हिरवा चुडा
वा.......पा...............
सुशांत हंबर्डीहून लग्न आटोपून परतला. भानाचा त्यास दररोज काॅल येऊ लागला. सुशांतपुढं मोठा पेच पडला. सांगावं की नको? दररोज काय कारणं द्यावीत!
" सुशा! बऱ्या बोलानं उमर्ठीत काय घडलंय ते सांग!"
" ..............." सुशांत ला काय बोलावं ते सुचेना.
" सुशा! रघू दादा व बापूसारखंच तू ही वागायला लागलास की काय? नेमकं काय घडलंय रे! काही तर मला चक्क ब्लाॅक करतायत! सुशा तू तर सांग!"
" भान्या! तू लवकर परत ये यार!"
" आधी काय घडलंय ते तर सांग?"
" तू केव्हा परत येतोस? तू आला की बोलू सवडीनं आपण!"
सुशांतनं फोन कट केला.
भाना संतापला. त्याला कळून चुकलं की उमर्ठीत काही तरी विचीत्र घडलं असावं! आपला कार्यक्रम एवढा गाजतोय पण भोसले सर,अप्पा गिते व नाशीकचे विश्वासराव व आक्का यांच्याखेरीज घरच्यापैंकी कुणी आपलं साधं कौतुक ही केलं नाही. एरवी दहावीला पहिला आलो तरी उमर्ठीत पेढे वाटणारे आपले बापू टिव्हीवर कार्यक्रम पाहून ही फोन का करत नसावेत. सुरुवातीस तरी आपण फोन केल्यावर बोलत होते पण नंतर तर फोनवर बोलणंच नाही. सुरुवातीस आपलंही चुकलंच. सिंगापूरला आल्यावर शुटींगच्या घाईत एक महिना नविन सीम घेणं जमलंच नाही. तुळसानंही आज उद्या करत चालढकल केली व तेथूनच रघू दादा काशीमामा यांनी तर आपला नंबरच ब्लाॅक केला.
काय घडलं असावं तो पडल्या
पडल्या विचार करू लागला. त्याला मागील चार पाच महिन्याची आपली धावपळ व सारा क्रम आठवला.
.
.
रघूशी तुळसानं लग्नाचा होकार द्यावा म्हणून भाना शोसाठी तयार झाला. त्यानं घरुन निघतांना शोसाठी मुंबई चाललो एवढंच सांगितलं. तुळसा व बाजीमामाशी काय बोलणं झालं याबाबत काहीच कल्पना दिली नाही. त्याला आपल्या रघू दादासाठी तुळसाला परत आणणं महत्वाचं होतं.
मुंबईला येताच दोघांनी शंकर मामासह शंतनू शर्माची भेट घेतली. शर्मानं त्यांच्या स्क्रीन टेस्ट घेतल्या, आॅडीशन्स घेतल्या. कारण भाना व तुळसानं आजपावेतो स्टेजवर अनेक शो केले असले तरी कॅमेरासमोर ते प्रथमच येणार होते. आठ दिवस शर्माचा मुलगा केदार शर्मा सहायक निर्देशक म्हणून नवीनच उतरत होता. त्यानं व शंतनू शर्मानं दोघांना बऱ्याच बारीक सारीक बाबी समजावल्या. सुरुवातीस त्यांना एका वाहिनीच्या अवार्ड शोचं अॅंकरींग करण्याची संधी मिळाली. भानानं त्या संधीचं सोनं करत तुळसास सांभाळून घेत धमाल उडवली. त्याची शब्दफेक, सेन्स आॅफ ह्यूमर, आवाज, पाॅज घेत नजरेनं समोरच्याला बोलतं करणं वा समोरच्यानं सवाल केला तर प्रसंगावधान राखत उचीत उत्तर देत अॅंकरीगचा फ्लो सांभाळत कार्यक्रम पुढे सरकवणं या बाबी त्याच्या प्रकर्षणानं उठून दिसू लागल्या. शंतनू शर्मा खूश झाला. त्यानं भानास लगेच प्रमोट करत या जोडीस थेट सिंगापूरच्या आपल्या युनीटवर नेलं. युनीट आधीच 'पॅन पॅसिफिक' हाॅटेलवर गेलं होतं. भारतीय प्रादेशीक नृत्य प्रकारावर एक भव्य डान्स शो ते निर्देशीत करत होते. आपल्या मुलास- केदार शर्मास ते निर्देशन क्षेत्रात आणत होते.
भाना सिंगापूरला गेल्यावर इतका बिझी झाला की त्याला घरच्यांशी बोलण्याची सवड मिळेना. एवढा मोठा शो म्हटल्यावर त्यातील प्रत्येक स्पर्धकाची प्रोफाईल पाहत त्याची वैयक्तिक माहिती मिळवणं विविध भारतीय नृत्यकला अभ्यासत बारकावे अभ्यासणं यातच तो मग्न झाला. कारण अॅंकरींग करतांना या सर्व बाबी त्याला उजागर कराव्या लागत. त्या प्रकारानुसार उचीत काव्य अभंग, ओवी, हिंदी सिनेमाच्या गिताच्या लाईन प्रेझेंट करणं , भारतीय संस्कृती ची महानता समोर ठेवणं या सर्व गोष्टी तो चपखल मांडे. पन्नास भागापैंकी दणादण वीस भागांचं शुटींग झालं व शो टि.व्ही.वर सुरू झाला. शो जबर टिआरपी मिळवू लागला.
भानाला शोच्या प्रत्येक शुटींग दरम्यान सुगंधाची उणीव भासे. आपण हे बोलल्यावर ती काय बोलली असती हे त्याला लगेच उरात उमटे मग तयारी करतांनाच तो तुळसास मी हे बोलल्यावर तू काय बोलावं हे तो आधीच पढवून ठेवे. मग शुटींगवेळी त्यांचं बरोबर ट्युनींग जुळू लागलं. समोर त्याला तुळसा दिसेच ना! तिच्या जागी तीच घारी नजर, कुरळे केस सावरणारी तीच सुगंधा! तर कधी एक दोन बटा मुद्दाम गालावर भुरभुरवणारी व गालावर खळी उमटवणारी सुगंधा त्याला दिसू लागे नी मग ह्रदयातून सर्वांगसुंदर अॅंकरींग बाहेर पडे पण मग मात्र तुळसाला तो प्रवाह साधणं जमेना व तिची भंबेरी उडे. मग तोच सर्व सुत्र सांभाळत प्रवाह पुढं नेई.
शो चं प्रक्षेपण आठवड्यात दोन दिवस होई. पस्तीस चाळीस भाग झाले व त्याला घराशिवाय व सुगंधाशिवाय राहणं मुश्कील होऊ लागलं. मध्यंतरी त्यानं सवड काढत सीम कार्ड मिळवलं. सुशांतशी बोलणं होऊ लागलं. पण बऱ्याच वेळा शुटींग दरम्यान दिवसभर फोन रिसीव्ह करता येईना. म्हणून सुगंधा उमर्ठीत येऊनही त्याचं बोलणं झालं नाही. त्यात त्याला तुळसाचा संशय येऊ लागला. हल्ली केदार शर्माशी ती जास्तच सलगी करू लागली. शंतनू शर्मास शंकर शिंदेनं काही तरी सांगीतलं असावं की काय ते ही सुरुवातीस काम करतांना फोन दूरच ठेवायला सांगू लागले होते.
ज्या रघू दादासाठी आपण आलोत त्या दादाशी ही तुळसा शो एवढा यशस्वी होत असुन, आता तिचं करीअर नक्कीच बनलंय ही खात्री होऊनही ती कधीच बोलत नव्हती.
भानानं तिला याबाबत छेडलं ही.
" तुळसा तुझा पहिलाच शो एवढा सुपरहिट झालाय की आता भारतात परतताच आपोआप नवीन नवीन कामं आपोआप येतीलच. आता तू मामास लवकर लग्नाची तयारी करायला लाव! आणि दादाशी का बोलत नाही गं! आमच्या दादांना तुझ्याकडून हे कळू दे!"
" भाना! तुझा दादा शो पाहतच असेल ना! मग त्यानं फोन केला असता तर काय बिघडलं असतं रे!"
तुळसाचा हा प्रश्न तर त्यालाच आधी पडला होता. पण तरी बाजू सावरत तो म्हणाला.
" तुळसा, येतांना तू व मामा यांनी नकार दिलाय दादाला म्हणून राग असेल गं! पण तू तरी राग काढ दादाचा! बोल माझ्यासमोर त्याच्याशी!"
" भाना! मग तर तुझ्या दादास त्याच भ्रमात राहू दे! भारतात परतून एकदम सरप्राईज देईन! भारतात परतलो की लग्नाचं ही तेव्हाच सांगू!"
.
.
भानाला सारं आठवलं. तो विचार गर्तेतून वर येत वाशरूम मध्ये जात फ्रेश झाला. त्यानं उठत खाली येत जेवण केलं. व सुशांतला पुन्हा फोन लावला. पण सुशांतनं जे काही उडवाउडवी करत सांगितलं व फोन कट केला यावरून त्याची धास्ती जास्तच वाढली. शो च्या शुटींगचे काहीच भाग बाकी होते. त्यानं रात्री रुममध्ये परतल्यावर गडावर सुगंधानं दिलेला हिरवा चुडा बाहेर काढला. चुड्याची किणकिण ऐकताच त्याला प्रसन्न वाटू लागलं. सुगंधाचे हिरवा चुडा घातलेले हात त्याला दिसू लागले.
त्याला गडावरचा तो पावसाळी दिवस आठवला. वादळी गार वारा, उनाड धो धो बरसणारा पाऊस व ओली सुगंधा.... त्याला खोलीत एकदम चिंब चिंब भिजलेला सुगंध व चुड्याची किणकिण जाणवू लागली. व बोल उठले!
" भाना! या कोऱ्या मनाची एक हौस आहे रे!"
" कोणती सांग? माणसानं हौस फेडणाऱ्या आपल्या माणसासमोर मनातल्या लिप्सा लपवण्याचा मूर्खपणा करु नये! जन्माचा पश्चात्ताप सोसत सरणावर जाण्यापेक्षा मनाच्या सांदीतल्या इच्छा प्रकट कराव्यात!"
" भाना महाराज ही प्रवचनाची वेळ नाही हो!"
" म्हणून तर विचारतोय!"
" पुनवेचा चंद्र मेघाआड चिंब चिंब होत रहावा, चांदणी ही रजत प्रकाशात व पावसात चिंबत असावी ! मस्त पावसाळी झडीच्या राती उंच डोंगरावर हातात हात धरुन फिरत रहावं. आभाळानं सांडलेला चांदणचुरा व मेघांनी ओतलेल्या धारा, गार वारा अंगावर घेत! कुणी कुणीच नसावं. द्वैत भावना एक होत आधी उभारलेला सारा निसर्ग प्रपंच विरत विरत जावा! तू तू न उरावा...मी मी न उरावी! केवळ रिक्त रिक्त होत जाणारी पोकळी!"
" सुगंधा! आज आषाढ पुनव आहे! पाऊस आहे, वारा आहे! चांदणचुरा सांडण्यास चंद्र पूर्व सांदीत येत आहे! समोर सह्य पर्वताच्या रांगा आहेत मग थांबूयात ना!"
"भाना! समोर नाशीक गाडी लागली बघ! चल पटकन अक्का वाट पाहत असेल!"
भाना तशीच रिक्त पोकळी मनात साठवत नाशीक बसमध्ये सुगंधास घेऊन बसला!
.
.
भानाच्या हातातून हिरवा चुडा खाली पडला व बिलोर छुणूणू न छून आवाज करत रुममध्ये घरंगळू लागले. भाना भानावर येत उठत चुडा उचलू लागला व रिक्त पोकळीत सामावत निद्राधीन झाला.
तुळसा आता केदार शर्माजवळ जास्त वेळ घालवू लागली. भानाला हे पाहून तळपायाची आग मस्तकात जाऊ लागली. पण तुळसाचं केदारजवळ जाणं हे केवळ ती भारतात परतल्यावर भाना नसला तरी केदार मार्फत काम मिळावं इतपत सिमीत होतं, हे भानास कळे. पण तरी रघू दादासाठी आपण इथं आलो ,शो केला तर आता तुळसा व बाजी मामानं शब्दास जागावं.
येण्याच्या आठ दिवस आधीच तुळसानं भानास दणका दिलाच.
" भाना! तुला काही कळलं का रे?"
" काय?"
" काल पप्पा सांगत होते......"
" काय?" भाना कान टवकारत पुन्हा जोरानं विचारता झाला.
" काशी काकाच्या त्या सुगंधानं कुठल्या तरी पाड्यावरच्या स्कुल मास्टराशी लग्न केलं म्हणे!"
.
.
कानाचे पडदे फाटले.....अंगातल्या धमन्या... शिरा..तटातट तुटू लागल्या....मेंदुच्या तर ठिकऱ्या ठिकऱ्या झाल्या...डोळ्यात निखारे फुलून डोळेच शिजत आहेत की काय......!
भावानं तुळसाच्या मुस्काटात छपाकदिशी लगावली. केस एका हातानं घट्ट पकडत
"नवीन असलं काही बोललीस तर इथच एका बुक्कीत गाडीन!"
तुळसा भानाचं रुप पाहून एकदम टरकली. तिला असलीच प्रतिक्रिया येईल हे माहीत होतं पण तरी प्रतिक्रिया इतकी उग्र असेल हे माहीत नव्हतं. तरी ती लालेलाल व फरफर सुजणारा गाल सावरत संतुलन तर अजुन शाबूत आहे सिंगापूरहून आपणास वेड्या भानाला न्यायचंय म्हणून पुन्हा धक्का दिलाच.
" भान्या! लग्न तिनं केलं नी मला का मारतोय! यातला एकही शब्द खोटा असेल तर एका बुक्कीतच मरायला ही तयार आहे मी!"
भानाचा आवेग सरासर वाढू लागला. त्याचं भान जाऊ लागलं त्या ही स्थितीत त्याला एकच आशा दिसू लागली..
" सुशा !........ खरं काय?" एकदम मोजकाच अंगार फुलला
सुशांत टरकला. फोनमधील आवाजावरुनच त्याला कल्पना आली व तो सुगंधानं घातलेली शपथ कुठल्या कुठे विसरला!
" भान्या.....कुणी सांगितलं?"
प्रश्नातच भानाची खात्री झाली व त्यानं मोबाईल समोरच्या भिंतीवर जोरात आपटला....
तो खाली येत शंतनू शर्माकडं गेला
" शर्मा साहेब, शुटींग रद्द करा व मला आताच्या आता परतायचं! परतण्याची तजवीज करा!
" भाना शेवटचे सेमी फायनल व फायनलचे राऊंड राहिलेत , वेड लागलं का तुला? काहीही काय बरळतोय!"
" शर्मा सांगितलं ना ........!
शर्मानं आपला एकेरी उल्लेख एका नवख्या कलाकाराच्या तोंडून ऐकला व लगेच ओळखलं की काहीतरी जबर बिनसलं. त्यानं भानास हो म्हणत शांत बसवलं. ते तुळसाला नेमकं काय घडलंय हे विचारू लागले. त्यांना कळताच युवा महोत्सवातील 'सुगंधा' त्यांना आठवली.
प्रसंग एकदम बाका होता.या स्टेजला शुटींग बंद करणं शक्यच नव्हतं. निर्मात्याचं करोडोचं नुकसान होतंच पण शो चं प्रक्षेपण हा ही मुद्दा होता. त्यांनी प्रेमानं भानास समजावलं. पण भानानं अशा काही नजरेतून पाहिलं की शर्मा ततफफ करू लागले.
शर्मानं तुळसाला सांगत भानास विनवायला लावलं.
" सरजी, तुम्ही अॅग्रीमेंट केलंय तर तो शो मध्येच असा सोडू शकत नाही! तशी धमकी द्या त्याला!"
" यस पापा! तुम्ही त्याला तंबी द्या! कसा शो सोडतोय मध्येच!"
" तुम्ही मूर्ख आहात! तंबी देऊन आपण त्याला रोखू ही शकू पण त्याच्यातल्या कलाकारास नाही रोखू शकत! आणि आता सेमी फायनल ला त्याचातला कलाकार तर हवाय मला!"
शर्मानं विचार केला आपले शुट होऊन तयार असलेले भाग अजुन तीन आठवडे चालतील. तो पावेतो आपणास अवकाश आहे. तो पावेतो भाना सावरेल! राहिला प्रश्न भारतात परतल्यावर लोकेशनचा तर काही तरी देशाभिमानाचा फंडा वापरत भारतात फायनल अशी जाहिरात करत तिथंच शुटींग करू व इथला खर्च ही वाचवू! शो लोकप्रियतेच्या कळसावर पोहोचलाय. तो कुठं शूट झालाय या गोष्टी आता मायने नाही राखत!
शर्मानं सारं युनीट भारतात आणलं.
तुळसाला आपण आठ दिवस आधीच सांगण्याची घाई केली याचा पश्चात्ताप झाला.
.
.
ती जळगावलाच थांबली. भाना तातडीनं उमर्ठीला परतला.
भानाला घरी पाहताच बापू मावशी त्याच्याकडं विखारी नजरेनं पाहू लागले.
" का? का? असं वागलास? तुझ्या लग्नाला आम्ही तयार असतांना शो साठी सिंगापूरला जात तिकडंच परस्पर लग्न करायची काय गरज होती?" बापू तुटणाऱ्या काळजानं रडत आक्रोश करू लागले.
भाना माजघरात भकास नजरेनं आढ्याकडं पाहत " बापू!..... सदा बाबाची जागा घेत खुर्दाण्यातून आणणाऱ्या माझ्या बापूस मी मानानं ती जागा अंतरात बहाल केली. मग का थांबवलं नाही माझ्या सुगंधाला?"
" नादान! तू थांबला नाही आणि वरून ती का थांबली नाही ? हे विचारतांना लाज का वाटत नाही.
नुसती आगपाखड, तीळ तीळ तुटणं, बराच वेळ होत राहिलं. हळूहळू गैरसमजाचे ढग विरत आभाळ मोकळं झालं पण मग एका मोठ्या विस्मयानं आश्चर्यानं भरत आभाळ पुन्हा भरू लागलं.
" मूर्खा जातांना तुळसाला आणायला गेला हे एका शब्दानं तरी बोलला असता तर साऱ्यात दुरावा आलाच नसता व सुगंधा..... सुगंधा गेली नसती रे!"
भाना आतून आतून खोल खोल तुटला. त्याच्या नजरेसमोर गडावर हळहळणारी सुगंधा दिसू लागली.
" भाना! भिती वाटते रे! वाढत जाणाऱ्या रिक्त रिक्त पोकळीची! पोकळीच रिक्त रिक्त होत अवकाश व्यापतेय याची!". भानाला आठवलं व तीच तीच पोकळी आता त्याला जाणवू लागली. आज पहिल्यांदा त्याला उमर्ठी एक शून्य रिक्त पोकळीगत वाटू लागली. तो भकासवाणा, उदासवाणा होत उठला व अवकाश व्यापणाऱ्या रिक्त पोकळीचं वादळ भरल्या मनानं काशीमामाच्या घराकडं निघाला.
काशी मामा व मामी मुलीच्या लग्नाला महिना उलटूनही हंबर्डीहून परतले नव्हते. बाजी दादानं दिलेली तंबी त्यांचा थरकाप उडवत होती. म्हणून ते हंबर्डीतच थांबले होते.
पुढच्या दाराला लावलेल्या भल्या मोठया कुलुपावर धूळ साठत लालसर गंज चढण्याची तयारी करत होता. ओट्यावर एक काळं कुत्रं बसलेलं होतं. भानाला पाहताच ते कान टवकारत गुरकावू लागलं. भाना वळसा घालत मागच्या दाराकडील खळ्यात घुसला. खळ्यात सर्वत्र धूळ व कचरा होता. एरवी शेणानं स्वच्छ सारवलेलं राहायचं.
पत्र्याच्या शेडमध्ये उभ्या खाटेला खाली टाकत तो तिच्यावर बसला.
.
.
समोरच्या भिंतीच्या कोनाड्यात उखळात तिरकस उभं असलेलं मुसळ त्याला दिसलं. त्याच्या डोळ्यास धारा लागल्या. नजरेच्या पाऱ्यात धुरकटता मातली. तो तसाच उठला व त्यानं मुसळ हातात घेतलं व खाटेवर बसला. त्यानं स्वत:च्या हातानं आपल्याच पायावर दाणदाण मुसळ मारायला सुरुवात केली. पायाच्या अंगठ्या चेचल्या गेल्या. तोच सुशांतला कुणाकडून तरी भाना आल्याचं कळलं होतं व तो भानाच्या घरून शोधत परतत काशी काकाच्या घरी आला.
त्यानं पायावर दणादण मुसळ मारतांना पाहिलं व मुसळ हिसकावत भानाला गच्च गच्च आवळलं.
" सुगंधा ऐक ना! तुझा काही तरी गैरसमज झालाय! अगं आधी थांब ! निदान मी काय सांगतोय ते तरी ऐक!" भाना सुशांतलाच सुगंधा समजत गच्च आवळत विनवू लागला.
सुशांत तर भानाच्या चेचल्या पायाला पाहून जोरजोरात आकांत करू लागला.
भाना तसाच खाटेवर लेटला.
सुशांत रडतच त्याच्याजवळ बसला.
भानास बाबा समजत आपल्यावर झोपलेली सुगंधा दिसू लागली. तोच तिचा पहाटभरला त्यावेळचा गंधाळ सुगंध दरवळू लागला. त्याचवेळी सुशांत त्याला घरी नेण्यासाठी उठवत होता.
भानानं सुगंधा समजून सुशांतलाच दूर लोटलं. भानाला मंजा मावशी सारखंच सुगंधाचं वेड लागेल की काय म्हणून सुशांत घाबरला.
सुगंधा ! सुगंधा म्हणून त्याला दूर लोटणाऱ्या भानास सुशांतनं कानात जोरानं खाडदिशी वाजवली.
" भान्या शुद्धीवर ये!" तो रडतच म्हणाला.
भानाचा आवेग शांत होईना.
बापू मावशी आई सारे आले.सुशांतच्या मदतीनं भानास घरी नेलं.
आठ दहा दिवसात घरच्यांना सारं सारं उलघडलं. 'भानाचं तुळसेशी लग्न' ही बाजीनं उठवलेली हूल होती. भाना रघूदादाशी तुळसेचं लग्न व्हावं म्हणूनच शोसाठी फक्त गेला होता. बापू व अंजामावशीस स्वत: चीच लाज वाटू लागली. बापू तोरणमाळला जात रघूला सारं सांगितलं. तेथेच सत्यम लोखंडेसोबत राहणाऱ्या सुगंधाला ही बापू भेटले व तिलाही सारं सांगितलं. रघूनं तुळसा उमर्ठीला नाही ही खात्री केल्यावर तो आपल्या उध्वस्त झालेल्या भानास भेटायला आला. पण रघूला लहान्या भानासमोर मान वर करायची देखील लाज वाटू लागली.
" दादा!तुझ्या मैनेला आणण्यासाठी गेलो तर माझीच मैना गमावून बसलो!" भकास उजाड वेदनेनं भाना बोलला नी रघूच्या काळजात कढत तेलाच्या घागरीच्या घागरी उपड्या होऊ लागल्या. एक भाना! आपल्यासाठी काय करतो नी एक आपण! त्याच्या माघारी सुगंधाला रोखू नाही शकलो! पण आता हातात काहीच उरलं नाही. केवळ रिते हात! रित्या हातात न व्यापली जाणारी पोकळी!
..
.
भानाच्या नावानं जगदंबेच्या साक्षीनं चुडा भरणाऱ्या सुगंधाचं काय?
.
.ललाटी मळवट कुणाचा? तर हातात हिरवा चुडा कुणाचा?
साराच गुंथनकाला...
हे महिशासूर मर्दिनी तूच काही मार्ग दाखव आता!
.
.
क्रमशः
भाग ::-- बारा
जूनमध्ये सुटीनंतर पाड्या पाडयावरील शाळेच्या घंटा घणघणल्या. तोरणमाळच्या रांगेत पाऊस तर त्या आधीच दाखल झालेला. पंधरा दिवसांपासून दररोज तो रतीब घालत होता. डोंगरांना पान्हा फुटत धोदाने जिकडे-तिकडे वाहत होते. लुशलुशीत तृणाची चादर पांघरत धुक्यात डोंगररांगा हरवत असल्या तरी सपाटून पावसाचा मार खातच होत्या. यशवंत तलाव टम्म फुगला होता. शाळेचा पहिला दिवस असुनही सकाळचा गेलेला सत्यम अजुन परतला नव्हता. सुगंधास निदान आज तरी तो लवकर परतेल व डबा घेत पाड्यावरच्या शाळेत जाईल म्हणून तिनं आपलं पोट सांभाळत स्वयंपाक करून ठेवला होता. पण दहा वाजायला आलेत तरी सत्यम परतला नाही म्हणून परस्पर शाळेत गेले असावेत म्हणून तिनं पाण्याची घागर घेतली व ती हॅण्डपंपावर पाण्यासाठी निघाली थंड गारठा व भूरभूर पडणारा पाऊस यानं तिच्या अंगात हुडहुडी भरली. ती तोल सांभाळत टेकडी उतरू लागली. टेकडीच्या खाली खोल भागातल्या पंपावर जात ती हॅण्ड पंप हाफसू लागली. पाण्याला घागर लावत ती घागर धुऊ लागली तोच हातातला सतत जपत आलेल्या हिरव्या चुड्यातला एक बिलोर घागर विसळतांना घागरीला लागत ताडकन टिचकला व तुकडे विखुरले. गडावर भरलेल्या चुड्यातला पहिला बिलोर फुटताच सुगंधाच्या काळजात धस्स झालं. लग्नावेळी आईनं मामीसोबत हंबर्डीला रुकसार चाचीकडं नवीन बिलोर भरण्यासाठी पाठवलं तरी मामीला कळू न देता तेच बिलोर हातात ठेवले व लग्नही त्याच चुड्यावर लावलं. घागर भरून वाहत होती तरी विचाराच्या धुंदीत सुगंधाचं हाफसा उपसणं चालूच होतं. तिला दम लागला व ती भानावर आली. तो पावेतो ती ओलीचिंब झाली. तिनं बिलोराचे तुकडे उचलले व ती घागर घेत टेकडी चढू लागली. पोट व तोल सावरत पावसात शेवाळून निसरड्या झालेल्या वाटेने ती विचारातच टेकडी चढू लागली.
शाळेतून मुलांना बोलवायला पाड्यांवर चाललेल्या रघूनं पाहिलं व त्यानं तिच्याकडून घागर घेतली.
" सुगंधा! असल्या स्थितीत पावसात पाणी भरणं गरजेचं होतं का? गरजेचं होतं तर त्याला सकाळी पाठवायचं ना! त्याला नाही समजत का? थांब भेटला का कान धरतोच त्याचे!" रघू घागर धरून पुढे चालत संताप करू लागला.
" दादा ! गावाहून केव्हा आलास! "
धापा टाकत चढतांनाच तिनं विचारलं.
" काल दुपारीच आलो" घागर ठेवत तो म्हणाला व निघू लागला.
" दादा थांब ! चहा ठेवते!"
" अगं गारठ्याचं चहा तर हवाच पण घाई आहे सायंकाळी सत्यम आल्यावर येतो मग घेतो चहा हवंतर!"
" दादा थांब, लगेच ठेवते!"
रघू थांबला.
सुगंधा तशीच ओली असतांना गॅस सुरू करत चहा ठेवू लागली.
" दादा! गावाला बापू, आत्या सगळे कसे आहेत?"
" सारे व्यवस्थीत आहेत!"
रघू बोलला व सुगंधा आणखी चौकशी करेल म्हणून तिच्याकडं पाहू लागला. पण सुगंधा गॅसच्या ज्योतीकडं पाहत सांडस घेऊन उभी.
" सुगंधा! काशी मामा व मामी उमर्ठीला आलेत पुन्हा हंबर्डीहून! तू तरी आली नाहीस? पाचोऱ्याला गेली होती का सुटीत?"
सुगंधाच्या काळजात चहाप्रमाणेच आंधण उकळू लागलं.
" पाचोऱ्याला जायचं ते आग्रह करत होते पण इथली उन्हाळ्यातली थंड हवा चांगली म्हणून गेलेच नाही" सुगंधा खाल मानेनं बोलली.
रघूच्या काळजाला पीळ पडला.
" दादा! एक विचारू?"
" काय?"
" माई भेटली होती?"
आता रघूच गॅसच्या बर्नरपेक्षा जास्त तापू लागला.
" सुगंधा, ती उमर्ठीला असती तर मी गेलो असतो का उमर्ठीत?" सूर एकदम घोगरा झाला.
" दादा, झालं गेलं विसर व माईला माफ कर!" चहाचा कप रघूकडून घेत सुगंधा विनवू लागली.
" सुगंधा, उमर्ठीत तुझ्या माईशिवाय दुसरं कुणीच नाही का चौकशी करायला?"
सुगंधा थरथरली तिच्या हातातील कपबशी सुटू लागली
" सुगंधा, कधीकधी माणूस कोणतीच चूक नसतांना अपराध्याच्या पिंजऱ्यात उभा राहतो! मग त्याचीच इच्छा राहत नाही आपण निरपराध आहोत हे सिद्ध करण्याची!" हे रघू कुणाबाबत बोलला हे सुगंधालाच काय पण खुद त्यालाही कळलं नाही.
भानाबाबत...?
सुगंधा बाबत....?
स्वत:बाबत........?
रघू निघून गेला.
सुगंधानं कपडे बदलवले. जेवणाची इच्छा नव्हतीच. ती सत्यम आता रात्रीच परतेल म्हणून तशीच झोपत पडून राहिली. बाहेर ढग पुन्हा पुन्हा भरून येत तोरणमाळच्या डोंगरांना अभिषेक घालणं सुरूच होतं.शेजारच्या झोपड्याल्या मोबाईल वर गवळण सुरू होती
" काय करु बाई, कुणाला मी सांगू?
हरीनामाची सांगड आणा!
नंदाच्या हरीने कौतुक केले
जाणे अंतरीच्या खुणा!!
कशी जाऊ कशी जाऊ मी वृंदावना...."
" सुगंधा तू आली नाहीस उमर्ठीला?"
रघू दादाच्या या प्रश्नाने तिच्या ओसाड उजाड मनात बाहेर सारखाच पाऊस दाटला व मातला. आठवणीचा धो धो पाऊस...! काळाच्या दाट धुक्यात ती सरकू लागली. दरीत धुकं विरण्याऐवजी दाटतच जावं तशाच सयी तिच्या मनात दाटू लागल्या
जगदंबेच्या साक्षीनं हिरवा चुडा घालुनही नात्यात बांधणं जमलंच नाही.
अपराधी कोण?
बाजी काका?
तुळसा माई?
भाना?
आई वडील?
परिस्थिती? की सुगंधा स्वत:च?
तो बोलला होता. छोट्या-छोट्या वस्तूनं जर जन्मभराची नाती जपली जात असतील तर मी हा चुडा आयुष्यभर जपेन? मग आपण थांबायला हवं होतं त्याची वाट पाहत? बाजी काकाच्या धमकीला आपण का घाबरलो? भानाला कायमंच हरवून बसण्याची भिती? ही भितीच दोषी का,? नाही रघू दादा बोलला तेच खरं! निरपराधित्व सिद्ध करण्याची इच्छाच उरत नाही? कशाला येईल तो आपलं निरपराधित्व सिद्ध करायला?
मग आपण कोणत्या तोंडानं जावं उमर्ठीला?
" पैलतीरी हरी वाजवी मुरली
नदी भरली यमुना!"
मोबाईल वर गवळण आता ऐन बहरात वाजत होती.
सुगंधाला खुर्दाण्यात मंजा आत्यास घ्यायला गेलो तो दिवस आठवला.
आपल्या पुढेच भाना बसलेला. सुजलेला पाय पाहण्यासाठी आपण पुढे झुकलो. आपला हात त्याच्या खांद्यावर ठेवत मुसळ मारल्याची माफी मागण्यासाठी आपल्या हाताचा दाब त्याच्या खांद्यावर वाढवला. पण तो खांदा चोरत पुढे सरकला. त्याच वेळी त्याची पाणीदार काळी भोर नजर आरशातून वेध घेत होती. त्या नजरेच्या धुंदीत खुर्दाणं कुठं आलं समजलंच नाही.
रात्री आईनं मलम द्यायला पाठवलं तर आपण त्याच्या सुजलेल्या पायाला मलम लावलं व झाल्या चुकीबद्दल माफी मागीतली. त्या वेळी त्याला गच्च गच्च बिलगावं असंच वाटलं.पण समोर मंदीरात गर्दी व घरातही.
तो कधीच स्वत:हून आला नाही. जेव्हाही आला तेव्हा अपघातानंच आला. पण ज्या ज्या वेळी आला तेव्हा तेव्हा या सुगंधाच्या देहावर कान्हागत मोरपीस फिरवून गेला! विहीरीत पडल्यावर भितीनं जीव वाचवण्यासाठी त्याला पहिली गच्च मिठी मारली ती त्यानं जिवाच्या आकांताने झिडकारली. केस धरत तो विहीरीच्या काठास लावत असतांना आपण स्वार्थान कि भितीनं पण मिठी मारलीच. वर काढतांना तर त्याच्या श्वासाच्या सुगंधात ही सुगंधा ...भानात भान हरपली. पण बाहेर येताच त्याला आपण बादलीच फेकत कपाळावर कायमचा व्रण दिला. निष्कलंक चंद्र आपण नाहक डागाळला...
तिनं कुस बदलली. बाहेर आता पावसाचा जोर चांगलाच वाढला असावा. झोपड्याच्या कौलांवर आवाज उठवत धारा ओसंडून वाहत होत्या. तिच्या डोळ्यातही धारा लागल्या. काजळमायेचे ओहोळ लागत काळजापर्यंत ओघळ उतरू लागले.
बाबा उशीरा आले असतील व झोपले. उजेडायला बराच उशीर होऊनही बाबा उठत नाही म्हणून आपण उठवायला गेलो. बाबा उठत नाही म्हणून बाबास बिलगलो. त्यानं आपल्यास तरी दूर भिरकावलं. पण आपला तरी वरून संतापच. थेट मुसळ घेत भिरकावलं. तो पुन्हा पुन्हा सांगत होता ." सुगंधा तुझा काही तरी गैरसमज झालाय! ऐक !" पण मारलंच मुसळ व केलं लंगडं! मनात एकच काहूर. इथंही तो भडगावहून उशीरा परतत वडिलांनी आग्रह केला म्हणून थांबला होता. म्हणजे अपघातानं आला पण आपण त्याला दोषी ठरवलंच! तो आपलं निरपराधित्व सिद्ध न करता लंगडत निघून गेला.
भाना तू कायम अपघातानं येत गेला नी मी तुला दोषी ठरवत ठरवत दूर लोटतांना स्वत:च अडकत गेले. व तुलाही अडकवलंच! हिरव्या चुड्याच्या व्यासात तुझं बहारदार व्यक्तीमत्व मी बंदीस्त केलंच! कारण मला तुळसा तुला माझ्यापासून दूर दूर नेतेय ही रिक्त पोकळी भासत होती. म्हणून सप्तश्रृंग निवासी आई जगदंबेच्या साक्षीनं तुला हिरव्या चुड्याच्या समृद्धी व पावित्र्याच्या बंधनात तुला अडकवलं.
तू अडकलास हीच चूक तुझी. तुला रिक्त पोकळीत अडकवून मी.....मीच थांबले नाही! मी थांबायला हवं होतं! निदान सिंगापूर हून परत येईपर्यंत तरी! पण बाजी काकानं तुझ्या वडीलांचा जसा काटा काढला तसाच तुझाही काढेल ही धमकीच माझ्या उरात धडकी भरवून गेली. तुळसा बरोबर माझा भाना कदापि जाणार नाही याचा मला भरवसा होताच रे. पण तू माझा झाला नाही तरी चालेल पण रहावा हीच आस मनात ठेवत बाजी काकाच्या धमकीनं मी माघार घेतली. आपलं माणूस आपलं राहिलं नाही , आपल्या जवळ राहिलं नाही तरी चालेल! पण जिवंत राहणं महत्वाचं. ते जगातल्या कानाकोपऱ्यात कितीही दूर राहो पण कुठं तरी आहे व सुखरूप आहे हीच बाब त्याच्या आशेवर जगणाऱ्यांना जगण्याची उमेद देत असते! भाना तुझी ही असण्याची उमेद तर मला आजपर्यंत जगवत आली. नाहीतर या सत्यम लोखंडेच्या जगात मला जागा आहेच कुठे? पण आपलं माणूस आपल्यासाठी कधी ना कधी परतेल व तेव्हा आपण जर नसू तर त्याचं काय? म्हणून भाना माझ्या आयुष्यात तू जरी माझा म्हणून राहिला नसशील तरी तुझ्या श्वासातला माझा सुगंध मला तसाच दरवळत ठेवण्यासाठी तरी मी जळत राहीन.
पावसाच्या झगारीनं व पहाडी भाग म्हणून लवकरच अंधारलं. ती तशीच उठली. लाईट नसल्यानं तिनं दिवा पेटवला. या दिव्याला आता रात्रभर तेल संपेपर्यंत आपल्यासारखंच जळत राहावं लागेल. सकाळचा स्वयंपाक तसाच पडलेला होता. सत्यम नेहमीप्रमाणं दहा अकराच्या आसपास काही तरी सोबत घेऊन येईल व तेच रांधायला लावेल म्हणून तिनं काहीच न करता तशीच बसून राहिली.
घुईंचं किरकिरणं पावसाच्या आवाजात मिसळत विचीत्र भाव उठवत होतं. दूर कुठं तरी झोपड्यात कुत्री भुकंत होती. सर्वत्र अंधाराचं साम्राज्य. दिवसा भाषेमुळं तिला कुणाशी संभाषण करता येईना तर रात्रीचा सवालच नव्हता. पण महिन्यांपासून नसलेला रघू दादा इथं परतला ही तिच्यासाठी मोठी आधाराची गोष्ट होती. रघू दादा तीन चार दिवसात तिला भेटत तिची विचारपूस करुन जाई. एका मोठ्या भावाची तिला त्यानं ददात पडूच दिली नव्हती.
तोच कुत्री जोरात कोघाट करू लागली. तिला वाटलं सत्यम आला.
ती उठली.
" सुगंधा! सत्यम आला का?" दादा बाहेरुनच आवाज देत विचारू लागला.
" नाही अजून! मी त्यांचीच वाट बघतेय !" ती यंत्रवत बोलली पण रोजचंच असल्यावर वाट तरी कोठवर पाहणार माणूस.
" घाबरू नको! तो कुठे असेल माहितीय मला! मी आताच जाऊन आणतो त्याला!"
रघू दादा जसा आला तसा परभारेच निघून गेला. जवळपास एका तासानं दहाच्या आसपास पुन्हा कुत्री भुंकू लागली. व नंतर असंबंध बडबड व रघू दादाचं दटावणं ऐकू आलं. सुगंधा उठली.
" रघू दादा! तू तू माझा साला असला तरी मी तु...ला साला कधी मानलंच नाही... तू तर माझा दादा..आहे!....बाप....आहे!....आई... आहे!..." सत्यम रघूदादाच्या आधारानं झुकांड्या देत बडबडत होता.
" सत्या लेका ! मी तुझा सर्वेसर्वा आहे! आता तोंड बंद कर!"
" दादा! मी तोंड बंद करू! माझी आई पण हेच म्हणते मला...... आई....
'आई माsssझी मा..ये..चा सागर!
दिssssला तिने जीवनाsssला आकार!' "
सत्यम गाणी म्हणू लागला.
रघू दादानं त्याला मोरीत नेत अंगावर पाणी टाकत धुतला व नवीन कपडे चढवले.
" सुगंधा, आता त्याला निवांत पडू दे! त्यानं तिकडंच कोंबडं खाल्लंय! तू जेवली नसेल तू जेवण कर बरं!"
" दादा ,जेवेन मी!" सुगंधाच्या डोळ्यात आसवे तरळली. सकाळपासून आपण याची वाट पाहत हा उपाशी असेल म्हणून उपाशी रहावं नी हा मात्र दररोज मटण, कोंबडं, माशाची पार्टी करत परततो. तरी आपण का याच्यासाठी थांबावं.
" सुगंधा! मी काय म्हटलं! जेव ना!"
" दादा जेवते ना!" तिघी इच्छाच उडाली जेवणाची.
पण रघूस माहीत होतं ही जेवलीच नसेल व स्वयंपाक ही केला असेल की नाही म्हणून तो उठला व दुरडी पाहू लागला.
" सुगंधा , असल्या स्थितीत पोटातल्या जिवासाठी शिळंपाकं खात नको जाऊ!
सुगंधा रडू लागली.
" उठ माझ्या समोर गरम भाकऱ्या थाप! सकाळचं जेवणं ही तसंच पडलंय म्हणजे तू सकाळची उपाशीच आहे"
सुगंधानं भाकऱी थापली. कसंबसं जेवण केलं. मग रघू दादा परतला.
" अशा माझ्या मोठ्या भावाशी..रघू दादाशीच माझं माझे आई वडील व बापू , आत्या लग्न लावायला निघाले होते! केवढं मोठं पातक झालं असतं!"
या एक दिड वर्षात या पहाडात रघू दादाशिवाय आपणास दुसरं कोण आहे! या विचारानं ती पडल्या पडल्या हमसून हमसून रडली.
सत्यम ?
सत्यम आता तोरणमाळच्या सात पायरी घाटात एखादं अवजड वाहन चढतांना आवाज करावं तसाच घोरत होता. त्याला कसलीच चिंता नव्हती.
सुगंधाला धुक्यात हरवण्याशिवाय दुसरा विरंगुळा तरी कोणता होता. हल्ली आठवणी, सयी ह्याच तिच्या सई बनल्या होत्या. सयींचा धांडोळा माणसास हवा तेव्हा खोलता येतो गुंडाळता येतो.मनमुराद आनंद दु:ख लुटता, घेता येतं. म्हणून ती पडल्या पडल्या सयीत रमली.
.
.
सत्यम पहायला आला तेव्हा आईचा मार खाऊनही आपण नाकारलं होतं. पण मामाची इज्जत सांभाळण्यासाठी आपण सामोरं गेलोच. सत्यम कडं वर नजर करुनही पाहिलं नाही. भानाची पाणीदार काळीभोर नजरच आपल्या नजरेत होती व त्या घडीला नजरेत आसवं.
नंतर बाजी काकानं धमकी दिली व भितीनं आपण तयार झालो.
सत्यमचा तर नकाराचा प्रश्नच नव्हता.
मामानं आई वडिलांचा तगादा व मुलगा शिक्षक आहे म्हणूनच होकार दिला होता. पण लग्नाआधी दोन दिवस मामास कुठून तरी कळलं की मुलगा एक नंबरचा बेवडा आहे. मामानं सारी तयारी होऊन ही माघार घेतली.
" दादा, आता मुलगा कसा ही असला तरी चालेल! पण एकदा या सटवीचे हात पिवळे कर!"
" ताई, काही ही बरळू नको! व्यसनी मुलाला मी माझी भाची देणार नाही! मी नकार देतो.हवंतर लगेच दुसरा मुलगा पाहू आपण!"
पण सुगंधानं लग्नास जेमतेम होकार दिलाय व हा मुलगा हातचा गेला व दुसरं स्थळ सापडलं नाही नी भाना परत आला तर पुन्हा सुगंधा बिनसेल.बाजी कदम तर आपणास जिवंत सोडणार नाही. म्हणून मालूबाईनं भावास समजावलं.
" दादा! लग्ना आधी कित्येकांना व्यसन असतं! भले भले लग्न झालं की बाईच्या धाकानं दारू सोडतात. सुगंधाच्या धाकात सोडेल तो दारू! तू लग्नाची तयारी कर!"
"आणि ताई त्यानं जर लग्नानंतरही नाही सोडली दारू तर?"
" तुझ्या बेवड्या दाजीसोबत मी तरी संसार करतेच आहे ना? करेल तसा संसार सुगंधा,!" मालूबाई संतापात फुत्कारली.
मामाचा नाईलाज झाला व सुगंधा बोहल्यावर चढली. सत्यमच्या आईनं दहापंधरा लोक जेमतेम आणत लग्न उरकलं. जातांना सुगंधाला आई बिलगली. पण सुगंधानं रडतच
" आई करेन मी संसार बेवडा असला तरी! पण तुला त्रास देणार नाही!"
इतरांना ऐकू जाणार नाही असं म्हणत निघाली. मालूबाईच्या काळजाला चटके बसू लागले.
" पोरी , आईचं दु:खं तुला आई होशील तेवहाच कळेल गं! त्यातल्या त्यात गरीबी तर नकोच!"
सुगंधा पाचोऱ्याला आली पण दहा दिवसातच सत्यमचा अख्खा जीवन पट एकदम खुल्ला झाला.
भिमा लोखंडे जळगावला एका खाजगी कंपनीत चांगल्या नोकरीवर कामाला होता. पण अट्टल दारुड्या .सत्यम झाला व अवघ्या तीन वर्षात बाई गेली. भिमा दारूत टल्ली राहत पोरास सांभाळू लागला.खोलीजवळच्याच चाळीतली एक शिकणारी मुलगी भांडी धुणी व स्वयंपाकास लावली. एका वर्षात तिच्या आई बापाच्या संमतीनं तिच्याची दुसरा घरोबा केला. पोरीनं शिक्षणाच्या अटीवर लग्न केलं. आता भिमा निवांत झाला. लहानग्या सत्यमला आई मिळाली म्हणून अधिकच दारूत वाहवत गेला. माधवी बाईनं शिक्षण पूर्ण केलं व विद्युत मंडळात आॅपरेटर म्हणून लागली. माधवीबाई पाचोऱ्यात आली व नंतर भिमा लोखंडेनं लवकरच नोकरी सोडली. दिवस रात्र दारूत टल्ली राहू लागला. माधवी बाईनं सारी जमापुंजी घेऊन भिमास रितं केलं. भिमा लोखंडेच्या आतड्या सडल्या व तो गेला. माधवी बाईनं मग दुसरा घरोबा केला. पण तोवर सत्यम रडत खडत आठवीत आला होता. ना घर, ना जमीन ना संपत्ती! माधवी बाईनं मात्र त्या ही स्थितीत त्याला बोर्डींगला टाकत शिक्षण सुरू ठेवलं. तो दहावी झाला व नंतर डि. एड. सत्यमला बापाकडून वारसात काहीच मिळालं नसलं तरी सावत्र आई - ती कशी ही असो पण ती मिळाली होती.नी मग नोकरीला लागला नी त्यानं बापाकडून वारसात एक गुण मिळवलाच तो म्हणजे दारू! त्यात तोरणमाळला आल्यावर तर कहरच!
माधवीबाईला आपल्या दुसऱ्या नवऱ्यानं तंबीच दिली होती.
"तुला जे काय करायचं ते बाहेरच. या घरात त्याचे पाय नको! मी लग्नालाही येणार नाही!"
माधवीबाईनं लग्न झाल्यावर सत्यम व सुगंधाला नेलं तेच भाड्यानं तात्पुरत्या घेतलेल्या खोलीत. दररोज बाहेरुन आयतं जेवण येऊ लागलं. घरात जेवण करायला भांडी होतीच कुठे! भांडी असायला स्वत:चं घर तरी हवं ना! माधवीबाई एक दोन वेळा येत सुगंधाला समजावू लागली.
" सुगंधा तुझ्या लग्नात मिळालेली भांडी व मी काही घेऊन देते ती सारी नेत नवीन संसार उभा कर! सत्यम विना आई बापाचा पोर म्हणून बिघडलाय थोडा! पण त्याला तू ताळ्यावर आण! मला ही नव्या घरचे मंडळी......" माधवीबाईंनी थोडक्यात नवीन संसाराचं सार सांगितलं. पण सत्यमला ताळ्यावर आणण्यासाठी सुगंधा तरी ताळ्यावर होती कुठे,? आणि ज्याला ताळ्यावर आणावयाचं तो ही कुठं होता ताळ्यावर! साराच मामला घनघोर!
सुगंधानं बाहेरुन आलेलं जेवण कसंबसं केलं.
" असं बाहेरचं जेवण घेत किती दिवस राहणार,?" सुगंधाचं सत्यमशी पहिलंच हितगूज!
" घराचं जेवण मिळण्यासाठी नशीब लागतं गं! ना घर, ना आई, आहे ती सावत्र! ती ही आता दुसऱ्या संसारात अडकली! तरी सावत्र असुन आईचं कर्तव्य तिनं पार पाडलं हेच बहू! आता तिला पुन्हा त्रास का द्यायचा!"
आज थोडीच अंगात होती म्हणून सत्यम सत्य तितकंच दाहक बोलत होता.
" उद्याच नोकरीच्या गावाला घेऊन चला!"
" तिथं तर डोक्यावर असणारा भाड्याचा स्लॅबही मिळणार नाही झोपड्याशिवाय व डोंगराशिवाय! इथं दूर असली तरी आई आहे व भाषा समजेल अशी माणसं आहेत!"
" कुणीतरी राहत असतीलच ना! मग राहू तिथं!"
सुगंधानं मामास लग्नातली भांडी आणावयास लावली. ती व माधवीबाईनं दिलेली काही घेत ते दोघंच तोरणमाळला आली.
शहादा, तेथून म्हसावद व पुढे जीप नं तोरणमाळ घाट चढू लागले. उंचच उंच डोंगर निमुळता सातपायरीचा घाट पाहून आधीच पोळलेली सुगंधा पार गर्भगळीत झाली.
तोरणमाळला आठ दिवस होत नाही तोच रघू दादा नवीन तोरणमाळला हजर झाला. देव कुठं तरी असतो व तो दु:खं देतांना त्याचा उतारा म्हणून कोणत्याना कोणत्या स्वरुपात कुणाला तरी पाठवतोच. रघू दादा तुळसा व भानाच्या वेदनेनं विमनस्क स्थितीत आला. पण तरी तो कामात स्वत:ला बुडवू लागला. संस्थेतल्या कामाचा अनुभव व जात्याच हुशार रघू पूर्ण केद्रात ओळखला जाऊ लागला. सत्यम आधी लागला असला तरी कामाच्या जोरावर तो सत्यमला शहापणाच्या गोष्टी शिकवू लागला. पण सत्यमला दारूशिवाय काहीच सुधरेना.
सकाळी उठला की दोन चार आजुबाजूच्या पाड्यावर ड्युटीवर असलेले मित्र हजरच असायचे. मग जवळच्याच एखाद्या पाड्यावर मव्हाची प्यायची,पत्ते कुठायचे. गावठी कोंबडं, मटण, मासे शिजवायचे. तेवढ्यात काही ड्युटीवर चक्कर मारून यायचे. दररोज दारूत झिंगणं खाणं पिणं, पत्ते यातच पगारा आधीच पैसे उडवायचे व मग उधारीवर पगारापर्यंत चालढकल. एका वर्षात घरात नवीन एकही भांडं आलं नाही की सुगंधासाठी काही हौसेमौजेचं! नाही तरी सुगंधाला कुठली म्हणून हौस राहिलीच नव्हती! केवळ जळत राहणं एवढंच शिल्लक! रात्री बाहेरुनच जेवण करुन आला तर पाणी पित ती तशीच झोपे वा सकाळचच उरलेलं जबरीनं कडूमडू करत खाई. जर जेवण केलं नसेल तर तोच तिकडून मटण मासे वा अंडी तरी घेऊन आलेला असायचा. तेवढ्या रात्री मग ती नाक दाबत वास सहन करत रांधे व नशेतल्या सत्यमला खाऊ घाली. नशा जास्त नसलीच तर मग त्या रात्री मव्हाचा असह्य ह़ोणारा वास तिच्या वाटेला ठरलेलाच!
बापू आले. रघूला भेटले व रघूसहीत सुगंधाला भेटायला आले. सत्यम नेहमीच्या कर्तव्यावर! बापूला पाहिलं नी सुगंधा धाय मोकलत बापूच्या गळ्यात पडली! एवढा घाट चढून येणारं तिचं आपलं माणूस रघूनंतर बापूच! तिला बापूच्या गळ्यात पडतांना आपला कष्टानं रापलेला व दारुत क्षीण होत चाललेला काशी बाबा आठवला. काही वेळ ती बापूला विसरली व आपण काशीबाबालाच बिलगलोय असाच भास झाला.
भावनावेग कमी झाला. ती रडत रडत आनंदानं उठली व बापू,दादासाठी चहा ठेवू लागली.
" सुगंधा! आपण सारे चुकलो गं! आपलं अस्सल सोनं परतलं! माझा..तुझा भाना परतला!"
सुगंधाला सारं आसमान गरगरायला लागलं. ती थरथरत जवळच्या कुडाचा आधार घेऊ लागली.
" सुगंधा, माझा भाना त्याच्या दादासाठी तुळसाला आणू पाहत होता गं! पण तुझ्या बाजी काकानं गावात काहीही वावड्या उठवल्या! मी ही भरकटलो!"
बापू उरातला कढ रिता करत होते पण सुगंधाचं बापूंच्या पुढच्या बोलण्यावर लक्षच नव्हतं.
" सुगंधा असल्या छोट्या छोट्या वस्तूंनी नाती जपली जात असतील तर मी हा हिरवा चुडा आयुष्यभर जपेन!" गडावर शपथ घेणारा भाना तिला आपल्या हातातल्या चुड्याच्या किणकिणीतून बोलतांना दिसू लागला!
" सुगंधा! उमर्ठीत तू दिसली नाही म्हणून भाना वेडापिसा झालाय गं! भानासाठी नाही बोलवणार मी पण निदान माझ्याकडे पाहून...एक बाप लेकीला बोलवतोय असं समजून एक वेळा ये ना उमर्ठीत! तुला एक वेळा पाहण्यासाठी तो वेडा झालाय सुगंधा! तुमच्या बंद घराजवळ तासनतास बसून राहतो! आपल्याच हातानं मुसळ आपल्याच पायावर मारतो"
बापू भानासाठी तुटत विनवत होते.
पण लग्नानंतर आपण आई वडील मामा साऱ्यांनी बोलवलं तरी गेलो नाहीत व आता आई वडील उमर्ठीत नसतांना आपण जाणं..... जायचं तर कोणत्या नात्यानं? कोणतं तोंड घेऊन! एक मन बंड करत होतं. द्यावं हे सारं झुगारून ! हा समाज! त्याच्या परंपरा! विवाहसंस्था! सारं सारं झुगारून थेट उमर्ठी गाठावं व गच्च गच्च आलिंगन द्यावं! डागळलेल्या चंद्राच्या किरणात...मिठीत विरून जावं!
पण
पण... तोच तिला सत्यम आठवला
" सुगंधा ..ना घर ना बाप..ना आई......" ती माघारली.
"कशी जाऊ कशी जाऊ मी वृंदावना...
काय करु बाई,कुणाला मी सांगू
हरीनामाची सांगड आणा
नंदाच्या हरीने कौतुक केले
जाणे अंतरीच्या खुणा...."
सुगंधानं बापू व दादास जेवण खाऊ घालत दुसऱ्या दिवशी आपल्या कडील हातात चढवून जो निम्मा चुडा ठेवला होता तो सुटकेसमधून काढत कागदात गुंडाळला व बापूकडं दिला.
" बापू हे भानाकडं द्या! त्याला म्हणा याच्या हिरवाईच्या सुगंधात व समृद्धीत रम! याच्या व्यासातून हजारो लाखोचा समुदाय फुलव!" सुगंधास माहीत होतं यातलं बापूस जरी काही समजणार नाही पण नंदाचा हरी समजेल.......
बाहेर पावसासोबत पहाटवारा सुटला व सुगंधाला भानाचं भान हरपत वास्तवतेचं भान आलं. बाहेर प्राची उलणार त्या आधी आधी तिचा डोळा लागला.
.
.
क्रमश:......