नकोसा...............! -5
वा..........पा...............
मालखेड्यात गोविंद व राधेच्या लग्नाच्या बातमीचा स्फोट झाला नी जो तो तोंडात बोट घालत ,तोंडाचा चंबू करत हवेलीकडं नेमकं काय घडलं हे जाणून घेण्यासाठी चक्कर टाकू लागला. दौलतबाबाच्या काळजातला खदखदणारा लाव्हा आता बाहेर पडत हवेलीत जलजलाच येईल असं चक्कर मारणारे वाट पाहत होते. पण बाबाच्या काळजातला लाव्हा बाहेर पडेच ना! तो अंतरातच खदखदू लागला.
रमणराव व सेंधव्याहून राधेवर लाल होत आलेले विठ्ठलराव बाबासमोर बसलेले. राधा, गोविंद दंगल व सुंदर हवेलीला कुलूप ठोकत परत लगेच निघून गेले.आठ दिवसासाठी मधुचंद्रासाठी गोव्याला जातोय सांगत पोबारा केला.
" बाबा.......!
"......…..." बाबांनी फक्त भरल्या डोळ्याची नजर आवाजाच्या दिशेनं फिरवली.
" बाबा, बोला!"
" विठ्या, काय बोलू? आपली माणसं तर मला गेल्या पंचवीस वर्षापासुन डागण्या देत आली.पण हल्ली ज्या परक्यांना, आपल्यांना उभारत नवीन नाती निर्माण करत होतो ती ही तशीच निघावी.....? आता तर माणसं.... नातं......विश्वास...प्रेम..हे शब्द कोणी बोललं तरी ...." बाबाच्या डोळ्यातून तप्त आसवे ओघळू लागली.
" विठ्या तुझ्या लेकीनं मधातून गरळ पाजलं रे माझ्या मधाला!". गुहेतून बोल घुमावेत तसे बनुमायचे बोल घुमले.
" बनु, का बोतेय गं! कारण ही बसलेली विठ्या, रमण, ही पण कोणाची माणसं यावर ही आता विश्वास नाही!"
विठ्ठलराव या बोलांनी उठला व भिंतीलाच डोकं आपटू लागला.
रमणरावांनी त्याला धरत खाली बसवलं. कपाळाला गोट्यागत ठेंगळं धावून येत रक्ताची धार वाहू लागली.
" कला, दंगल हे वागतांना निदान समोर ठाकत वागली. पण आता तर समोर काहीच दिसत नाही! कुणाशी व कसं लढावं!" बाबाचा लाव्हा बाहेर निघू लागला.
" आक्का मा़झं रक्त नासकं निघालं ....." विठोबा धाय मोकलत रडू लागला.
बाबाही ढसाढसा रडू लागले.
"विठ्या तुझं रक्त नासकं की माझ्या नासक्या रक्तात मिसळत ते नासकं झालं? की आपणच नासकी? चार महिना घातक्यांनी कशा चाली खेळल्या तेच कळालं नाही."
" बाबा , सारा तपास लावतो," रमणराव आतून संतापत बोलले.
" तू लाख छडा लावशील रे आता! पण त्यानं जळून खाक झालेलं माझ्या मधाचं आभाळ परत येणार का?"
" होईल बाबा सारं सुरळीत होईल.!"
विठ्ठल मुलीला जाब विचारायला आला पण ते तर गावात येत विठ्ठलाचं दर्शन घेत गायब झालेली.
आठ दिवस हवेलीत सयेनं स्वयंपाक करुनही कुणीच धड जेवण करेनात!
माधवनं तर वरच्या मजल्यावर कोंडूनच घेतलेलं. केवळआजी, बनुमाय जेवणाचं ताट घेऊन दाराशी कडी वाजवत. पण काहीही न बोलता तो एक दोन घास कसाबसा ढकली!
"मधा...? मधा.....! असं जिवास जाळून आता काय हशील पोरा!"
" ..............."
" तुझा बाबा मरेन अशानं! तुझी हालत पाहून जीव पोळतोय रे!"
"........"
" आत्या त्याला त्याचं काय?" अनुसया लावलेल्या खिडक्या, मागचं दार उघडत म्हणाली.
" का....? का...? वागली अशी ती?"
" तो सवाल तर साऱ्यांचाच जीव घेतोय रे!"
" सये, राधा तर त्या सावळ्याच्या प्रेमासाठी युगायुगाची अतृप्त होती ना? मग माझ्या राधानंच का असं वागावं? का सोडून गेली? एक वेळ मला भेटायचंय तिला!"
रमणराव सेंधव्याला जाऊन दत्ता ,वना, दिना यांना भेटले. पण त्यांनी कानावर हात ठेवत काख्या वर केल्यात.
" रमणराव, त्या विठ्ठलालाच विचारा! त्याचीच लेक ना ती?"
" दत्ताजी, ते ही सुन्न झालेत ! काय सांगतील ते!
" मग तुमच्या हवेलीतला आपापसातला मामला आहे तो! आम्ही काय सांगणार?"
रमणरावांनी जंग जंग पछाडलं पण काहीच हाती लागलं नाही. त्यांनी दिनास काही सांगितलं व ते परतले.
पंधरा दिवसांनी गोविंद व राधा सर्वांसह परतले. माधव बाबासाठी जेमतेम सावरला होता .साडीतल्या राधेला पाहताच तो लालेलाल होत संतापला.तो त्या हवेलीकडं जाऊ लागला. पण बाबांनी हात धरत
" मधा.......? मागं फिर पोरा!" कळवळत विनवलं.
" बाबा ,फक्त एक वेळा! प्लिज मला तिला भेटू द्या ना!"
" काहीच हाती लागणार नाही ,उरातला जाळ भडकत वेदनेचा दाह होईल पोरा!"
" बाबा, बाबा ! ऐका ना. मला फक्त तिला विचारू तर द्या?"
" मधा ! ऐक ना रे पोरा! तुला माझी शपथ आहे" बाबा आक्रंदतच विनवू लागले. बाबांची थरथर पाहून सया घरातून धावतच आली.
सयानं त्याला ओढतच घरात नेलं.
मधा लहान पोरासारखा तिला बिलगत हमसून हमसून रडू लागला.
" सया हिला असं जायचं होतं तर या सावळबाधेत स्वत: रंगत मला का अडकवलं गं?"
आठ दिवस भयाण शांतता वावरत होती. वादळ येणारच. ते लवकर येवून जावं असंच उलट साऱ्यांना वाटत होतं. पण गोंगावणारं वादळ वावरत असुनही येत नव्हतं.
एकदाचं वादळाला तोंड फुटलंच.
बाबानं रमणला आरोळी ठोकत हवेलीच्या अंगणात बोलावलं.
" रमण्या त्या हरमखोर दंगलला काढ बाहेर!"
रमणराव घाबरले. आता काय होईल याची जाणीव त्यांना झाली. त्यांनी हवेलीच्या मागून दंगल व सुंदरला बोलावलं.
" दंगलराव भिखारी जगताप! सुंदरबाई! चांगलं कर्तृत्व गाजवलं तुमच्या त्या दिवट्यानं! नी तुम्ही ही! माझी छातीच आज अभिमानानं फुलून आली! "
बाबांचा फुलणारा श्वास पाहुन
"बाबा तुम्ही शांत बसून बोला! सारं विचारू आपण!" रमणराव विनवू लागले.
" काय विचारणार रे रमण्या? त्या राधीला कशी पळवली हे? का, का पळवली हे? असं का केलं हे? काही नाही विचारणार मी! विचारुन तरी काय होईल? आता एकच! हात जोडतो एक उपकार करा! त्या दिवटीला पळवलीच तुम्ही. पण तिच्या नावावरील आमची जमीन तेवढी परत करा. म्हणजे जन्माजन्माचा ऋणी होईल मी तुमचा!"
'जमीन' हा शब्द ऐकताच सुंदरबाई तोंड फिरवून कुत्सीत हसू लागली. दंगलराव अगदी शांत घुम्यागत बसला.
" रमण्या यांना हाकल आता माझ्या नजरे समोरुन ! मला यांचं तोंड ही पाहू वाटत नाही!"
बाबाला वाटलं राधेनं धोका दिला तरी तिच्या नावावरील जमीन परत मिळाली की मधासाठी पाहू आपण दुसरी मुलगी.मुलीचा काय तोटा पडला. पण वादळाला आता खरी सुरुवात झाली होती.
मळ्यात पपईचा तोडा आला. दोन दिवसांपूर्वी फोन केलेले सुरतेहून व्यापारी दोन ट्रक घेऊन मळ्यात उभे राहिले. मधा व बाबा गेले. तो पावेतो मळ्यातून गोविंदानं ट्रक वाल्यास हाकलून लावलं होतं. बाबांनी परतणाऱ्या व्यापाऱ्यांना विचारल्यावर गोविंदनं हाकलून लावल्याचं कळताच बाबा जागेवरूनच तडतडतच आरोळ्या ठोकत मळ्यात घुसले. मळ्यात गोविंद पोलीसाची गाडी घेऊनच उभा होता. बाबा संतापत कुणाची मजाल की माझ्याच शेतातल्या पपईचा तोडा करु देत नाही.
पोलीसांनी रमणरावास आधीच कल्पना दिली होती.
रमणराव डोळ्यात अश्रू आणत बाबास विनवत घरी नेऊ लागले.
माधव व बाबांना सारं समजावलं. त्यांनी शेतावर कब्जा बसवलाय हे कळताच बाबांचा पुन्हा थयथयाट झाला.
त्यांनी परत दंगलला जाब विचारला.
" काय खेळ लावलाय हा? त्या दिवटीनं माधवशी लग्न जर केलं नाही तर जमीन का परत करत नाही?"
" बाबा, ती जमीन त्या राधेनं लग्नाच्या दहा बारा दिवस आधीच गोविंदच्या नावावर करुन दिलीय" दंगल बोलला नी बाबाच्या कानाच्या पाळ्या लाल झाल्या.
" दंगल्या, त्या सटवीनं तर आग लावलीच. पण हरा....! तुलाही लाज नाही वाटत! भिखाजी जगतापाची अवलाद असशील तर तुझ्या नावावरची जमीन लगेच माझ्या नावावर चढव! तुला माधवला नाही द्यायची तर नको देऊ पण माझ्या नावावर तर चढव!"
दंगलराव रमणरावास बाजुला नेऊन रडतच रडतच सारा मामला उघड करू लागले. राधेनं लग्नापूर्वी ती जमीन गोविंदच्या नावावर झाल्याचं मला लग्नानंतर समजलं. आणि आता माझ्या नावावर जर जमीन शिल्लक नाही तर मी कुठून जमीन नावावर करू! आबा तुम्हीच बाबांना समजवा!"
ते ऐकून रमणराव ही सुन्न झाले!
" दंगल, बाबाची व तुझी सामाईक दहा एकर विकून तु पंधरा एकर घेतलं होतं ती राधाला दिली. पण नंतर पंधरा एकर घेतलेली ती तर तुझ्या नावावर असेल ना? मग ती दे!"
" आबा ती घेतली तेव्हाच बाबांना न कळू देता मी सुंदर व गोविंदच्या नावावर केली होती!"
रमणरावला हे ऐकून पुन्हा धक्का बसला.
" तुला असं करतांना लाज नाही वाटली?"
" त्यावेळेस बाबा गोविंदलाच दत्तक घेणार असंच वाटल्याने मी ती गोविंद च्याच नावावर केली होती"
रमणरावाला सारं नवीनच ऐकायला मिळत होतं. त्याचा विश्वासच बसत नव्हता. दंगल मोठ्या मुलाचा तिरस्कार करतो एवढं ते जाणून होते पण दौलतबाबाची हे अशी वाट लावतील याची त्यांनी कल्पनाच केली नव्हती.
" मग आता बाबास कोणती जमीन देणार तू?"
" मी जमीन द्यायला माझ्या हातात काय राहीलंय? सुंदर व गोवींदनं माधव आला तेव्हापासून माझीच गच्छंती केलीय. आता गोविंद माझं साफ ऐकत नाही"
" दंगल तू पोरासाठी साफ चाटा मारतोय!"
पण हे ऐकताच दंगल लहान पोरासारखा पायाशी लागला व रडू लागला.
" आबा, तुझी व बाबाची शपथ घेऊन सांगतोय यातला एक शब्दही खोटा नाही!"
" अरे पण ज्या बाबाच्या मेहनतीवर तु जमीन वाढवली त्या बाबांनाच तू भुमीहीन करतोय ! हे पाप कसं फेडशील? तेही बाबा स्वत:साठी नाही तर तुझ्याच मोठ्या मुलासाठी मागताय! तू काहीही कर पण निदान बाबाची वडिलोपार्जित पाच एकर होती, जी तू विकली होती तेवढी तरी त्यांना बाबाच्या नावावर करायला लाव! बघ विचार कर! बाबांना एक झटका आलाय! अनुराधेचा धक्का व आता हे ऐकलं नी बाबास जर पुन्हा झटका आला तर महागात पडेल!"
" बघतो मी सुंदर व गोविंदला विनवून पाहतो. पण आबा, तू बाबास समजव!"
रमणरावांनी येत बाबास व बना वहिणीस सारा प्रकार सांगितला.
माधवला गोविंद राधेला गाडीत घेऊन गेला होता व दुसरी गाडी येत कागदावर सह्या घेतल्याचा तो दिवस आठवला. म्हणजे लग्ना आधीच राधेनं जमीन दिली हे त्याला पटलं.
बाबा तर एकदम रक्त गोठल्यागत थंड झाले. त्यांना एकच पश्चाताप वाटला की आपण हेल्यागत शेतात राबत राहिलो. व्यवहार पाहिलाच नाही. भाऊ शिकलेला आहे ,करील सारं बरोबर! फाजील विश्वास ठेवला! वडिलोपार्जित नावावरची विकून दुसरी घेतली ती कोणाच्या नावानं घेतली ते पाहण्याची ही बुद्धी सुचली नाही आपणास? आपण निर्बुद्ध! आपल्या मुर्खपणाची आपणास अशीच शिक्षा हवी होती! त्यांना छातीत आधीसारख्याच कळा जाणवू लागल्या.
रमण्या ,झालं गेलं ती माझीच चूक! पण आता निदान माझ्या लेकरासाठी माझी वडिलोपार्जित पाच एकर तरी द्यायला सांग!" बाबा कळवळून म्हणाले.
उभ्या आयुष्यात आपल्या वाघासारख्या बाबास इतकं लाचार व दीनवाणा होतांना रमणराव आज पहिल्यांदाच पाहत होते. त्यांनी डोळ्यातली आसवं थांबवत
" बाबा मी पण त्या मूर्खास तेच विनवतोय! पण आता गोविंद व सुंदर काय म्हणताय त्यावर सारा खेळ आहे!"
रात्री पोलीसांना ओली पार्टी देऊन परतलेल्या गोविंदाजवळ व सुंदरजवळ दंगलनं सारा किस्सा सांगत "अनुराधाला गठवत तोडलं, हे एकवेळेस माफ होईल पण त्यांच्या हिश्याची जमीन तरी परत करा! "
पण गोविंदनं हसतच ते उडवून लावलं.
" सुंदरे, हे महागात पडेल, तो नकोसा असला तरी इस्टेटी वरचा त्यांचा हिस्सा कुणीच डावलू शकत नाही!"
" अहो ,बंद करा ही टिरीटिरी! तो दत्तक गेल्यावर त्याच्या हक्काचा काय संबंध!"
" अगं पण मग बाबाच्या हिश्श्याचा तरी विचार करा! निदान वडिलोपार्जित जी आपण विकलीय ती तरी परत करा! नाही तर ते मला जगू देणार नाहीत."
"म्हणजे एकंदरीत त्यांनी तुम्हास धमकी दिलीय तर! उद्या पाहतेय मी त्यांची धमकी! तुम्ही फक्त पहाच!"
दुसऱ्या दिवशी सुंदर व गोविंदने रमणकाका ,कला काकी व राधेशामला अंगणात बोलवलं.
जोरानं पुकारा देत
" या बाबा बाहेर या! आज पुर्ण निवाडा एकदाचा होऊनच जाऊ द्या!"
बाबा, बनुमाय अनुसया व माधव बाहेर आले.
हवेलीच्या कोरवर सुंदर बाई ,अनुराधा ही उभी.
" तुम्ही माझ्या वडिलांना धमकावतात! उद्या माझ्या वडिलांनी काही बरंवाईट केलं तर याचे परिणाम वाईट होतील. सर्वांना असा झब्बू बसवेन तर फेडता फेडता कोठडीतच दम तोडणार!"
गोविंदनं उघड धमकी दिली.
माधवच्या मुठी वळल्या. डोळ्यात लाली उतरली व तो थरथरू लागला. तोच रमणरावांनी त्याला माघारी धरत बाजुला बसवलं.
" सुंदर, याला समजव! एका लाथेनं मुस्काट फोडीन बाबास एका शब्दानं बोलला तर!" रमणरावांनी दम भरला.
" आबा, हेच आधी तुम्ही त्यांना समजवा! आम्ही यांच्या अध्यात ना मध्यात यांना धमकावतांना लाज वाटायला हवी!" उलट सुंदरबाईच वरुन तणाणल्या.
" सुंदर, सारा विस्कोट करुन वरुन अध्यात ना मध्यात म्हणतांना तू ताळ्यावर आहेस का? मुकाट्यानं त्यांची जमीन नावार करा म्हणजे वादाचा संबंध येणार नाही!"
" काका, कोणती जमीन! एक वखरही मिळणार नाही! तीस एकराचा अख्खा काळीज घड माझ्या व माझ्या आईच्या नावावर आहे! असे केव्हाही कुठली बॅण्ड पार्टी वाजत येईल व आयतं मागेल त्यांना वाटायला आम्ही रिकामे नाहीत!"
बॅण्ड पार्टी म्हणताच राधा हसली व माधवला मेल्याहून मेल्यासारखं झालं.
आपल्या गायनाचा असा उल्लेख गोविंदने करावा यानं तो भणाणला.
" सुंदर पाया पडतो, झोळी पसरतो हवं तर! नको जास्त, मी राबलो व जमीन घेतली हे ही मी म्हणणार नाही, पण माझ्या हक्काची तरी द्या! हवंतर दान म्हणून द्या! हा दौलत जगताप भिकारी होऊन मागतोय!"
माधवनं एकच हिसका देत रमण काकाच्या हातातून सुटत बाबाला उठवलं.
" बाबा, हे काय करताय? माझ्यासाठी हात का पसरताय? माझ्यावर विश्वास नाही का ? मी जर या हवेलीचीच अवलाद असेन तर इथंच राबत त्यांच्यापेक्षा जास्त जमीन घेऊन दाखवतो! पण तुम्ही झोळी पसरू नका!"
रमणरावासही आपल्या बाबाची दयनीय अवस्था पाहून हंबरडाच फोडावा वाटला. बाबा लाचार, खजील होत थरथरत उठले व खालमानेनं हवेलीत निघाले.
" गोविंद, पाच एकराची तीस करण्यासाठी आम्ही ही किती खस्ता खाल्ल्या, नको ते पापड बेलले पण अशी भीक नाही मागितली बाळा!" सुंदरबाईनं कुत्सीतपणे हसत ठेवणीतला तीर उपसलाच!
" आईसाहेब, आता पर्यंत या तुमच्या नकोशा मुलाने जमिनीची हाव कधीच धरली नव्हती. तो गुंडूरलावा बनवणाऱ्या डोऱ्या मैनेच्या प्रेमात आकंठ बुडाला होता. पण आता पासुन त्याची जमिनीची हाव त्याच्या बाबासाठी जागृत झालीय. आता तुमची जमीन त्याच्यापासुन वाचवता आली तर वाचवा. कारण 'नकोसा ' हा लाकडात एकदाचा घुसला की असा वाकडा होऊन रुततो की तो कडीस कितीही नकोसा वाटला तरी निघत नाही. निघाला तर कडीस दार सताड उघडं पडल्याने घराचं सरंक्षण ही करता येत नाही!"
सुंदरबाईलाच काय पण कडीलाही ही गोष्ट भेदली. काळजातल्या कपारीतला खिळा कुणीतरी मजबूत हलवतोय व वेदना असह्य होत असल्याचा भास होऊ लागला.
बाबास हवेलीत जाताच छातीत जोरात कळा सुरू झाल्या.
सया बनुमाय आकांत करायला लागल्या. रमणरावांनी तात्काळ फोन करत गाडी बोलवली व बाबांना गाडीत टाकलं. पण बाबाची हालचालच मंदावली. गाडी सुसाट पळाली. गाडीत निपचीत पडलेल्या बाबास पाहताच रमणरावांनी हंबरडा फोडला.
" माझा बाबा गेला....!"
रमणराव छाती पिटू लागले.
माधवनं बाबाच्या छातीला जोरजोरात चोळायला सुरुवात केली. दम लागेपर्यंत तो चोळू लागला. पण हालचालच नाही. होश उडू लागले.
"काही उपयोग नाही मधा! बाबा गेला! गाडी पलटव! "
ड्रायव्हर गोंधळला. पण मधानं जोरात ओरडत
" आबा, माझा बापमाणूस भुमीहीन मरूच शकत नाही! हा त्यांचा मधा त्यांना भुमीहीन मरूच देणार नाही!"
म्हणत तो जोरजोरात छातीवर हातानं मारू लागला.
रमणरावांनी रडतच मधाला धरत मागे ओढलं. पण बाबा गेला या वेदनेनं तो आणखीनच जोरजोरात छातीवर हातानं मारत
"बाबा भुमीहीन मरुच शकत नाही" बोलला.
नी एकदम छातीतून दम निघत बाबा हाफू लागले. ते पाहताच दोघांनी छाती चोळायला सुरुवात केली. गाडी सुसाट दवाखान्यात आली. लगेच इंजेक्शन दिलं व बाबा दुसऱ्या झटक्यातून परतले. साऱ्यांना हायसं वाटलं कदाचीत भुमीहीन मरणं त्यांना ही पटलं नसावं.
गोविंद नं वातावरण शांत झालं हे ताडलं. त्यानं गावासाठी रिसेप्शनच्या नावाखाली पंगत देण्याची तयारी केली.
सेंधव्याहून दत्ता, वना व त्यांचा सारा कबिला आनंदानं मालखेड्यात आला. विठ्ठलरावांनी तर हायच खाल्ली. दिना आमंत्रण मिळालं म्हणून आला असला तरी तो खास रमणरावांच्या कामासाठी आला होता.
कार्यक्रमाच्या दिवशी उगाच वाद नको म्हणून माधवनं बनुमाय, बाबा, सया केवळमाय साऱ्यांना जळगावला नेलं. प्रविण मासोळकराकडेच ते चार दिवस मुक्कामास राहिले. प्रविणनं आपल्या मालकाची सारी व्यवस्था केली.
पंगतीत घाई गर्दीत जेवण करुन रमणरावासोबत दिना निघाला व कुणास न कळू देता जळगावला आला.
रमणरावांना मागे सेंधव्यात जाऊनही राधेनं असं का केलं याबाबत काहीच कळालं नव्हतं. त्यांनी दिनास ती कामगिरी सोपवली होती.
दिना दत्ता, वनाकडंच राबत होता. त्यानं वनाची पत्नी सोजर बाईकडून पोटात घुसत सारी माहिती काढली होती. सोजर बाईला जे झालं ते वाईटच ही जाणीव असल्यानं सारा पट त्यांनी दिनाजवळ उलघडला होता.
दिना माधव व बाबाजवळ सारं सांगू लागला.
.
.
सुंदरबाईस बाबा एकत्र राहत गोविंदलाच मुलगा मानत हयात घालवतील हीच अपेक्षा होती. पण बाबांनी दत्तकचा घाट घातल्यावर त्या नाईलाजानं तयार झाल्या. खरं तर त्यांना माधव नकोच होता.
माधव आला. दत्तक विधान झालं. त्या आधी अनुसयाशीच गोविंदचं लग्न त्या करणार होत्या. पण माधव मालखेड्यात आला व त्यांनी बनुबाईंनी आणलेल्या भाचीचा उपयोग करण्याचं ठरवलं.
सेंधव्याला रिसेप्शनला आले तेव्हा त्यांनी अनुसयेस कटवलं. अनुराधा गाडीतून उतरलीच नाही. सेधव्यात आल्यावर सुंदरबाई व गोविंदनं लगीन घाईत ही विठ्ठल रावांची भेट घेतली व राधेची मागणी घातली.
" ताई, हे कसं शक्य आहे! माधवला दत्तक घेतलं तर बनुताई राधेलाच सून करणार आहे ना! तु अनुसयेला कर!"
त्यानं सपशेल नाकारलं. त्यांनी त्याचा होरा ओळखत 'सहज तुझं मत पाहत असल्याचं' सांगत त्याला कटवलं. मग सुंदरबाईनं दत्ता व वनाला घेत पाहुण्यांना मंडपात बसवत अनुराधेला घेतलं.
" अनु, आम्ही आधीपासून तुलाच सून करणार होतो. पण बनुमाय तुला घेऊन गेली. नी माधवला दत्तक घेत सारं चौपट केलं. पण बघ, माधवशी लग्न केलं तर एक एकरही मिळणार नाही. आमचं ऐकून वागलीस तर गोविंदच्या तीस एकरची मालकिण होशील. शिवाय गोविंद व तू दोन्ही डाॅक्टर! तो माधव कुठं वाढला, कुणात राहिला काहीच धड माहीत नाही!"
तीस एकर व गोविंद डाॅक्टर हे पाहून ती तयार झाली.
" फक्त आता तुझ्या वडिलांना याबाबत काहीच सांगू नकोस. व तो हेकट दौलतबाबा जमीन मागेल व गोविंदचे वडील ती देतीलच ती मिळवण्यासाठी तू माधवशी सलगी कर. त्याला पुरतं वेड लाव. आम्ही जमीन तुझ्या नावावर करुन गावालाही जमीन देण्याचं दाखवतो! मग हळूहळू सारं सुरळीत होताच तु व गोविंद लग्न कर व सारी जमीन तुमचीच!"
राधा तयार झाली व त्या दिवसापासूनच - रिसेप्शन पासुनच माधवला ती घोळू लागली. चार महिन्यात काय घडलं सारं माधवला व तुम्हाला माहितच आहे. मध्यंतरी दत्ता व वना येत सारं मार्गदर्शन करत होते. सयेनं काहीतरी ऐकलं याची त्यांना शंका आली म्हणून सयालाच त्यांच्यासोबत हाकललं. नाही तरी सया राहून त्यांना अडचणच होती.
राधा व गोविंद एकांतात भेटतच होते. तिनं जमीन ही आधीच नावावर केली.
.
.
माधव व बाबा हे सारं ऐकून चक्रावलेच. माधवला आपणास सोयीस्कर रित्या राधेनं वापरलं व आपणास कळू नये याची लाज, पश्चात्ताप व घृणा वाटली. जमीन राधेच्या नावावर केली तेव्हाच त्याबाबत आपण अंदाज बांधला होता की जमीन नावावर करायची नाही यांना. पण आपणास जमिनीचा सोस नव्हताच म्हणून राधास मिळते आहे यातच आपण दुर्लक्ष केलं. म्हणून विठ्ठलमामा, सया लग्नाची घाई करत असतांनाही आपण गाफील राहिलो केवळ राधेमुळेच. व आपणास गाफील ठेवण्यासाठीच तिचा सारा खेळ होता. केवळ दंगलरावाच्या नावावरील जमीन त्यांनी आपणास देऊ नये यासाठी त्यांनी राधेला वापरलं.
माधवला त्या स्थितीत मात्र आपण ज्याला नकोसा होतो त्यांच्या ह्रदयात आपली आई रेशमबाई अजुनही जिवंत आहे हे कळलं व त्याला दु:खातही आनंद वाटला.
आता लढायचं, आता जगायचं! मालखेड्यात राहून भुमीहीन बापमाणसाच्या नावावर सातबारा करायचाच!
त्यानं आॅर्केस्टाच्या स्वतंत्र खात्यावरील रक्कम काढली. सर्व संच प्रविण मासोळकरला विकला. दत्तक विधान करतांना बाबाच्या खात्यावर मिळकत दाखवतांना चार लाख ठेवले होते ते तसेच होते; ते ही काढले. केवळमायेच्या परवानगीने शिवणीचं शेत दोन महिन्यात लगेच विकलं. बनुमाय व केवळआजीच्या अंगावरील किडूकमिडूक ही ओरबाळून मोडलं. सत्त्तावीस, अठ्ठावीस लाख उभे राहिले. आपल्याजवळ काहीच नाही असं वाटत असतांना इतका पैसा उभा राहिला याचं त्यालाच खरं वाटेना.
सारी रक्कम बाबाच्याच खात्यावर ठेवत त्यानं बाबास घेत पंजाबची वाट धरली.
एक नवी उडी घेण्यासाठी!
जातांना पुन्हा आजही बनुमाय व सयानंच ओवाळलं! त्यावरुन ओवाळलेल्या दह्याच्या कवड्या व भात दंगलरावाच्या हवेलीच्या अंगणात पडल्या. अनुराधा संतापली.
.
.
क्रमशः...........