हिरवा चुडा
रघूला नंदुरबार जिल्हा परिषदेत तोंडी परीक्षा असल्यानं सारी कागदपत्रे घेण्यासाठी उमर्ठीला जावं लागणार होतं. त्यानं नंदुरबारला सोबत तुळसाला घेऊन जायचं ठरवलं. तसा त्यानं तुळसाला काॅल केला.
" तुळसा! नंदुरबार जायचंय! येतेस का? तेवढीच सोबत होईल!"
" आणखी कोण येणार आहे सोबत?"
" आपण दोघंच! "
" आली असती रे पण पप्पांनी उमर्ठीला श्रावण महिन्याचा प्रोग्राम ठेवलाय काहीतरी,म्हणून नाही शक्य होणार!"
भाना नाही म्हणून ही नकार देतेय हे रघूनं ताडलं.
" भाना असता तर आली असती ना!"
रघू वेदनेनं बोललाच.
" रघू ,हे अति होतंय तुझं! मी का यावं नी कुणासोबत यावं हे ठरवणारा तू कोण?" तुळसाचा आवाज तिकडनं चढला.
" मी कोण! जिच्यासाठी भावाच्या परीक्षेचा विचार न करता बोर्डाला रात्र रात्र जागत तयारी करायचो तोच! सहलीत सोबत फिरतांना ज्याला तू ......तोच रघू!" रघूचाही आवाज चढलाच.
" रघू, निर्वाणीचं सांगतेय! आता मला मागे काय घडलं त्याच्याशी काहीच देणंघेणं नाही! न जाणत्या वयातला भूतकाळ विसरत मला ज्यात उज्ज्वल भविष्यकाळ दिसतोय तीच वाट चालायचीय!" सांगत तुळसानं संतापात फोन कट केला.
रघूनं आता भानूच्या मनात नेमकं काय हे एकदां ओळखायचं ठरवलं. तसा त्याचा भानावर विश्वास होताच पण तरी....
रघूनं भानास फोन करत
"भाना नंदुरबारला परीक्षेसाठी जायचंय रे आपणास!" सांगत भानास उमर्ठीला यायला लावलं.
भाना उमर्ठीला आला. सुगंधा पंधरा वीस दिवसांपासून उमर्ठीलाच होती. म्हणून ती इतके दिवस होऊनही जळगावला का परतत नाही म्हणून ही भाना उमर्ठीला आला.
उमर्ठीत बाजी कदमांनी श्रावण महिन्याचं औचित्य साधत मळ्यात पोथीवाचनाची सांगता करतांना भंडारा द्यायचं ठरवलं होतं. त्यासाठी तुळसा सहीत शंकर शिंदेचं पूर्ण कुटुंब उमर्ठीला आलं.
रघू भानाला सोबत घेत एक दिवस नंदुरबारला जात परीक्षा देऊन आला.
बाजी मामाच्या मळ्यात भंडारा असल्यानं बापू, अंजाताई, काशीमामा व मामी सारेच मग्न होते. दालबाटी गंगाफळाची भाजी, खास वांग्याचं भरीत असा साध्या पण जंगी जेवणाचा बेत होता.
दोन दिवस सारं दूध घरीच ठेवत कढीसाठी दही मुरली जात होती.
अंजाबाईनं दही घुसळण्यासाठी रवी बांधली. भानानं शर्ट काढला व मावशीकडंनं रवी घेत घुसळायला सुरुवात केली. खर्रर्र..फर्र्रर..सर्रर्र रवी फिरू लागली. ताकावर लोणी वर येऊ लागलं. तोच सुगंधाला अंजाबाईनं बोलावलं असल्यानं ती आली.
" सुगंधा! बरं झालं तू आलीस! एवढं लोणी काढ या ताकातलं. मी बाजी दादाकडं जाऊन येते तेवढ्यात! आणि भाना रवी चांगली फिरव बाबा,कंटाळा नको करूस!" अंजामावशी निघून गेली.
अंजामावशी व बापूनं बाजी कडं रघूचा विषय काढायचाच हे मनात पक्कं केलं होतं. कारण बाजी दादा आता मनातली कटुता विसरलाय व तुळसा रघूही एकमेकांना पसंत करतात म्हणून रघू तुळसाचं जमवत दोन्ही घरातलं वैर कमी करायचंंच असं ठरवत होते. रघू मळ्यात तुळसाला एकदा शेवटचं नक्की काय हे विचारायचंं म्हणून तुळसाला भेटण्यासाठी तळमळत होता.
सुगंधा घामाघूम झालेल्या भानाकडं पाहत रवी थांबली की वर आलेलं लोणी गोळा करत अलग काढत होती. तो रवी फिरवू लागला की पुन्हा त्याच्याकडं टक लावून पाही. भानाच्या कपाळावरील व्रणाकडं लक्ष जाताच तिच्या मनात डब्यात ताक जसं उलटसुलट फिरत होतं तशा वेदना गरागर फिरू लागल्या. त्याच वेदनेत ती भानाच्या पायाकडं पाहू लागली. ती मुसळ मारल्या जागी पायावर हात ठेवू लागली. तोच रवी थांबली.
" सुगंधा, एवढे दिवस उमर्ठीत का थांबली?" भाना रागानं पाहत विचारता झाला.
तिच्या डोळ्यात आसवं गोळा होत पायावर थेंब पडले. हाताच्या स्पर्शासोबत थंड थेंब पायाला लागताच त्यानं तिला उठवत कवेत घेतलं. सुगंधाचा संयमाचा बांध फुटला व ती त्याला बिलगत हमसून हमसून रडू लागली.
" रडू नकोस! काय झालं सांग!" भाना तिचा हिरव्या चुडाचा हात धरत कळवळून विचारू लागला.
" आई बाबास कुणी तरी भलतंच भरवलंय वाटतं! म्हणून ते आता शिक्षणच बंद सांगत आहेत!"
" तू समजावलं नाही त्यांना?"
" भरपूर प्रयत्न केला.पण हवंतर बाहेरुन परीक्षा दे पण आता घर सोडून कुठेच बाहेर जाऊ द्यायला तयार नाहीत ते!"
तेवढ्यात मंजाताई आली. रवी गरागर फिरू लागली.
" भाना ,ताई कुठं गेली! सुगंधा तू कधी आलीस गं! बघ भाना, तू नव्हता तर ही येत नव्हती व आता तू आला तर लगेच आली बघ!" आई भानास हसत म्हणाल्या.
मावशी बाहेर गेल्याचं सांगत भाना ताक घुसळू लागला.
घाऱ्या नजरेत काळी पाणीदार नजर एकसारखी भिरभिरत होती. सुगंधाला आज तेथून हलावसंच वाटत नव्हतं. तर भानास हिरव्या चुड्याची किणकिण ऐकतच रहावी असं वाटत होतं.
भंडारा झाला त्या रात्रीच सवड व बाजी दादाचा मूड पाहून बंकट बापू व अंजाताईनं शंकरमामा तुळसा बसलेली असतांनाच बाजीकडं विषय काढला. रघू तुळसाशी बोलण्यासाठी तुळसा बाहेर येण्याची वाट पाहत ताटकळत उभा होता. नेमक्या त्याचवेळी काशीमामा मालू मामी व सुगंधाही तिथंच होती. सुगंधाची नजर भानास शोधत होती पण तिला भाना दिसेना म्हणून तेथून ती लवकर निघण्याच्या तयारीत होती तोच बंकट बापूनं विषयाला सुरुवात केली.
" दादा! सारं सुरळीत पार पडलं! "
" दाजी! तुम्ही सर्वजण राबलात म्हणून मला कार्यक्रमात त्रास जाणवला नाही."
" दादा! एक सांगायचंय तुला!" बापूनं थेट मुद्द्यालाच हात घातला.
" काय दाजी?"
" रघूचं या वर्षी लग्न उरकायचं ठरवू का?"
" अरे व्वा! मग उशीर का!" बाजी चेहऱ्यावर आनंद फुलवत म्हणाला पण पायाचा जमीनीला दाब वाढवत त्यानं बंगडी थांबवली.
" तेच म्हणतोय मी , तुझी संमती विचारण्यासाठीच आम्ही आलोय!"
" त्यात मी खोडा घालणार का?"
" तसं नाही पण तुळसाचंही मत...."
बाजीनं कान टवकारले.
" म्हणजे?"
" दादा रघू व तुळसाचं ...."
" दाजी ! थांबा. रघुला तुळसा हवी असं विचारायचं का तुम्हाला?"
" त्यात काय विचारायचं दादा! रघू व तुळसा दोघांची मर्जी तीच आहे!" अंजाबाई भावास म्हणाली.
तिकडं रघूला मनात एकदम तरंग उठू लागले. आई वडील थेट तुळसाला मागणी घालत आहेत याचा त्याला कोण आनंद झाला. तो तेथून आता खुशीत निघणार होताच पण त्याचे पाय निघेनात.
" दाजी ,ताई तसं माझं काही म्हणनं नाही. पण तुळसाला तर विचारावं लागेल! काय तुळसा मग व्हायचं का अंजाआतीची सून?" बाजी तुळसालाच विचारू लागले.
" पप्पा ! मी....मी...क्काय सांगू! पण...पण रघूऐवजी भाना...."
तुळसा अडखळण्याचं व लाजेचं नाटक करू लागली.
" काय म्हणायचं तुला नेमकं?"
" दाजी, तुळसा अंजाताईची सून व्हायला तयार आहे पण रघू ऐवजी भानाशी लग्न करायचं आहे तिला!" शंकर मामानंच मध्ये स्पष्टीकरण दिलं.
रघूचा आनंदाचा बिलोरी बंगला ताड ताड ताड खच फाट होत तुटला. काचाच काचा पसरल्या. कोपऱ्यात थांबलेल्या काशीमामाच्या अंगात ही जणू त्या काचा घुसल्या . आणि..आणि एक भला मोठा काचेचा तुकडा वेगानं एका ह्रदयाचा छेद घ्यायला वेगानं येतोय म्हणून सुगंधा कोपऱ्यातच अंधारात बसली. त्याच वेळी तुळसा तिकडंच आपला कटाक्ष टाकत तुकड्यानं काळजाचा छेद घेतला का हे पाहत होती.
बापू व अंजाताईच्या काळजात एक कळ उठली.
" तुळसा! काय हे! दाजी व अंजाताई कुणाचा विषय करत आहेत नी तू हे काय बरळतेय?" बाजी सावंत जुन्या जखमेवर सैंधव फिरवू लागले.
" पप्पा, मला भानाशीच लग्न करायचंय! तसं आमचं दोघांचंही पक्कं ठरलंय!" तुळसानं काही अंगाचं जोडत ठासून सांगितलं नी सुगंधाच्या हातात आपल्याच काळजाचा छेद येत तडफडू लागला.
" अगं तुळसा पण आधी तू तर रघू....! मग आता हे काय नवीन? असं कुठं असतं का? आता दाजी व अंजाताईला कोणत्या तोंडानं मी जवाब देऊ!" बाजी मुलींवर संतापला.
" पप्पा आत्यास मी सून हवी होती तर सून म्हणूनच तर मी त्यांच्या घरात जातेय ना!"
" तुळसा..." बाजीचा नाटकी संताप वाढला.
" दादा! बस! तुळसा भानाला सांगतेय ना! ठिक आहे भानाही आमचाच मुलगा आहे. आम्ही रघूची समजूत घालून त्याला दुसरी मुलगी पाहू! पण तुळसेला काही बोलू नको!आमचीच समजण्यात काही तरी गफलत झाली असावी!" बंकट बापू काळजात काच रूतत असतांनाही सदाच्या मुलावर अन्याय नको म्हणून मोठ्या मनानं बोलले.
' याला कुठल्या देवानं घडलंय! किती संयम आहे यात!' बाजी सावंत बंकट बापूकडं खालचा ओठ दातानं दाबत मनात चरफडले. हे बंकट माकड स्वत:च्या मुलावर अन्याय करेल पण त्या मंजीला व भान्यास हाकलणार नाही. हे बाजी सावंतानं ताडलं.
" दाजी ,तुमची हरकत नसेल व तुळसा व भानूचीच तशी मर्जी असेल तर मला ही मान्य आहे!" बाजी सावंत जखम सावळावी म्हणून नव्हे तर जखमेत आग आग उठावी म्हणून तूपच चोळू लागले.
काशी व मालू मामी सर्व आशाच संपली म्हणून खालमानेनं घरी परतले. सुगंधाला तर घरी परततांना पायात कुणीतरी मणामणाच्या बेड्या घातल्यात व ते ओझं ओढत ती परतली.
' मी भानाशीच लग्न करणार व तसं आमचं दोघांचं पक्क ठरलंय!' हे तुळसाचं वाड्यातलं वाक्य सुगंधाच्या कानात तप्त शिसं ओतू लागलं. आपणास जाणवणारी रीक्त पोकळी खरी ठरली याची जाणीव होताच ती पोकळी वाढत वाढत रिक्ततेचं अवकाश व्यापत आणखी जागा शोधू लागली.
मालू मामीनं संतापात सकाळीच सुगंधास हंबर्डीला आपल्या शिक्षक भावाकडे पोहोचवलं.
प्रवासात ती सुगंधा वर सारखी आगपाखड करत होती.
" भवाने ! तेव्हा लाख समजावलं तुला! मोठ्यांच्या नादी लागू नको, लागू नको! पण तुझं आपलं भाना तसा नाही! त्यावर माझा पक्का विश्वास आहे! त्या तुझ्या बापालाही बंकट बापुचा पुळका! नी आता कुठं गेला गं तुझा भाना? त्यावरचा पक्का विश्वास! ती सर्वासमोर ठासुन सांगत होती 'आमचं दोघांचं पक्क ठरलंय!' तेव्हा का तुझं तोंड शिवलं होतं! आता याद राख पुन्हा त्या भानाचं नाव काढलंस तर!" हंभर्डी आलं तरी मालुबाईचं तोंड बंद होईना. सुगंधा आपल्या आकाशातील चंद्र पुनवेच्या रातीलाच आपल्या समोर चोरुन न्यावा व आपण पाहत रहावं अशीच खाली मान घालत आईमागं जात होती! आता तिला एकच धूसर आशा होती की चोरुन नेणाऱ्या सोबत आपला डागाळलेला चंद्र जाईल का? का तो आपल्याला शोधत हिरव्या चुड्याची समृद्धी शोधायला येणार? याची वाट आपण पाहू. पण तो पावेतो काळ तिच्या आभाळात पुनव रात्र टिकू देणार होता का? प्रश्न चिन्ह फेर धरत तिच्या हातातील हिरव्या चुड्यागत गोल गोल फिरू लागले.
" मला भानाशी लग्न करायचंय,! तसं आमचं दोघांचं पक्कं ठरलं या एका वाक्यानं रघूला भयाण त्सुनामीच्या तोंडावर आणुन सोडलं होतं. पण तरी त्याला एक वेळा त्या त्सुनामीत प्रवेश करतांनाही तुळसेला
'तू असं का केलंस हे एक वेळा पुन्हा विचारावं वाटलंच.
त्यानं तुळसेला घरची बापूची दुधाची गाडी घेत तिला जबरीनं बसवत आमराईत आणलं.
" रघू, तुला असा तमाशा करतांना थोडीही लाज नाही वाटत?" तुळसा आमराईत गाडीवरून उतरताच संतापली.
" काल तू एवढा तमाशा केला मग त्यामानानं हा तमाशा कमीच आहे. ते जाऊ दे पण का ..का... असं वागतेय तू? कुठला खेळ खेळतेय तू?"
" कसं वागतेय मी? नी कोणता खेळ खेळतेय?"
" तुळसा या आमराईतच तू मला चोचीनं कैरी तोडत मैनेला भरवणारा राघू दाखवला होतास ना! मग आता उडत मैना दुसरा राघू का शोधतेय?"
" रघू, आधी काय घडलंय त्याच्याशी मला आता काहीच देणं घेणं नाही. पण आता मला तुझ्याशी बोलण्याची ही इच्छा नाही उरली!"
" इच्छा, लिप्सा, कामना अशी एकाएकी का बदलली? मी कोणता अपराध केला ते तर मला कळू दे?"
" तू काय केलंय ते तुलाच ठाऊक. पण आता मला भानाशी..."
भाना नाव ऐकलं नी त्यानं खाडकन एक तिच्या गालावर लगावली.
" मूर्ख एक शब्द बोलू नको! मला सोडून तू ज्याच्यासाठी जातेय तो तुला लाथ घालून हाकलून देईल! माझा भाना या राघूच्या मैनेला नादाला कदापि लावणार नाही! त्याच्या आड तू इतरांसमोर लपू शकशील पण मला नको सांगू! "
" मी खोटं कशाला सांगू? तू बघशीलच भानाशीच मी लग्न करेन!"
" तुळसा मुकाट्यानं बऱ्या बोलानं सांग तू मला का नाकारतेय?"
" रघू तू हजारवेळा जरी विचारलंस तरी माझं उत्तर तेच राहील ! आणि मला जसं आणलं तसं इज्जतीनं जाऊ दे! मला आता तुझं तोंडही पहावसं वाटत नाही!"
रघूच्या काळजात एकदम सुराच घुसला. वेदनेच्या असंख्य इंगळ्या त्याला ढसल्या.
" तुळसा, ज्या रघूसाठी तू रात्र रात्र तळमळायची त्याच रघूचा इतका तिटकारा!"
" तिटकाराच काय पण आता जन्मात तुझं तोंड पाहणार नाही!" तुळसा लालेलाल होत आग ओतू लागली.
रघूनं तिच्या केसात हात घालत तिची मान घट्ट पकडली व तो आकांत करत दहाडला.
" या रघूस शेवटचं एकदा बघ! हा रघू त्याच रखमा आजीचा नातू आहे , जिनं तुझ्या बापाच्या मावशीसाठी, तुमच्यासारख्या कोल्ह्या कुत्र्यांसाठी उभ्या ऐश्वर्याला लाथ मारली पण आपल्या नवऱ्यास मरेपर्यंत तोंड दिसू दिलं नाही! मी त्याच रखमा आजीचा नातू असेल तर ऐक! मी जितेपणीच काय पण मेलो तरी माझं तोंड तुला दिसू देणार नाही!" रघूच्या डोळ्यात साऱ्या शरीरातलं रक्त गोळा झालं होतं तर काळजातला सारा विखार, वेदना त्याच्या बोलातून बाहेर पडत होत्या. तुळसा देऊ पाहत असलेलं हलाहल प्यायला तो निघाला. त्यानं गाडीला किक मारली व तो घरी आला. घरी आला तसाच तो पाचोऱ्याला परतला.
भाना काल भंडारा आटोपताच सुशांतबरोबर त्याच्या मावशीच्या गावास निघून गेला होता. तो दुसऱ्या दिवशी परतला. घरातलं वातावरण एकदम भकास. अंजाताईला भंडाऱ्याची दगदग झाल्यानं ताप भरला असल्यानं मावशी झोपली होती. बंकट बापूही दूध पोहोचवून झोपलेले. भानानं बंकट बापूस दुपारची वामकुक्षी घेतांना सहसा पाहिलंच नव्हतं. त्यानं आईला डाॅक्टर आणू का म्हणून विचारलं
" ताई, भानाला पाठवू का डाॅक्टर आणायला?" मंजाबाई आपल्या ताईस विचारू लागली.
" नको मंजा. थोडी कणकण भरलीय जाईल झोप घेतल्यावर!" अंजाबाईनं नाकारलं.
तो काशीमामा व मालूमामीस सुगंधाला शिकू द्या असं सांगून पाहू म्हणून काशीमामाकडं आला. पण मामाच्या घराला कुलूप. तो मळ्यात गेला. काशीमामानं त्याला पाहीलं व दुरुनच कल्टी मारत निघून गेला. भानास काही तरी बिनसलंय याची जाणीव झाली. रघा दादा अचानक निघून गेला, बापू व मावशी झोपलीय, सुगंधाच्या घरास कुलूप व आता काशी मामा ही आपणास पाहून कानाडोळा करत निघून गेला म्हणजे काही तरी घडलंय. पण काय? ते कसं कळणार?
त्याच दिवशी चारच्या आसपास बाजी मामाचा सारा परीवार जळगावला निघून गेला.
रात्री झोपल्यावर त्याला झोपेत बंकट बापू व मावशीचं बोलणं ऐकू येऊ लागलं. त्याची झोप चाळवली व तो गोधडी पांघरतच कान टवकारून ऐकू लागला.
" अहो, ऐका ना! आपल्या भानास आपण समजावू! भानाला काशीदादा सुगंधा देणार आहेच मग तो का ऐकणार नाही?"
" अंजे नको! बाजी, पारू व शंकरची इच्छा भानाला द्यायची आहे तर आपण पाहू आपल्या रघूला दुसरी तुळसेऐवजी!"
" अहो तुम्ही भानासाठी माघार घेत आपल्या रघूवर अन्याय करत आहात असं नाही का वाटत?" अंजाबाई उरातला कढ काढू लागल्या.
" अंजा, लहान भान्याला खुर्दाण्याहून आणलं तेव्हाच या पोरास आपण आपलं मानलं! मग आता रघूसाठी त्यावर का अन्याय करू मी! मेल्यावर सदास तोंड दाखवायला जागा हवी मला! म्हणून हात जोडतो! बाजी ,पारु व तुळसाच्या मर्जीप्रमाणंच होऊ दे!" बापू अंजाबाईस समजावत होते!
आता भानास थोडं थोडं लक्षात येऊ लागलं की घरात भकास वातावरण का आहे. एकंदरीत बाजीमामा व तुळसानं काही तरी सांगितलंय व त्यानंच रघू दादा निघून गेला. पण सुगंधा ही मामाच्या गावाला का निघून गेली असावी? रघूदादाचं तुळसासाठी तुटणं, सुगंधास जाणवणारी रिक्तता यात तुळसेचा काही तरी हात नक्कीच आहे. हे आपणास शोधावंच लागेल व दादासाठी एकदा याबाबत बाजी मामा व तुळसाशी मोकळं बोलावच लागेल! पण अंजामावशीचं 'काशी सुगंधाला द्यायला तयार आहे' हे बोलणं ऐकताच त्याच्या मनात हिरव्या चुड्याची किणकिण वाजली व तो निद्रेच्या अधिन झाला.
भाना जळगावला निघाला. आल्या आल्या दुसऱ्या दिवशीच त्यानं शंकर मामाकडं जात आपल्या बाजी मामाची भेट घेतली. आजपावेतो तो मळ्यात वा घरीही बऱ्याच वेळा बाजीमामा समोर जाई पण सहसा बोलणं होईना. भंडाऱ्याच्या कार्यक्रमातही तो बापू व मावशी सारेच राबत होते म्हणून हजर होता. पण मामाशी तो स्वत: हून कधीच बोलत नसे. बाजी मामा तर तो लहान असतांना पाण्यातच पाही. पण आता त्याचं कर्तृत्व पाहत ते त्याला थोड्या मवाळ भुमिकेनं पाहत पण तरी ते ही बोलत नसत.
" ये भाना! तुळसा पाणी आण गं आणि दाजींना बोलव कोण आलं बघ!" शंकर शिंदे सर घरात मोठ्यानं आवाज देत बोलले. आवाजानं तुळसा बाहेर आली व भानाला पाहताच चेहऱ्यावर अनंत चांदण्या फुलवत पुनवेच्या चंद्रागत तिचा चेहरा फुलला. ती पाणी घेण्यासाठी घरात पळाली. भानाला पाहताच, सावजापुढं हड्डी फेकल्यावर सावज जाळ्यात अडकण्यासाठी येणारच असल्या आवेशात पाहत बाजी कदम( सावंतच) बाहेर आले.
" भाना काय काम काढलं रे! " शिंदे सरांनी विचारलं.
तुळसानं हसतच दिलेला ग्लास घेत त्यानं पाणी घोटलं व खाली ग्लास देऊ लागला. तुळसानं ती संधी साधत आपल्या चाफेकळी बोटानं त्याच्या बोटांना स्पर्श केला व चेहऱ्यावर खोडकर हास्य फुलवलं.
भानानं मनात उठणारा राग दाबत तिच्या मर्कटलिलाकडं दुर्लक्ष करत आपला हात झटक्यात मागे घेतला.
" काही नाही आमच्या मामांना भेटायला आलो!" भाना शिंदे मामाकडं पाहत बोलला.
" भाना, एक आनंदाची बातमी आहे आधी! शंतनू शर्मा एक शो निर्देशीत करणार आहे. त्याचं अॅंकरींग ते तुळसासोबत तुला करायचं विचारत होते!"
" मामा, आता मला मुळीच इच्छा नाही,असल्या शो करण्याची!" सध्या स्टेजवर सुगंधा राहत नाही म्हटल्यावर तो शो करण्याचं हल्ली टाळू लागला होता.
" जीवनाला कलाटणी देणारा शो आहे! त्यांच्याकडं कलाकाराच्या रांगा लागतात! केवळ तुळसा आहे सोबत म्हणून ते तुला घ्यायला तयार झालेत! ते ही आम्ही मिनतवारी केली म्हणून! बघ संधी दवडू नको!"
" जिवनाला कलाटणी देणारा शो आहे तर तुळसाला अवश्य पाठवा!"
" आणि तू?" शिंदे मामानं चष्म्याच्या दांड्या घट्ट सरकवत विचारलं.
" मला असल्या भिकार कुणाचा टेकू घेऊन मिळणाऱ्या संधीची गरज नाही!" भानानं शिंदेच्या वर्मावर बोटच नाही तर पायच ठेवला म्हणून बाजी मामा सोफ्यातच संतापला.
" अरे पण तुळसा सोबतीला होती म्हणून तुझ्या कॅरीअरला नवा आयाम मिळाला असता!" शिंदे मामा तरी लाळ घोटू लागले.
" मामा ,आम्ही जिथं उभं राहू तिथं नवे आयाम तयार करू! आमच्या करीअरची तुम्हाला आताच का एवढी चिंता! " काॅलेजमधून नाशिकला रवानगी करणाऱ्या शिंदे मामाबाबत भानाचा संताप उफाळून आला.
भानानं आतापर्यंत यांना तुळसेला घडवायची चिंता होती व आता तुळसेच्या मदतीनं आपणास घडवायला निघाले यातली खोच ओळखली. शंतनू शर्मानं युवा महोत्सव संपला तेव्हाच आपणास भेटत संधी देऊ केली होती व लवकरच बोलवलंही होतं पण आपण गेलो नाही म्हणून यांच्याकडं बोलणी केली असावी हे ओळखत त्यानं सपशेल नकार दिला.
" जाऊ दे! तू कशासाठी आलास ते सांग!" बाजी मामा त्याकडं धुमसणाऱ्या रागानं पाहत विचारू लागले.
"मला तुळसाशी बोलायचं आहे!"
" बोल!" बाजी मामा दात ओठ खात संतापले.
" सर्वासमोर उचीत होणार नाही, तिला खाली अंगणात पाठवा तिथंच बोलतो!"
" जे बोलायचं ते आता इथंच बोलायचं!" बाजी मामातल्या सावंतानं नस तडकवत ताकीद दिली.
" ठिक आहे! जशी तुमची मर्जी! तुळसा तुला चालेल ना सर्वांसमोर बोललेलं?"
" बोल काय सांगायचं भाना?" तुळसा तरी गोड आवाजात बोलली.
" तुळसा, रघू दादाशी तू लग्नास तयार असतांना, बापू व मावशीनं लग्नाबाबत विचारल्यावर नकार का दिला?"
" भाना, शुद्धीवर आहेस का?"
" मामा.....! आताशी कुठं आम्ही शुद्धीवर आलोत!" भानानं तुळसेवरच नजर स्थीर ठेवत मामास सुनावलं.
" तुळसा, रघू दादास नकार का?" जे असेल ते मोकळं सांग! साऱ्या अडचणी सुटतील पण रघू दादास दुखवू नको!"
तुळसा आता शांत उभी राहत अबोल झाली.
" तुळसा कुणा शांत डोहात जो पर्यंत कुणी दगड मारत नाही तो पावेतो डोहात तरंग उठत नाहीत! तू खडा टाकलास तर मग आता माघार का?"
" भाना! अजाणत्या वयात रघूनं तिला फूस लावली. पण तिला आता आधी करीअर महत्वाचं आहे."
" तसं असेल तर रघू दादा तुळसेचं करीअर घडेपर्यंत थांबेल!"
" काही गरज नाही थांबण्याची! तुळसाला आता शंतनू शर्माचा शो महत्वाचा आहे!"
" मामा थांबणं न थांबणं यावर ते अवलंबून नाही. तुळसाचं लग्न तर रघू दादाशीच होईल हे पक्कं! "
" भान्या! तोंड आवर! मुस्काट फोडीन!"
" माझं मुस्काट फोडलं तरी तुळसाला बापुंची सून तर व्हावंच लागेल! अन्यथा राघो कदम, पार्वता कदम यांची आगीत भस्म झालेली मढीही बोलायला लागतील मामा!"
भाना डोळ्यात अंगार फुलवत संतापला.
राघो कदम व पार्वता कदम ही नावं निघताच बाजी सावंत थरथरला. ते थरथरत भानाकडं पाहू लागले.
वातावरण बिघडू पाहतंय म्हणून शिंदे मध्ये पडले.
" भाना ऐक! आताच्या घडीला तुळसाचं करीअर महत्वाचं आहे. शो साठी तू जर तिला मदत गेली तर सहा महिन्यात दोघे स्टारडम होणारच. मग हवंतर लग्नाचा विचार करू!"
" सहा महिन्यात तिला स्टारडम होत घडवू देत करीअर! आम्ही अडवणार नाही!"
" अरे तू तिच्या जोडीला काम करशील तेव्हा हे शक्य होईल ना!"
भाना रागातही मिश्कील हसला
" शिंदे मामा! शिंदे सर! प्राध्यापकास खोटं बोलणं शोभत नाही व बोलूही नये! पितळ उघडं पडतं लगेच. तुम्हीच बोलले ना रांगा लागल्यात म्हणून! मग रांगेतला हवा तो घ्या नी घडवा करीअर! रघू दादास थांबवण्याची जबाबदारी माझी,!"
" भाना! शर्मा तुझ्या नावावरच अडलेत! "
" मग माणसानं सरळ शरणागगती पत्करावी !"
" भाना आमची जशी गोची झालीय तशीच तुझीही झालीय! आम्हास तुळसेसोबत शो साठी तू हवाय तर तुला रघू साठी तुळसा!"
" मामा गोची तुमची झालीय फक्त! रघूला जशी तुळसा हवीय तसाच तुळसेला ही रघू हवाय! पण तिला तो जवळ असल्यानं कळत नाही! जर तो रुसला व दूर झाला तर लक्षात ठेवा तुमच्या अंगणातल्या तुळसेच्या साऱ्या मंजिऱ्या गळत तुळस वाफसल्याशिवाय राहणार नाही!"
" भाना, एक मदत तू कर! तुळसासोबत सहा महिने हा शो करत जर हिट केला तर बाजी दाजी खुशीनं तुळसाचं रघूशी लग्न लावून देतील!"
" म्हणजे तुमच्या मुलीस पुन्हा मला टेकू द्यावा लागेल तर! मामा किती दिवस टेकू घेत मोठे होत राहणार,? कधी आमच्या जमिनीचा टेकू, कधी आमच्या मदतीचा टेकू!"
भाना बोलला नी बाजी सावंत संतापात उठत धावले. पण शिंदेनं त्यांना शांत करत बसवलं.
" मामा ठिक आहे हा शो मी करतो! पण लक्षात ठेवा जर का पुन्हा या तुळसेनं वा या तुमच्या दाजीनं काही कुरापती करत रघू दादाच्या लग्नास नकार दिला तर मग हा भाना आग लावल्याशिवाय राहणार नाही!"
बाजी मामा, तुळसा व शिंदे मामा सारे तयार झाले. पुढच्या दहा दिवसांत शर्माशी सारं बोलणं करत भाना व तुळसास परस्पर मुंबईस पाठवलं.
भानानं रघू दादास व बापूस फोन करत फक्त टि.व्ही शो साठी मुंबईस चाललो एवढंच सांगितलं.
मनात मात्र भाना कळवळलाच.
' दादा तुझ्यासाठीच चाललोय! आमच्या दादाच्या मैनेस परत आमराईत आणण्यासाठी! उंच उडणाऱ्या भिंगार मैनेस राघूच्या उंचीवर आणण्यासाठी!'
भानानं काशीमामाशी बोलण्याचा भरपूर प्रयत्न केला पण ना काशी मामाशी संपर्क झाला ना मामीशी! सुगंधाशी तर दूरच! सुगंधाशी बोलण्यासाठी त्याची तगमग होऊ लागली.
भाना गेला नी साऱ्यांनाच एका खोल गर्तेत टाकून गेला.उमर्ठीत नवीच समीकरणे जुळू लागली. काही एकचल समीकरणे गरज नसतांना द्विचल करत सोडवण्याचा हुडदंग सुरू झाला.
.
.
.
. क्रमशः...
भाग ::-- दहावा
वा.......पा........
भाना शो साठी मुंबई ला गेला व त्यानंतर पंधरा दिवसांनी भाना हा तुळसा सोबतच गेलाय हे कळताच रघूची वरुन आभाळ कोसळत असतांनाच पायाखालची जमीनही निसटतेय की काय अशी अवस्था झाली. तुळसाचं ठिक पण ज्या भानाला सख्ख्या भावापेक्षा जास्त प्रेम दिलं त्यानंच असं करावं यानं रघूचा जगण्यावरील व नात्यावरील विश्वासच उडाला.
'आमचं दोघांचं पक्क ठरलं!' हे तुळसेचं म्हणनं त्यानं सुरुवातीस मनावर घेतलंच नव्हतं. आपला भाना असं वागणारच नाही ही खात्री होती. पण 'भरवश्याच्या म्हशीलाच टोणगा' ही गत झाली. रघू आतून हादरला. भानाला नेमकं फसवण्यासाठी आपणच सापडलो का ? हा सवाल रघूस झोपू देईना.
बंकट बापू व अंजा मावशीस सुरुवातीस भाना बोलला तेव्हा काहीच वाटलं नव्हतं पण जेव्हा बाजी व पारू गावात बोलू लागले की
"भाना व तुळसा केवळ शो साठीच गेले नाहीत तर ते तिकडेच परस्पर सिंगापूरला लग्नासाठी गेलेत! आता ते लग्न करुन परततात की तिकडेच सेटल होतात ,काहीच सांगता येणार नाही" तेव्हा मात्र अंजा मावशी व बापूस एकदम जिव्हारी लागलं. आपण तर तुळसाशी लग्न लावूनच देणार होतो मग भानानं शो साठी जातोय असं खोटं का सांगावं! परस्पर लग्न का लावावं? अंजा मावशी घरात तणफणाट करू लागली व आपली बहिण मंजास जाब विचारत कोसू लागली.
" अंजे, भाना लग्न परस्पर करणार की नाही हे आ
अजून पक्कं नाही! समजा केलंही तरी त्यात मंजाचा काय दोष? मूर्खासारखं वागू नको!" बापू अंजाबाईस आवरू लागले.
बापू व अंजाबाईनं या धक्क्यातून सावरत रघूसाठी लवकरच निर्णय घेतला. त्यांनी काशी व मालूस घरी बोलवलं.
" काशी! आमच्या रघूबाबत काय झालं ते तुम्हास सारं ठाऊक आहेच! त्यात भानाची चूक आहे किंवा नाही हे येणारा काळच ठरवेल!....."
" भानानं असं वागणं हे शोभणारं नाहीच बापू! असं शेण खायला नको होतं! तुम्ही माफ करणार पण आम्ही माफ नाही करणार! आमच्या मुलीस फसवून सख्ख्या भावासही दगाच दिला!" मालू मामी लाल होत तणफणली.
" मालू! माझा भानू तसा तर नव्हताच गं ! असं का व कसं घडलं तेच समजत नाही!" बापू कळवळले.
" याचं असंच! तो सारी लंका जाळून गेला तरी हे त्याच्या सावपणाचाच डंका वाजणार!" अंजामावशीनंही मालूची बाजू घेत नवऱ्यावर आग पाखडली.
" अंजे, झालं गेलं त्यावर आता बोलण्यापेक्षा पुढे काय त्यावर बोलूयात!"
" बापू! आता बोलण्या सारखं काय उरलं आपल्या हातात!" काशी वेदनेनं बोलला.
" काशी! तुमची इच्छा असेल तर सुगंधास रघूसाठी आम्ही मागणी घालतो! लग्न लावून दोन्ही घराची इज्जत झाकली जाईल अजूनही!"
काशीचे डोळे चमकले व त्यानं आशेनं मालूकडं पाहिलं.
" काशीदादा, मालू! नाही म्हणू नका ! माझा रघूही गुणी आहे!" अंजाबाई आशेनं पाहू लागली.
मालूनंही विचार केला की रघू एकटा आहे शिवाय मास्तर आहे! आपली सुगंधा सुखी होईल. तिनं मागचं भानाचं दु:खं विसरत सुगंधासाठी रघूस होकार दिला. साऱ्यांचा जीव भांड्यात पडला.
" मालू! सुगंधाला लवकर बोलवून घे व तुझ्या मास्तर भावाचाही सल्ला घे हवंतर!"
" बापू, ताई आमचा होकारच समजा पण आधीसारखा आता मात्र नकार देऊ नका!"
" मालू बापूचा शब्द आहे! सुगंधा आमची सून होणार म्हणजे होणारच!"
बापूं व अंजाबाईंनी इथेच चूक केली. त्यांनी रघूस गृहीत धरलं. पण रघूला तर तुळसेच्या धक्क्यानं व बोलण्याने जिवनाची आसक्ती राहिली नव्हती तर लग्नाची आणखी कुठून! त्यात सुगंधाशी तर मुळीच नाही. त्यानंतर बापूंनी त्याला दोन तीनदा फोन करून उमर्ठीला बोलवलं. पण महिनाभर रघू आलाचं नाही. उमर्ठी, उमर्ठीतली बाजी मामाची आमराई आठवूनच त्याच्या साऱ्या देहाची आग आग होऊ लागली. मालूबाई सुगंधास काही एक न सांगता उमर्ठीला घेऊन आली. येतांना तिनं आपल्या मास्तर भाऊस कानात सांगत सल्ला विचारला.
" ताई, ज्या घरातल्या एका मुलानं नाकारलं तरी पुन्हा त्याच घरात पुन्हा का देताहेत सुगंधास! त्यापेक्षा मी एखादा मास्तर पाहतो व सुगंधाचं लग्न लावून देतो!"
" दादा, गेला तो जाऊ दे ! पण रघू ही गुणी आहे व मास्तरच आहे. शिवाय माझी लेक माझ्या डोळ्यासमोर राहील!"
मास्तरानं बहिणीसमोर माघार घेतली. मालुबाईनं सुगंधास उमर्ठीला आणलं पण रघू येईना.
सुगंधा उमर्ठीला येताच भानाचा तपास करू लागली. तुळसा बोलली तरी आई जगदंबेच्या गडावर घेतलेल्या आणाभाका आपला भाना विसरणार नाही याची तिला शाश्वती होती. फक्त आता भानाशी बोलण्यासाठी ती भानास शोधत होती. तिनं सुशांतला गाठलं.
" सनेर!" तिच्या डोळ्यात आसवे तरळली.
" सुगंधा बोल काय झालं?"
" तुझा जोशी मास्तर कुठाय? त्याच्याशी बोलायचंय मला!" ती कळवळून म्हणाली.
सुशांतलाही गलबलून आलं.
" सुगंधा, बाजी काका व पारू काकी गावात काहीही वावड्या उठवत आहेत! पण माझा भान्या तसा नाही गं! मागे त्याचा फोन आला होता! बंकट बापू काशी मामा व रघू दादा व्यवस्थीत बोलत नाही असं सांगत होता!"
" त्याला काॅल कर आताच!"
" तो मुंबई हून सिंगापूरला गेलाय! तेव्हा तो म्हणाला होता की नवीन नंबर घेतला की काॅल करतो असं पण नंतर त्याचा आलाच नाही."
" सुशा! आला की काहीही करुन मला बोलव. किंवा माझा निरोप तरी दे!"
सुगंधा आज सनेरला पहिल्यांदाच सुशा बोलली व सुशाच्या डोळ्यास धारा लागल्या.
" सुगंधा ,घाबरू नको! त्या भान्याचा काॅल येऊ दे , लगेच बोलायला लावतो तुझ्याशी!" सुशांतनं तिला धीर दिला.
बऱ्याच दिवसांनी रघू; तुळसा उमर्ठीत नाही व बापूंचा पुन्हा पुन्हा काॅल येतोय म्हणून आला. बापू व आईनं त्याला बसवलं. काशी मामास व मालूसही बोलवलं.
" रघू! झालं ते वाईटच! त्याला विसरत आम्ही निर्णय घेतलाय. सुगंधा व तुझं लग्न ....." बापू बोलले व रघूकडे पाहू लागले.पण रघूच त्याच्याकडं फाटक्या नजरेनं व विदीर्ण भावनेनं पाहू लागला.
" बापू, माझ्या लग्नाची का एवढी घाई लागली तुम्हास?"
" रघू, घाई नाही रे! पण तरी ज्या त्या गोष्टी ज्या त्या वयात झाल्या तर बरं!"
" बापू, सद्या तरी मला लग्न हा विषय च नकोय!"
" रघू, तुला नसेल रे ! पण माझा, तुझ्या आईचा विचार कर! आमच्या साठी तरी विचार कर! वेडेपणा करु नको! त्यांच्यासाठी का असं वागतोस!"
" बापू! मला कुणाशीच काही म्हणनं नाही.पण लग्न नकोच!"
" रघू , तू मुलाची जात! तू थांबशीलही! पण या काशी व मालूनं आपल्या सुगंधास किती दिवस थांबवावं!"
" बापू, मामास मी कशाला थांबवू? त्यांनी खुशाल सुगंधाचं करावं लग्न!"
" रघू ऐक! बाकी तुझं तुझ्याकडं ठेव.आम्ही सुगंधासाठी शब्द दिलाय त्यांना व लगेच आम्ही तयारी करणार आहोत तुमच्या लग्नाची!"
" बापू, त्यांनी एक मूर्खपणा केला म्हणून आपणही तसा मूर्खपणा करावा का?"
" काय म्हणायचं तुला?"
" सुगंधा तयार आहे का या लग्नाला? तिला माझ्यासमोर विचारा बरं!"
" तिला काय विचारायचं रघू दादा!" मालू मामी बोलली.
" मामी! लग्न तिचं करायचं म्हटल्यावर तिला विचारावंच लागेल ना! तिला आधी विचारा"
रघूनं सर्वांना साफ शब्दात धुडकावलं.
दुसऱ्या दिवशी बापू व अंजाबाई काशीच्या घरी गेले.
" सुगंधा! बापू व आत्या
काय विचारत आहेत तुला, इकडं ये!"
मालुबाईनं सुगंधाला बोलवत सांगितलं.
" काय झालं आत्या!" सुगंधाला काहीच माहीत नसल्यानं ती
जवळ बसत विचारु लागली.
" सुगंधा! रघू व तुझं लग्न करायचा विचार करतोय आम्ही!" अंजाबाई बोलल्या.
सुगंधाला ऐकताच जबर धक्का बसत ती जागेवरच मागे सरत भिंतीला टेकली व ऊर फाडत आक्रंदू लागली.
अंजा आत्यास बिलगत तिचा हुंदकाच थांबेना.
" आत्या, सारं माहीत असून का असं ?" ती रडत प्रश्नचिन्ह उभं करू लागली.
" सुगंधा! मोठी माणसं चांगल्यासाठीच निर्णय घेतात! मुकाट्यानं ऐक!"
" आत्या, बापू! हात जोडते.....भानाशिवाय मी....
दुसरा विचारच करणार नाही...आईनं मारून टाकलं तरी..माझा निर्णय अंतिम आहे!"
" सुगंधा, मुस्काट फोडीन त्याचं नाव काढलं तर!" मालूबाई तिच्यावर चालून जात म्हणाली. तोवर बापूनं तिला आवरलं.
" सुगंधा, तुझं म्हणनं योग्यच होतं गं! पण तोच भाना थांबला नाही म्हटल्यावर तू का त्याच्यासाठी थांबावं?"
" भाना थांबला नाही म्हणजे? बापू तुम्हीही त्या तुळसाच्या सांगण्यावर विश्वास ठेवताय?"
" सुगंधा ,विश्वास ठेवण्यासाठी विश्वास ठेवणारी माणसं राहिलीच कुठं गं! ज्याला सर्वजण मानत होते त्याच भानाने तुळसाला घेत शो केलाय व त्याचा कार्यक्रम टि.व्हीवर यायला लागलाही. तू पाहिला असेलच.पण गोष्ट इतपतच मर्यादित नाही राहिली गं! कदाचित आता पावेतो त्यांनी लग्न ही....."
" बापू ,माझा भाना मुळीच असं करणार नाही! निदान त्याला विचारल्याशिवाय तरी मी विश्वास ठेवणार नाही!"
" सुगंधे, तसं नसतं तर त्याचे फोन बंद झालेच नसते गं!"
" बापू निदान तुम्ही तरी असं बोलू नका हो!" सुगंधा ह्रदयाला चिर पडेल असं रडू लागली.
" सुगंधा, रघूला हो करतोय आम्ही!" मालू बाई जोरात दटावत म्हणाल्या.
" आई, ज्या रघू दादाला मी मोठा भाऊ मानत आले तो दादा मी तयार झाले तरी मुळीच तयार होणार नाही!"
" तु तयार हो! रघू तयार आहे!" बापू आशेनं म्हणाले.
" मुळीच नाही! दादानं माझ्यासमोर म्हणावं एकदा! दादा तयार असेल तर मी भानाचा विचार करणार नाही हवंतर!" सुगंधानंही खोडा घातला.
मालूबाई अंजाबाईला कोपऱ्यात घेत म्हणाल्या.
" ताई आता रघू दादास तयार करण्याचं काम तुमचं!"
रघूनं सुगंधाला तर सुगंधानं रघू दादाला विचारायला लावलं.
बापू घरी परतले. पण नंतर त्यांची रघूला विचारायची इच्छाच झाली नाही. भावा बहिणीच्या पवित्र नात्याला नवीन नात्यात बांधण्याइतपत आपण मोठे नाहीत ही खुजेपणाची जाणीव त्यांना झाली.
रघू पाचोऱ्याला परततांना सुगंधास भेटला.
" सुगंधा! घरचे जबाबदारी च्या ओझ्याखाली समजदार बनत असले व भाना तुळसेनं चूक केली म्हणून हा रघू शेण खाणार नाही! तुझा पाया पडतो एक ऐक! मला आता उभ्या आयुष्यात शक्य नाही. पण घरच्या लोकांसाठी तरी तू लग्न कर! "
सुगंधा दादाकडं पाहत आसवं भरल्या डोळ्यानं पाहत म्हणाली.
" मग दादा घरच्यांच्या इच्छेखातर तूच कर ना माझ्याशी लग्न!"
रघूचा ही संयम सुटला व तो ही ढसाढसा रडू लागला.
" सुगंधा, ज्याच्यासाठी आपल्या दोघांचा जीव तुटतोय त्यांचा जीव का नाही तुटला गं!"
" दादा, माझा माझ्या ढागाळलेल्या चंद्रावर पूर्ण विश्वास आहे! माझा चांद घडी लागल्यानं माझ्या नभात दिसत नसेल पण तो येईलच! आणि म्हणून मी त्या पुनवेची वाट कायम पाहत राहील! तो येवो अथवा न येवो! या जगाच्या प्रथा पार पडल्या तरी माझ्या हातातील हिरव्या चुड्यात त्याचीच किणकिण उठत राहील!" ती रडतच म्हणाली.
" सुगंधा, तुझ्या चंद्राची तरी तू वाट पाहू शकते. पण आमची शुक्रचांदणी उगवणारच नाही! आणि उगवली तरी तिला चेहरा दिसण्याच्या आत हा चंद्र अस्ताला जाईल!"
रघू घरच्यांना सपशेल नकार देत परतला व मालू मामी पुन्हा संतापली.
" अंजाताई, माझी लेक तुम्हास टोपलीतला भाजीपाला वाटली का?"
आता मात्र बापूंची मान शरमेनं खाली गेली. आपल्या दोन्ही पोरांनी हिच्या लेकीस अवहेरून आपणास गुन्हेगार ठरवत कठढ्यात उभं केलं.
मालूबाई व काशीनं पोरीस पुन्हा मामाकडं पोहोचवलं.
" दादा, तुला वाटेल तसा मुलगा पहा पण सुगंधाचं लवकरात लवकर उरकवं!" मालूनं भावास विनवलं.
बाजीस जेव्हा सुगंधानं रघूस नकार दिल्याचं कळालं तेव्हाच बाजीनं काशीला मळ्यात बाजूला घेतलं.
" काशी पवार! थोडी तरी नात्याची व उपकाराची जाण ठेव! तुला एका वेळच्या खाण्यास मोताद होती. दूरचा नात्यातला भाऊ म्हणून तुला उमर्ठीला आणलं व तुला पोसत आलो. याद राख! तुळसा व भानाच्या मध्ये जर तुझी सुगंधा आली तर तुझं आख्खं खांड मातीत गाडीन! बऱ्या बोलानं सांगतोय महिन्याच्या आत तिचे हात कुठे ही पिवळे कर! ऐकत नसेल तर तिकडेच तिची राख कर!"
बाजी सावंताच्या एका धमकीतच काशी मधुरा झाल्यागत पिवळा झाला व त्यानं सुगंधासाठी शालकास लवकर उरकायला लावलं.
गुणा मास्तराच्या जुन्या मित्राच्या नात्यातला पाचोऱ्याचा मुलगा नंदुरबार जिल्ह्यात तोरणमाळजवळ शिक्षक होता. गुणा मास्तर मित्राला घेत पाचोऱ्याला गेला. शिक्षक असलेला सत्यम लोखंडे गुणा मास्तरास आवडला. तो आमत्रण देत हंबर्डीला परतला. त्यानं बहिण मेव्हण्यास कळवलं.
सत्यम लोखंडे पहायला आला. सुगंधाला कळताच ती आकांत करत मामास नकार देऊ लागली. मालूबाई आल्या. मालूबाईनं पुढच्या ओट्यावर पहायला आलेला मुलगा बसला असतांनाही नकार देणाऱ्या सुगंधास मागच्या घरातल्या खोलीत घेत मजबूत चोपलं. सुगंधा आईचा मार खाऊ लागली पण मुलापुढे जायला नकार देऊ लागली. मालूबाई मारून मारून थकल्या.
गुणा मामानं सुगंधास हातपाय जोडत विनवलं.
" सुगंधा, ऐक! हवंतर लग्न नको करू पण आता मुलगा आलाय तर नुसती उभी रहा! तो पाहून परत गेला की हवंतर नकार कळवेन मी! पण माझी इज्जत नको घालवू! मी आमंत्रण देऊन आलोय!"
सुगंधा जेमतेम पाणी घेऊन गेली. सुगंधाचा चेहरा मार खाऊन व रडून सुजलेला. तरी सत्यम लोखंडेचा नकार द्यायचा प्रश्नच नव्हता. त्यानं सुगंधास पसंत केलं.
सुगंधा दुसऱ्या दिवशी आई व वडील हंबर्डीला असतांनाच उमर्ठीला परतली. तिनं सुशांतला भेटण्यासाठी घरी बोलवलं.
" सुगंधा , भानाचा फोन आला होता गं! तुझ्याशी बोलण्यासाठी तो ही आतूर आहे ! मी तुझ्या घरी आलो होतो पण तु नव्हती व तुझी आई संताप करत होती,! पण तरी त्यानं त्याचा नंबर दिलाय! थांब लावतो आता.
पण बराच वेळ प्रयत्न करूनही भानाचा फोन लागेना! तेवढ्यात समोरून बाजी काका येतांना तिला दिसला. सुशांतला मग निघणं भाग पडलं.
" काय गं सुगंधा! काशी व माली नाही आलीत का?"
" येत आहेत!" सुगंधानं टाळण्यासाठी मोघम उत्तर दिलं.
बाजी सावंतानं आजुबाजुला पाहिलं. त्याला माहीत होतं की जो पर्यंत ही इथं आहे तो पावेतो तो भान्या तिथं ही स्थीर राहील. एकदाची ही गेली तरच त्याचं संतुलन.....!
" सुगंधा! भानाचा बाप सदा देसले कसा मेला तुला माहीत आहे का गं?"
" नाही!" सुगंधा तोऱ्यातच म्हणाली व काका असं का विचारतोय म्हणून चक्रावली.
" सुगंधा पोरी! ही दुनिया खूप जालीम आहे गं! बिचारा टाळकरी वारकरी पापभिरू माणूस होता गं! पूर्ण फिडर बंद करून काम करत असतांना कुणी तरी दहा पंधरा हजारात विकलं गेलं व फिडर दिलं सुरू करून! बिचारे आमचे सदा दाजी बोंबलागत भाजले व पडून तडफडून गेले!"
" काका, मला का सांगताय?"
" सुगंधा पोरी! जालीम दुनिया कशी आहे ते सांगतोय तुला! बाकी तू शहाणी आहेस! आता त्याच सदा दाजीचा भाना एवढ्या दूर अनजान देशात गेलाय! सिंगापूर,! तो ज्या हाॅटेलात उतरलाय ते पंच तारांकीत हाॅटेल आहे म्हणे! पॅन पॅसिफिक! काय सांगाव ,कसं सांगाव! लाख दिड लाखात सदाचं जसं झालं तसंच भानाचं ही व्हावं!"
" ............." सुगंधा कोरड पडलेल्या तोंडात जीभ फिरवू लागली. तिला बाजी काकाच्या डोळ्यात लाली दिसू लागली.
" सुगंधा, असलं काही घडू नये या मताचा मी आहे! पण तरी एक काळजी तू घ्यावीस असं मला वाटतं! जो मुलगा पहायला आला त्याला मुकाट्यानं होकार दे! भानासाठी थांबलीस तर भाना तुझ्यासाठी थांबेल ही खात्री मी देणार नाही!"
बाजीनं धमकी दिली व सुगंधाच्या देहातली शक्तीच गेली. तिचं सारं अंग थरथर कापू लागलं.
" लग्न करुन तु निघून गेलीस तर निदान जीवंत राहिला तर डोळ्यांना तरी दिसेल!" हे पक्कं लक्षात ठेव! कुणाला काही सांगण्याच्या भानगडीत तर मुळीच पडू नको!"
सुगंधा आली तशीच हंबर्डीला परतली. आज तिला आपण या जगातल्या धनदांडग्यासमोर किती क:पदार्थ आहोत याची जाणीव झाली. आपल्या ह्रदयात भावना उमडू शकतात . पण त्या भावनेच्या लाटेवर स्वार व्हावं की नाही हे ठरवणं आपल्या हातात नाही. तिनं मामास सत्यम लोखंडेला होकार द्यायला लावला. दिवसभर न सापडलेली पोर रात्री परत येते व होकार देते याचा काशी व मालूस कोण आनंद झाला. मालूबाई तिच्या सुजलेल्या पाठीवर हळद लावू लागली.
स्टेजवर निवेदन करतांना हजार लोकांसमोर धाडधाड बोलणारे आपण बाजी काकास एका शब्दानं रोखू शकलो नाही. कारण आपल्या प्राणप्रिय पोपटाची मानगूटच त्यांच्या बोटाच्या चिमटीत आहे व आपल्या एका शब्दानं देखील नख लावत ते आपल्या पोपटाची मानगूट क्षणात पिरगाळतील ही एकचं जाणीव.
सत्यम लोखंडेसोबत हंबर्डीतच येत्या आठ दिवसांत लग्न ठरलं.
भानाला सुशांतकडून सुगंधा दोन वेळेस उमर्ठीला येऊन गेल्याचं कळताच त्यानं सुशांतला हंबर्डीलाच जायला लावलं. पण मध्यंतरी सुशांतलाही बाहेर गावी काम निघालं. भानाकडं फक्त काशीमामाचा नंबर. पण काशीमामाचा नंबरच बंद.
सुगंधास हळद लागली. उमर्ठीतल्या कुणालाच कळवलं नाही. ना बंकट बापू! ना रघू! ना बाजी कदम! अगदी सरळ सरळ मंदीरातच माळा टाकत दोन्ही पक्षाना कसली इतकी घाई होती कुणास ठाऊक. सुशांत हंबर्डीला गेला व त्याला हळद लागलेल्या सुगंधास पाहताच धक्का बसला. तो सुन्न होत बधिरतेनं आ वासून पाहू लागला. त्यानं मोजक्याच उपस्थित गर्दीतही सुगंधाला भानाच्या फोनबाबत सांगितलं.
" सुशा फोन बंद कर व आलास तर तू तरी लग्नास थांब! भानास त्याचा शो होईपर्यंत लग्नाबाबत काहीच कळवणार नाहीस अशी शपथ आहे तुला!"
लग्न लावून पाचोऱ्यात पंधरा दिवस राहिली व सरळ नवऱ्यासोबत सुगंधा तोरणमाळच्या सातपुडा पर्वतात आली.
रघूला नंदुरबार जिल्ह्यात नोकरीचा आदेश आला व त्याला ही जणू सुगंधाचे हाल पाहण्यासाठी की रघूचं समईगत जळणं सुगंधाला पाहता यावं म्हणून रघूलाही तोरणमाळ जवळचाच पाडा मिळाला! पाचोऱ्यातील अप्पा गितेंच्या संस्थेत राजीनामा देत रघू सातपुडा पर्वतातील तोरणमाळ चा घाट चढला!
.
.
क्रमशः