्षी संधी द्यायची आहे तर पक्षबांधणीसाठी या युवकाचा वापर करावा.नवीन मतदारांना आकर्षीत करत पक्षसंघटन वाढवण्यासाठी?"
अप्पांना हा विचार पटला.
" पहा त्याच्या कला गुणांना वाव मिळत असेल व पक्ष संघटन वाढत असेल तर हरकत नाही!" अप्पांनी सरळ मनानं सांगितलं.
शिंदेनी भाना व सुगंधास अप्पांच्या जावयाकडं पाठवलं. भानास वाटलं काही कार्यक्रम असेल, म्हणून तो गेला. तेथे गेल्यावर त्यास तालुक्या तालुक्यात युवकांचे मेळावे घेतले जाणार होते त्यात पक्षाची कामं ,आगामी धोरण व हिताच्या योजना मांडत पुढचा उमेदवार अप्पाचे जावईच कसे योग्य ते युवकांना पटवायचं होतं.
भोसले सरांना हे कळताच त्यांनी महाराजांना कळवत अप्पांना समजावयाची विनंती केली. पण महाराजांनी
"भानास असल्या परिस्थितीचाही अनुभव असावा.तो त्या परीस्थितीला कसा सामोरे जातो पाहुयात!" सांगितलं.
" पण बाबा अशानं त्याचं शिक्षण?"
" भोसले, तो स्वत: एक संस्था आहे, तुमच्या काॅलेजेस त्याला नवीन काय शिकवणार,!"
भोसलेंनी माघार घेतली व भानानं नवीन काय शिकायला मिळतं म्हणून ते काम स्विकारलं.
दहावीच्या सुट्टीत भोसले सरांनी अभ्यासासाठी जी पुस्तकं दिली होती त्या अभ्यासाचा संदर्भ घेत व अप्पांच्या जावयांची मदत घेत तो कोणत्या ठिकाणी काय विषय घ्यावेत याची तयारी करू लागला. तसेच ज्या ठिकाणी जायचं तेथले स्थानीक प्रश्न व पक्षानं घेतलेले आगामी विकास कामे यांची सांगड तो घालू लागला.
सुत्र संचलन सुगंधानं करावं व त्यानं युवकांना एक तास मार्गदर्शन करत त्यांना पक्ष व उमेदवार याबाबत पटवावं असं नियोजन केलं.
भानानं कल्पकतेनं, आपल्या अभ्यासानं तर सुगंधा आपल्या निवेदनानं सभा गाजवू लागले. दोन तीन महिने त्यांनी नाशीक जिल्हा पिंजून काढला व त्यात ज्या तालुक्यात अप्पाचे जावई आगामी उमेदवार होते त्या तालुक्यात तर त्यांनी धमालच केली. जावयानं सासऱ्याकडं भानाचं भरभरून कौतुक केलं. नाशीकमध्ये भानाच्या प्रयत्नांनी पक्षाचं संघटन वाढलं. भानानं या कामी पक्षाच्या जुन्या नेत्यांचा व मार्गदर्शनाचा खुबीने वापर करून घेतला. एक सभा गाजवणारा उत्कृष्ठ वक्ता म्हणून भानानं या तीन महिन्यात नाव कमावलं. जुने नेते मंडळी चक्रावली. आपल्या स्थानीक समस्यांना युवकांपुढे आपणास मांडता आल्या नाहीत, ना आपल्या पक्षानं केलेली कामं मांडता आली, ना आगामी योजना. या अनोळखी तरुणांनं हे सर्व करुन दाखवलं.
तिकडे या वर्षाचा युवा महोत्सव पुन्हा जळगावलाच झाला. शिंदेनं तुळसाला संधी देण्यासाठीच या जोडीला काढलं होतं. पण प्रत्यक्षात भानानं अशी काही कामगिरी केली की अप्पाचे जावई त्याला एक युवा नेता या थाटानं युवा महोत्सवासाठी घेऊन आले. शिंदेला ही जबर चपराक होती. भानानं जावयामार्फत अप्पांच्या संस्थेत पाचोऱ्याच्या संस्थेत डि. एड झालेल्या रघू दादाचा आदेश काढावयाची विनंती केली. आताचं पोरगं ज्याचं स्वत:चं शिक्षण अजुन चालूय तो मोठ्या भावास त्याच्या एका शब्दानं नोकरी मिळवून देतो यानं शिंदे चक्रावलेच. त्यानं पुन्हा भाना व सुगंधास काॅलेजातच अडकवलं. आपले दाजी का याला समजून घेत नाही याचं त्यांना आश्चर्य वाटलं.
शंकर शिंदेनं रघूला घरी बोलवलं.
" ये रघू, बस! काय म्हणतेय नवीन नोकरी?"
" मामा डि.एड सुटताच नोकरी मिळाली याचा वेगळाच आनंद असतो."
" तुळसा रघूस चहा आण! बऱ्याच दिवसातून तो घरी आलाय आणि चहा झाल्यावर तू ही बस जवळ!" शंकर शिंदे प्रेमानं म्हणाले.
" रघू, भानाला समजव जरा! त्या काश्याच्या मुलीला सोबत काय फिरवतोय! निवेदनाचं तिला सारं कसब शिकवलंय! आता तर राजकीय सभा गाजवतोय तर तेथे ही तिलाच सोबत!"
" मामा, दोघे चार पाच वर्षांपासून सोबत आहेत व अॅंकरींगची त्यांची केमेस्ट्री जुळलीय म्हणून व अप्पासाहेबांनीच दोघांना नाशीकला पाठवलंय म्हणून सोबत गेले होते ते!" रघू मामास समजावू लागला.
" अरे पण त्याच गोष्टी सख्ख्या मामाच्या मुलीस शिकवल्या तर त्याचं काय नुकसान होणार आहे! आपल्या तुळसेला त्यानं हे कसब शिकवावं!"
" मामा ,का नाही शिकवणार तो तुळसेला! बोला हवंतर उद्यापासुनच तो शिकवेल तुळसेला!"
" रघू, निवेदन ही कला नुसती शिकवून येत नाही रे! त्यासाठी भानानं तुळसेसोबत स्वत: निवेदन केलं तर ते अधिक परिणामकारक होईल!"
"..........." रघू शांत बसला व तुळसाकडं पाहू लागला.
" रघू एक राहिलंच! बाजी दाजी आले होते! पुढच्या वर्षी ते तुमच्या दोघांच्या लग्नाचा बार उडवायचं सांगत होते!" शंकर शिंदे बोलत रघूकडं पाहू लागले.
" काही तरीच मामा....!" रघू लाजता लाजता लाल झाला व तुळसाकडं पाहू लागला. मस्तानीही लालेलाल झाली होती.
रघूला स्वत: बाजी मामानं आपल्या लग्नाचा विषय काढावा याचं विशेष वाटलं. पण तुळसा बोललीच होती. तिनंच बाजीमामाकडं सांगितलं असावं व आपणास नोकरी लागली म्हणूनही बाजी मामा तयार झाला असावा. रघूला तुळसा बसलेला झुला आपोआप हलल्याचा भास होऊ लागला.
" रघू तेवढं भानाला सुगंधाऐवजी तुळसालाच सोबत न्यायला सांग!" शंकर मामा रघूची मनात कीव करत म्हणाले.
नेहमी प्रमाणं तुळसा मामाची गाडी काढत रघूला भानाकडं सोडायला निघाली.
" मामी मला परस्पर शैलजाकडं जायचं असल्यानं परतायला उशीर होईल गं!" तुळसानं सांगितलं व ती रघूला घेत विद्यापिठाच्या टेकडीकडं निघाली. तो पावेतो सायंकाळ झाली.चांदणी रात्र होती. दोघे बराच उशीर पर्यंत टेकडीवर बसले. तेथून समोरचा परीसर अतिशय रम्य वाटत होता. रघूस तर तो आज जास्तच बेनझीर वाटू लागला.
" तुळसे! मामा इतक्या लवकर कसं काय तयार झाले गं लग्नाला!" रघू हसत आनंदानं विचारु लागला.
" रघू सारखा भाचाच जावई हवा होता त्यांना!" तुळसा जवळ जात म्हणाली.
" तुळसा ,मामांना घरी बापूंना व आईस विचारायला सांग ना!"
" पप्पा ते विचारतीलच पण आधी तू भानास सांग ना!"
" तुळसे, भाना मैना वहिणीस शिकवणार नाही तर कुणास शिकवणार गं!"
दोघे निघाले. रघूला होस्टेलला सोडत तुळसा परतली.
मेसवर जेवण होताच रघूनं भानास जवळ बसवत शंकर मामा तुळसाबाबत काय म्हणाले ते सांगितलं.
" भाना, तुळसा ही निवेदन छान करते रे! पण तुझी व सुगंधाची सर तिला नाही. "
" दादा, देवानं प्रत्येकास काही ना काही हुनर प्रधान केलं असतं! जे इतरांना कौतुकाचं वाटतं! तुळसासारखं सौंदर्य कुणालाच नाही हे ही कौतुकच ना!"
" भाना माझ्यासाठी तिला शिकव ना!"
" दादा, तुझ्यासाठी म्हणजे?"
भाना हसू दाबत म्हणाला.
" भाना, बाजी मामा आमच्या दोघांच्या लग्नास तयार आहे!"
भानाचा कानावर विश्वास बसेना! रघू दादा व तिचं काही तरी आधीपासून चाललंय हे भानास माहीत होतंच पण बाजी मामानं हे इतक्या लवकर स्विकारलं यावर त्याचा विश्वास बसेना.
" दादा, मामा तयार आहे हे कुणी सांगितलं?"
" शंकर मामानं!"
" दादा, तरी एक वेळ घरी जाऊन पक्की खात्री कर!"
" भाना, मैना सोबत असल्यावर बाजी मामा नाक दाबून येईल!"
भानाला तरी मनात शंका आली.
" भाना मग शिकवशील ना!"
" दादाच्या मैनेसाठी का नाही !" भाना हसतच म्हणाला.
दुसऱ्या दिवसापासून तुळसा भानाला घरी नेऊ लागली. भाना तिला निवेदनातल्या बारीक सारीक गोष्टी ज्या तुळसाच्या चुकत होत्या त्या समजावू लागला.
" तुळसा, निवेदकास पहिली गोष्ट स्टेज ओळखता यायला हवं, प्रेक्षक कोण व त्यांचा स्तर कोणता हे ओळखत सादर करावयाचा कन्टेन्ट निवडावा. युवा वर्ग असेल व जोडीनं निवेदन करणार असाल तर जोडीदार कोण हे विसरत युवा प्रेक्षकांना तो खरा जोडीदार वाटेल असा आपला स्टेजवर वावर असावा. पण एकदम एकत्र आलात तर युवकांची उत्सुकता तिथंच संपते. उत्सुकता ताणून ठेवत निवेदन सुरू ठेवावं. आपली नजर कुणा एकावर कधीच स्थीर न ठेवता शेवटच्या व्यक्तीपर्यंत जावी" भाना अशा अनेक बाबी समजावू लागला.
मध्यंतरी जळगावमध्येच छोटे मोठे कार्यक्रम झाले त्यात त्यानं तुळसासोबत निवेदन केलं. तुळसात हळूहळू फरक पडू लागला. शहरातच एका संस्थेचा अमृतमहोत्सव वर्षाचा जंगी कार्यक्रम होता. भाना व सुगंधास घसघशीत मानधन देत बोलवलं होतं. भाना तुळसासही घेऊन गेला. तुळसानं मामाची गाडी आणत भानास बसवलं. भानानं सुगंधाला बोलवलं.
" भाना, हिला कशाला घेतो सोबत मी आहे ना!" तुळसा सुगंधाकडं तुच्छतेनं पाहत म्हणाली.
गाडीत बसणारी सुगंधा तशीच बाहेर थांबली व भानाकडं पाहत थरथरली.
" तुळसा! कार्यक्रमात तिच आमंत्रीत आहे!" भाना डोळे रोखत बोलला व सुगंधास मध्ये बोलवलं.
" भाना, असं कर माईलाच घेऊन जा!"
" नको गं मला माहीत नव्हतं तुला ही बोलवलंय ते! चल काही हरकत नाही!"
सुगंधाला तरी बसायची इच्छा होईना पण भानाकडं पाहून ती नाईलाजानं बसली.
कार्यक्रमात तुळसा मुद्दाम भानाशी सलगी करत सुगंधाला डिवचू लागली. भाना निवेदनात गुंग असला तरी तुळसाचं जवळ येणं त्याला खटकलंच. सुगंधाला आज प्रथमच भानात व आपणात जमीन अस्मानाचं अंतर असल्याचं जाणवलं. ह्या अंतरात अनेक वादळे घिरट्या घालत आहेत हे तिनं ओळखलं.
परत येतांना तुळसा सुगंधाला डिवचण्याची एक ही संधी सोडत नव्हती.
तुळसा होस्टेलवर दोघांना सोडत परत निघाली.
गेटमधून आत येताच सुगंधा कळवळली.
"भाना एक ऐकशील!"
" काय?"
" आता अभ्यास व कार्यक्रम या दोन्ही गोष्टी मला शक्य होत नाही. म्हणून माईलाच नेत जा!"
भाना सुगंधा असं का म्हणतेय ते समजला.
" सुगंधा, रघू दादानं सांगितल्यावर मी नकार नाही देऊ शकलो गं!"
" तसं म्हणायचं नाही भाना मला!"
" सुगंधा फक्त आणखी काही दिवस.तुळसाला काही बाबी शिकवल्या की तिच्या बरोबर मी देखील जाणार नाही!"
सुगंधाला मनात कालवाकालव झाली.
" भाना, मागच्या आठवड्यात घरी गेल्यावर आई संतापत होती रे!"
" का? कशासाठी?"
" ती तिची आईपणाची जबाबदारी पार पाडत होती!"
" काय झालं ते तर सांग!"
" काही नाही जाऊ दे!"
" सांग ना!" भाना कळवळून विचारू लागला.
" आई आता मला निवेदकाचे कार्यक्रम करायला नाही म्हणतेय!"
" मालू मामी मूर्ख आहे! मी जाऊन समजवेल मामा व मामीस!"
" भाना, काही कामं अशी असतात की श्रीमंतांच्या मुलींनी करणं म्हणजे त्या त्यात करीअर करतात पण तीच काम गरीबांच्या मुलींनी करणं जगाच्या दृष्टीनं घराच्या इज्जतीची शोभा होते!"
" सुगंधा, ते काही नाही!जग नावं ठेवत पाय ओढायला पुढं येतं ! त्याचा विचार आपण करायचा नसतो"
" ज्या समाजात आपण मोठं होतो, आपलं मोठंपण ज्या समाजावर अवलंबून असतं,त्याचा विचार गरीबाला करावाच लागतो!"
" म्हणजे?"
" मला आता कुठल्याच स्टेजवर येणं जमणार नाही!" भाना दुसरी
" सुगंधा! मालू मामी, मामा एक अनाडी आहेत पण तू तर अडाणी नाही ना!" भाना रागात भडकला
" भाना एक स्त्री अनाडी असू शकते पण मुलीच्या दृष्टीनं एक आई कधीच अनाडी नसते! "
" मग तर मी पण कुठलंच अॅंकरींग करणार नाही! तुळसेची तयारी झाली की!"
" नाही रे! खरं सांगू माझं एक स्वप्न आहे!"
" ............" भानानं काहीच विचारलं नाही.
" तू बोलत असावा व समोर हजारोंचा समुदाय असावा! तुझ्या वक्तव्याच्या प्रवाहात तल्लीन होणारा! 'भाना महाराज!'......खरच अमृतकर बाबा म्हणत होते तेच स्वप्न मी खुर्दाण्यात तू गवळण म्हटली तेव्हापासून तुझ्याबाबत उरात बाळगून आहे!"
" सुगंधा, लाखोचा समुदाय जमवीन! पण त्याचं स्फुर्लिंग चेतवणारं एक आपलं माणूस साथीला असलं तरच त्यास महत्व!"भाना कळवळून बोलला.
" ..............." 'आपलं माणूस' हा उल्लेख ऐकताच ती विरघळली.
" आपलं माणूस फक्त निवेदक म्हणून साथ देणार नाही पण......." तिच्या डोळ्यात आसवे तरारली. ती सरळ होस्टेलवर परतली .
.
.
रात्री तिला ती घरी गेली होती तो प्रसंग आठवला.
भानासोबत ती नाशीकला युवक मेळावा साठी फिरत असतांनाच पारू काकीनं आई व वडिलांचे कान भरले होते व आई संताप करत होती.
" सुगंधा, आता असं बाहेर फिरणं बंद कर बाळा!"
" असं म्हणजे कसं गं आई?"
" सुगंधा, भाना तसा चांगला आहे पण तुझं असं ते स्टेजवर भाषण बाजी करणं पोरीच्या जातीला शोभा देत नाही!"
" आई मग जाऊ देत मी आताच काॅलेज बंद करते!"
" सुगंधा तसं नाही गं! तू भानासोबत असली की आम्हास कसलीच धास्ती नसते पण लोक विचीत्र आहेत,काहीही बोलतात.म्हणून ते स्टेजवर लोकांसमोर बोलणं बंद कर बाळा!"
सुगंधाला आई वडील का म्हणतायेत ते कळलं व ती तेच आज भानास सांगत होती. तुळसाचं डिवचणं व आईनं पारू काकीचा केलेला ओझरता उल्लेख यावरुन ती समजली. तिनं यापुढं अॅंकरींग करणं बंद करायचं ठरवलं.
.
.
क्रमशः
भाग ::-- आठवा
डि.एड ची जाहिरात निघाली. रघूनं संस्थेत अजून पूर्ण पगार नव्हता म्हणून अर्ज भरला. तो पाचोऱ्याहून शनिवारी कधी उमर्ठीला तर कधी जळगावला जाई. पण हल्ली तुळसा आधी सारखी भेटण्यास उत्सुक नसल्याचं त्याला जाणवू लागलं. कदाचित अॅंकरींग शिकण्यासाठी भानाबरोबर फिरत असल्यानं जमत नसेल म्हणून रघू स्वत:ची समजूत काढू लागला.
तिसरं वर्ष सुरू झालं.नाशीकला अप्पाच्या जावयांच्या प्रचारासाठी शंकर शिंदे सरांनी भानाला पाठवलं. सोबत महिला आघाडीच्या युवा अध्यक्षा म्हणून तुळसालाही पाठवलं.
भानानं अप्पांच्या जावयांना सांगत सुगंधासही बोलवण्याची विनंती केली. पण सुगंधाआधी तुळसा व शिंदे सरांनीच किल्ली फिरवली. आता भानासोबत प्रचारसभांना तुळसाच फिरू लागली. भानानं प्रचाराचा एकदम धुरळा उडवला. अप्पांचे जावई त्याला सोबत घेऊनच सभा घेऊ लागले. भाना जाईल त्या सभेला तुफान गर्दी होऊ लागली. सभेत भानाला बोलतांना पाहतांना तुळसा देहभान हरपून पाहत राही. तिला आता रघूची कीव वाटे व सोबत स्त:तावर संताप.आपण रघूत काय पाहिलं की त्यात सुरुवातीस इतकं गुंतत गेलो! आता तिला रघू नकोसा वाटू लागला व भानातच राहू दिसू लागला. झंझावात कवेत घेत धुरळा उडवणारा राहू!
भाना गर्दीच्या गराड्यात व प्रचारात गुंग असल्यानं तुळसेची नजर कळूनही त्याला गर्दीत काहीच बोलता येईना.
रघू दादाचा दुपारी एका ठिकाणी जेवतांनाच फोन आला.
" बोल दादा!"
" भाना काही नाही! हल्ली मनात एकदम उदासी वाटते रे! म्हणून तुझ्याशी बोलावं वाटलं!"
भानाला वेळ नव्हताच तरी त्यानं गर्दीला दूर सारत तो बोलला.
" दादा फक्त चार दिवस राहिलेत प्रचाराला! मग बस येतोच परत! मग बोलू निवांत!"
" भाना ,तुळसा कशी आहे?"
" दादा ,आता मैनेला माझी शिकवणीची गरज नाही हं! म्हणून मैनेला तु परत बोलवलं तरी हरकत नाही!"
" अरे तिच्याशीच बोलायचंय पण ती फोन उचलतच नाही!"
भाना एकदम संतापला.
" दादा थांब मी तिच्या कडं देतो फोन! का बोलत नाही ती!" म्हणत भाना तुळसेकडं गेला व फोन दिला.
तुळसेनं रघूचा फोन आहे हे कळताच रागात पाहिलं.
" बोल!"
" तुळसा कशी आहेस गं?"
" रघू तुला काही कळतं की नाही रे! एवढं विचारण्यासाठी तू इतक्या बिझी शेड्युल मध्ये डिस्टर्ब केलंस?"
" तुळसा! ऐक ना! मला तुझ्याशी बोलायचंय गं!"
" बिलकुल नाही! मला आता वेळ नाही.मी आता फोन ठेवते व नंतर करेन!"
" तुळसा, दादा बोलतोय तर बोल! सभेला भरपूर अवकाश आहे! आणि आपल्या माणसांपेक्षा सभा महत्वाची नाही!" तुळसेचं बोलणं भानानं ऐकलं म्हणून तो संतापात बोलला.
" भाना, रघूला आपणास डिस्टर्ब करतांना कळायला हवं ना!”
" काय कळायला हवं हे आता दादाला तू शिकवणार का?" भाना गुश्श्यातच बोलला.
तुळसा संतापात महिलांकडं निघाली.
रघू पाचोऱ्यास परतला.
भानाला रघू दादासाठी एकदम भरून आलं. बाजी मामा, शिंदे सर व तुळसा मिळून दादाचा खेळ तर करत नाही याची त्याच्या मनात शंका दाटू लागली.
प्रचार संपला. निकाल लागला. अप्पांचे जावई प्रचंड मतांनी निवडले.
भाना परतला. तो पंधरा वीस दिवसांनी परतला होता. परतताच तो सुगंधास भेटला. या वर्षी पाऊस खूपच लांबणीवर पडला होता. निकाल लागला नी पाऊस धो धो कोसळायला सुरुवात झाली. त्याच वेळी शंतनू शर्माचा शिंदे सरांना फोन होता.
शिंदे आता हा शेवटचा काॅल करतोय. युवा महोत्सवातील ती जोडी पाठवा. आमच्या कडं आॅडीशन्स साठी कतार लागते तरी मी तिसऱ्यांदा काॅल करतोय!"
" शर्माजी जोडीतील मुलींनं अॅकरींग सोडलं. त्या मुलासोबत माझ्या भाचीला घेत असाल तर आताच पाठवतो हवंतर!"
" तो मुलगा असल्यास तुमची भाची का असेना पण पाठवा. पावसाळा संपताच नवीन प्रोग्रॅम शूट करायचाय!"
शिंदे हो म्हणत गालात हसला.
रघू पुन्हा जळगावला आला. पण शिंदे सरांकडं तुळसा असुनही त्याला ती भेटली नाही.
" रघू, तुळसा आता मोठी कलाकार झाली बाबा! तिला मुंबई वरुन निर्देशकांची मागणी होतेय! म्हणून आता तिला भेटायचं म्हणजे अपाॅईंटमेंट घेऊनच यावं लागेल!" शिंदे सर अंगणातून कुत्र्यास हाकलत बोलत होते.
" मामा, आता पर्यंत शिकवणीची गरज असलेली तुळसा लगेच स्टारडम झाली?"
" तकदीर व अंगात स्कील असलं की माणूस रातोरात चमकायला लागतं! तुला ही सांगतो बाबा, ती मास्तरकी सोड नं काही तरी दुसरं पहा!"
रघू तेथून निघाला व भानाकडं आला.
" दादा अप्पांच्या जावयानं आठ दिवस टूरसाठी गाडी पाठवलीय! चल सर्वजण सोबत जाऊ व फिरून येऊ!" भाना रघू दादास म्हणाला.
" कोण कोण रे भाना?"
" बापू, मावशी, आई ,तू, काशी मामा ,मालू मामी व सुगंधा सर्वजण जाऊ "
" तुळसा येतेय का?"
" तिला मी नाही विचारलं.पण तू हवंतर विचारून पहा.तुझ्यासोबत आली तर अवश्य तिला ही घेऊ!"
" भाना ,विचारायला ती भेटायला तर हवी ना!" ऊर फाटल्या तडफेनं रघू बोलला. भानास भरुन आलं.
" दादा, मैनेची मजाल काय! माझ्या दादापुढं जाण्याची!"
म्हणत भानानं तिला फोन लावला.
" तुळसा?"
" बोल भाना! कशी आठवण केलीस?"
रघू जवळच होता. त्याला मधला आवाज ऐकू गेलाच.
" तुळसा! दादा बोलतोय!"
म्हणत भानानं रघूदादाकडं फोन दिला.
" बोल!" एकदम त्रागानेच सुस्कारा सुटल्याचं रघूनं ऐकलं.
" तुळसा, घरी आलो होतो! भेटली नाही!"
" आता काय ते बोल लवकर!"
" तुळसा, भाना टूरला बोलवतोय जायचं का?"
" आले असते पण प्रचारानं थकून आल्यावर आता थोडे दिवस आराम करते!" तुळसानं नकार दिला.
रघू एकदम खिन्न झाला. त्यानं फोनच कट केला.
" भाना माझी शाळा असल्यानं मला नाही शक्य! तू सर्वांना घेऊन ये फिरून!" रघू भकासपणे फुटरं बोलला.
" दादा, ती आमच्या सोबत नाही म्हणत असेल तर तुम्ही दोनच जण जा! तशी सोय करतो हवी तर!"
पण दादानं नकार दिला. भानानं घरी विचारलं. पण बापूचं शेतीचं काम व काशी मामाचंही तसंच म्हणून फक्त एक मुक्काम करत गडावर जाण्याचं नियोजन केलं.
बापू मावशी, आई, काशीमामा, मामी, सुगंधा, बाला व सुशांत व रघू दादासही घेत ते गाडीनं निघाले. अप्पाच्या जावयांच्या कार्यकर्त्यांनी जेवण, राहणं व प्रवास सर्व सर्व व्यवस्था केली होती. आई वडील सोबत होते म्हणून सुगंधाही आनंदात निघाली. ती वेगळ्याच कारणासाठी गडावर जात होती. सप्तश्रृंगी मातेचं साऱ्यांनी दर्शन घेतलं. तेथून ते बापू नकार देत असतांनाही एक दिवस मुक्काम वाढवत नाशीकला गेले. गोदावरी स्नान, पंचवटी, त्र्यंबक करत अप्पाच्या जावयाकडं आले. अप्पांच्या मुलीनं राघो कदमांच्या मुली अंजाताई व मंजाताई आल्यात म्हणून खास स्वागत करत प्रेमानं सरबराई केली. साऱ्यांनी भानाचं व सुगंधाचं तोंड भरून कौतुक केलं. मागच्या वर्षांपासून भानानं जी मेहनत केली त्यानंच निवडणूकीत यश मिळाल्याचं सांगितलं. बापू व काशीमामासही एकदम गहिवरुन आलं. भानाचं व सुगंधाचं कर्तृत्व थोर की आपणास कुणीतरी ओळखतंय याचं त्यांना अप्रुप वाटलं.
तिसऱ्या दिवशी सकाळी सारे परतले. पण भाना व सुगंधास अप्पांच्या जावई व मुलीनं मुंबई ला जायचं असल्यानं ठेवून घेतलं. मालू मामीनं खुशीनं निसंकोचपणे पोरीस रहायला लावलं. सुशांत व बालासही भाना रोखत होता. पण दोघांना परतणं महत्वाचं होतं. त्यांना आज आपल्या 'जोशी मास्तराचा' अभिमान वाटला.
" सुशा, कुठं ही जाऊ तरी मनानं कायम एकच राहू! लक्षात ठेव!" भाना बोलला नी सुशा एकदम त्याला बिलगला.
" भान्या , कुठं ही रहा पण आता जोशी मॅडमाचा मार खाऊ नको!" सुशा सुगंधाला ऐकू जाईल असं बोलला नी सुगंधानं हसतच
" सनेर बस कर!" म्हटलं.
भाना व सुगंधा मुंबई साठी राहिले पण मुबंई जाणं दोन दिवस लांबलं. मग भाना जळगावला परतू लागला. पण जावयानं व आक्कानं ऐकलंच नाही.
" भाना ! दोन दिवस सवड आहे तर जवळपास फिरून येऊ ना?" मनातली गोष्ट गर्दीत बाकीच राहिली म्हणून सुगंधा भानास म्हणाली. भानानं आक्कास विचारलं. आक्कानं गाडी घेऊन जायला सांगितलं. पण भाना व सुगंधा बसनेच निघाले.
" सुगंधा कुठं जायचं?" सीबीएसवर येताच भानानं विचारलं.
गडावर जाणाऱ्या गाडीकडं सुगंधानं बोट केलं.
दुपार पावेतो दोघं पुन्हा गडावर आले.
" भाना, मला तू कधीच काही दिलं नाहीस!"
" देणं- घेणं यात बनिया व्यवहार असतो गं! तो व्यवहार सांभाळतांना नाती सांभाळणं मुश्कील होतं सुगंधा!"
" पण कधी कधी अगदी साध्या साध्या गोष्टी ही हयातभर नातं घट्ट करत माणसांना एकमेकांशी जखडून ठेवतात भानू!"
" असं असेल तर बोल काय हवंय!"
सुगंधा खुश झाली ती गडाच्या पायथ्याशी असलेल्या दुकानांच्या गर्दीत हवं असलेलं दुकान शोधू लागली. एक वयानं पिकलेली म्हातारी बिलोराचं दुकान थाटून बसलेली. पावसाळा असल्यानं नव विवाहीत जोडप्यांची गर्दी कमी झालेली. सुगंधा तिथे थांबली.
" बोल पोरी चुडा भरायचा का?"
सुगंधानं भानाकडं सहेतूक घाऱ्या नजरेच्या पाऱ्यातून पाहिलं व ती आजीसमोर बसली.
" पोरी, लाल, कथ्थई, हिरवा कोणता रंग दाखवू?"
" आजी हिरवा चुडा!"
आजीनं हिरवे बिलोर ठेवलेला रोल काढला व सुगंधाच्या हाताचं माप घेऊ लागली.माप घेताघेता आजी भानाकडं पाहत विचारती झाली.
" लग्न ठरलं का?"
त्याचवेळी सह्याद्री रांगेत आभाळात ढग गडगडायला व विजा चमकायला सुरुवात झाली. आभाळ काळ्याशार मेघांनी भरुन आलं. पाऊस धो धो कोसळत जणू गड धुवू लागला.
सुगंधा भानाकडं ओथंबल्या नजरेनं पाहत आपल्या गोऱ्या हातात जगदंबेच्या साक्षीनं हिरवा चुडा भरुन घेत होती हातात चुडा भरुन होताच तिनं एक डझन आणखी घेतले. आजपर्यंत भानाकडून कधीच काही न मागणाऱ्या सुगंधानं भानास चुड्याचे पैसे द्यायला लावले.
" पोरांनो, आज आषाढ पुनव आहे! आईला खण नारळ घेऊनच दर्शनाला जा!" दोघांच्या नजरेतला शुद्ध भाव पाहत आजीनं सल्ला दिला.
चुडा भरल्या हातात तिनं देवीसाठी खणा नारळाची ओटी घेतली. तो पावेतो दुकानांच्या आडोशाला न थांबता चालत निघाल्यानं ते पूर्ण भिजले. दोघे सह्याद्रीच्या आषाढ सरीत ओलेचिंब होत गडाच्या पायऱ्या पायीच चढू लागले. गडावरचा पाऊस झेलत, थंड वारा अंगात भिनवत हिरव्या चुडयाची समृदधी व पवित्रता पेलत दोघांनी मातेचं दर्शन घेतलं. गड उतरतांना पूर्ण पावसातच ते पायऱ्या उतरले. मध्येच सुगंधानं भानास थांबावयाला लावलं. एका ठिकाणी बसत गड धुणारा पाऊस, हिरवाई चेतवणारा पाऊस ,मन पालवी धुंदाळणारा वारा ती पाहू लागली.
" भाना, आजचा दिवस माझ्या आयुष्यात कायम स्मरणात राहील!"
" का गं?"
" कोऱ्या मनात ज्याच्या अस्तित्वाच्या रेघोट्या चितारल्या जातात त्याची साथसंगत असल्या ठिकाणी व असल्या वातावरणात मिळणं काय असतं ते आई जगदंबा तुला ही कळू देत! तुला कळतंय की नाही हे मला नाही कळत पण ज्या वेळेस तुला कळेल त्या वेळी अशीच साथसंगत राहो हीच आई जगदबेला मागणी!"
भानानं तिचा हिरव्या काकणाचा हात हातात घेतला!
" सुगंधा, आज मनात एवढं कसलं काहूर उठलंय गं!"
" भाना, मागच्या सहा महिन्यांपासून मनात विचीत्र अनंत रिक्त पोकळी भरून येते व जीव कासावीस होतो रे!"
" कसली पोकळी गं!"
" मन ज्या रेघोट्या चितारू पाहतंय त्या रेघोट्या कुणीतरी पुसतंय! नी मग मनात कराल अवकाशीय पोकळी निर्माण होत एकटे पणाची भिती वाटत राहते!"
" का वाटतं असं?"
" माहीत नाही! पण असं एकटेपण कुणाच्या ही वाट्याला नको!"
सुगंधाच्या डोळ्यात आसवाची दाटी झाली व तिनं भानाचा हात आपल्या हातात घेत घट्ट घट्ट दाबला.
" भाना ,निदान असं एकटंपण तुझ्या वाट्याला तरी नको!" ती एकदम बोलून गेली व त्याला बिलगत रडू लागली.
" सुगंधा, मूर्ख आहेस का तू!" भानाला कळेना ती असं का बोलतेय. पण त्यालाही तिची अस्वस्थता पाहून भरून आलं. त्यानं तिला रडू देत तिचा आवेग निघू दिला.
" भाना, त्यासाठीच देवीच्या दर्शनाला मी तुला पुन्हा घेऊन आले! परवा सर्वांसमोर जोडीनं साकडं घालणं शक्यच झालं नाही."
" सुगंधा, रघू दादा व तुळसाचं एकदाचं निस्तरलं की तेवढ्यात आपली ही करीअरची काही तरी घडी बसवूच. मग बापू व मामाच्या संमतीनं सारं काही सुरळीत पार पडेलच!"
सुगंधानं पर्समधून आजीकडून घेतलेला डझनभर हिरवा चुडा काढला. त्यातल्या निम्मे त्याच्याकडे दिल्या.
" मला बांगड्याचा आहेर देतेय का?"
तो मनावरीलभार हलका करण्यासाठी हसत म्हणाला.
" भाना, तू कुठं ही असला, कुणीही सोबत असलं तरी हा चुडा कायम तुला माझी आठवण देत राहिल. कुठलंही पातक करतांना कोणास तरी आपण चुडा भरलाय याची आठवण हा चुडा कायम देत राहिल!"
भानानं ते बिलोर घेतले.
" सुगंधा, हे वाढले तर गं!"
" मनातल्या रेघोट्या पुसू द्यायच्या नसतील तर वाढू देऊ नकोस!" ती बाहेर बरसणाऱ्या पावसाकडं पाहत बोलली.
भानाला आज सुगंधाचं वेगळंच रूप दिसलं त्या रुपाचा सुगंध त्यानं मनातल्या गाभाऱ्यात साठवला.
गड उतरले . भावूक सुगंधा आता एकदम सामान्य स्थितीत आली. भानाचं लक्ष तिच्या चेहऱ्यावर गेलं. पावसाच्या धारा तिच्या बटांमधून कपाळावर होत गालावर ओघळत होत्या. त्याकडं तो तन्मयतेने पाहत होता.
" काय पाहतोस!"
" सुगंधा तू माझ्या कडून हिरवा चुडा घेतला पण मला काहीच दिलं नाहीस!"
" माकडा, आपल्या कपाळावर बघ जरा! बादलीनं उठवलेला डागाळलेला चंद्र!"
भानानं आपल्या कपाळाला अनाहूतपणे हात फिरवला. जखमेची खूण लागताच
" ही तर दुखरी सल आहे ना गं!" तो म्हणाला.
" भाना, काही दुखऱ्या सली अशा असतात की त्या कायम गोंजाराव्याशा वाटतात! त्या कायम मिरवत राहण्यातही सुखाचा सागर दडलेला असतो!"
" सरळ सांग ना, काहीच भेट द्यायची नाही असं!" तो हसत म्हणाला.
" बोल काय घेऊन देऊ?"
" काही घेऊन नको देऊ पण मला एका प्रश्नाचं उत्तर हवंय!" भाना एकाएकी गंभीर होत म्हणाला.
" काय?"
" मी साथीला असतांनाही तुला रिक्त पोकळी का जाणवतेय सुगंधा? आणि इतक्या दिवसांपासून का बोलली नाही तू मग?"
" भाना, लाखो हजारोच्या समुदायात मला एकटं सोडून तू निघून जाशील हीच रिक्त पोकळी वाटते रे! आज पावेतो तुझ्यावर असलेल्या विश्वासापोटीच बोलली नाही......"
" मग आता नाही का विश्वास?"
" स्वत:पेक्षा जास्त! पण हा लाखो हजारोचा समुदाय जवळ असल्यावर गर्दीत हरवण्याची भिती वाढत चाललीय हल्ली ! आणि तुझ्यावर असला तरी इतरांचा भरवसा नाही रे!" सुगंधा बोलली पण ती काहीतरी दडवतेय हे भानानं ओळखलं.
त्यानं तिच्या नजरेत खोल खोल पाहिलं. पण नितळतेसोबत त्याला घाऱ्या नजरेत भितीच जास्त दिसली.
"सुगंधा, लाखो हजारोंचा समुदाय ही मी आज पासुन या हिरव्या चुड्यातूनच पाहीन! हे बिलोर फुटले तरी हिरव्या चुड्याचा सुगंध मनात सतत दरवळत राहील!" भाव भरल्या काळजानं तो बोलला नी त्याला घाऱ्या नजरेतली भिती कमी होत नितळताच खुलून दिसू लागली.
सायंकाळी गडावर मुक्काम करण्याचं भाना म्हणाला पण सुगंधानं हिरव्या चुड्याची पावित्र्यता व गडावरचा हवासा पाऊस मनात साठवत लगेच त्याला नाशीकला परतायला लावलं.
मुंबईला दोन दिवस राहत दोघे जळगावला परतले.
तोच काशीमामानं सुगंधास तातडीनं उमर्ठीला बोलवलं व तिची रिक्त पोकळी अधिकच वाढतेय याची तिला मनात जाणीव होत धास्ती वाढली..
.
.
क्रमशः.