हिरवा चुडा
उन्हाळी सुट्या लागताच जळगावला बोर्डिंगमध्ये शिकणारा रघू उमर्ठीत परतला. रघू भानूपेक्षा एखाद वर्षाने मोठा. शांत, मितभाषी रघू एकदम अभ्यासू किडा. सुटीत घरी आला की बापूसोबत तो ही घरच्या व मामाच्या शेतात राबे. पण जूनपासून दहावीत जाणार म्हणून या सुटीत तो आतापासूनच अभ्यासाला लागला. दुपारी अकरा पर्यंत शेतातलं काम आटोपून शेतातच जेवण करत तो आमराईतल्या दाट सावलीत अभ्यासाला बसे. साहजिकच भानूही त्या सोबत आमराईतच अभ्यासाला बसू लागला. पण भानूचा अभ्यास म्हणजे रघू दादा बसतोय म्हणून हेवा म्हणून बसणं एवढंच. तरी रघू दादाचीच नववीची पुस्तकं तो वाचे. रघू त्याला भुमितीतली प्रमेय, त्रिकोणमिती, गणितातली एकचल द्विचल समीकरणे, आलेख असलं बरंच काही शिकवे. भानुचं लगेच समजणं त्याला बुचकळ्यात टाके. भानुचा ज्ञान ग्रहणाचा आवाका पाहून त्याला आश्चर्य वाटे. भानू थोडा वेळ थांबून लगेच इतर कामाकडे वळे. पाटात दुपारी मनसोक्त डुंबणं हा त्याचा आवडता छंद. पोहून झाल्यावर केळीच्या बागेतून दुभत्या म्हशी व बैलासाठी पत्ती व पिल गोळा करी.
रघू सोबतच जळगावी एकाच हायस्कुलात शिकणारी बाजी मामाची तुळसा ही सुटीत आलेली.
आमराईत आंबा बेडण्याचं काम होणार असल्यानं बाजी मामा सोबत तुळसा ही दुपारी मळ्यात आली. बापू ,काशी मामा व इतर माणसं आंबा बेडू लागली. एका झाडाखाली वेगवेगळ्या जातीच्या व आकाराच्या कैऱ्यांचा खच गोळा होऊ लागला. दुपारी बाराच्या सुमारास रघूनं जेवण करून आज आमराईत गलका असल्यानं पुस्तकं घेत केळीच्या बागेत पथारी टाकली. भानूला आंबा बेडणं हा प्रकार नवीन असल्यानं मजा वाटत होती. तो कैऱ्या वाहण्यासाठी बापूजवळच थांबला.
बाजी मामा, मामी व तुळसा आमराईत आले.
मामाचा वाडा बापूच्या घरापासुन गावात लांब असल्यानं भानूचं सहसा वाड्यात जाणं नसे. एक दोन वेळा खळ्यातून म्हशीच्या दुधाच्या बादल्या पोहोचवण्यासाठी गेला असेल एवढंच. बाजी मामाची नजरेच्या खडीची धडकी भरत असल्यानं ही असावं ,पण तो वाड्याकडं फिरकेच ना!
काशी मामानं दिलेली झाडावरची सांग खात असतांनाच मामा मामी व तुळसा आली. सांग खातांना भानूचं सारं तोंड पिवळं व चिघट झालेलं. रसाचे डाग शर्टावर गळ्यापर्यंत .
" पप्पा हे कार्टून कोण?" गोरीपान कमळाच्या कळीगत गुलाबी गालाच्या तुलसेनं हसतच विचारलं. भानू तसाच खाली मान घालत भितीनं उभा. तो पाच सहा वर्षात तुलसेला पाहत होता. तुलसेनं ओळखलं नसलं तरी त्यानं ओळखलंच.
" तुलसा! तू या कार्टूनला ओळखलं नाही! बंकट दाजीनं आणलंय! मंजीचं कोंबडं! याचा बाप बोंबीलगत खांबावरच शिजला नी गेला. खुर्दाण्यात खायचे वांदे होऊ लागले मग आलं आपल्या आसऱ्याला!"
बाजी मामा तोऱ्यात खुनशी हासत तुलसेला सांगत होता. भानूचे पिवळे गाल आता लाल होऊ लागले. त्यानं हातातली सांग फेकली व तो रघूकडं निघाला.
लाल डोळे पाहून " काय झालं रे भानू! डोळे का लाल झालेत?" रघूनं विचारलं.
" काही नाही कैऱ्यांच्या देठांचा चीक डोळ्यात गेला!"
"पाटावर जा व पाण्यानं स्वच्छ डोळे धू पळ!"
फिरता फिरता तुळसा रघू बसलेल्या बागेत आली.
" रघू तू रोज येतो का अभ्यासाला मळ्यात?" तुलसेनं रघूजवळ बसत विचारलं.
" तुलसे, या वर्षी बोर्डाची परीक्षा असल्यानं सुरुवातीपासूनच अभ्यासाला लागावं लागेल म्हणून आमराईत बसतो.पण आज आमराईत आंबा बेडत असल्यानं इथं बसलोय!"
"अरे वा! मग मी पण येत जाईन!"
रघूनं स्मित हास्य करत तिच्याकडं पाहिलं. कमळ कळीचा नाकाचा शेंडा लालसर झाला.
तुलसेनं रघूला सांगण्याचा घाव व पाटावरुन तोंड धूत भानूचा परतण्याचा घाव एकच झाला.
" तुलसे, हा भानुही नववीतच आहे पण तुझ्यापेक्षा नक्कीच हुशार आहे.आतापासुनच दहावीचे त्रिकोणमितीचे सुत्रे व उदाहरणे सहजच सोडवतो!" रघूनं सांगितलं पण भानुच्या अवताराकडे पाहून तिनं अविश्वासानं पाहिलं.
जून उजाडला व रघू, तुलसा जळगावला परतले. तुलसा तिच्या मामाकडं राहत नववीत जाऊ लागली तर रघू बोर्डिंगला राहत दहावी करू लागला. हायस्कुलातून मागणी जाताच भानूचा दाखला आला व तो गावातच नववीत जाऊ लागला. रघू गेल्यानं त्याला सुरुवातीस सुनं सुनं वाटू लागलं.
मृगाच्या पावसानं गिरणा व अंजनी काठास झोडपलं.अजिंठ्याच्या डोंगराकडून व पश्चिमेच्या नाशीककडून ढगांचा जमावळा येत जळगाव जिल्ह्याला झोडपू लागला. गिरणा, अंजनी, अनेर तितूर नदींनी तापीला तट्ट फुगवलं.
मळ्यात पेरणीचं काम अत्यल्प असल्यानं मळ्यातल्या कामास थोडा विसावा मिळू लागला. भानू आता शाळेत स्थिरावू पाहत होता. शाळेचं ग्रंथालय त्याच्या आधीच्या शाळेपेक्षा खूप मोठं होतं. भली मोठी कपाटेच कपाटे, जाडजूड वेगवेगळ्या विषयाची पुस्तकं त्याला भुरळ घालू लागली. ग्रंथालयातून पुस्तकं काढत तो रात्री वाचण्याचा सपाटा लावू लागला. एका महिन्यात त्याची वाचनाची आवड ग्रंथपालाच्या लक्षात आली. ग्रंथपालानं एके दिवशी त्याला बसवत कोण, कुठला, कितवीत शिकतो, आता पर्यंत काय काय वाचलं? सारं सारं विचारलं. त्यानं वाचलेल्या पुस्तकाची नावं ऐकून ते भानूकडं अविश्वासाने पाहू लागले.
वाचलेल्या पुस्तकावर गप्पाच्या ओघात काही प्रश्न विचारले. भानूनं दिलेली उत्तरे ऐकून त्यांच्या भुवया वक्रावल्या. ऐतिहासिक, धार्मिक, वैज्ञानिक, सामाजिक साऱ्याच विषयाचं वाचन या वयात? ग्रंथपालानं दुसऱ्या दिवशी बोलवत कोणकोणती पुस्तकं आधी वाचावीत याची यादी दिली व त्याला हवी तेवढी पुस्तके नेण्याची मुभा दिली.
" भानू ! गावातल्या विठ्ठल मंदिरात दर एकादशीला किर्तन असतं, भजनं असतात, त्याला रात्री येत जा!" भोसलेंनी असा सल्ला ही दिला.
भानूनं होकार दिला व निघाला.
विठ्ठल मंदिर राघो कदमांनीच बांधलेलं. त्यांनी मंदिराच्या गंगाजळीत त्याचवेळी भरपूर रक्कम ठेवलेली. त्या रकमेवरील व्याजातून मंदिरात किर्तन, अखंड हरीनाम सप्ताह चाले.
भोसले सरांनी सांगितलं म्हणून मंदिरात जायचंच असा भानूनं निश्चय केला.
त्याला खुर्दाणेतलं श्रीराम मंदिर व मंदिरातल्या प्रत्येक कार्यक्रमात भजनं, भारूडं, पदं म्हणणारा , हार्मोनियम वाजवणारा, आपला सदा बाबा आठवू लागला.
मंदिरात भजन झालं की चिवड्याची पुडी वाटली जाई. त्या मिळणाऱ्या पुडीसाठी भानू मंदिरात सोबत यायचा हट्ट करी. भजनात, किर्तनात रंगलेला सदा बाबाला ऐकणं व पाहणं हा एक रमणीय सोहळा असे. बऱ्याच उशीरा घरी आल्यावर झोपतांना बाबा भानूस काहीना काही विचारत नवनवीन अभंग, ओवी, श्लोक म्हणून दाखवे, म्हणावयास लावे. पाठ करावयास लावे. एकच अभंग वेगवेगळ्या चालीत गाई. त्यातूनच पाचवी सहावीतच ज्ञानेश्वरी, गाथा, भागवत वाचनाची त्यास गोडी लागली.
एकादशीला भानू बापूस घेऊन मंदिरात जाऊ लागला. उमर्ठीतल्या भजनी मंडळात तो हळूहळू टाळ घेऊन मागं उभा राहू लागला. अभंग म्हणतांना सऱ्हाईत वारकऱ्यागत तो गाऊ लागला. दोन तीन महिन्यातच त्याचा आवाज व वयोमानानं पाठांतर पाहून जुन्या जाणत्या लोकांना अप्रुप वाटू लागलं.
" पोरा, छान गळा आहे, येत जा! हे सारं वैभव तुझ्या आजोबांनीच उभारलंय!"
एका वर्षात भानू गावातल्या भजनी मंडळातील अव्वल गायक झाला. लहानगा भानू नवीन येणाऱ्या किर्तनकाराच्या नजरेतही भरू लागला. त्याचं पाठांतर तर भल्या भल्यांना तोंडात बोट घालायला लावू लागलं. तो हळूहळू तबला, मृदंग, हार्मोनियम याचंही ज्ञान मिळवू लागला. सोबतच किर्तनाच्या कार्यक्रमाचं छोटंसं सुत्रसंचालन ही करू लागला.
उन्हाळा लागला व परीक्षा जवळ येऊ लागली. त्याचं वाचनच एवढं दांडगं होतं की त्याला पास होणं अवघड नव्हतं. पण तरी त्यानं एका महिन्यात परीक्षेची तयारी केली.
बोर्डाची परीक्षा आटोपून रघू गावी आला. आता त्याला निवांतपणा होता. भानूची एका वर्षातील प्रगती पाहून तो चाटच पडला. आमराईत आता तो भानू व तुळसाच्या बोर्ड परीक्षेची तयारी करून घेऊ लागला. जळगावला असलेल्या मामानं तुळसास शहरातच क्लास लावायचं सांगितलं पण तुळसानं साफ नकार देत पायाला भिंगरी बांधल्यागत उमर्ठीत येणं पसंत केलं.
" तुलसे ! त्या भिक्कार कार्टुनासोबत काय अभ्यास होईल गं? त्यापेक्षा बाहेरच क्लास लावूयात ना!" बाजीनं तुळसेला आमराईत अभ्यासाला जातेय हे समजल्यावर सांगितलं
" पप्पा, सुरुवातीस मला ही ते कार्टूनच वाटत होते! पण अभ्यासात दोन्ही हुशार आहेत! रघू तर क्लासच्या सरांपेक्षाही चांगलं समजावतो! तुम्ही काळजी करू नका! मी करीन तयारी बरोबर!" तुळसा वडिलास पटवू लागली.
आमराईत दुपारी निसर्गरम्य वातावरणात रघू दोघांना गणित, विज्ञान, मराठी - इंग्रजी व्याकरण समजावी. मात्र भानू नवीन काही असलं तरच थोडा वेळ बसे व तो भाग समजला की लगेच उठत आमराई, पाट, मळ्यात फिरे. आताशी रघू ही भानू जाऊ लागला की त्याला काहीच बोलेना. आपणास भानूनं लगेच उठून निघावं असं का वाटतं ते त्याला कळेना. तो मग तुळसास बराच वेळ शांतपणे समजावत राही. तुळसाही गुंग होत समजून घेई.
" रघू तो राघू बघ आंब्यावर कैरीला चोचीनं मारतोय! आणि मैनैच्या चोचीत भरवतोय!"
" तुलसे, तिकडे का बघतेय गं! मी काय सांगतोय ते आधी समजून घे! बघ तुला हे समजत नाही ना! तर सोप्या भाषेत सांगतो. समज तू त्या राघूकडं साठ अंशाच्या उन्नत कोनानं पाहतेय. राघू बसलेलं झाडं तुझ्यापासून पाच मीटर अंतरावर आहे तर राघू जमिनीपासून किती उंचीवर आहे?"
" दादा मैना जेवढ्या उंचीवर बसलीय तेवढ्याच उंचीवर राघूनंही बसावं!" पाटाकडून आलेल्या भानूनं आंब्यावरील राघू मैनेवरची आपली नजर स्थीर ठेवत शक्य तेवढी निरागसता दाखवत म्हटलं. त्याचवेळी झाडावरची मैना अचानक उडू लागली. जाणाऱ्या तुळसाकडं रघू खुळ्या राघूगतच पाहू लागला.
सुटीतच बंकट बापूनं आपल्या मुलीचं - संगाचं लग्न उरकलं.
पावसाळा लागायच्या सुमारास रघूचा निकाल लागला. त्यानं अठ्ठ्याऐंशी टक्के मिळवत शाळेत पहिला क्रमांक पटकावला. बंकट बापू व अंजाबाईचं काळीज सुपाएवढं झालं. त्यांनी भानुमार्फत उमर्ठीत पेढे वाटले. वाड्यावर जाताच पेढे काय झालं कुणास ठाऊक पण कडवट झाले.
बारा जूनला चारच्या सुमारास मृग मुसळधार कोसळला. काडकाडsss ,कडकड कानठळ्या बसवणारी घनगोफ, डोळे दिपवणारा लखलखाट करत उमर्ठी झोडपली जाऊ लागली. मळ्यातल्या झोपडीत बांधलेल्या म्हशी दुधासाठी गावातल्या खळ्यात घेऊन जातांनाच भानू मळ्यात अडकला. आसमंतातला सारा धुरळा क्षणात खाली बसत पाण्याचे लोट जिकडे तिकडे वाहू लागले. जांभुळबनातली जांभळाची व आमराईतली आंब्याची झाडं एकमेकाच्या झिंझ्या हालवत फांदीतून फासटली जाऊ लागली. शेंड्यावर हात न पुरणारी व उशीरानं लागलेली उरलेली जांभळं, चुकार कैऱ्या धटाधट तुटत पाटात शेतात उडत फेकल्या जाऊ लागल्या. केळीची पानं टर्रर्र...आवाज करत फाटू लागली. शांत निसर्गाचं रौद्र रूप पाहत भानू धावेवरच्या झोपडीत थांबला. तोच बाजुच्या केळबागेतून शेळींना हाकारत कुणीतरी येतांना त्याला दिसलं. भेदरलेल्या शेळ्या पाऊस व वाऱ्याच्या मारानं सैरावैरा पळत होत्या. त्याच्याच वयाची मुलगी त्या शेळ्यांना एकत्र करत पाटाच्या दिशेनं हाकारू पाहत होती. तोच दोन तीन शेळ्या विहीरीच्या धावेवरून झोपडीत घुसू लागल्या. मागोमाग ती मुलगी ही झोपडीजवळ आली. पूर्ण भिजलेली गोरीपान, कुरळे भुरे केस, घाऱ्या डोळ्याची तिची नजर भानूवर स्थिरावली.
झोपडीत अनोळखी भानूला पाहताच ती झोपडीच्या दारातच थबकली. हातातली आंब्याची काडी हालवत शेळ्यांना बाहेर निघण्यास चुचकारु लागली. पण थंड पाणी, गार वाऱ्यानं भेदरलेल्या शेळ्या बें बें करत बाहेर निघण्यास जणू विरोधच करत होत्या.
" कोण?" यापूर्वी कधीच गावात न पाहिलेल्या त्या मुलीस भांबावलेला भानू ओथंबलेल्या स्वरात अचानक विचारता झाला.
मुलीनं घाऱ्या डोळ्यानं रागानं पाहत थेट मध्ये घुसत शेळ्यांवर काडीनं वार करत आपला राग जतवत निघून गेली. भानूनंही मग पडत्या पावसात म्हशी सोडत पाठीवर रपाटा हाणत गावात खळ्याकडं पळवल्या.
शेळ्या काशी मामाच्या होत्या वाटतं पण मग ती मुलगी कोण? हा प्रश्न त्याच्या डोक्यात पावसासारखाच झोड उठवू लागला. तो काशी मामाकडं बऱ्याच वेळा जाई पण काशी मामा व मालू मामी शिवाय त्याला त्या घरात कुणीच आढळलं नव्हतं. मग काशी मामाच्या शेळ्या नेणारी ती कोण? हा प्रश्न मृगाच्या पाण्यात वाहत भिजवत राहिला.
सकाळी काल पडलेला पाऊस जमिनीत मुरला तसा तो सवाल ही विरला व तो कामात गुंग झाला. काशीमामाला विचारणं राहिलंच.
पंधरा जूनला शाळा उघडली. दहावीचं वर्ष म्हणून भानू पहिल्याच दिवशी हजर झाला. वर्गात प्रवेश करताच मुलींच्या रांगेत शेवटच्या बेंचवर त्याची नजर स्थिरावली. तेच घारे डोळे, कुरळे केस गालावर आता तर डिम्पल! नजरानजर होताच नजरा खाली भुई धुंडाळू लागल्या.
" भानुदास सदा देसले" जोशी सर दोनदा मोठ्यानं नाव पुकारत होते. भिंगाच्या चष्म्यातून मुलांच्या रांगेत भानूकडं तिरकं पाहत " भानू! लक्ष कुठंय तुझं?" जोरानं विचारू लागताच " येस...येस....स्सर.." भानूची भंबेरी उडाली.
तोच शब्बीर शिपायानं लि. स. आणत जोशी सरांना मुख्याध्यापकांचा निरोप दिला.
जोशी सरांनी लि. स. वर नजर फिरवत मस्टरवर शेवटी नाव लिहीत शब्बीरकडं लि.स. परत केलं.
" सुगंधा काशीनाथ पवार कोण?"
जोशी सरांनी वर्गावर नजर फेकत मोठ्यानं विचारलं.
तीच...काडी धरत शेळ्या हाकारणारी, भिजलेली ,झोपडीच्या दारात उभी असलेली व आता शेवटच्या बेंचवर बसलेली मुलगी उभी राहिली.
" मी सर ! सुगंधा काशीनाथ पवार!"
" नवीन प्रवेश ना? कुठून आलीस?" लि. स. वर शाळेचं नाव वाचुनही जोशी सरांनी खात्री साठी विचारलं.
" हंबर्डीहून! महात्मा गांधी विद्यालयातून!"
"ठिक आहे, बस खाली!"
भानूचा आपल्या कानावर विश्वास बसेना. ही काशी मामाची मुलगी? तो मागच्या वर्षांपासून रापल्या चेहऱ्याचा, पिकल्या केसाचा, दररोज थोडी फार गावठी मारणाऱ्या काशीमामास पाहत आलेला. बंकट बापू बरोबर बाजी मामाकडं राबणारा गरीब प्राणी! असल्या गरीब प्राण्याच्या खुराड्यात हे अनमोल रत्न? त्याचा विश्वास बसेना..
भाग::-- चौथा
एका महिन्यात किसान विद्यालयातील दहावीच्या वर्गात सुगंधानं आपली बुद्धिमत्तेची व वक्तृत्वाची चुणूक दाखवली. गेल्या वर्षी प्रथम क्रमांक आलेला भाना व दुसरा सुशांत सनेर यांचे कान खाडकन उघडत ते जमिनीवर आले. प्रत्येक तासाला विचारलेल्या सर्व प्रश्नाची उत्तरं सुगंधा हमखास देई. वर्गात या वर्षी बोर्डाच्या परीक्षेत प्रथम क्रमांकात चुरस असल्याची चर्चा होऊ लागली.
११ जुलै आंतरराष्ट्रीय साक्षरता दिवसाचा आज किसान विद्यालयात कार्यक्रम होता. प्रमुख पाहुणे म्हणून जिल्ह्यावरून निरंतरचे शिक्षणाधिकारी येणार होते. वक्तृत्व स्पर्धा होणार होत्या. विद्यालयात कुठलाही कार्यक्रम असला की विद्यार्थीच सुत्रसंचालन करत. सुगंधानं आधीच जोशी मॅडमांना भेटत सुत्रसंचलनासाठी नाव दिलं होत. सुगंधानं जोशी मॅडमकडून कोण कोण येणार, कुणाची भाषणं होणार अशी सर्व कार्यक्रम पत्रिका घेतली व ती तयारीला लागली.
निरंतन शिक्षणाच्या शिक्षणाधिकाऱ्यामार्फत प्रतिमा पुजन करवत सुगंधानं संचलनास सुरुवात केली. एका व्यवसायिक निवेदकास लाजवेल अशी शब्दफेक, माधवी आवाज व लाघवी शैली साऱ्यांना भुरळ घालू लागली. प्रसंगानुरूप सुभाषित, सुविचार, शेरोशायरी, आधीच्या बोलणाऱ्यांची अचूक टॅगलाईन पकडत ती अधोरेखित करणं यानं सर्वाचीच मनं सुगंधाने जिंकली. अध्यक्षीय भाषणात शिक्षणाधिकाऱ्यांनी तिचं खास कौतुक करत तिला पाचशे रुपयाचं बक्षीस दिलं. सुगंधा या एका कार्यक्रमानच विद्यालयात प्रत्येकाच्या ओळखीची झाली.
बंकट बापूनं आणखी म्हशी वाढवत एक जुनी मोटर सायकल घेत म्हशीचं दुध भडगावला पोहोचवू लागले. घरचं वीसेक लीटर व बाहेरचं असं मिळून कधी ते तर कधी भाना भडगावला हाॅटेलात दूध पोहोचवू लागले. शेतातलं काम, दूध पोहोचवणं, रात्री मंदिरात भजन किर्तन, वाचन यातच वेळ जाऊ लागला. वर्गात तर चुरस वाढलेली. तो रात्री बराच उशीरा जागत अभ्यासामागं खडबडून लागला.पावसाळा कुठं संपला त्याला कळलं ही नाही.
पाच सप्टेंबरला शाळेत शिक्षक दिन साजरा करण्यात आला. शाळेतील सर्व शिक्षकांच्या नावाच्या चिठ्ठ्या लिहून टेबलावरील खोक्यात ठेवण्यात आल्या .उत्सुक असणाऱ्या विद्यार्थ्यांनी जाऊन खोक्यातून चिठ्ठी उचलावी व निघालेल्या नावानुसार त्या त्या शिक्षकांचे अध्यापन करावं.
भानाचा नंबर आला. त्याला दहावी वर्गाचेच वर्गशिक्षक जोशी सरांची चिठ्ठी निघाली. एकेक जण येत चिठ्ठी काढू लागलं. सुगंधानंही चिठ्ठी उचलली. नेमकी जोशी मॅडमांची चिठ्ठी तिच्या वाट्याला आली. तिनं नाव उच्चारताच दहावीच्या रांगेत एकच हशा पिकला व जो तो भानास डिवचू लागला.
दिवसभर भानानं गणिताच्या तर सुगंधानं जोशी मॅडमांच्या इंग्रजीच्या तासिका घेतल्या. शेवटी समारोपाच्या कार्यक्रमात पटांगणावर खुर्च्या मांडत सर्व विद्यार्थी शिक्षक व शिक्षक बसले. प्रातिनिधिक प्रतिक्रिया व्यक्त झाल्या. आठवण म्हणून गावातील फोटोग्राफरनं ग्रुप फोटो काढला. फोटोसाठी सारे रांगेत उभे राहत पोज घेत असतांनाच सुशांत सनेर ऐनवेळी भानाजवळ येत " जोशीसर आज तरी जोशी मॅडमजवळ उभे रहा!" कानात पुटपुटला व हात धरत जोशी मॅडम बनलेल्या सुगंधाजवळ ढकललं. एकच हास्यकल्लोड मातला. त्या गडबडीत सुगंधावरच तोल जाऊ लागताच भानाचा हात तिच्या खांद्यावर पडला. फोटोग्राफरनं तोच क्षण क्लिक केला. खांद्यावर हात पडताच सुगंधानं रागानं घारी नजर वळवत सॅण्डलसहीत दाणकन भानाच्या पायावर पाय आपटला. सॅण्डलच्या टाचेचं टोक पायावर टोचताच भाना पाय धरत सुशांत मागं पळाला.
दुसऱ्या दिवशी भाना लंगडत लंगडतच शाळेत आला. लंगडणाऱ्या भानास वर्गात येताच सुगंधाकडं पाहत " हे जोशी सर आले रे उठा, गुड माॅर्निंग म्हणा!" मुलं एकसुरात ओरडले व पुन्हा वर्गात हास्याचे फवारे उडाले. सुगंधानं शरमेनं खाली मान घालत आपल्या नशीबात जोशी बाईंचीच चिठ्ठी का निघावी म्हणून नशिबाला दोष देऊ लागली. दोन तीन दिवसांनी फोटोग्राफर सर्व वैयक्तीक, सामुदायिक फोटो घेऊन आला. सुशांत सनेर, बाला शंकपाळ या आगावू कार्ट्यांनी सर्व फोटो ताब्यात घेत त्यांना हवा असलेला फोटो झामलू लागले. पण नको नको त्या चिमण्यांच्या अदाकारीचे फोटो असुनही भानानं खांद्यावर हात ठेवलेला फोटो सापडलाच नाही. त्यांचा हिरमोड झाला. त्यांनी सर्व फोटो पुढे पास करत फोटोग्राफरला गाठलं.पण फोटोग्राफरनं निर्वीकारपणे 'जेवढे होते तेवढे दिले' सांगत त्यांना कटवलं. सुगंधानं समाधानाचा सुस्कारा सोडला.
दिवाळी शेताच्या कामात गेली. भाना संगाच्या सासरी जात संगास दिवाळीसाठी मोटर सायकलवर घेऊन आला. रघू व तुळसा शाळेची सहल राजस्थानात जाणार असल्यानं आलेच नाही.
दुसऱ्या सत्रात प्रत्येक कार्यक्रमात जोशी मॅडम भाना व सुगंधास एकत्रीत सुत्रसंचलना ( अॅंकरींग) चं काम देऊ लागल्या. एका बाजूनं भाना समयोचीत अभंग, ओवी, श्लोक म्हणे तर लगेच दुसनऱ्या बाजूनं सुगंधाही शेर मारत कार्यक्रमात रंगत आणे. दोघांचं सुत्रसंचालन पहायला एक वेगळीच मजा येई.
पूर्व परीक्षा संपली. मुले रात्रंदिवस अभ्यासाला लागली. बंकट बापूनं भाना नाही म्हणत असतांनाही अकरावीतल्या रघूस पंधरावीस दिवस येत भानाचा अभ्यास घेण्यासाठी निरोप पाठवला. पण त्याच वेळी खास बाजी मामाच्या की तुळसाच्या सांगण्यावरुन रघू बोर्डींग वरुन तिच्या मामाच्या घरी मुक्कामाला राहू लागला. रात्रभर तो तुळसेची तयारी करुन घेऊ लागला. मामी बाराच्या सुमारास उठत दोघांना काॅफी करुन देई. मग पुन्हा रघू तिच्या कच्च्या घटकाची व हमखास पडणाऱ्या प्रश्नाची तयारी घेई. पहाटे पहाटे तिचा डोळा लागे. तरी रघूला तिच्यासाठी जागावं वाटे.
परीक्षा संपली. सुगंधाला पेपर चांगले गेले, तुळसाला रघूमुळे एकदम उत्कृष्ट गेले. भानूला कुणी विचारलं नसलं तरी भोसले ग्रंथपालानं घरी बोलवत गोड चहा पाजत पेपराची चौकशी केली. भानूला बंकट काकानंतर भोसले सरातच आज आपला सदा बाबा दिसू लागला.
" सर पेपर तर ठिक गेलेत; बघू आता पुढे काय होतंय!
सरांनी त्याला आता सुटीचं अवांतर वाचनासाठी पुस्तकांचा भला मोठा गठ्ठाच दिला. त्यात धार्मिक पुस्तकासोबत राजकीय व सामाजिक पुस्तकं ही होती.
" सर ही राजकीय पुस्तकं नकोय मला?" विनवत तो म्हणाला.
" भाना, शिक्षणासोबतच तुझं करीअर करायचं असेल तर ती नक्कीच उपयोगाची आहेत! नक्की वाच! तुझं करीअर सद्द्या किर्तनकार की निवेदक अशा दोरीवर झुलतंय! म्हणून पुढे जाऊन ती ही उपयोगात पडतील!" भोसले सर जास्त स्पष्टीकरण न देता बोलले.
रघू आला व त्यानं भानूच्या सर्व प्रश्नपत्रिका समोर घेत लिहीलेल्या ,
सोडवलेल्या प्रश्नांची विचारणा केली.
" भाना, बापू बोलवत असतांना मी आलो नाही! खरं सांगायचं तर तुला काय शिकवायचं याचीच मला भिती वाटते रे!"
" दादा, मैनेचे पेपर कसे गेले?" भानानं नेमक्या वर्मावरच बोट ठेवलं.
" बोललो ना मी तुला! तुझा सवालच माझ्या स्पष्टीकरणाचं अधिक तुष्टीकरण करुन गेला बघ! भाना मैना, साळुंख्यांनी उडून उडून किती ही गिल्ला केला तरी माझ्या भावाची गरुडझेप त्या रोखूच शकणार नाहीत!"
" दादा, तुझ्यावर किती ही संतापायचं ठरवलं तरी माणूस विरघळतोच! तु बोलतोच इतका गोड! थेट काळजालाच हात घालतो!"
दोन्ही भावांनी मिठी मारली.
रघू आमराईत बारावीच्या तयारीला लागला तर भानूनं राजकीय वाचनाचा झकूच लावला. स्वातंत्र्यानंतरचं भारतीय व जागतीक राजकारणासंदर्भात मिळेल ते तो झपाटल्यागत वाचू लागला. राज्यशास्त्र व प्रशासन ही हाताळू लागला.मध्यंतरी भोसले सर त्याला निवेदकाबाबतची पुस्तकं देऊ लागले.
एकदाचा निकाल लागला. बाजी मामाच्या वाड्यात आधी कळाला. तुळसाला एकोणनव्वद टक्के मिळाले. तदनंतर दूध टाकून मळ्यात गेलेल्या भानूला सुशांतने पळतच येत निकाल कळवला.
" जोशी सर पेढे काढा! तालुक्यात तुम्ही ग्रामीण भागात पहिले आलात! ब्याण्णव टक्क्यानं!"
" आणि......"
" जोशी मॅडमांना साडे नव्वद टक्के!"
" माकडा तुझा विचारतोय मी आधी?"
" भाना , अपेक्षेपेक्षा जास्त! पंच्याऐंशी टक्के पण मानांकन जोशी मॅडमामुळं एका क्रमांकानं घसरलं!" सुशांत हासतच बिलगत म्हणाला. मळ्यातल्या बापू व काशी मामास सुशांतनंच कळवलं. काशी मामास लेकीचा तर आनंद झालाच पण भानाचा जास्त आनंद झाला. बंकट बापूनं दुपारीच जळगावहून आलेल्या रघूस पेढे वाटायला लावले.
रात्री जेवतांना बंकट बापू
"अंजा! मंजा! माझ्या भानानं राघो कदमाचं नाव रोशन केलं. उमर्ठीतल्या राघो कदमांचा नातू भडगाव पेठेत पहिला आला! सदा.....तू पळून गेलास ! आज हवा होतास तू!" बंकट बापू भरल्या काळजानं गदगदत होता. पण मंजा....! मंजा आई तर आपल्याच शून्यात शून्य नजरेनं काही तरी न गवसणारं शोधत होती! न गवसणार केव्हा गवसणार होतं देव जाणे!
" तुळसा तू उगाच त्या रघ्याच्या नादी लागली! क्लास लावला असता तर नक्कीच त्या मंजीच्या कार्टूनला पछाडलं असतं! पण काही ही म्हण मंजीचं कार्टून हुन्नरी आहे! माकड मंदीरात गातं तेव्हा अख्ख्या गावात ऐकू येतं. खळ्यात पडल्या पडल्या ऐकल्यावर माणूस हरवून जातो! बघ अजुनही अकरावीला त्या कार्टुन सोबत येथेच प्रवेश घे! तो रघ्या त्या बंका दाजी व अंजा सारखाच नेभळट आहे!"
बाजी आपल्या नाराज पोरीला समजावत होता. पण तुळसा तर वेगळ्याच विश्वात गुंग होती.
तुळसानं रघासोबतच राहत जळगावला अकरावीत प्रवेश घेतला.
सुगंधा, भाना गावातच अकरावीत जाऊ लागले.
भानाला आता परीसरातील सप्ताह, किर्तन, प्रवचनात बोलवू लागले. तो ही मोटार सायकलवर कधी बापूस, कधी काशी मामास तर कधी गावातील भजनींना सोबत घेत जाई. किर्तनकार पाहून कधी कधी भोसले सरच स्वत:हून भानाबरोबर जात. भाना कधी पखवाज वाजत पदे म्हणी तर कधी हार्मोनियम वाजत पदे म्हणी. कधी कधी तर टाळकरी ही होई. नवीन काही तरी शिकण्याची उपजत उर्मी त्याच्यात होती. एक मात्र निश्चीत की पदे म्हणतांना किर्तनकाराचं अस्तित्वच तो विसरायला लावत आपलीच उपस्थिती उपस्थितांच्या काळजात अधोरेखीत करी. एकदा
असंच विदर्भातले नामवंत किर्तनकार जवळच्या गावात येणार होते. त्यांनी भोसले सरांशी परिचय असल्यानं तसं कळवलं. भोसले सरांनी बोलण्याच्या ओघात एक मिसरुड ही न फुटलेलं पोरगं कसं आहे हे पहायला नक्की यायला लावलं.
भोसले सर भानास घेऊन शेजारच्या गावी गेले.
किर्तनकार आले त्यांनी पाया पडत वीणा हातात घेतली. सेवेसाठी असलेला अभंग समजताच
टाळ घेतलेल्या भानानं अभंगाचा
पहिला चरण म्हणावयास सुरुवात केली व किर्तनकार जागेवरच स्थिर होत समाधी लागल्यागत ऐकू लागले. पुर्ण किर्तन होई पर्यंत अभंगाचा
कोणता चरण महाराज केव्हा सुरू करतील हे अचूक ओळखत नेहमीच्या पद म्हणणाऱ्यासही लाजवेल अशा रितीनं भानू गात साथ देत होता. उपस्थित लोक तर जणू किर्तनकाराच्या निरुपणापेक्षा पद ऐकायलाच अधिक उत्सुक होते. नावाजलेल्या किर्तनकारानं उभ्या महाराष्ट्रात फिरूनही असा अनुभव घेतला नव्हता.
किर्तन संपलं. महाराज भोसले सरांना भेटले.
"भोसले हे पोरगं कोण? कुण्या किर्तनकाराचं आहे का?"
" महाराज किर्तनकाराचं नाही, पण हयात नसलेला याचा बाप एक साधा वारकरी होता. मात्र या पोराच्या आजोबांना आपण ओळखता."
"कोण?" भुवया चढवत महाराजांनी विचारलं.
" राघो कदम! उमर्ठीकर!"
" तेच म्हणतोय मी! सिंहाच्या गुहेतलाच हा छावा असावा!" राघो कदमांनी ज्या संस्थांना दान दिलं होतं,त्यात महाराजांच्या वडीलांची एक संस्था लाभार्थी होती.
" भोसले! राघो कदमांचे आमच्यावर उपकार तर आहेतच. पण ते उपकार फेडण्यासाठी म्हटलं असतं तर बाजी कदम आज किर्तनकार राहिले असते. वारकरी संप्रदायात अंतरातली भक्ती व उपजत गुण महत्वाचे असतात.जे यात आहेत! एक दिवस हा महाराष्ट्रातील मोठा किर्तनकार बनल्याशिवाय राहणार नाही. जिथं उभा राहील तिथल्या सर्वांना फिकं करत तेजाळण्याची स्वयंस्फूर्ती यात आहे! यावर लक्ष ठेवा!"
" महाराज , आताशी शिकतोय तो!"
महाराजांनी भानाला बोलवत आपला पत्ता दिला. " तूर्तास शिक्षण महत्वाचं, ते आधी कर पोरा! जे लागलं ते कळवं! तुझ्या आजोबांमुळंच आम्हास आज सुखाचे दोन घास मिळताहेत! शिक्षणानंतर भेट मग काय नी कसं करावं ते ठरवू!"
भानानं होकार देत आशीर्वाद घेतला.
दिवाळीच्या सुट्टीत शेतातल्या कामाची लगबग सुरू झाली. ज्वारी, मका कापणी सुरू झाली. मजुराचा तुटवडा भासू लागल्यानं शाळकरी मुलांनांही उभं करण्यात येऊ लागलं.
बंकट बापुंनी ज्वारी काढण्यास सुरुवात केली. भाना ज्वारीच्या कणसाची ढाली घेऊ लागला. बैलगाडी भरली की विहीरीच्या धावेवर कणसं टाकू लागला. बाजी मामाच्या शेतात काशीमामाची, सुगंधाही आई सोबत कापूस वेचायला आली होती.
दुपारी कापूस वेचणारी माणसं विहीरीवर भाकरी खाण्यासाठी आली. भानाही कणसांनी भरलेली गाडी धावेवर उपसण्यासाठी आला. गाडी वर उचकवत पाणी पाजण्यासाठी बैलांची मुसकी काढली. भाकरी खाऊन माणसं कापूस वेचायला परतली. आईनं सुगंधास शेळ्यासाठी हिरवं गवत काढायला मागे थांबवलं. भानानं गाडीतली कणसं काढत गाडी सरळ केली तोवर बैलं पाणी पिऊन विहीरीला लागून उभ्या ज्वारीच्या शेतात घुसली. ज्वारीच्या ज्या धाट्यावरच्या कणसावर बैलानं तोंड टाकलं त्यावरच मोहोळ होतं. ते हालचालीनं उठलं व मधमाशा बैलावर तुटून पडल्या. बैल उधळला व विहीरीकडं पळत आला. माशाही घोंगावत चावू लागल्या. त्यानं बैल आणखीनच चेतावला. समोरून गवत काढणारी सुगंधा आडवी आली. भाना पळतच बैल धरायला धावला. हातात गवत असल्यानं सुगंधा विहीरीकडंच धावली. त्याच वेळी बैलानं तिला शिंगानं उचलत भिरकावलं. सुगंधा हवेतूनच विहीरीत धप्पकन पडली. जात्या पावसाळ्यात विहीर तुडूंब भरलेली. सुगंधा गटांगळ्या खाऊ लागली. ज्वारी कापणारी माणसं दुसऱ्या बांधाकडं होती. कापूस वेचणारी ही लांब. भानानं आरोळ्या मारल्या व सरळ विहीरीत उडी मारली. भानाच्या आरोळ्या व उधळलेला बैल पाहत माणसं धावू लागली. तो पावेतो सुगंधा वरून खाली, खालून वर व पुन्हा खाली गेली होती. भानानं दुरुनच तिच्या सोनेरी केसांना पकडलं व वर आणलं. पाण्यावर तोंड येताच ती श्वास सोडत भेदरली व भानाला गट्ट बिलगू लागली. भानानं तिला बिलगूच दिलं नाही. ही बिलगली तर आपल्यालाही बुडवेल म्हणून त्यानं केसांनाच धरत हळूच विहीरीच्या काठास लावू लागला पण घाबरलेल्या सुगंधानं त्याच्या मानेला विळखा घातलाच. सावध भानूनं हळूच काठाचा आधार घेतला. तोवर धावतच तीन चार माणसं आली. वरुन दोर सोडला व दोघांना बाहेर काढलं. बाहेर येतांना दोघांच्या श्वासात सुरमयी लय बांधली जात होती व त्यात वेगळाच रान बहरी गंध मिसळत होता. बाहेर येताच घाबरलेली सुगंधा वाघीण झाली. सुगंधाला पाणी काढायची बादली दिसली.तिनं संतापानं उचलत अंगातली सर्व शक्ती एकवटून अचानक भानावर फेकली.
" मेल्या कुत्र्या, भान्या! बैल सांभाळता येत नाही!" शिव्याची लाखोली वाहत धावत आलेल्या वडीलांना बिलगत लहान पोरीगत रडू लागली. भानाची काहीच चूक नव्हती हे तिला ही कळालं होतं. पण एकाच दोराला धरत यानं पूर्ण भिजलेल्या आपणास सर्वांसमोर वर काढलं या तारुण्यसुलभ लाजऱ्या भितीनंच तिनं बादली फेकून मारली. बादलीनं भानाच्या कपाळाचा वेध घेत खोक पाडली. रक्ताची चिरकांडी उडाली सारे जण हसू दाबत भानाचं कपाळ दाबू लागली. एकानं घावपाला चुरगाळत घट्ट पट्टी बांधली. सुगंधा ओल्या कपड्यानंच सरळ घरी निघाली.
त्यानंतर सुटीनंतरच वर्गात दोघांची भेट झाली. घरी तिला आई व वडील दोघे 'तू कारण नसतांना भानास बादली मारली!' म्हणून बोलत होते. त्यावेळेस ती खाली मान घालत विहीरीतलं छातीस घट्ट बिलगल्याचं दृश्य आठवत भानास मनातल्या मनात शिव्या देत होती. पण वर्गात बेंचवर बसताच तिच्या घाऱ्या नजरेनं गुपचूप तिरकं पाहत वेध घेतला. कपाळावर जखमेचा व्रण सावळत होता. तिला ते पाहून मनात कालवा कालव झाली. जाऊन माफी मागावी असं तिच्या मनात आलं व ती उठलीही. पण तेवढ्यात सुशांत सनेर तिच्याकडं पाहत जोरात ओरडला
" अय बाला! ते टेबलावरचं डस्टर लपव बाबा! ऑफ पिरीयडला जोशी मॅडम येणार आहेत व त्यांचा संताप खूप विचीत्र आहे.त्या थेट कपाळावर डस्टर मारुन फेकतील!" ती जागेवरच थबकली व थरथरत बसली.
तिकडं भाना सुशांतची गचांडी धरत हसतच त्याचं तोंड दाबत खाली बसवत होता!
" जोशी सर आता तरी सुधरा! उगाच कुणाला वाचवायच्या फंद्यात पडणं सोडा!" सुशांत हसत हसत टोमणे मारतच होता.
रघूनं बारावीतही घवघवीत यश मिळवलं. त्याला पुढे खूप शिकायची इच्छा असुनही बापूचं, आईचं व भानाचं राबणं त्याला दिसू लागलं. आपण ग्रॅज्युएशनच्या फंदात पडलो तर घरच्यांवर पडणारा ताण लांबतच जाईल. म्हणून त्यानं थोडक्यात डि. एड करायचं ठरवलं. जळगावला त्याचा डि. एडला नंबर लागला ही.
सुगंधा, भाना व तुळसा यांचं हे महत्वाचं वर्ष. भाना व सुगंधा काॅलेजच्या प्रत्येक कार्यक्रमात सुत्रसंचालन करतच होते. मध्यंतरी गावात एका राजकीय पक्षाची जंगी सभा होती. संस्था त्याच पक्षाची असल्यानं सरांनी सुगंधा व भानालाच सर्व सुत्रे सोपवली.
" सर ! शैक्षणिक कार्यक्रम वेगळा व या कार्यक्रमाचं स्वरूप वेगळं! आम्हास नाही जमणार! कोण पाहुणा कुठला? त्याचा हुद्दा काय हे ही माहीत नाही! उगाच गोंधळ होईल!".
" भाना, आम्हास जमणार नाही असं नको म्हणू! तुझं सांग फक्त! हवं तर ती सुगंधा एकटी सांभाळेन सगळं!"
भानानं सुगंधाकडं पाहीलं. त्याला वाटलं ती ही नकार देईल. पण ती शांत उभी होती. तिचं शांत असणं हाच होकार होता. त्याचा ही इगो हर्ट झाला.
" ठिक आहे सर; मग तर मी ही करतो प्रयत्न!"
भानानं सभेचं प्रयोजन, कोण कोण येणार, त्यांची राजकीय पार्श्वभूमी जाणून घेतली. सभेत कोण कोण संबोधीत करणार सर्व माहिती मिळवली.
सभा विठ्ठल मंदीराच्या आवारातच होती. सारा गाव गोळा झाला होता. विशेष बाजी मामा ही हजर होता. जिल्ह्यातील नेते उपस्थीत होत होते.
सुगंधाची काम करण्याची पद्धतच वेगळी होती. ती कुठलाही गवगवा न करता तिला हवी ती माहिती गोळा करी. आताही तसंच झालं होतं. सोबत कोण असो नसो तिला काहीच फरक पडत नसे. भानानं नेहमीचा धार्मिक ट्रेंड बदलत ऐतिहासिक राजकीय दाखले देत कोट्या करत सुरुवात केली. सुगंधानं शांत सयंत अदबीनं कसलेल्या घरंदाज नारीचं रूप घेत सुरुवात केली. कुठलाच उच्छंखलपणा नाही, सयंम ठेवत. तिला बोलतांना पाहून या मुलीत दुनियेचं शहाणपण कुठून आलं असावं! काशी मामा व मामी तर अंगठे बहाद्दर. फक्त हिचा हंबर्डीचा मामा शिक्षक. घरात कुठलंच वातावरण नसतांना इतकं हुशार कोण असूच कसं शकतं!
तोच त्याची टर्न आली. तो एकदम गडबडला. त्यानं कशीबशी बाजू सावरली.
त्याच वेळी सुगंधा त्याच्या कपाळावरील व्रणाकडं पाहू लागली. मनात एक दुखरी कळ उमटली. चंद्रास नाहक डाग लावण्यास आपण जबाबदार आहोत याचं तिला वाईट वाटलं.
दोघांमुळे सभा एकदम उठावदार झाल्यानं प्रत्येक राजकीय नेत्याच्या नजरेत ही जोडी भरली. कुठला ही कार्यक्रम असला की यांनाच बोलवू असं जो तो मनात म्हणू लागला.
बाजीनं भानूचं बोलणं ऐकलं व तो गारच झाला. घरी परतल्यावर रात्रीला झोपच येईना. या कार्टूनचा वेळीच बंदोबस्त केला नाही तर हा पुढे जाऊन डोईजड होईल हे त्यांनी ओळखलं. त्यांना आपल्या बापाचं सांगणं आठवलं.
" बाजी पोरा तुला सावंताचं कदम व्हावंच लागेल! आपल्या काकाचा बदला घेण्यासाठी!"
.
.
बाजीला सारं आठवू लागलं.
पार्वतामावशी लग्नाची झाली तशी काकांनी वडीलांकडे लग्नाबाबत विषय काढला. पार्वतामावशी ही लळींगहून सटाण्याला बऱ्याचदा यायची . काका व तिच्या लग्नाचं जवळपास निश्चीत झालं. लहान बहिणीलाच जाऊ करण्याचं आईनं माहेरी कळवलंही. पण त्याच वेळी राघो कदमांकडची मागणी आली व आजोबांनी दुजवर कदमांचं ऐश्वर्य पाहून मावशीस उमर्ठीतल्या कदमांना द्यायचं ठरवलं. पार्वता मावशीनंही राघो कदमांना पसंती देत काकास ( बहिणीच्या दिरास) नाकारलं. काकांना नकार जड गेला. लळींगला आलेले काका सटाण्याला परतलेच नाही. लळींग घाटातच त्यांनी ट्रकखाली उडी घेतली. काकांच्या कोथळ्यास अग्नीडाग देतांनाच वडिलांनी साली व भाऊच्या लग्नाआड येणाऱ्या कदमांचा बदला घेण्याचं ठरवलं.
पार्वतामावशीला मुल न होणं वडिलांना फावलं.
मावशीच्या नावावर जमीन होताच दोन प्रयत्न फसले. नंतर मंदिराच्या प्राण प्रतिष्ठेला आपण आलो. वडिलांनी सांगितल्या प्रमाणं भंडाऱ्याच्या रात्रीच राघो कदमाच्या जेवणाच्या ताटात उशीरा असर करणारं औषध व झोपेच्या गोळ्या टाकल्या. दिवसभराची दगदग म्हणून राघो कदम लवकर झोपले असंच सर्व पाहुण्यांना वाटलं. त्या रात्री हळूहळू गोळ्या व औषधानं असर केलाच. लोकांना वाटलं सारं यथासांग पार
पाडत राघो कदम गेले. पण काकांचा बदला घेण्यासाठीच कदमांना आऊट केलं. पुढे वडिलांच्या अंदाजाप्रमाणं मावशीनं आपणास दत्तक घेतलंच.
कदमाचाच वंश असलेल्या मुलींना लग्नात मदत न करता गरिबीच्या नरकात ढकललं. गावकऱ्यांचा व पोलीसांचा दबाव ,तसंच मोठी अंजा ही रखमा मावशी सारखीच सोशीक म्हणून तिला महामुश्किलानं आश्रय दिला. बंका तर आपल्याच शेतात सालदारागत राबतोय! पण खरा धोका मंजापासुन होता. कारण ती राघो कदमावरच गेलीय! राघो कदमाचे हुबे हुब गुण तिच्यात आहेत. म्हणून ती व तिचा नवरा उमर्ठीत येणार नाहीत यावर लक्ष ठेवलं. सदा ही तसा वारकरीच. पण तरी धोका नको म्हणून भाजला पोलवरच बोंबलासारखा! ते ही दुरुनच अंग शेकत! हाक ना बोंब! मंजा ठार वेडी झाली. निवांत श्वास सोडला. म्हणून तर त्या दोघांना बंकटला आणू दिलं उमर्ठीत. पण मंजीचं हे कार्टून आईवर जात आईकडून आजोबांचे गुण घेऊन आला. याचाच खरा धोका आहे. आज सभेत बोलतांना पाहिलं व राघो कदमांचीच आठवण आली. लहानपणी मावशी सोबत यायचो तेव्हा पाहत आलेलो! अरे मावशीचं राहिलंच! मावशी ही पीर पीर लावत होतीच. तिलाही तसंच राघो कदमाचा फंडा वापरत पाठवलं. पण आता तसलं काही करणं धोक्याचं होईल. त्यापेक्षा वडिलांची खुमखुमी आपल्यात उतरली. तशीच आपली खुमखुमी आपल्या तुलसेत न शिकवता, न सांगता उतरलीय! त्या खुमखुमीचाच वापर करत राघो कदमाच्या वारसांचा या बाजी सावंताची तुळसा गेम करेलच!
सारं आठवता आठवता बाजीच्या चेहऱ्यावर अंगार फुलला. तो अंगार मुखावर तसाच झळकू देत ते झोपले.
.
.
क्रमश