हिरवा चुडा
भाना सिंगापूरहून परतला तेव्हा उमर्ठीत कडक उन्हाळा सुरू होता. पाटाजवळची आमराई व जांभुळबन पूर्ण बहरलं होतं. पण त्या बहरात या वर्षी एक उजाड भकासी, उदासीच बहरली असाच भास होत होता. भाना विमनस्क अवस्थेत मळा ,आमराई काशी मामाच्या घराजवळ भटकू लागला. सुशांत त्याला सोडतच नव्हता.
" सुशा! या उदासीच्या बहरात तू का थांबला बाबा? साऱ्या मैना भुर्रsss उडून गेल्या काकातूला सोडून! तू ही जा! तू बोर्डाच्या परीक्षेवेळी बोलला तेच योग्य होतं!
पुढे कोण कुठे जाणार? सारीच फाटाफूट होणार? जाणाऱ्यांना ही सलणारी ऊरतोड कळत नाही. पण जे मागे थांबतात त्यांना कुणाचं जाणं वैशाख वणवा उठवतं.
सुशांतनं भानास आमराईतून मळ्यात आणलं. तोच उन्हात लहानशी पोर जंगलातून विहीरीजवळ आपल्या शेळ्या हाकत आली.
भाना गांगरला. त्या लहानशा पोरीकडं विचीत्र नजरेनं पाहू लागला.
त्याला सुगंधाची पहिलीच भेट आठवली. पावसाळ्यात अशीच शेळ्या हाकत ती आली होती. तिच्या शेळ्या धावेवरच्या झोपडीत घुसल्या. भाना मध्येच होता. झोपडीच्या दारात काठी धरत उभी पाहताच " कोण?" प्रश्न उठला. तिच्या घाऱ्या नजरेची, कुरळ्या कुंतलबटांची व खळीची भिज ओल त्याचा काजळकाठ भिजवत होती.पोरीला पाहताच उन्हाळ्यात जाळ उठवू लागल्या.
तोच मळ्यात बाजी मामा व तुळसा भानाला शोधत कार ने आले. तुळसा व बाजी मामाला पाहताच भाना जास्तच चेकाळला.
" सुशा यांना हाकल माझ्यासमोरून!"
पण मळा बाजी काकाचा असल्यावर सुशा काय करणार!
" भाना! तू हे चांगलं केलं नाहीस?"
" ............." मनात कोलाहल व संतापाचा उद्रेक होऊ लागला. आता फक्त दोन आठवडे टेलीकास्ट होतील एवढेच भाग बाकी आहेत. शंतनू शर्मा सरांचे काॅलवर काॅल येत आहेत! तू त्यांचे काॅलही रिसीव्ह करत नाही? ते शंकर मामास व मला धारेवर धरत आहेत. त्यांना लवकरात लवकर उरलेल्या भागाचं शुटींग उरकायचं आहे!" तुळसा एका दमात फाडफाड बोलत होती.
" शर्माला कुणी अडवलं? त्यांनी खुशाल करावं शुटींग!" भाना आग ओकत असलेल्या नजरेनं पाहत उद्गारला.
" अरे पण तुझ्याशिवाय कसं शक्य? तरी त्यांनी तुझ्या सोईसाठी भारतातच पुढचं शुटींग ठेवलंय!"
" त्यांच्याकडं रांगा लागल्यात ना कलाकारांच्या? मग त्यांना घेत करा म्हणावं!"
" भाना! वेड्यागत काहीही बरळू नकोस! तुला यावंच लागेल!"
" इथं शहाणं राहिलंय कोण शिष्टाई करायला? "
तुळसा चपापली.
'तुला वेडंच पहायचंय होतं मला. पण माझा आगाऊपणा नडला मला.मी थोडी घाई केली. फक्त आठ दिवसासाठी घोंगडी अडकलीय माझी. अन्यथा तुला मंजा आत्यासारखंच वेडा पाहण्याची खरंच मजा आली असती.' ती मनातल्या मनात म्हणाली.
" भाना , उद्याच्या उद्या मुंबई ला निघायचंय आपल्याला!"
" मी येतो ना! पण आधी तुझ्या बापानं व तू मला दिलेला शब्द पाळा! रघूशी लग्नाचं कबुल केलंय ना तुम्ही? मग आधी रघूशी निदान साखरपुडा तरी कर! मग मी येतो!" भाना वेडेपणात शिष्टाई करू लागताच बाजी संतापला. एवढं होऊनही हा आजून पुरता वेडा नाहीच. आपणास वाटलं होतं की सुगंधाच्या लग्नाची बातमी ऐकताच हा पिसाळेल! गावात पाच सहा दिवसाची चर्चा ही तशीच आहे पण हा तर ताळ्यावर आहे म्हणून बाजी कदम संतापला.
" भाना! तू शो पूर्ण करायचं वचन दिलंय! शो आधी पूर्ण कर .मग लग्नाचं बघू नंतर!"
" खड्डयात गेला शो नी वचन! मुकाट्यानं आधी लग्नाचं आधी बोला!"
" भाना! तू शर्मास करार करून दिलाय! तू शो करत नाही कळल्यावर केदार तुला सोडणार नाही!"
" त्या केदारला जे करायचं ते करू दे,! आधी लगीन रघूचं मग ...."
तुळसा संतापात निघाली.
" मामा! ती एक नादान आहे! पण तुम्ही शहाणे आहात! वेळेवर शुद्धी धरा! एकदाची वेळ गेली तर तुमच्या मुलीला रघूसाठी झुरत झुरत मरावं लागेल!"
बाजी कदम भानावर एकदम धावून गेला. पण भानानं झोपडीच्या छतातलं दांडकंच उपसलं.
" सुशा! या तुझ्या बाजी काकाला उमर्ठीतही पोहोचू देणार नाही. जांभूळबनातच गोर खोदेन! कारण माझ्या आजी आजोबाचा जुना हिशोब बाकी असतांना हे नवीन खाती उघडत आहेत"
बाजी कदम मध्येच थबकला. बरं झालं कारकडं निघालेल्या तुळसानं परत फिरत त्यांना मागे ओढलं. नाही तर बाजी कदम आज दांडक्यानं बदळले गेलेच असते. बाजी कदमाला आज प्रथमच कुणाची भिती वाटली. आज त्यांनी जी कच व हाय खाल्ली तशी कधीच खाल्ली नव्हती.
शर्मानं तुळसाचा निरोप ऐकताच जुन्या कलाकारातून एकाची निवड करत तुळसेच्या जोडीनं शुटींग सुरू केलं.
"पप्पा, त्याला असा सोडू नका! अॅग्रीमेंट मोढलंय त्यानं!" केदार शर्मा वडीलांना सुचवत होता.
" केदार मुकाट्यानं शुटींग सुरू कर! आपण त्याचं काहीच करू शकत नाही. करारानुसार द्यावयाची अमाऊंट त्यानं अजुन घेतलीच नाही. त्याला आपण अजुन एक रुपयाही दिला नाही! हे विसरू नको,!"
तुळसा मुंबईला गेली होती त्याच दिवशी बापू रघूस घेऊन तोरणमाळ हून उमर्ठीला परतले होते. रघूला भानाबाबत बापूनं सारं सांगितलंच होतं.
' दादा! तुझ्या मैनेला आता नाही आणू शकलो तरी ती परतल्याशिवाय राहणार नाही!" भाना बोलला व रघू त्याला धरत रडायला लागला.
" भान्या! मी तुझ्यापुढं मोठा असुनही कायम खुजा ठरत आलोय! आजही तू मला कोतंच ठरवलं भावा! "
" दादा! मोठी कधीच चुकत नसतात!चुकून चुकले तरी लहानांसमोर तसं दर्शवू नये थोरांनी!"
या बोलानं तर रघूला पुन्हा कोतेपणाची लाज वाटली पण ती त्यानं आता दर्शवली नाही.
" भाना.....सुगंधानं तुला काही तरी पाठवलंय!" बापू थरथरत बोलले.
" तिनं निदान एकदा तरी यायला हवं होतं! गेली याचं दुःख नाही पण मी गेलो नव्हतो हे पाहायला तरी यायला हवं होतं! "
भानानं कागद उलगडला त्यात अर्धा डझन चुडा पाहिला व तो हंबरला. डोळ्यात महापूर दाटला असतांना चुडा गुंडाळलेल्या कागदावरची अक्षरं त्याला दिसली!
" भाना!..... मी पुन्हा चुकले! माझ्या चुकीला माफी नाही. पण आता एकच.....इतर जिवाची बाजी लावतात पण तुला 'बाजी'शीच जिवाची बाजी लावायचीय! सोबत तोच हिरवा चुडा पाठवलाय! याच चुड्याच्या व्यासात केव्हाही भेटलास तरी हजारो लाखोचा समुदाय जमवणारा भाना महाराज पहायचाय!"
भाना उठला व त्यानं मळ्याचा रस्ता धरला. रघू मागोमाग जाऊ लागला.
" दादा ,आता या घडीला कोणीच नको मला सोबत! मला एकटं सोडा!" विनवत तो निघाला. सूर्य केव्हाच ठाणबंद झाला होता व क्षितीजसांदीत चंद्र पायघड्या टाकत उगवतीचा घाट चढत होता.
जांभूळबनात त्याला चंदेरी शांतता वाटली. तो एका झाडाच्या बुंधाशी बसला.
सारीकडं शितलता असतांना त्याच्या मनात, उरात जाळ उठत होता व तो शितलता शोधत होता.
" मी पुन्हा चुकले!" हे एकच वाक्य त्याच्या मेंदूत फेर धरत होतं! त्याच्या मेंदूच्या साऱ्या घड्या विस्कटल्या जात होत्या. तो पुन्हा पुन्हा त्या घड्या पुन्हा पुन्हा बसवू पाहत होता पण एक घडी बसली की दुसरी विस्कटे. दुसरी घालावी तर पहिली विस्कटे. आता आपल्याकडं वेळच वेळ आहे. रिक्तताच रिक्तता आहे! आख्खी हयात पडलीय! कसलीच घाई नाही! घड्या बसवूच! त्यानं पुन्हा पहिली घडी बसवायला घेतली.
.
.
खुर्दाण्यात आई परतत नाही म्हणून सारे काकाच्या घरी परतले. पाय सुजून टम्म झालेला. अंगात ताप. आपण ओसरीत खाटेवर पडलेलो.
" अंजा आत्यानं मलम लावायला लावलंय! पाय दाखव!" आपण पाय पुढे केला. सुगंधाचा हात फिरू लागला. मलम मुलायम की तिचा हात मुलायम? की सुगंध मृण्मयी तलम? पण धुंदाळ धुंदीत डोळे लागत असतांना कपाळावर अधराचा मारा झाला नी आपण उठलो! उठलेला पाहताच सुगंधा मागं सरली व मान खाली घालत
" सकाळी मी चुकले माफ कर!"
माफी मागत निघू लागली. कपाळावरील व्रणावर अधराच्या माऱ्याबाबत माफीनामा नव्हताच!
.
.पहिली घडी बसली.आता तो दुसरी घडी पुन्हा बसवू लागला.
.
.
गडावर पाऊस, वाऱ्याचा कहर की बहर...
" भाना या हिरव्या चुड्याच्या व्यासात तू हजारो लाखो लोकांचा समुदाय जमव! मला भाना महाराज पहायचाय! लोकांना आपल्या वक्तव्यात तल्लीन करत समाधी लावणारा!"
दुसरी घडी बसली.
" लोक जिवाची बाजी लावतात. पण तुला बाजीशीच जिवाची बाजी लावायचीय!"
घड्यावर घड्या बसू लागल्या साऱ्या घड्या बसत असतांना मध्येच एक घडी विस्कटू पाहत होती.
" मी पुन्हा चुकले! चुकीला माफी नाही!" का माफी नाही? व बाजीशीच का बाजी? पुन्हा चुकणं व बाजीचा संबंध काय? ही विस्कटली तर पुन्हा साऱ्या घड्या विस्कटतील! म्हणून त्यानं ती तात्पुरती तशीच ठेवली.
सुशांत व रघू दादा त्यास जोरजोरात आरोळ्या मारत शोधत आले.
" सुशा! ती मध्यंतरी उमर्ठीला आली होती. तेव्हा तू भरपूर काॅल केले होते. पण शुटींग असल्यानं मला कळलं नसल्यानं मी रिसीव्ह केले नव्हते. मग रात्री ती लगेच परत गेल्याचं तू बोलला होता. ती येऊन अचानक परत का गेली होती?"
भान्या! आता सोड सारं! पुन्हा पुन्हा तीच ती राख का डोक्यात घालून फिरतोय?" सुशा कळवळला.
" सुशा! त्या दिवशी काय घडलं तेवढं फक्त सांग?"
" मी व सुगंधा तिच्या घरून तुला काॅल करत असतांनाच बाजी काका आला होता. मग नाईलाजानं मी घरी परतलो. जातांना तिला मी तुझा काॅल आला की कळवतो सांगितलं पण तुझा काॅल आलाच नाही व रात्री आला तेव्हा सुगंधा निघून गेली होती."
" इथंच काही तरी आहे!"
" काय भाना?" सुशांतनं विचारलं पण भाना उठला व ते घराकडं परतले.
भानाची स्थिती पाहून भोसले सरांचं काळीज करपू लागलं. एवढं गुणी पोर पण वाया जाईल. म्हणून त्यांनी उमर्ठीत घडत असलेलं सारं अमृतकर महाराजांच्या कानावर घातलं व काही तरी करण्यास विनवलं.
अमृतकर महाराज पंधरा दिवसांनी धुळ्याला किर्तनाला जात होते. त्या दिवशी त्यांनी भोसलेला भानास घेऊन पारोळ्याला बोलवून घेतलं.
" सरजी, महाराजांपुढे उभं राहण्याची ही आता माझ्यात हिम्मत नाही"
" भाना ! तू चुकला असशील वा नाही ते नंतर पाहू. पण बाबा बोलवत आहेत तर भेट घे! ते थोर आहेत काही तरी उपदेश करतील!"
भानास भोसले सरांचा शब्द टाळणं जिवावर गेलं व तो मुकाट्यानं सुशांतला घेत भोसले सरांसोबत निघाला.
पारोळ्याहून अमृतकर बाबांनी आपल्याच गाडीत भानास बसवलं. गाडीत जागा नसल्यानं सोबतच्या एका माणसास व सुशांतला बसवर यायला लावलं.
" भाना काय म्हणतोस? शिक्षण झालं ना?"
" ............" भाना काहीच बोलेना.
तिसऱ्या वर्षाच्या दुसऱ्या सत्रात तो काॅलेजला गेलाच नव्हता. पण तरी त्यानं परीक्षा दिली होती. पण निकाल घ्यायला ही तो गेला नव्हता. प्रचार मेळावे, स्टेज शो व नंतर तर मुंबई सिंगापूरच.
" बाबा, भाना ग्रॅज्युएशनला इंग्रजी विषयात विद्यापिठात पहिला आलाय." भोसले सरांनीच नंतर त्याचं सर्टिफिकीट घेऊन ठेवलं होतं.म्हणून तेच बोलले व भाना त्यांच्याकडं पाहत राहिला. सिंगापूरला असतांना भोसले सरांचा फोन येत होता पण शुटींग दरम्यान तुळसा कट करत होती ते त्याला आठवलं. सर निकाल. कळवण्यासाठीच करत असावेत.
" अरे व्वा छान! भाना आता काय करतोय मग?" बाबा महाराज पुढं पाहत विचारू लागले व भानानं खाली मान घातली.
" बाबा, आपणच काही तरी सांगावं म्हणून आपला सल्ला घेण्यासाठी आलोय!" भोसले सरच बोलले.
" भोसले! त्याला बोलू द्या!"
आता बाबा आरशातून भानाकडं पाहत होते.
"..............." पश्चात्ताप व सलदर्शक मौन.
" भाना किर्तन संपलं की रात्री मी निवांत बोलतो तुझ्याशी! तो पावेतो तू मनात पक्कं कर पुढे काय करायचं ते! कारण तुझ्या बोलण्यावरुन तुझ्या मनातलं द्वंद्व बारावी नंतर होतं तसंच आहे अजून!"
धुळं आलं. देवपूरमध्ये बाबांचं किर्तन होतं. साऱ्यांनी भोजन केलं. सुशांत व भाना भोसले सरांसोबत बसत किर्तन ऐकू लागले.
रात्री किर्तन संपल्यावर बाबांनी एका स्वतंत्र खोलीत त्यांना बोलवलं.
" भाना! बोल आता! पुढची दिशा काय?"
" बाबा! अजून काहीच ठरलं नाही! पहिला शो दणदणीत झालाय! वाटलं तर छोट्या पडद्यावर भरपूर संधी चालून येत आहेत! नाहीतर आधीसारखं स्टेज शो आहेतच!"
" मनापासून काय करावंसं वाटतं ते सांग?" बाबा त्याच्या नजरेत नजर टाकत विचारत होते. पण भाना नजर चोरत होता.
" भाना! माणसानं कोण काय सांगतं , कुणास काय वाटतं त्यापेक्षा आपणास काय वाटतं यावर विचार करावा! मी काय म्हणेल, हे भोसले सर काय म्हणतील वा घरचे काय म्हणतील यापेक्षा या घडीला तुला काय हवंय ते सांग!"
" बाबा! मला झगमगाट वा समृद्धीतला गोंगाट, कोघाट नकोय! शांततेत नांदणारी पावित्र्यता वा रिक्ततेत ,पोकळीत वसणारी समृद्धी हवीय!" भाना आतून बोलून गेला.
भोसले सर व सुशांत भाना बडबडतोय की काय असाच विचार करू लागले.
पण बाबा हसले!
" भाना , मला ही तेच हवंय! तीन वर्ष मी यासाठीच तुला थांबवलं होतं. तुला शांततेतली समृद्धीच महत्वाची आहे. झगमगाटी दुनियेतली समृद्धीची तुझी हौस फिटली हे छानच झालं. कारण तो अनुभव न घेता तुला जर भक्तीमार्गाकडं पाठवलं असतं तर तू रमलाच नसता! आता मला हवा असलेला भाना महाराज येत्या पाच सहा महिन्यात तयार होईलच."
बाबा महाराजांनी सकाळीच फोन करत भानास परस्पर आळंदीला पाठवायची तयारी केली.
" बाबा, सोबत सुशांत ही आला असता तर बरं होईल!" भानानं हात जोडत विनंती केली.
भाना व सुशांत परस्पर आळंदीला किर्तन कार बनण्यासाठी निघाले. भोसले सरांना आनंद झाला. ते उमर्ठीत परतले व दोघांच्या घरी निरोप देत समजावलं. भोसले सर करतील ते योग्यच करतील हा बापूस भरवसा असल्यानं त्यांचा नकाराचा प्रश्नच नव्हता.
भानानं ग्रॅज्युएशनच्या पहिल्या दोन वर्षात बाबांनी दिलेल्या वेद, पुराण, उपनिषद, गाथा, गिता, रामायण महाभारत याचा अभ्यास केलाच होता. त्यामुळं अवघ्या महिन्यातच त्याच्यातली भक्तीमार्गातील आवड व पाणी दिसू लागलं. सुशांतला पखवाज वादनाचं प्रशिक्षण दिलं जाऊ लागलं. सुशांतनं ही शिक्षण सोडत गावातच शेतातली कामं सुरू केली होती म्हणून भाना व बाबानं सांगताच तो तयार झाला होता.
पाच महिने भाना पूर्ण रिक्त पोकळीत राहत केवळ भक्तीमार्ग, संतविचार, वारकरी संप्रदाय याच विश्वात रमला. तो हिरव्या चुड्यातली समृद्धी ,शांतता भक्तीत शोधू लागला. विमनस्क अवस्थेतल्या भानाच्या विस्कटलेल्या घड्या बसू लागल्या. एक स्थीर, शांत, भाना तयार होऊ लागला. स्थीतप्रज्ञतेकडे वाटचाल सुरू झाली. पाच महिने भाना व सुशांतनं उमर्ठीचं नाव घेतलं नाही. मनातला सुगंध भिज ओलीगत आत आत खोल खोल उतरत भक्तीभाव उरात भरू लागला.
तुळसाला घेत जुन्या कलाकारासोबत शर्मानं सेमी फायनल व फायनलच्या शो चं शुटींग केलं व शो टेलीकास्ट झाला होता. पण भानानं शो सोडल्यानंतरचे भाग सुरू झाले व टि आर पी एकदम खाली आला. तुळसानं केदार शर्माला हाताशी धरलं. शंतनू शर्मा नाही सांगत असतांना केदारनं तुळसाला त्याच धर्तीवर आधारीत दुसरा सिझन सुरू केला पण नृत्याची थीम बदलवली. निर्माता शोधत शूटिंग सुरू झालं. तीन महिने शूटींग चाललं शोचं टेलीकास्ट सुरू झालं. शो पूर्ण फ्लाॅप गेला. नंतर तुळसाला कुणीच उभं करेना. तुळसा जळगावला परतली व मामाकडं राहू लागली.
" तुळसा! तुझ्या बापाला मी आधीच सांगितलं होतं की रघूला दूर करा व भानास जवळ करा! हिरा आहे तो! पण दाजी व तू ही त्या वेळेस मनावर घेत भानास रघूला दूर करण्यासाठी जवळ घेतलं पण नंतर भानाशीच गेम सुरु केला! इथेच चुकलात तुम्ही!"
तुळसा ...! फडफड करत एकेकाला हूल भरत वर उडू पाहणारी मैना वर उडाली होतीही. पण गाठलेली उंची स्वत:च्या हिकमतीवर राखू शकली नाही. ती आता झपाट्यानं खाली येऊ लागली. पण खाली येतांना आपणच दूर केलेले राघू तिला परतीच्या वाटेवर भेटेनात! ती अस्वस्थ झाली. तिला आमराईतलं भानाचं वाक्य आठवू लागलं!
" दादा! राघू व मैना एकाच उंचीवर राहतील .फक्त झाड किती दूर ते अंतर महत्वाचं ,वा मैनानं पाहण्याचा उन्नत कोन वाढवू नये!
आपण ना एका उंचीवर राहिलो ना उन्नत कोन स्थीर ठेवला.उन्नत कोन वाढवत वाढवत विशाल करत गेलो व आता भुईवर आपटतोय.
भाना व सुशांत परतला. परततांना बाबांना विचारत भाना सरळ आधी खुर्दाण्यात गेला. श्रीराम मंदीरात जात त्यानं दर्शन घेतलं. सभामंडपात मांडी घालून बसला. त्याच्या नजरेसमोर कधी टाळ वाजवणारा सदाबाबा, कधी पखवाज वाजवणारा सदा बाबा,तर कधी हार्मोनियम वाजवत अभंग गवळणी म्हणणारा आपला बाप दिसू लागला. त्याचे डोळे पाणावले. उपाशीपोटी रागावलेल्या आईस विनवण्या साठी गवळण म्हणणारा आपला बाप त्याला दिसू लागला. त्याच्या मनात शांत सयंमी ज्योत तेवतांना जाणवू लागली व तो मनातल्या मनात पुटपुटू लागला.
" बाबा, आता मलाही आयुष्यभर तुमचीच वाट तुडवायची! भक्तीमार्गाची!" पण तरी त्याच्या मनात ती गवळण तरळलीच...
" एका जनार्दनी मनी म्हणा
देव महात्म्ये न कळे कोणा
कशी जाऊ कशी जाऊ मी वृंदावना
मुरली वाजवितो कान्हा!"
उमर्ठीला आपल्या आजोबांनी बांधलेल्या विठ्ठल मंदीरात विनयानं माथा टेकवला. बापू, मावशी, आई, सनेर काका, काकु साऱ्यांचेच आशीर्वाद घेतले.
दोन दिवस राहिला. रघू दादाची हालहवाल विचारली.
अंजा मावशी हंबरली,. भानाचं असं व रघू लग्नास साफ नकार देतोय म्हणून माऊली तुटत होती .
" भाना! एक वाईट बातमी आहे रे!"
" बापू आता आणखी काय राहुन गेलं वाईट घडायचं! आधीच तर सारं घडून गेलंय भरपूर!"
बापूचा उर पुढचं सांगण्याआधीच भानाच्या शब्दांनी फाटू लागला.
" सांगा बापू, काय घडलं!"
" सुगंधा पहिल्या बाळंतपणात जेमतेम वाचली! मुलगी तर जन्मा आधीच वारली! मुलीच्या जाण्यानं सुगंधा एकदम बिनसलीय! तिचा नवराही दु:खात बुडालाय"
भानाच्या खिशातला कायम किणकिण आवाज करणारा हिरवा चुडा एकदम टिचल्यागत आवाज करू लागला.
" मरे एक त्याचा दुजा शोक वाहे!
अकस्मात तो ही पुढे जात आहे!
बापू जाणाऱ्या भुताचा त्रास वेदना होणारच! शहाण्यानं विस्मरण्याचा प्रयत्न करावा!"
" भाना! एक वेळ..."
" बापू! महत प्रयत्नानं बसू पाहणाऱ्या घड्या विस्कटू नका! हात जोडतो, पाया पडतो"
" रघू दादाला तर भेटून ये!"
" माझा दादा या लहान्या द्वाड भावास भेटण्यासाठी येईलच! हा द्वाड गेला नाही तरी!"
त्या रात्री भानाला झोप लागलीच नाही. बापू सदा बाबाचे, तुमचे संस्कार मला कुणाच्या संसारात आग लावायला शिकवत नाही.
भाना व सुशांत अमृतकर महाराजाकडं परतले. जातांना भोसले सरांना सोबत घेतलं. सारं पार पडलं पण आता पुढे काय? हा सवाल भानाला नाही पण सुशांतला भेडसावत होता. भाना मात्र निर्धास्त होता. आपण उभं राहू तिथं गर्दी खेचू! पण आता गर्दी खेचणं नव्हतं तर आपणास गर्दीला मार्ग दाखवायचाय! म्हणून तो खरं तर बाबांची आज्ञा घेऊ पाहत होता.
अमृतकर बाबाकडं पुढच्या वर्षभरांच्या किर्तन तारखा होत्या. त्यांचं वय थकत होतं पण सेवावृत्ती शांत बसू देईना.
बाबांचं त्याच रात्री चिखलीला किर्तन होतं. बाबांनी चिखलीला भानास फेटा बांधत थेट किर्तनास उभं केलं. बाबांच्या जागी उभं राहणं या कल्पनेनेच तो थरथरला, कंप पावला.
" भाना ! संधी आली की तिचं सोनं करायचं!"
भाना पाया पडत उभा राहिला. त्यानं खिशातून एक बिलोर काढत क्षणभर त्याकडं पाहत समोरच्या माईकला अडकवला. बा विठ्ठला तुझ्या भक्तीचा सुगंध माझ्या वाणीत परिमळू दे!
सुशांत पखवाज घेत साथ देऊ लागला. भाना स्वत:च पदं म्हणत जगतगुरु तुकोबारायांच्या अभंगाचं निरुपण करू लागला.पद म्हणतांनाचा आवाज, निरुपण करतांना संदर्भ व उदाहरणे , स्वत: ची एक आगळी वेगळी शैली यानं सारा भक्तगण सुखावला.
किर्तन संपलं. अमृतकर बाबा भोसलेचा हात हातात घेत भावनावेगानं उद्गारलेच
" भोसले, बोललो होतो ना! हा जिथं उभा राहील तिथं साऱ्यांचंच अस्तित्व विसरायला लावेल. हा आता कोणाकोणाचं अस्तित्व पुसतो हे लोक पाहतीलच!"
अमृतकर महाराजाच्या साऱ्या तारखा तोच करू लागला. महिन्यातच यु ट्यूब वर त्याच्या क्लिप्स गाजू लागल्या. लाखो फाॅलोअर्स मिळू लागले. उभ्या महाराष्ट्रातून हे नवीन महाराज कोण? विचारणा होत भराभर तारखा येऊ लागल्या. भाना महाराज विशेषतः तरुण वर्गास नात्यातील ओलावा व देशासाठी योगदान , महान संतपरंपरा याबाबत प्रबोधन करत एकनिष्ठ राहण्याबाबतची शाश्वतता आपल्या किर्तनात मांडू लागले. बांगड्याचा आहेर स्विकारावा लागेल असं कृत्य करण्यापेक्षा आपली दि
दानत व नियत स्वच्छ ठेवा! तुमच्या नावानं जिनं हिरवा चुडा घातला तिच्याशीच एकनिष्ठ रहा! माता पित्याचे पांग फेडा हाच खरा आधुनिक भक्तीमार्ग !
भाना महाराज अख्ख्या महाराष्ट्रात फिरू लागले!
भानास शांततेतली समृद्धी गवसली. पण पोकळीत वावरतांना आपली एकनिष्ठता जिच्या ठाई त्या एकनिष्ठतेचं काय? रघू दादाचं काय? ही सल काळीज पोखरी. व तो संत साहित्य वाचनात व भक्ती मार्गात स्वत:ला गाडू लागला.
जळगावला किर्तन संपलं व खाली उतरतांना त्याला भोसले सर येत भेटले!
" भाना! बाजी कदम! विहीरीवर शाॅक लागून.........!"
भाना पुटपुटला..
" मरे एक त्याचा दुजा शोक वाहे!
अकस्मात तो ही पुढे जात आहे!!
भाना तुझी बाजीशी जिवाची बाजी संपली.
पण तरी......
.
.
क्रमशः
भाग::-- चौदावा
पावसाळ्याच्या सुरुवातीस लावलेले वेल सुगंधा झोपड्याच्या छतावर चढवत होती. या वर्षी वेल मस्त डवरले होते. कोहळा, रानकांदा, कारली, वाल, काकडी,आबुईचे वेल छतावर पोहोचत तणाव गुंडाळत पुढे चाल करत होते. त्यांना पाहून नववा संपत चालल्यानं ती आपल्या कांती चढलेल्या देहाकडं खुशीनं पाहत होती. तोच तिच्या काळजात धस्स झालं व ती वेलाच्या मुळाकडं पाहू लागली. पण या वर्षी उंदरांनी वेली कुरतडल्या नव्हत्या. ती मनात संतोषली. कारण मागच्या वर्षी पावसाळ्यात अशीच वेल चढवतांना तीचं वेलीकडं लक्ष गेलं व उंदरांनी वेल कुरतल्याचं लक्षात आलं व लगेच तिला त्रास जाणवायला लागला होता. सत्यम घरी नव्हताच. दादानं इतरांना शोधायला पाठवत तोवर स्वत: आपणास शहाद्यास नेलंही. पण प्री मॅच्युअर्ड बाॅर्न बेबी.... आठ महिन्याची मुलगी... रघू दादाच्या धावपळीला यश आलंच नाही. मात्र दादानं बहिणीस मृत्युच्या दाढेतून वाचवलं. त्या वेळी जवळ ना नवरा, ना मामा ना आई-वडील! मागावून एक एक सारे आले! दादानं तर सत्यमला मारायचंच बाकी ठेवलं.
सत्यम खाली मान घालत डोळ्यात आसवं आणत ऐकत होता.
" तुझ्या निष्काळजीपणामुळंच मुलगी वाचली नाही! मूर्खा पूर्वसंचीत चांगलं असेल की सुगंधा तुला दिसतेय!"
दादानंच गाडी केली व घाट चढत तोरणमाळला आणले. दादाचा निरोप मिळताच आई- वडील, मामा मामी आले. मुलगी गेल्यानं आईच्या गळ्यात पडून धाय मोकलत रडावं वाटत होतं. पण आतलं दु:खं आतच कोंडलं जात होतं. बाहेर निघावं वाटत असतांनाही निघत नव्हतं. पावसानं खालचं सारं तळ ओलं. कुडातून पाण्याचा फवारा व झड आत येत होती. आईनं ते पाहून गोधडी अंगावर टाकली.
" सुगंधा! जावई आले नाहीत अजुन?" वाट पाहुन थकलेले बाबा विचारू लागले.
" येतील बाबा! त्यांच्या वेळेवर!" कसातरी खोल बोल निघाला.
रघू दादा आला. त्यानंच मामी व आईच्या मदतीने जेवणाची तजवीज केली.
सत्यम डुलत डालत नऊला आला. तो आल्यावर सारे जेवायला बसले.
" मामा...! मला काय माहीत तुम्ही आलेत म्हणून! माहिती असतं तर गावठी लाल कलगीचं कोंबडं हासडलं असतं तुमच्यासाठी!" अंगातली मव्हाची बोलू लागली.
बाबा व मामांना एकदम भरून आलं. कोणत्या प्रसंगी आलोय आपण नी जावयाचं काय!
सकाळी सत्यम निघून गेल्यावर आई संतापली.
" सुगंधा तू बोलत नाही का त्यांना?"
" आई, तू बाबांना कह्यात ठेवते तसं मला नाही जमलं गं त्यांना कह्यात ठेवायला! पण बघ येतांना तुला वचन दिलं होतं की मी करेन बेवड्याशी संसार! तर करतेय ना गं मी! भले त्याची दारू सोडवण्यात मी कमी पडले. पण तरी संसार मात्र करतेय मी! मी... मी...बिनसली नाही गं!"
आई बाबाच्या काळजात चर्र झालं. आपणास ही घरी आलेल्या आई बाबा व मामास दुखवायचं नव्हतंच पण का कुणास ठाऊक लग्नापासुन दाबलेला लाव्हा उफाळून आलाच.
आई बाबा रडू लागले
" सुगंधा....चुकलो आम्ही पोरी! अल्लड वयात जाण नाही पोरीस म्हणून घाबरलो होतो गं!"
दवाखान्यात दाबून ठेवलेला ज्वाला निघाला. मुलगी जन्मन्या आधीच गेली म्हणून आपण आईला बिलगत रडू लागलो!.
"आई रडण्यासाठी देखील दादाखेरीज कुणीच नव्हतं गं माझ्याजवळ दवाखान्यात...."
सारी सल,कढ, बाहेर निघू लागली. पोरीच्या जाण्याच्या दुखात जुना ढवंढाय ही निघू लागला.
आई वडिलांनी मामांनी आठ दहा दिवस थारेपालट होईल म्हणून सोबत येण्यास खूप विनवलं. पण त्या उमर्ठीत ही नको व हंबर्डीतही नको! पुन्हा ती आग... तो दाह... नकोच..कोणत्या तोंडानं जावं! वाट पाहणारा ताटकळत असल्यावर आपण बिनसलो तर?
आई -वडील, मामा-मामी परतले. मामास नकार देऊन ही अडीअडचणी ला राहू देत म्हणून मामानं पैसे दिले.
" मामा, या डोंगरातील लोकांकडं काहीच नसतं! आपणास वाटतं की हे लोक कसे राहत असतील! पण त्यांच्या गरजा व लिप्साच इतक्या कमी आहेत की डोंगरात जे आहे तेच त्यांना पुरुन उरतं. माझंही आता तसंच झालंय. मला आता याची गरजच भासत नाही.
" सुगंधा ,रघूनं दवाखान्यात भरलेलं बील माझ्याकडून घेतलं नाही! यातून निदान ते तरी त्याला दे!"
" मामा! बहिणीच्या बाळंतपणाचं कर्तव्य करतोय तो! कसा घेईल तो!"
आई वडील परतले. सत्यमचं पुन्हा जे होतं तेच पहिले पाढे पंचावन्न सुरू झालं. त्यात शाळेवर नियमीत नाही म्हणून गटविकास अधिकाऱ्यानं आधीच्या शाळेतून उचलत तोरणमाळ पासून वीस किमी दूर नर्मदा किनारी बदली केली. आता तो जाईच ना! गेला तर आठ दहा दिवस येईना. आला की तेच सामीष भोजन, दारू...नी मग जिवाची काहिली उठवणारा तो वास व ओरबाडणं सहन करणं! सुगंधा सांगून सांगून, समजावून कंटाळली.त्यानं ऐकलंच नाही पण निसर्गानं ऐकलं. निसर्गानं तिच्या झोळीत पुन्हा दान टाकलंच.
.
.
सुगंधा वेल चढवत असतांना सारं आठवू लागली. या वर्षी तरी उंदरांनी वेल कुरतडायला नको म्हणून काळजी घेत होती.
सुगंधा घरात आली. चुलीतली गोळा केलेली राख घेत ती वेलीच्या, भेंडीच्या, काकडीच्या मुळाजवळ टाकू लागली. व पुन्हा आठवतीचं मागचं तळ शोधत मुळाकडं सरकू लागली.
.
.
रघू सत्यमला दटावत दर महिन्यास डाॅक्टरकडं पाठवू लागला. सत्यमकडं पैसे नसले की म्हणजे नसायचेच! मग रघूच देई पण दर महिन्याला पाठवी.
" सुगंधा , काही कळलं का?"
दादानं असं विचारलं की तिचा प्राण कानात गोळा होई पण ती तरी विचारेना. आपण विचारणार नाही हे दादा ओळखून असायचा .मग नाही विचारलं तरी दादा मोठ्या उत्साहानं सांगू लागे.
" भाना व आपला सुशांत आळंदीला गेलेत गं! अमृतकर बाबांनी पाठवलंय! आता बघ दोघे किर्तनकार बनूनच परततील!"
उरात अमावस असली तरी राकेचं चांदणचुऱ्याने आभाळ फुलायचं!
' आई जगदंबा जगले वाचले व तुझ्या गडावर येणं झालं तर तुझी खणा नारळानं ओटी भरेल गं! यश दे! रिक्त पोकळीत जगण्याचं त्याला बळ दे!' मनात नवस बोलला जाई.
.
.
.
पुन्हा दादा आला की " सुगंधा काही कळलं का?"
".........." प्राण कंठाशी व कान आतुरतेनं दादाकडं.
" भाना किर्तन करायला लागला. यु ट्यूबवर बघ त्याचं किर्तन टाकलंय! आणि लोक त्याला 'भाना महाराज' म्हणून ओळखायला लागले अवघ्या एक दोन महिन्यातच!"
" आई जगदंबे! शक्ती दे त्याला!" पुन्हा मनात नवस.
बाजी काका गेले. कळलं. रघू दादा व सत्यम राव गेले. रघू दादा तुळसास पाहणं नको म्हणून परस्पर स्मशानात गेले. मामाचं अंतीम दर्शन घेतलं व परस्पर परतला. सटाण्याचा बाजी काकाच्या पुतण्यानं पाणी दिलं.
सुगंधाला आठवणी याच गडणी असल्यानं ती केव्हाही त्यांच्यासोबत हितगूज करी. गडणी परतल्या की भयाण वास्तवतेत ती परते!
सायंकाळी सत्यम लवकर परतला. रघू औरंगाबादला मीपात संगणकाच्या प्रशिक्षणासाठी सहा दिवसांपासून गेलेला. अजून चार दिवस लागणार होते परतायला. जातांना सत्यमकडे पैसै देत बजावून बजावून सांगून गेला.
" सत्या , सुगंधाकडं लक्ष दे! डाॅक्टरांनी दिलेली तारीख जवळ येत आहे तोवर मी परतेनच. काशी मामा मामीही येतील तोवर. पण आधीच त्रास व्हायला लागला तर ताबडतोब शहाद्यास ने! बघ दिलेल्या पैशाची ढोसू नको! नाही तर ऐनवेळी पंचाईत होईल!"
" दादा, तुझी बहीण असली तरी माझीही कुणी तरी आहे ना! कशाला काळजी करतो!"
" सत्या ,मागचा प्रसंग आठवला की काळजात धस्स होतं रे!"
रघू निघून गेलेला. म्हणून सत्यम पाच दिवसांपासून लवकर येत होता.
" अहो, आज दुपारपासून अस्वस्थ वाटतंय! जीव घाबरायला होतंय!"
" थांब गाडीवाल्यास पाहतो मग! शहाद्यालाच जाऊ!"
" तसं नाही,पण दम लागल्यागत होतंय!"
सत्यम गेला व गाडी घेऊन आला. अंधार पडेपर्यत ते घाट उतरले व सुगंधास त्रास व्हायला लागला. कशीबशी गाडी शहाद्यात आली. दवाखान्यात अॅडमीट केलं. सुगंधास खूपच त्रास होऊ लागला. तारखेला अजून अवकाश होता. डाॅक्टरांनी साऱ्या तपासणी करत उपचार सुरू केले. रघू दादानं दिलेले पैसे काऊंटरला पहिल्याच दिवशी जमा केले. उत्तर रात्रीनंतर त्रास अधिकच वाढला व सुगंधाचं सीझर करण्याचा निर्णय घेतला. पहाटे टॅव करत मुलीनं जन्म घेतला.
सकाळ होताच सत्यमला धास्ती भरली. रघू दादास पुन्हा कसा फोन करावा? त्यानं तर दहा हजार आधीच दिलेत! सत्यम मित्रांना फोन करू लागला. कोण रेंजमध्येच नव्हतं. तर कुणी सकाळीच चालू पडत तऱ्हाट व्हायला सुरुवात झालेली.
" सत्या! तुला तर माहितीय ना यार! तुझ्यासारखाच पगार आपणास ही पुरत नाही! पगारपर्यंत अडजेस्ट कर पगार झाला की हवंतर देतो!"
" नाऱ्या, लेका! पगार होईपर्यंत डाॅक्टर नाही थांबणार ना!"
" मग तुझं तू बघ भावड्या!"
काहिंनी मागचेच बाकी म्हणून हात झटकले.
सायंकाळ पर्यंत सत्यमने साऱ्यांपुढे हात पसरले पण कुठूनही मिळेनात. डाॅक्टर दोन तीन दिवसांनी डिस्जार्च देणार तेव्हा लागतीलच पैसे. तोवर रघू दादा येणं मुश्कील. रघूस सीझरची कल्पनाच नव्हती. व तारीख पुढे असल्यानं तोवर येऊन जाऊ म्हणून त्यानं दहा हजारच टाकलेले.
सत्यमनं आईस फोन करायचं ठरवलं.
दुसऱ्या दिवशी आईस फोन केला
" कोण?" वडिलांनी उचलला.
" मी..मी सत्यम!" फोन नाव ऐकताच रागानं कट झाला.
सत्यम समजला. तो रुममध्ये येत खाली मान घालत बसला.
" अहो! काय झालंय? पैशाची तजवीज झाली नाही का?" खोल क्षीण आवाजात सुगंधानं विचारलं.
" करतो मी काही तरी! तू काळजी नको करू! आराम कर तू!"
सुगंधाला सत्यमचं बोलणं ऐकून पटत नव्हतं तरी धीर आला. रघू दादा नाही तेच बरं झालं. दादा असता तर हे बिनघोर राहिले असते व टाकून ....पण दादा नाहीत तर निदान जबाबदारी तरी अंगावर घेत आहेत. पैशाची व्यवस्था होवो ना होवो!
" माझं ऐका! दादालाच फोन करा! दुसरं कुणालाच करू नका!"
" सुगंधा! हंबर्डीला करू का?" सत्यम डोळ्यात आसवं आणत इलाज नसल्यानं बोलला.
सुगंधा समजली.पैशाची सोय झाली नसावी. आई वडीलांकडे ऐनवेळी एवढी तजवीज होणार नाही.
" अहो, दादा असल्यावर मामाला का त्रास देताय!"
" पण सुगंधा, रघूनं आधीच दहा हजार दिल्यावर पुन्हा मागणं?"
" तो परका नाही! बहिणीसाठी देईल तो!" ती हक्कानं म्हणाली.
सत्यम उठला. त्यानं रघूस फोन केला. पण रघू उचलेना. प्रशिक्षणात अलाऊड नसेल म्हणून रघू उचलत नसेल हे त्यानं ओळखलं. सायंकाळी त्यानं पुन्हा एकदा आईस केला. आता आईनंच उचलला.
" आई! मुलगी झालीय गं! पण थोडी अडचण होती!"
पलीकडून वडिलांचं बोलणं सत्यमला ऐकू येत होत.
" माधवी, एकदा सांगितलेलं तुला कळत नाही का! दुसऱ्या खांडातलं कोकरू या घरात बिलकूल नको! बोलणं ही नको!"
" सत्यम ! बेटा, समजून घे मला! आता तुला सावत्र मुलगा म्हणूनही ही आई जवळ घेऊ शकत नाही....." फोन कट झाला.
सत्यमनं ओळखलं. सि
सावत्र असली तरी ती सख्ख्या आईच्या मायेनं तिची मजबुरी सांगतेय.
त्यानं मनाचा हिय्या करून रघूलाच फोन केला. रघूनं आता उचललाही.
" बोल सत्यम! प्रशिक्षणातून परस्पर गावात निघून गेलो होतो.फोन रुमवरच होता. आता आलो नी तोच तुझा काॅल आला!"
" रघू, तू मामा झालास लेका!"
" सत्या ,केव्हा रे! सुगंधा कशी आहे?"
" काल पहाटे! सुगंधा व बाळ सुखरूप आहेत!"
" इतक्या उशीरा कळवतोस मग?"
" रघू , पैशाची तजवीज नाही होत आहे रे!"
" घाबरू नकोस! डिस्जार्च केव्हा देणार आहेत?"
" बहुतेक परवा सकाळी!"
" माझं उद्या सायंकाळी प्रशिक्षण संपतंय! परवा सकाळीच मी येऊन जाईन! पैशाची काळजी करू नको! सुगंधाची काळजी घे!"
रघुचा सारा ताण क्षणात हलका झाला.
रघूनं सत्यमचा फोन ठेवला तितक्यात भानाचा त्याला काॅल आला.
" दादा, कुठं आहेस? बरं ऐक भेटावंसं वाटतंय रे! कालपासून एकदम मन सैरभैर झालंय!"
रघूला एकदम भरून आलं. त्यालाही भानास भेटायची ओढ असायचीच. पण भावा भावाच्या भेटीत अस्वस्थता नसायची.
" भाना! कुठं आहे? ये ना मग !"
" आता उमर्ठीला! मी व सुशांत सकाळी निघतोय शहाद्याला. दुपारपर्यंत शहादा पोहोचू. रात्री किर्तन आहे!"
" मग ये तोरणमाळला!" रघू भानास मुद्दाम म्हणाला.
तोरणमाळचं नाव ऐकून भाना एकदम बोलायचा थांबला.
" दादा! त्यापेक्षा तूच जर शहादा आला असता तर दुपार ते सायंकाळपर्यंत बोलता आलं असतं!"
भानाला तोरणमाळ यायचं नाही हे रघूनं ओळखलं.
" भाना येतो मी शहाद्याला.तू शहाद्याला पोहोचला की मला काॅल कर!"
रघूला मनात एकदम आनंद झाला. भानास कालपासून अस्वस्थ का वाटत असावं हे रघूनं ताडलं तरी नियतीचं गणित रघूस कोड्यात टाकत होतं. पण काही का असेना खोटं बोलून का असेना पण दोघांची एकदा भेट तर घडेल! म्हणून रघूला मनात समाधान वाटलं.
दुसऱ्या दिवशी डिस्जार्च मिळणार नाही म्हणून सत्यम सायंकाळ आधी परत येतो सांगत सकाळीच अंघोळ व कपडे बदलण्याचं निमीत्त करत तोरणमाळ निघून गेला. दवाखान्यात सुगंधा एकटी थांबली. तिला वाटलं सत्यम रघू दादानं होकार दिला तरी आणखी पैशासाठी तोरणमाळ जात असेल म्हणून " लवकर या " एवढं म्हणत तिनं जाऊ दिलं.
भाना व सुशांत पहाटे पाचलाच निघत शहाद्याकडं कारने निघाले. शहादा जसं जसं जवळ येत होतं तसं तसं भानास एकदम अस्वस्थ वाटू लागलं. तीच रिक्त रिक्त पोकळी. त्यानं दोंडाईचा येताच सुशांतकडं कार दिली.
तो मागच्या सीटवर डोळे बंद करत बसला. त्याला किण किण ऐकू येऊ लागली. त्यानं दचकून खिशात हात घातला. हिरवा चुडा लागताच तो सुखावला. डोळे उघडले. बाहेर झड सुरू होती.त्याला अचानक काठी धरुन झोपडीच्या दाराशी उभी असलेली ओली सुगंधा आठवली. तो खडबडून उठला!
" सुशा, आजची तिथी रे?"
" भाना महाराज काय एवढी अस्वस्थता? तिथीही विसरलात! आषाढ पुनव आहे ना आज!"
' आषाढ पुनव' ऐकलं नी भाना बिथरला.
.
.
"भाना पुनवेचा चांद वर येत असावा. आषाढ झड सुरू असावी. मेघ व चंद्राच्या लपंडावात पावसात चांदणचुरा भिजत रहावा.... मस्त डोंगरावर भिजलेला चांदणचुरा झेलत, पाऊसवारा अंगावर घेत हातात हात घेत भटकावं उंच उंच डोंगरावर.... सारं हळूहळू विरत जावं.. श्वासात श्वास एक होत सुरमयी लड व्हावी नी द्वैत एक होत...."
" भाना, दादा बोलवतोय तर जाऊयात ना तोरणमाळलाच! भरपूर वेळ आहे! कशाला उगाच दादाला इकडं बोलवतोय!" भानाची समाधी तोडत सुशांत सांगत होता.
" सुशा! काही तरी कर नी तुझ्या जोशी मॅडमांना आवर!" सुशांतच्या बडबडीकडं लक्ष न देता भाना बरळू लागला.
सुशांत काल पासुन भानाचं अस्वस्थ होणं पाहत होता.त्यानं दचकून उठत बोलणाऱ्या भानास आरशातून पाहिलं.
" भाना! पाऊस पडतोय म्हणून वाटत असेल! पुढे रस्त्यावर तापी ओलांडून दत्तमंदीर येतंय! दर्शन घे शांत वाटेल"
दत्ताचं दर्शन घेत ते शहाद्यात प्रवेश करत होते.
" भाना, एक सांगू?"
" सुशा, केव्हापासून परवानगी घेऊन विचारायला लागला, माकडा?"
" जोशी मॅडमांचं ऐक! लग्न करून मोकळा हो ना!"
" सुशा तुच लावलेलं गाण ऐक आधी"
भाना बोलला नी सुशातचं लक्ष गाण्यावर गेलं.
" मौसमे इश्क में मचले हुए अरमान है हम,
दिल को लगता है दो जिश्म एक जान है हम!
ऐसा लगता है तो लगने मे कुछ बुराई नही,
दिल ये कहता है की आप अपनी है पराई नही!"
"........" सुशांत गप्प झाला.
" सुशा जगाच्या व्यवहारात, परंपरेत भौतीक स्थुलतेला महत्व आहे. पण त्याउपर मनाचे खेळ वेगळे असतात बाबा....."
.
.
" दादा , शहाद्यात आलो आम्ही! तू कुठपर्यंत आलास?" भाना दादास फोनवर विचारू लागला.
" भाना, सुशांतकडं दे फोन! "
भानानं सुशांत कडं दिला.
रघूनं सुशांतला हळूवार समजावलं व दवाखान्याचा पत्ता दिला.
सुशांत थरथरला. आवाज घोगरा झाला. त्याच्या डोळ्यात आसवं तरळतांनाही नजर खुशीनं तेजाळली.
" सुशा, काय रे ? कुठं आहे दादा?"
" भाना, दादा चं कुणीतरी पेशंट दवाखान्यात अॅडमीट आहे.तिथंच दादानं भेटायला बोलवलंय . पण आधी हे सारं सामान आपण यजमानाकडं ठेवून येऊ चल पटकन!" सुशांत आनंदाने म्हणाला.
" सुशा, नुसतं दादा भेटणार यानंच किती प्रसन्न वाटायला लागलं रे! मला तर वेगळाच सुगंध दरवळल्याचा भास होतोय बघ!"
" महाराज, या सुशाला तर ताटवाच बहरल्याचा उल्हास झालाय!"
.
.
.
दहाच्या सुमारास सुगंधा बेडवर मुलीस छातीस लावून पडली असतांना समोरच्या बाकावर एक माणूस लहान्या मुलास लस्सी पाजत होता. त्या मुलाची आई ' पावसाचं लस्सी देताय, सर्दी होईल' म्हणून नवऱ्यावर कातावत होती.
" अगं ऐकतच नाही तो ,सारखं टिरीटिरी करत होता लस्सीसाठी! मग दिली काय करणार!" माणूस लस्सी चमच्यानं पाजत म्हणाला.
मुलानं चमच्याला पाहत तोंड फिसकारत ग्लास वडिलांकडून हिसकावला व ग्लास तोंडाला लावला. आता तो ग्लासच्या तळासी असलेल्या काजू बदामाच्या तुकड्याशी झटापट करत होता.
सुगंधास ते पाहून हसू फुटलं. ती गाठोडं उपसत हवी असलेली आठवण शोधू लागली. तिला जास्त प्रयास पडलेच नाहीत.
तिला बोर्डाच्या शेवटचा पेपर संपल्यावर भाना थंड पाजायला घेऊन गेल्याचा किस्सा आठवला व ती हसू लागली. भानानंही या लहान पोरागतच चमचा बाजूला ठेवून घटाघटा लस्सी घोटली होती. आपण मात्र तो क्षण पुरेपूर लुटता यावा व लवकर उठावं लागू नये म्हणून सावकाश चमच्यानं पित होतो. तो पठ्ठ्या ग्लासातल्या तळाशी असलेले तुकडे कसे काढावेत या विवंचनेत आपल्याकडं पाहत होता.
" माकडा, मुकाट्यानं ग्लास तोंडाला लावून वर करत हालव! तुकडे येतील बरोबर तोंडात!". आपण बोललो नी त्यानं हसतच ग्लास तोंडाला लावला.
काही क्षण प्रत्यक्ष जगताना मोलाचे वाटत नाहीत. पण आयुष्य हातातून निसटत जातांना तेच क्षण कोंदणातील हिरे( स्टोलन मोमेंट) बनतात.
आज सकाळपासून भाना पुन्हा पुन्हा का आठवतोय तिला कळेना.
" बाई, तुमचे मिस्टर कुठे गेलेत? डाॅक्टर साहेब बोलवत आहेत! बील लवकर भरा आता लगेच डिस्जार्च देणार आहेत तुम्हास!" नर्स सुगंधाजवळ येत म्हणाली.
" अहो ताई! उद्या सकाळी डिस्जार्च देणार होते म्हणून ते घरी गेलेत! आता अचानक कसं डिस्जार्च देताहेत?"
" ते मला काय माहीत बाई! डाॅक्टरांना भेटायला लावा तुम्ही!" नर्सने हात झटकले.
सुगंधा तशीच त्रासानं लहान्या मुलीस छातीशी घेत उठली. ती डाॅक्टरच्या कॅबीनकडं जाऊ लागली. डाॅक्टर सांगून बाहेर निघून गेले होते. काऊंटरवरच्या माणसानं सुगंधास अडवलं
नेमक्या त्याच वेळी भाना व (सुशांत?) रघूदादास भेटण्यासाठी दवाखान्यात प्रवेश केला.
" ताई, ते मला काही माहित नाही तुमच्या मिस्टरांनी फक्त दहा हजार जमा केलेत अजुन उरलेले पंधरा जमा करा ! तुम्हाला आताच डिस्जार्च द्यायला लावलाय सरांनी!"
" अहो दादा,ते येईपर्यंत थांबा! दुपारून येतील ते!" सुगंधा घाबरत डोळ्यात येऊ पाहणारी आसवे रोखत म्हणाली.
" ठिक आहे, पण लवकर त्यांना फोन करून बोलवा!"
सुगंधा लहान्या बाळास धरत वळली व रुममध्ये न जाता जवळच्याच बाकावर बसत कुणी मोबाईल वाला शोधू लागली. तोच.....तोच... तिची नजर समोर उभ्या असलेल्या व आपल्याकडंच पाहत असलेल्या भानाकडं गेली नी ती बसल्या जागी भूकंप आल्यागत थरथरली...
" सुशा......सुशा......!" भाना लहान पोरागत तिच्याकडं बोट दाखवत भिंतीचा आधार शोधू लागला.
घाऱ्या नजरेत काळी पाणीदार नजर की काळ्या पाणीदार नजरेत घारी नजर उतरत काळजाच्या डोहात शिरत होती. काळजाच्या खोल अंधाऱ्या सांदीतली घट्ट ठोकलेली मेख हात न लावता उखडू पाहत होती. नजरेला नजर भिडतांना आसवाच्या पुरात वाहत असल्यानं धूसर दिसत होतं.
" सुशा..तुझी जोशी मॅडम!"
सुशांतनं सुगंधाकडून बाळास घेतलं व दोघांना तिला अॅडमीट केलेल्या रुममध्ये तिच्याच मदतीनं आणलं.
बेडवर ना ती बसे, ना तो! एक विचीत्र अनोळखी भावविभूती!
सुशांतनं सुगंधास बेडवर बसवलं. जवळचा स्टूल सरकवत भानास तिच्या समोर बसवलं. तो मुलीस धरून उभा राहिला.
गडावरून परतल्यावर त्यानं बाजी मामानं दिलेल्या भंडाऱ्यात तिला शेवटंच पाहिलं होतं आज जवळपास दोन वर्षाचा कालखंड लोटला होता! तो एकसारखा तिला पाहत होता तर ती भान हरपत त्याला!
" सुशा! जोशी मॅडमांना एक वेळा ही वाटलं नाही की आम्ही रिक्त पोकळीत साथ देण्यासाठी परतलो म्हणून पहायला यावं असं?" तो घाऱ्या नजरेस पक्क ठाणबंद करत विचारता झाला.
" सनेर, कुणाला पोकळीत एकटं सोडण्याची चूक केल्यावर कोणत्या तोंडानं परतू!"
बोल घुमले व भानाच्या घट्ट बसलेल्या मेंदुतल्या साऱ्या घड्याच विस्कटल्या!
" सुशा, या भाना वर इतका विश्वास नव्हता का की त्यानं असल्या किती तरी चुका माफ करत राजीनं परत पाठवलं असतं!"
सुगंधाला आतून जोराचा उमाळा आला व ती हंबरडा फोडत भानाच्या पायाला बिलगणार तोच तो दूर सरकला.
"सुगंधा हिरव्या चुड्याला बट्टा लागेल असलं पातक माझ्या माथी लागलेलं तुला रुचेल?"
ती थांबली. पण 'सुगंधा' ऐकलं व ती
पुन्हा बिथरली.
" सुशा, याला त्याच चुड्याची आण आहे! एकदा आणखी सुगंधा म्हणायला लाव.."
" .........."
" भाना....!"
" भाना, समाज भोतीक स्थुलतेला महत्व देतो तर देतो तू ही का देतोय? पाक मनानं तिला पायाशी बिलगावं वाटतं तर मनाचे खेळ समजून तिला
चरण धरू दे ना!"
" सुशा शब्दांचे खेळ करत माझ्याच शब्दजंजाळात अडकवू नको मला!"
बराच वेळ उरातल्या आगी भडकत राहिल्या, सुलगत राहिल्या!
सुशांतनं डाॅक्टरांना भेटत बील पेड केलं. आजचा दिवस पेशंटला डिस्जार्च न देता अॅडमीट करायला लावलं.
" तशी बाळ व आईला रहायची गरजच नाही..."
" डाॅक्टर तुम्हास तुमचं बील मिळतंय ना! आम्हास बाळ व आईची सुरक्षितता महत्वाची आहे. म्हणून आज ते अॅडमीटच राहतील!" सुशांत नं ठासून सांगितलं.
सुशांत नं रघू दादास फोन कर कळवलं.
" भाना.... एक ऐकशील?"
" निदान काशी मामासाठी उमर्ठीला येत राहशील हे कबूल करशील तर ऐकेन!"
" एवढी समृद्धी असतांना पोकळीत थांबणं उचीत नाही. निदान माझ्या समाधानासाठी तरी लग्न.....!"
" रिक्त शांततेतली समृद्धी गवसल्यावर तो फुकाचा प्रपंच नकोय आता! आठवणीच्या समृद्ध अडगळीवरच आता हयात सरो!"
सुगंधा कळवळली.
" म्हणजे मला माफी नाहीच?"
" आई जगदंबेच्या साक्षीनं जिला चुडा भरलाय ती मनात असतांना, तिचा सुगंध रोमारोमात दरवळत असतांना आता अप्सराही नको!"
चारच्या सुमारास सत्यम आला. त्यानं भानास पाहिलं.
" आपणच भाना महाराज ना! रघू दादाचे भाऊ?"
भानाला ना कसली भिती वाटली ना कसला संकोच.
" सत्यम लोखंडे! नशीबवान आहात! तुमचं पूर्वसंचीत थोर! पूर्वजांचे उपकार स्मरा व सुगंधास जपा!"
भाना सुशांतला सांगत निघू लागला.
तोच सत्यम पुढे झाला.
" महाराज ,आला आहात तर एक उपकार कराल?"
भाना थबकला.
सत्यमनं सुगंधाकडून मुलीस घेतलं व भानासमोर धरत विनवलं.
" या आमच्या लेकीचं नामकरण करुन जा!"
" कुणाचं नामकरण करण्याइतपत मी मोठा नाही. पण तरी आपली इच्छा असेल तर ' रखमा!....रखमा!' ठेवा.आमची आजी थोर होती. आजीचच नाव देऊन आमच्यावरच उपकार करा!"
सुगंधा ला आनंद झाला.
सुशांत नं सत्यमला रघू दादानं सांगितलं म्हणून बील दिल्याची कल्पना दिली. व आणखी दहा हजार त्यांच्याकडं दिले. सत्यम डोळ्यात पाणी आणत दहा हजार नाकारू लागला.
" सत्यमराव सुगंधा रघू दादाचीच नाही तर माझीही ताई आहे! ठेवा पैसै!" सुशांत डोळे पुसत म्हणाला.
सुगंधा कडं जात
" सुगंधा, आज आमच्या भाना महाराजाचं किर्तन दवाखान्यातून का असेना पण जरुर ऐक! त्यासाठीच तर तुझा मुक्काम एक दिवस वाढवलाय!" सुशांत म्हणाला.
रात्री भाना महाराजांनी कृष्ण राधा...शाश्वत भक्तीभाव यावर काळजाला पीळ पाडणारं किर्तन केलं.
सुगंधाची मनातली इच्छा पूर्ण झाली.
" मला चुड्यातल्या व्यासातून लाखोचा समुदाय खिळवणारा भाना महाराज पहायचाय!" निदान आज तिनं लांबून का असेना पण ऐकला.
प्रारब्ध व सटवाईचा टाक कुणाला कसं नि कुठं फिरवेल हे नियतीखेरीज कुणालाच माहीत नसतं. हीच जगण्याची अशाश्वतता आहे. माणसाचं जीवन अळवावरचं पाणी! सुगंधा या बहिणीची काळजी घेणारा रघू दादा ...व सत्यमच्या ललाटावर सटवाईनं काय टाक लिहीलाय हे ना तुळसेला माहीत ना सुगंधास! नियतीच्या मनात एकचल समीकरण एक चलाचा वापर करुनच सोडवायचं असेल तर बाजी सारख्या स्वर्गाच्या दारी गेलेल्या माणसानं दोन चलं वापरली तरी नियती बेरीज वजा करत एक चल उडवेलच!
.
.
२०२० उजाडलं ते जगाला ग्रासायला निघालेल्या कोरोना महामारीनच.
भारतातही चंचू प्रवेश झालाच.
.
.
क्रमशः