हिरवा चुडा -भाग ::-- पहिला
दिडच्या सुमारास बंकटराव व अंजाबाई हेरगाव फाट्यावर उतरले. तीन चार मैलाची पायपीट करत पुढे त्यांना गाव गाठायचं होतं. तापलेला चैत त्यात आजुबाजूचा ओसाड व डोंगराळ भाग यानं त्यांच्या घशाला कोरड पडली होती. उन्हाळी वाहणारे वारे ,दूर दूर हिरवळीचा मागमूस नाही, जिकडे तिकडे बरडच बरड व दगडंच दगडं. मध्ये मध्ये कुठंतरी शेरीची( थोरे) झाडं समाधीस्थ झाल्यागत उभी होती. एक भकास वातावरण चहूकडे दाटलं होतं. मृगजळ आवाज करत वाहत असल्याचं जाणवत होतं. तापलेला लाल फफुटा चपलांच्या पट्ट्यात घुसत चटके देत होता. चुकार एखादी घार, गिधाड आकाशात सुनी भटकतांना दिसत होती. कदाचित मनातल्या भावनांचाही परिणाम होत असावा असा विचार करत बंकट बापू रस्ता कापत होते पण गाव येण्याचं नाव घेईना. त्यांच्या मनात विचाराचं काहूर उठलं. इथून परतून पंधरा वीस दिवस होत नाही तोच गंगा मावशीनं पत्र पाठवून बोलावलं होतं.
सदा जाऊन सहा महिने झाले होते. मंजा तर ठार वेडीच झाली होती. म्हातारी गंगा मावशी जाणाऱ्या काळजाच्या तुकड्याला विसरत वेडसर सून व लहानग्या नातूस सांभाळत होती. तसं बंकट बापूही सहा महिन्यांपासून सर्वतोपरी मदत करतच होता. पण आभाळ फाटलं की जवळची ही दूर होतात. तिथं कुणाचे दिर व कुणाचे जेठ! कदाचित म्हणूनच गंगा मावशीनं बोलवलं असावं,असा विचार करत बंकट बापू खुर्दाणं जवळ करत होते.
सदा हा त्यांचा साडू. विद्युत मंडळात तीन वर्षापुर्वीच वायरमन म्हणून लागलेला. आधी वायरमनच्या हाताखाली किरकोळ कामं करी. वय झालेला वायरमन पोलवर चढण्या उतरण्याचा कंटाळा करी वा पाण्या पावसात फिरण्याचा कंटाळा करी म्हणून वायरमन सोबत राहत सदा काम करत आलेला.कधी पोलवर चढ, फाॅल्ट काढ, अंधारी उजेडी जात लाईन सुरळीत कर अशी कामं तो करी. त्याचच फळ म्हणून त्याला वायरमन व साहेबांच्या ओळखीनं वायरमन म्हणून नोकरीही मिळाली होती. वारकरी संप्रदायात वावरणारा सदा कष्टाळू व हुशार होता. प्रचंड वाचन, भक्ती मार्गाची आवड होती म्हणून प्रत्येकास तो आवडे. गंगा मावशीस व मंजास सुखाची चाहूल लागता लागताच नियतीनं फासे पालटवले.
परतीच्या पावसानं वादळ वाऱ्यासहीत खुर्दाणे परिसराला झोडपलं. विजेच्या तारा तुटल्या, खांब वाकले, काही वाकून पडले. जबर नुकसान झालं. तयार पिके जमिनीवर लोळली. रात्रभरच्या थैमानानंतर सकाळी सर्व वायरमन शिवारात फिरत तारा जोडू लागले. पोल गाडू लागले. दोन दिवस खपून पोल गाडत काही भाग सुरू झाला. सायंकाळी शेवटचाच भाग बाकी असतांना बाकी परतले . सदा एकाच्या साथीनं उर्वरीत काम आटोपू लागला. सूर्य मावळतीकडं झुकू लागतांनाच सदा पोलवर चढत काम उरकत होता. तोच काय झालं काही कळायच्या आत बंद केलेली लाईट आली व क्षणात....क्षणात काही कळायच्या आत...सदाचा खेळ खल्लास.....शिजून वरुन खाली पडलेला सदा अवघ्या काही मिनीटात होत्याचा नव्हता झाला. खालच्या माणसानं जिवाचा आकांत करत चिखल, डबके तुडवत रान डोक्यावर घेत मदतीला बोलवू लागला. पण व्यर्थ. लाईट नेमकी कुणी सोडली वा कशी आली या नंतरच्या चौकशीत बरच काही उघड झालं ,दाबलं गेलं. कुणी म्हणालं कुणाची तरी अदावत असेल ती नडली सदाला. पण सदा पापभिरू माणूस.कुणालाच त्याचं वावडं नव्हतं. मग कुणी म्हणालं कुणाची नजरचूक नडली असावी.पण मंजीचं कपाळ मात्र कायमस्वरुपी सुनं झालं. चौदा पंधरा वर्षाचा भानू पोरका झाला.
गाव आलं तसा बंकट बापू भानावर आला. गावात प्रवेश करताच मराठी शाळा लागली. शाळेला आज सुट्टी असावी बहुतेक. साऱ्या आवारात पत्त्याचे डाव रंगले होते. लिंबाच्या झाडाखाली पत्ते कुटणारे पत्त्यात दंग होते तर लहानी पोरंही तिथंच खेळत होती. खेळणाऱ्या पोराकडं पाहत शाळेच्या ओट्यावर बसलेला भानू नजरेला पडताच बंकट बापूनं त्याला हाकारलं.मावशी व काकास पाहताच भानू पळतच आला.
" मावशी!, काका!" करत करत मावशीस बिलगला. अंजा मावशीनं रस्त्यातच त्याचे पटापट मुके घेतले व गोंजारलं. पोराची गेलेली रया पाहून दोघांच्या डोळ्यांना धारी लागल्या. भानूची गत पाहून 'घराचा खांब मोडला की उभं घरच ढासळतं' याची दोघांना प्रचिती आली.भानूनं बापूच्या हातातील पिशवी घेतली व तो आनंदानं घराकडं निघाला. पायऱ्या चढताच ओसरीवरील सदाचा फोटो पाहून बापूला पुन्हा गलबलून आलं. घरात विस्कटलेल्या केसांची मंजा चाहूलीनं उठून बसली. बहिणीला पाहताच अंजाबाईही हंबरली. सहा महिन्यांत घराचं सारं चित्रच बदललं होतं. गंगा मावशीचं आधीच वय झालेलं तरी ती कशीबशी रांधत दोघांना खाऊ घालत होती. मंजा तर जागच्या जागी बसुन राही. बसुन बसुन कंटाळा आला की तिथेच झोपे.
पिशवीतला वस्तू चाफलत भानुनं काकानं आणलेला खाऊचा पुडा सोडून खायला सुरुवात केलेली.
गंगा आत्या चुल पेटवायला लागली. सकाळचे उपाशीच निघाले असतील म्हणून रांधायची तयारी करू लागताच अंजाबाई बहिणीजवळून उठली व स्वयंपाकास लागली. भाकऱ्या थोपटत मठाच्या वड्या केल्या. साऱ्यांना वाढत जेवणं उरकली.
" बापू, काही ही कर बाबा ,पण माझ्या नातवास व सुनेस सोबत ने! या देहाचा आता भरवसा नाही! सदा गेला व या देहासही वेध लागले.पोटचा गोळा जाण्याचं काय दु:खं असतं ते मलाच माहीत पण माझ्यानंतर तरी यांचे हाल नको म्हणून डोळे मिटण्या आधी यांची सोय व्हावी यासाठीच बोलवलंय तुम्हाला!"
बापू व मंजाबाईस याची कल्पना आली होतीच. पण उमर्ठीतही आपण यांना नेलं तर बाजी खुश होईल असं नव्हतं. शिवाय जवान सालीस नेण्याविषयी सदाच्या भावांना कसं विचारायचं हा प्रश्नही बापु पुढं होता. पण इथलं ह्रदयद्रावक दृश्य व हलाखी पाहून उमर्ठीतल्या बाजीला आपण पाहून घेऊ, असं बापूनं ठरवलं.
" मावशी, मंजा व भानू आम्हास जड नाही .पण गणाजी व सुभाण यांचा सल्ला ही घ्यावा लागेल?"
" बापू, कसला सल्ला? नी कोण गणा, कोण सुभाण! म्हणायला ती ही माझीच मुलं.पण तरणा भाऊ गेल्यावरही जी त्याच्या मुलाकडं ढुंकून पहायला राजी नाही.ती काय वागतील ? मी सारासार विचार करुनच सांगतेय यांना आता इथं कोणीच वाली नाही."
" मावशे, तसं असेल तर मंजाची चार बिघे जमीन आहेच आमच्याकडं. वागू आम्ही त्यांना! उद्याच नेतो सोबत हवं तर!".
संध्याकाळी बापू सुभाण व गणाजीस भेटले.
" गणा तात्या! भानू व मंजास नेऊ का उमर्ठीला?"
" तेच बरं होईल. त्यांची जमीन नाही तरी तुच खेडतोय व खातोय कित्येक वर्षांपासून!" गणाजी तुरसटपणे बोलले.
बंकट बापूस हे ऐकताच वेदना उठल्या. पुतण्या व भावजईस वागणं दूरच, वरुन या डागण्या! पण त्यांना विचारुन खात्री करायची होती म्हणून होकार मिळताच ते उठले. मंजाची जमीन आपण खातोय हेच यांना म्हणायचं होतं पण आपण स्वत: राबत त्यातलं उत्पन्न सदास देत होतो हे यांना सांगून ही कळणार नाही. म्हणून त्यांनी तिकडं दुर्लक्ष करत घरी येत अंजास सर्व सामान बांधावयास लावलं. मावशीच्या गावास जातोय हे कळताच भानूही सामान भरु लागला. सर्वात आधी त्यानं खताच्या पिशवीत पुस्तकं भरायला सुरुवात केली. बापू त्याच्याकडं पाहू लागले. सदाला वाचनाचा छंद असल्यानं तुकारामाची गाथा, ज्ञानेश्वरी, भागवत, पुराणं, रामायण, महाभारत असे जाडजूड ग्रंथ होते. भानू तेच भरत होता.
" भानू, तो पसारा कशाला घेतो! त्याचा काय उपयोग आता?" बंकट बापू ओझं व लगेज वाढेल म्हणून सांगू लागले.
" बापू, भानूला सदा दुसरं काही नाही पण ते मात्र टाकून गेला बघ! बापाप्रमाणेच यालाही आवड आहे.आतापासुनच त्यातले अभंग, ओव्या, श्लोक, भारुडं पाठ आहेत त्याची! म्हणून ते नेऊ देत त्याला! ते वाचून तरी कोणी सांगावं बापाचा वारसा तरी चालवेल तो!" गंगाबाई बोलल्या.
सारी आवरासावर झाल्यावर अंगणात खाट टाकत भानूस घेत बापू लवंडले.
दुसऱ्या दिवशी भल्या पहाटे उठत अंजाबाईनं मंजास स्वच्छ अंग घासत अंघोळ घातली. केसाच्या बटा मोडत केस धुतले. भानुचीही अंघोळ घातली.
सामानाची गाठोडी घेत सकाळच्या गाडीनं ते निघण्यासाठी ओटा उतरू लागले. सदाच्या फोटोकडे पाहताच बापू बिथरले. जणू काही सदास मागे टाकून आपण त्याचा कबिला नेतोय याची अंतरात कळ उठली.गाडी निघताच मागं पडणाऱ्या गावाकडं व भानुकडं पाहत बापूस पुन्हा भरून आलं. लग्न झाल्यानंतर सुरुवातीस आपण सदाला किती वेळा विनवलं होतं की 'सदा इथं ही राबतोय तर चल उमर्ठीत! आठ बिघ्यातली चार बिघे जमीन तुझी घे व तिथंच राब!' पण प्रत्येक वेळी सदा 'बापू जमीन कुठं पळून चाललीय,येऊ कधी तरी! तूर्तास तुम्ही राबत आयतं आम्हास देत आहात हे काय कमी आहे का' म्हणे व यायचं टाळे. खरच जमीन कुठंच पळून गेली नाही सदा. पण तू मात्र पळून गेलास. मंजीस ना गाव सुटतंय याचं दुःख ना जमीन मिळेल याचा आनंद! नादान भानूला आताशी समज येतेय तोच हे दु:खं! खुशीनं गाव सोडणं वेगळं! नी परिस्थितीमुळं लाचार होतं गाव सोडणं वेगळं! बापूंचा कंठ दाटला.
" बापू, आता परत केव्हा यायचं आपण?" मागे पडणाऱ्या गावाकडं खिडकीतून पाहत बाळबोधपणे भानू विचारू लागला.
बापूनं त्यास कवेत घेत मांडीवर बसवत गळ्यापर्यंत आलेला हुंदका गिळला.
"भानू बेटा, या गावातला तुझा शेर संपला! माणसानं जिथं जायचं तिथं आपला गाव निर्माण करावा! तुला ही आता तुझा स्वत:चा गाव निर्माण करायचाय!" पण भानूला बरंचसं न कळाल्यानं तो खिडकीतून बाहेर पाहू लागला. साक्री, धुळं, पारोळा करत ते सायंकाळ पर्यंत भडगाव तालुक्यातल्या उमर्ठीत पोहोचले.
मंजास घेऊन आल्याचं कळताच बाजी व पारुबाईच्या कपाळावर आठ्या पसरल्या. दुसऱ्या दिवशी
बंकट बापू खळ्यात चारापाणी करत असतांना उद्रेक झालाच.
" काश्या, या रिकामट्या ढोरांना हाकल रे! फुकटाची कुणाच्याही गव्हाणीतली वैरण खातांना यांना काहीच लाज वाटत नाही!"
काशी गड्याला समजेना मालक बाजीदादा कोणत्या ढोरांना हाकलायला लावत आहेत. तो गांगरला.
" बंका बापू! बाजी दादा कुणास बोलतोय?"
" काशी, दुर्लक्ष कर व त्या घोड्यास हरबऱ्याच्या चंदीचा तोबरा चढव, तुला नाही कळायचं ते!" बंकट बापू हातातली कामं आटोपत उरातला कढ दाबत समजावू लागले.
मंजाबाई माहेरात आली तरी तिच्या वेडपट पणात काडीचा फरक पडला नाही. अंजाबाईस तिनं घरातली कामं तरी केली तरी पुष्कळ होतं. पण मंजा एका शून्य विश्वात पाहत कोपरा धरत बसुन राही. अंजाबाई व बंकट बापुंचा दिवस भल्या पहाटेच सुरू होई. बाजी दादांच्या मळ्यात राबणं एवढंच त्यांना माहीत. बदल्यात रोजगारासोबत त्यांना स्वत:ची आठ बिघे जमीन खेडता येई. बाजी दादाच्याच विहीरीचं पाणी व औत मिळे. बंकट बापू सालगड्यागत राबे.
भानूला उमर्ठीतल्या हायस्कुलात आठवीला घातलं. पण नावाला बसू देत जूनमध्येच त्याचा दाखला आल्यावर नाव पडणार होतं. सकाळ सत्राची शाळा करून तो अंजना मावशीची मुलगी संगासोबत मळ्यात जाई.
गावाच्या पश्चिमेला एक दोन नंबर ओलांडून गिरणेचा पाट लागे. तो ओलांडला की लगेच बाजी मामाचा काळजाचा ठावागत मळा लागे.
गावालगत जळगावला वकीली करणाऱ्या काळू पाटलाचा मळा होता. त्यानंतर गिरणेचा पाट. काळू पाटलाच्या मळ्यात पाटालगतच्या बांधावर हारीनं जांभळाची पंचवीस-तीस झाडं होती. म्हणून यास पाटलाचं जांभूळबन म्हणत. जांभुळबन ओलांडताच पाटालगत जांभूळबनास समांतर बाजीमामाची आमराई लागे. पाटाच्या एका बाजूस जांभूळ बन तर दुसऱ्या बाजुस आमराई.
भानू मळ्यात जातांना देहभान हरपून याकडं पाही. लहानपणी तो यायचा पण दोन तीन दिवसच. आता मात्र गेल्या पंधरा दिवसात या मळ्यातल्या वातावरणात तो हरखूनच गेला.
जांभळावर हिरवे हिरवे छोटे गुच्छ लगडत होते. तर दुसऱ्या बाजुस आमराईत मोहोरात कैऱ्या झुलत होत्या. कोकीळांचा, पोपटाचा नुसता हुल्लड चाललेला असायचा. खालून तुडुंब भरलेला पाट निवळशंख पाण्यानं वाहत राही. मध्येच वाऱ्यानं वा पोपटांनी तोडलेली कैरी वा कच्चं जांभूळ डुबूक आवाज करत पडे. ते दृश्य पाहत तो तासन् तास उभा राही.
पाटाच्या पाण्यानं उन्हाळी बाजरी, भुईमूग, मका शेतात लहऱ्या घेई. कुठे गहू पक्वं होतं कापणीला आलेला. कायमस्वरुपी चालणाऱ्या विहीरीवर केळी, पेरू, लिंबूच्या बागा होत्या. अमळनेर,जळगाव,भडगाव पेठेत इथल्या आंबा, पेरू, लिंबू केळींना विशेष उठाव असे.
बंकट बापू, मावशी व बहिण संगी सोबत भानू हळूहळू मळ्यात, खळ्यात रमला व रमता रमता कामं ही शिकू लागला.माणसाच्या भाकऱ्या घेऊन जाणं, दुपारी औताची बैलं पाजणं, पाटात धुणं, चारणं ,खळ्यात झाड लोट करणं, दुधाची धार काढणं, दूध मोजायला जाणं ही कामं बंकट बापू त्याला हळूहळू शिकवत त्याच्या अंगवळणी पाडू लागले. पण त्यात
बाजी मामाची धारधार नजर त्याला कायम भितीदायक वाटे. आमराईत,मळ्यात, खळ्यात बाजी मामा समोर आला की नजरेची खडी त्याची भंबेरी उडवे.
" मावशी! बाजी मामा, पारू मामी अशी रागानं का पाहतात गं?" रात्री झोपतांना भानूनं विचारलं.
मावशीनं त्याला जवळ घेतलं.
" भानू ,त्यांची प्रेम करण्याची रीतच तशी आहे बाळा! आपण आपलं काम करत राहायचं बस! तू फक्त राबत राबत भरपूर शिक! मोठा हो! आणि आता लवकरच सुटीत आपला रघूदादाही येईल बघ!" मावशी समजावू लागली.
भानूचं समाधान झालं नाही पण जळगावला शिकणारा रघू दादा येणार हे ऐकताच तो खुलला .
रात्री अंजाबाईचा डोळा लागेना. त्यांना बाजीच्या नजरेच्या खडीत राघो कदम, पार्वताबाई,रखमाबाई आठवू लागली.
क्रमशः...
भाग ::-- दुसरा
राघो कदम उमर्ठीतली बडी असामी. कदमाच्या आमराईतल्या कैऱ्या, आंबे, बागातील केळी, लिंबू, पेरु भडगाव पेठेत प्रसिद्ध. उमर्ठीचे 'राघो कदम' म्हणून भडगाव पेठेत दरारा. अंगणात घोडागाडी ( टांगा) उभा राहिला की पायात करकर वाजणारे वाजणारे बूट, सोन्याची बटणं असलेला सदरा व डोक्यावर पगडी चढवत राघो कदमांची स्वारी रुबाबात निघे. पण सारं ऐश्वर्य असुनही राघो कदमांना एक बोचरी सल सलत होती. मूलबाळ होत नसलेल्या रखमाबाईस बऱ्याच वर्षांनंतर दोन मुली झाल्या. पण कदमांच्या वाड्यास हवा असलेला कुलदिपक होईना. मुलीनंतर राघो कदम बिथरले. त्यांनी रखमाबाईच्या परवानगीने दुसरं लग्न करण्याचं ठरवलं. रखमाबाई व्यथीत झाल्या. राघो कदमापुढे अवाक्षर बोलण्याची हिम्मत नाही.लळींग परगण्यातली दुरच्या नात्यातल्या पार्वतीबाईस पसंत करत राघो कदमांनी दुसरं लग्न केलं.
वयानं बरीच लहान असलेली सवत घरात आली नी रखमाबाईनं दोन्ही पोरींना घेत माहेरची वाट धरली. माहेरी असलेला एकटा भाऊ चिंधाची परिस्थीती अतिशय बिकट. पण तरी रखमाबाई पोरींना घेत तिथंच राहू लागल्या. भावास वाटलं दोन दिवसाचा राग मावळेल व आपली आक्का परतेल.
राघो कदम सासरवाडीत कधीच पाय ठेवत नसत. त्यांनी उमर्ठीतल्या आपल्या मर्जीच्या माणसांना पाठवत रखमाबाईला मनवायला लावलं. पण रखमाबाई परतल्या नाहीत.
दिवसाचे महिने गेले व साल संपलं.
राघो कदम कळवळले व नाक धरुन चिंधाकडं खिरणीत आले.
रखमा दारा आडून ओसरीत येईना.
" रखमे! काय लावलं हे? तू परवानगी दिली म्हणूनच दुसरा घरोबा केला ना! मग मनात एवढा राग का?"
" कसला राग नी कसला त्रागा?"
" मग तयारी कर ,पोरी व तुला घ्यायला आलोय मी!"
" तिथं येऊन काय करु मी? जिथं दोघात आपला अडसर होईल तिथं माणसानं जाण्यात काय हासील!"
" रखमे मला तिच्या आधी तू महत्वाची आहे मग अडसर कसला!"
" कोण महत्वाचं हे ठरवण्याची आता माझी इच्छा नाही उरली!"
" रखमे, तू जर एका शब्दानं ही बोलली असती तर मी मुळीच दुसरं लग्न केलं नसतं! जे केलं तेही पुत्रप्राप्तीसाठी तुझ्या मर्जीनच ना? मग का येत नाही?"
" तुम्ही जे केलं त्याबाबत मला काहीच म्हणणं नाही!"
" मग चल ना परत! एवढं असुनही माझी अंजा, मंजा कशा परिस्थीतीत राहत आहेत याची मलाच लाज वाटतेय! निदान त्यांच्यासाठी तरी परत चल!"
" ज्या परिस्थितीत त्यांची आई समाधानी आहे त्या परिस्थीतीत मुली ही राहत आहेत. तरी त्यांना जर असल्या परिस्थीतीत रहायची लाज वाटत असेल तर मी कधीच मनाई करणार नाही त्यांना! त्यांनी खुशाल परतावं!"
राघो कदमांना एकदम गलबलून आलं व ते ओसरीवरुन दरवाज्याकडं रखमाकडं निघाले. तोच दार खाडकन बंद झालं.
" आक्का, ऐक ना! तू कुणासाठी दार बंद करतेय ? दाजी काय सांगतात ते तर ऐक!" जवळ असलेला चिंधा विनवू लागला.
" चिंधा! ज्यांच्या घराण्यास मी कुलदिपक देऊ शकले नाही त्यांना मी माझं तोंड कधीच दाखवणार नाही!" किलकिल्या दारातून शब्दविखार बाहेर पडला.
" रखमे ,मी इतका परका झालो का?"
" ............." समोरुन काहीच उत्तर आलं नाही.
" याचा अर्थ मी काय लावू!"
" मी पाहिलेले कदम एकपत्नी व एक वचनी होते. त्यांनी पुत्रासाठी दुसरा घरोबा केला असला तरी मी त्यांच्या एकपत्नीत्वाला माझ्याकडून बट्टा लागू देणार नाही.!"
" रखमे इतकी कठोर नको होऊस!"
भडगाव पेठेतील एक बडी असामी असलेले राघो कदम कधीच इतके लाचार झाले नव्हते जितके आज दिसत होते. पण रखमाबाई परतण्याचं तर दूरच साधं तोंड देखील त्यांनी दिसू दिलं नाही. चिंधानं आपल्या दाजीस समजावलं.
" दाजीसाहेब, काही दिवसांनी राग निमाला की मी आक्कास समजावेल व परत पाठवेन!"
" चिंधा! काही उपयोग होणार नाही,तुझी बहिण असली तरी मी तिला तुझ्यापेक्षा जास्त ओळखतो! फक्त आता एकच ती घराबाहेर निघणार नाही एवढी काळजी घे! त्यांनी खिशातली नोटांची गड्डी काढत चिंधाकडं सोपवली. "माझी रखमा व माझ्या मुलींना ऊन लागणार नाही एवढं पहा! जे लागेल ते न सांगता येत राहिल!"
पण चिंधानं गड्डी घेतली नाही.
" दाजी, हा चिंधा हाडाची काडं करेल पण त्याच्या आक्कास ऊन पाहू देणार नाही"
चिंधानंही पैसे घेतले नाही म्हणून राघो कदमांनी चिंधाच्या पत्नीला हात जोडत पैसे ठेवायला लावले.
राघो कदम परतले. नंतर वहिणीकडचे पैसे रखमानं चिंधास परत करायला लावले. त्या दिवसापासून रखमाबाई पोरींना घेत वहिणीबरोबर मजुरी करु लागली. भाऊ वहिणीनं लाख विनंत्या करुनही माझं कुणावर ओझं नको सांगत त्यांनी सर्व त्यागलं व कष्टास जवळ केलं.
त्यानंतर राघो कदमांनी नातेवाईक, गावातील इतरांनाही समजावयाला व परत आणण्यास पाठवलं पण व्यर्थ.तीन चार वर्षानंतर पुन्हा राघो कदम व पार्वतीबाई आले. पार्वतीबाईचंही पोट पिकलंच नाही म्हणून तर राघो कदम व स्वत: पार्वतीबाई ही दुःखी होत्या.
पुत्र प्राप्तीसाठी दुसरा घरोबा करूनही पुत्र प्राप्ती झाली नाहीच पण उलट घरची लक्ष्मी दुरावली ही सल राघो कदमांना झोपू देईना.
पार्वती बाईंनी डोळ्यात आसवे आणत रखमाबाईंना विनवलं.
" तुझ्यावरच काय पण माझा कुणावरही राग नाही गं! पण मी परतणार नाही! फक्त हात जोडून एक विनंती करते. माझ्या मुलींच्या बापास सुखात ठेव व स्वत: ही सुखी रहा! एवढंच. बाकी मला काही नको!"
ओसरीवरच्या राघो कदमांनी हे ऐकलं व त्याच्या काळजास पीळ पडला. डोळ्यात आसवं तरारली. पार्वतीबाई तर सुन्न. कोण ही त्यागाची मूर्ती! सारं ऐश्वर्य उधळत उन्हातान्हात राबतांनाही दुसऱ्याच्या सुखासाठी याचना करतेय!
पुन्हा त्याच कारवण्या, विनवण्या, मनधरणी. पण तरी नकार तो नकारच.
" रखमे! नाही येत तर नको येऊ पण तुझंच सारं असतांना का उन्हातान्हात राबते. न मागता देतोय त्यात कोणताच उपकार करत नाही मी! कारण लहान असतांनाच नवरी होऊन आमच्या घरी आली व आमची प्रगती झाली. म्हणून आज कदमाचं जे आहे त्यात तुझाही वाटा आहेच; ते तर स्विकार! तुझे असले हाल असतांना आम्ही कसे सुखात राहणार!"
"...........…." तरी एका शब्दानंही रूकार आला नाही.
" ठिक आहे रखमे! होऊ दे तुझ्या मनासारखं! यापुढे मी या घरी पायच ठेवणार नाही! " राघो कदम मुद्दाम संतापात बोलले. संताप पाहून तरी रखमा वितळेल असं त्यांना वाटलं.पण परिणाम उलटाच झाला.
" बोललात तर आता याद राखा! चुकुनही येऊ नका! आलात तर ही रखमा नसेलच!" दाराआडून शब्द आले नी राघो कदम ढासळलेच. त्यांना बोलण्यातलं वर्म कळालं. आपली जीभ नको ते बोलून गेली व रमखा आता आपला शब्द वाया जाऊ नये म्हणून कोणत्याही थराला जाईल म्हणून परतलेले राघो कदम खिरणी व रखमा कायमचेच विसरले. निदान लेकींसाठी ती हयात रहावी म्हणून. बऱ्याचदा आपल्या काळजात कोरलेलं लेणं नजरेसमोर नसलं तरी दुनियेत कितीही दूर व कुठं ही असो पण त्याचं कुठं तरी असणं हेच जिवनाचा आधार बनतं. तिचं हयात असणं हेच आता त्यांच्यासाठी खूप होतं.
राघो कदमांनी कच खाल्ली. जी रखमा आपल्या एका कवडीस हात लावत नाही ती जमीन, ऐश्वर्य काय कामाचं! त्यांना आपलं ऐश्वर्य खायला उठू लागलं. पुढच्या पाच वर्षात त्यांनी संतापात बरीच जमीन विकली व मोठ मोठ्या संस्थांना देणगी देण्यास सुरुवात केली. उमर्ठीत भलं मोठं विठ्ठल मंदीर उभारलं. उरलेली चाळीस बिघे (दहा परतन) जमीन पार्वतीच्या नावावर चढवली.
" पार्वती यातली बाकी मुलींना देता आली तर दे! बाकी तुझं तू ठरव!"
गावात मंदिराचं काम पूर्णत्वास आलं. विठ्ठल, राई( राधा) व रुक्मिणीची मूर्ती आणत प्राणप्रतिष्ठा झाली. त्याच रातीला राघो कदमाच्या देहातलं प्राण पखेरू उडून गेलं की त्यांनीच स्वत: त्यास मुक्त केलं हे देवाला व त्यांनाच माहीत. मंदिरात विठ्ठलासोबत राई व रुक्मिणी सोबत असतांना उमर्ठीचा हा ( राणा) राघो कदम रखमेस आणावयास निघाला.
खिरणीत निरोप गेला. चिंधा व पत्नी मुलींना घेऊन आले. पण रखमाबाई आल्याच नाही. उमर्ठीत राघो कदमास मुलींनी अग्नी दिला त्या आधीच रखमाबाईं घरात श्वास रोखत राघो कदमाच्या वाटेनं निघाल्या.
"मला माहीत होतं तुम्ही येणारच!" श्वास रोखतांनाही रखमेच्या चेहऱ्यावर विठ्ठल प्राप्तीचं सुख विलसत होतं.
परतलेल्या चिंधानं व मुलींनी हंबरडा फोडला पण तो ऐकण्यास रखमाबाई होत्याच कुठं!
काळ कलू लागला. पार्वतीबाईला मुलबाळ झालंच नसल्यानं राघो कदम जाताच त्यांनी सटाण्यातील बहिणीचा मुलगा - बाजीस उमर्ठीत आणलं.
पार्वतीबाईस पती निधनानंतर भिती व एकाकीपणा वाटू लागला. कारण मुलींनी पाणी दिलंय व आपला वारसा हक्क मागितला तर? रखमाबाई निस्वार्थी होत्या पण मुलीही तशाच निघतील हे कशावरुन? मामाच्या सांगण्यावरुन त्यांनी हक्क मागितला तर? त्याच भीतीत त्यांनी बहिणीच्या मुलास- बाजीस दत्तक घेत फक्त दोन परतन आपल्या नावावर ठेवत बाकीची जमीन बाजीच्या नावावर करून दिली.
मुलीच्या लग्नास आपण लागो तेवढा पैसा देऊ भले! असं ठरवत त्यांनी शब्दास जागायचंही ठरवलं पण आधी आपल्या भवितव्याचा आधार त्यांनी भक्कम केला. इथेच पार्वताबाई चुकल्या.
बाजीस दत्तक घेत सारी जमीन नावावर केल्याचं कळताच चिंधा मामाचा जीव भाचींसाठी तुटू लागला. त्यांना स्वत:साठी काहीच नको होतं पण भाचींना मिळावं व त्या सुखी व्हाव्यात एवढीच माफक अपेक्षा होती. ती फोल ठरताच आपल्या आक्कानं ठोकरलं ते मागण्यासाठी आपण तरी का जावं! स्वत:हून भाचींना दिलं असतं तर एकवेळ आपण भाचींना घ्यायला लावलं ही असतं.पण आता नकोच. चिंधा मामा भाचींच्या लग्नासाठी बेगमी जमवू लागला. पण या वयात ते कसं शक्य होतं.त्यांना ही मुलबाळ नसल्यानं आपली जमापुंजीच खर्च करण्याचं ठरवलं. राहतं घर विकून लग्नानंतर ते कर्ज फेडू असं त्यांनी मनात ठरवलं.
बाजीनं एक दोन वर्ष पार्वता मावशीशी गोडी गुलाबीनं वागत मावशीचा विश्वास संपादन केला. मावशीकडचं सोनं, चांदी, रोकड शिल्लक किती या साऱ्याचा अंदाज घेतला. हळूहळू तो मावशीचा विश्वास मिळवत सोनं नाणं, चांदी काढू लागला. सारा व्यवहार त्यानं पार्वता मावशीकडून आपल्या हातात घेतला. तोवर लग्नाचं वय झालेल्या अंजासाठी चिंधामामाकडं बंकटचं स्थळ आलं. बंकट पूर्ण कफल्लक पण अंगात कोणतंही कष्ट करण्याची धमक! चिंधा मामाच्या काळजात कळ उठली पण नाईलाज होता. राघो कदमाची लेक अंजा आज केवळ आपल्या घरी असल्यानं गरीब घरात जातेय! दाजीसाहेब हयात असते तर मोठ्या घराण्यात गेली असती. त्यांनी कळ दाबत डोळे पुसत बंकटला होकार दिला. लग्नाची तारीख ठरली . चिंधा मामा उमर्ठीस गेला. पण बाजीनं पार्वता मावशीला त्या आधीच काशीला एका महिन्यासाठी पाठवून दिलं होतं. चिंधा मामाकडून पत्रिका घेत बाजीनं चिंधा मामास कोरं हाकलून लावलं. चिंधा मामाची उरली सुरली आशा ही मावळली.
पार्वताबाई परतल्या तोवर अंजाचं लग्न ही उरकलं. चिंधा मामानं संतापानं उमर्ठीशी संबंधच तोडले. पाच सहा महिने पार्वताबाईला लग्नाबाबत बाजीनं कळूच दिलं नाही. आताशी पार्वताबाईंना आपणास बंदिस्त केलं जातय अशी शंका यायला लागली. घरातलं सारं ऐश्वर्य आटत चालल्याचंही त्यांच्या लक्षात येऊ लागलं
" बाजी?"
" काय मावशी!"
" पोरा ,खिरणीत एक फेरी मारावी वाटतेय रे! मुली लग्नाच्या झाल्यात. चिंधा भाऊशी बोलून लग्नाचं पहावं लागेल. कारण त्यांच्या वचनात मी अडकलीय रे!"
खिरणीचं नाव काढताच बाजीची नस तडकली.
" जायचं तर जाऊन ये मावशी! मी कुठं आडकाठी करतोय! पण तू काशीला गेली तेव्हा तो चिंधा मामा आला होता."
" काय चिंधा आला होता? नी तू आता सांगतोय?"
" कुणाचं तरी आमंत्रण द्यायला आला होता!"
" कुणाचं रे?"
" काय माहित माझी ही शेतातली गडबड सुरू होती. मी पण घाईत होतो व कुणाचं ते विचारलच नाही व लग्नासही गेलो नाही!" बाजीनं साळसूदपणे निखालस ढापलं.
ऐऐपार्वताबाई खिरणीत गेल्या. चिंधा भाऊ त्यांना पाहताच संतापला पण तरी संताप दाबत तो मुकाट्यानं बसला. पार्वताला अंजा दिसेना. त्यांनी मंजास विचारलं नी चिंधाचा स्फोट झाला.
" ताईसाहेब! सख्खी आई असता तर आपणास कळालं असतं लेकीच्या लग्नास सहा महिने उलटले असं! पण सावत्र तर सावत्रच....!"
पार्वताबाई लग्न ,सहा महिने, सावत्र या शब्दांनी घायाळ झाल्या. चिंधा भाऊचं सारं घर त्यांच्या भोवती गरगर फिरू लागलं
त्यांना चिंधानं रडत रडतच सारा प्रकार सांगितला. पार्वताबाई रडू लागल्या. बाजीच्या वागण्याचा त्यांना संताप चढू लागला व अंगाची लाही लाही झाली. त्या हात जोडत माफी मागत निघाल्या. अंजा पोरीस गरीबीच्या नरकात जायला आपलं काशी जाणंच कारण ठरलं या जाणिवेनं त्या तडफडल्या.
चिंधा भाऊस व मंजास त्या ही स्थितीत धीर देत त्या परतल्या.
घरी येताच काही तरी धुरळा उडेल याची जाणीव असल्यानं बाजी तयारच होता. त्यानं आधीच सटाण्याहून वडिलांना बोलवून घेतलं होतं.
" बाजी! का? का? असं वागलास? तुला काय कमी पडू दिलं मी की मामा घरी आल्यावर लग्न दूर असुनही तू मला काशीहून बोलवू शकला नाहीस?"
" मावशी, मला वाटलं तुला का उगाच त्रास द्यायचा! व तू ही लग्नास जाणारच नाही म्हणून!"
" मी लग्नाला जाणार नाही असं तुला का वाटलं?" पार्वताबाई संतापानं कडाडल्या.
" तसं नाही मावशी पण त्या सावत्र मुली म्हणून.....!"
" मुस्काट बंद कर मुर्ख माकडा! अरे ज्या मानसानं हे वैभव दिलंय त्यांचंच रक्त त्यांच्या धमन्यात वाहतंय! नी लक्षात ठेव त्यांच्या आईच्या त्यागावरच तुझ्या मावशीस हे सारं वैभव मिळालंय!"
" मावशी चुकलं माझं.मला काय माहीत तू त्यांच्याबद्दल एवढी सहानुभूती दाखवशील!"
" मुस्काट बंद कर! तुला इतकी ही अक्कल सुचली नाही की लग्नास हजर रहावं"
" जाऊ दे मावशी ,झालं गेलं विसर आता!"
" ते काही नाही, मी आता त्या मंजास इथं आणतेच!"
प्रकरण चिघळतंय पाहून बाजीचा बाप पुढे आला.
" पार्वता, खुशाल आण! सवतीच्या मुलीला नुसतं आणूच नको तर निम्मा वाटा ही दे!" बाजीचा बाप प्रथमच बोलला.
" दाजी, ते ही करेन मी! त्यासाठी तुमच्या सल्ल्याची गरज नाही मला!" पार्वता बाई आपल्या वडील मेव्हण्याचा मुलाहिजा न बाळगता फुत्कारली.
" मग तर चांगलंच! आम्हासही भीक नाही लागली! बाजी चल निघ इथनं!"
बाजी संतापात वडीलांसोबत निघून गेला.
दोन चार दिवसात पार्वताबाईचा राग थंड झाला. आपल्या पतीनं आपल्यावर विश्वास दाखवून जमीन नावावर केली. हे करतांना " पोरीचा हिस्सा देऊन उरलेल्या जमिनीचं तुला वाटलं ते कर!" हे सुचवतांना त्यांना दत्तक अपेक्षित नव्हतंच. आपण दत्तक घेतला तरी निम्मा त्यांचा हिस्सा द्यायला हवा होता. निम्मा हिस्सा देऊनही उरलेल्या जमिनीसाठी बाजी एका पायावर खुशीनं आला असता.पण म्हातारपणीचा आधार शोधतांना आपण हे सारं विसरलो. हेच आपल्याला नडतंय. कारण बाजी परत गेला तरी आठ परतन त्याच्या नावावर असल्यानं आपण त्याचं काहीच करू शकत नाही. म्हणून शांतपणे विचार करत पार्वता बाईनं बहिणीला व बाजीला परत बोलवलं.
" ताई, अंजा एवढ्या मोठ्या घराची लेक असुनही गरीब घरात गेली म्हणूनच बाजीवर मी संतापले. मला काशीहून बोलवलं नाही तरी हा जाऊन लग्नाला नुसता उभा राहिला असता तरी ती लेक खूश झाली असती गं! पण यानं तितकंही मन मोठं केलं नाही पण आता झालं ते झालं. बाजीनं मंजाचं तरी चांगलं स्थळ शोधून लग्न ठरवून द्यावं!"
बहिणीनं बाजीकडून ते कबूल करून घेतलं. बाजीनं ही तात्पुरतं हो म्हणत उमर्ठीत राहिला.कारण जमीन नावावर असली तरी अजुन मावशी मृत्यूपत्र बदलूही शकते ही धाकधूक त्याला होती. म्हणून त्यानं तूर्तास नमतं घेतलं.
तीन वर्ष गेली. मंजासाठी मुलगा पहायला पार्वताबाई बाजीकडं तगादा लावू लागली. पण आता बाजी मावशीस साफ धुडकावू लागला.
" मावशी तुझं वय झालं. तुला काही कळत नाही. माझ्या राघो काकाला देखील त्या चालत नव्हत्या व तुलाच का एवढा पुळका! मी सपशेल मुलगा पाहणार नाही व फुटी कवडी ही देणार नाही!"
पार्वता बाई थरथरल्या. त्यांना आपल्या हातून सत्ता,संपत्ती गेलीय हे कळून चुकलं. बॅंक बॅलेंस, सोनं, नाणं सर्व बाजीच्या ताब्यात गेलं. त्याच्या बापानं ते केव्हाच सटाण्यास नेलं हे त्यांना कळून चुकलं. आता आपण मंजीच्या लग्नास आर्थिक मदतही करू शकत नाही. त्या आसवे गाळत पश्चात्ताप करू लागल्या.
बाजी आता मावशीस घरातूनही बाहेर पडू देईना. चिंधा मामाची आताही निराशा झाली. त्यांनी खुर्दाण्याच्या सदास पसंत केलं व मंजाचे हात पिवळे केले. लग्नास कशाबशा पार्वताबाई गेल्याच. बाजीस वाटलं जाऊन जाऊनही मावशी काय देईल. द्यायला तिच्याकडं आपण ठेवलंच तरी काय!
पार्वताबाईनं दोन्ही मुलींना व मोठ्या जावयास जवळ बसवत सारी हकीकत बया केली. माझ्या हातून अपराध झालाय हे कबुल केलं.
" आई आम्हाला काही नको! तू आलीस हेच आम्हास खूप आहे!" अंजा मंजानं आईस धीर दिला.
तिघांना घेत त्यांनी ओळखीचा वकील गाठला. सारं पेपरवर्क करत आपल्या नावावरील आठ बिघे जमीन दोन्ही मुलींच्या नावावर चढवली. अंजा व मंजा नाही म्हणू लागल्या. बंकट बापूला तर जमीन ध्यानीमनीच नव्हती. पण पार्वता बाईनं हात जोडत चिंधा भाऊस विनवलं. चिंधा मामांनी दोन्ही भाचींना समजावलं.
" अंजा, आता निदान पार्वताआईचा सांभाळ करण्यासाठी उमर्ठीत राहता यावं म्हणून व तुमच्या हक्काची आहे म्हणून तरी जमीन घ्या! नाही तर पार्वता बहिणीस उमर्ठीत जागाच उरणार नाही."
पार्वताबाईंनी जमीन नावावर करून देत बंकट बापू व अंजास घेऊनच त्या उमर्ठीत परतल्या. बाजीस हे कळताच तो नागागत फुत्कारू लागला. मावशी एवढी उडी घेईल याचा आपण विचार न करणं ही महाचूक केली या वेदनेनं तो कळवळला.
" मावशी तू तुझा मरत भाग त्यांना दिला. आजपासून माझ्याशी तुझा काहीच संबंध नाही! तुझा सांभाळ करण्याची माझी जबाबदारी संपली".
" बाज्या लेका! संबंध कसा नाही रे! तू तर आठ परतन खातोय ना!"
" हं हं, ते तर बाजी सावंत ऐवजी बाजी कदम हे नाव लावलं त्याचा मोबदला. उगाच कुणा ऐऱ्या गैऱ्याचं नाव लावायला हा बाजी सावंत काय तुला रस्त्यावर पडलेला बंकट दाजी वाटला का?"
" अरे मग कदमांचं नाव लावलं तर त्या राघो कदमाचीच मी पत्नी आहे, तुझी मावशी हे नातं सोड , त्या नात्यानं तरी लाज ठेव व सांभाळ!"
" अय मावशे! सांभाळणं तर दूरच पण हे बंकट दाजीसाहेब आठ बिघे (दोन परतन) जमीन कशी ताब्यात घेतात तेच पाहतो मी!"
"बाजी, ताबा तर तुझ्या दोन्ही बापास सुटणार नाही!" पार्वताबाई थकल्या असल्या तरी वाघिणीगत निर्वाणीचं डरकाळल्या.
पार्वताबाईंनी गावातील पतीच्या बैठकीच्या दहा बारा माणसांना गोळा केलं. लोकांनी बाजीस घेरलं.
" बाजी मुकाट्यानं ताबा दे! नाही तर याद राख निम्मा हिस्साही द्यायला भाग पाडू."
त्याच वेळी पार्वताबाईनं भडगावच्या वकिलामार्फत बोलवलेला पोलीस ताफा ही आला.
बाजीला परीस्थीतीची जाणीव झाली. त्यानं मुकाट्यानं आठ बिघे तोडून दिलं. बंकट बापूनं सर्वासमक्ष चार चार बिघ्यात बांध घालत शेवटीही बांध घातला.सर्वांनी जातांना बाजीस पुन्हा धमकावलं " बाजी आताच नाही तर पुढेही काही आडफाटा केला तर गाठ राघो कदमाच्या उमर्ठीकरांशी आहे!"
बंकट बापूनं मात्र शालकाशी नरमाईचं धोरण स्विकारत त्याच्याकडेच राबायला सुरुवात केली. त्याचच पाणी, औत घेत त्याच्याच कडं राबत विश्वास संपादन करण्याचा सतत प्रयत्न बंकट बापू करू लागले. नात्यातली तेढ कधीना कधी कमी व्हावी हाच मानस बाळगत ते राहू लागले. बाजीचंही लग्न झालं. घरात पारी आली व राघो कदमांच्या मुलींना नाही निम्मा हिस्सा पण काही तरी देत वचनास आपण जागलो या समाधानात लवकरच पार्वताबाईंनी निरोप घेतला व त्या रखमाबाई व राघो कदमांना जणू ताट मानेनं भेटायला निघाल्या.
बंकट बापूस संगा व रघू झाला. मंजास भानू झाला. त्याचवेळी बाजीच्या घरातही तुळसा आली. आता राघो कदमांच्या आमराईत तिसरी पिढी सज्ज झाली.
.
.
अंजाबाईस सारं आठवत आठवत त्यांची उशी ओली झाली.त्यातच आमराईच्या पहाट गारव्यात त्यांचा डोळा लागला.
क्रमशः....