मी पुन्हा येईन.....
भुसावळ शहराचा विस्तार बराच वाढलेला पण जुन्या भैरव चौकातली वस्ती अजुनही जुनं जाणते पण कवटाळत तशीच वसलेली. सिमेंटचं जंगल अपवादात्मकच. चौकात भैरवाचं मोठं मंदीर . मंदिरापुढं जुनं भलंमोठं विस्तारलेलं पिंपळाचं झाड. येणाऱ्या जाणाऱ्यांची कायम रीघ लागलेली. चौकासमोरच गजानन नाना व बजाजी अप्पा चिंचोलेंची आठ येली दुमजली लाकडी फडताळ असलेली टोलेजंग हवेली. गजा नाना व बजा अप्पा सख्खे चुलत भाऊ. त्यांचे वडील ही एकेकटे भाऊ व तेही एकेकटेच. त्यामुळे तीन पिढ्यांपासून आठ येली हवेली एकसंधच राहिली. गजा नानास नंदिनी (नंदा) ही एकटी मुलगी व बजा अप्पास टिला व बाला ही दोन मुलं. टिला घरचा पापड, मसाले, नुडल्स,वेफर्स बनवण्याचा व्यवसाय सांभाळी तर बाला गेल्या वर्षांपासून सैन्यात भरती झालेला. हल्ली हवेलीत त्याच्याच लग्नाची धामधूम चाललेली.
गजानन चिंचोले यांची बरीच जुनी प्रिंटींग प्रेस (छापखाना) होती. हवेलीच्या मागच्या बाजुकडून मुख्य रस्ता जाई त्याच बाजुला हवेलीला तळमजला होता. त्यात बजा अप्पाच्या हिश्यात छापखाना होता व गजा नानाच्या हिश्यात हल्ली नंदानं नव्यानेच सुरू केलेलं सायबर कॅफे.
आख्खा तालुका गजानन नानास 'प्रेसवाले गजा नाना' म्हणूनच ओळखत. एकदम शांत सयंमी व्यक्तीमत्व. प्रथम दर्शनी एखादा निवृत्त मास्तर वाटावा असाच अवतार. पांढरा नेहरु सदरा व पांढरी ट्राऊझर. डोक्यावर कायम कांझी केलेली चंदू टोपी. मनगटात एच. एम. टी.चं दम टाकत असलेलं घड्याळ. दुरुस्त करणाऱ्यानं नानास अखेरचा दम भरलेला..." नाना, आता बिघडलं तर तिकडंच फेका.पार्ट मिळत नाही तर दुरुस्त कसं करणार?"
पण तरी "सुधरतंय तो पर्यंत सुधरव.चालतंय तो पर्यंत वापरू!" सांगत नाना ते वापरत आलेले.
नाना आलेल्या गिऱ्हाईकाशी कधीच भाव करत नसत. जुनी गिऱ्हाईक काम झालं की नाना बोलतील तेवढे पैसे देऊन वाट धरत. नाना कधीच कुणाकडून एक आणाही जास्त घेत नसत. पण एखादा नवीन गिऱ्हाईक आला व भावाबाबत घासघीस करायला लागला की शांत नाना प्रथम त्यास धिरानं एकवेळ
"एक पै कमी होणार नाही!" सांगत. जर तरी गिऱ्हाईक नखरछखर करायला लागला की नाना सरळ त्यास हाकलून लावत. पण नानांनी सांगितल्या पेक्षा कमीत कुठेच काम होत नसे. मग तो नाक धरुन मुकाट्यानं नानाकडेच येई.
तहसील, पंचायत समीती वा इतर कार्यालयांना लागणारे फाॅर्म्स, रजिष्टर, नमुने सारे गजा नानाच्या छापखान्यातच मिळत. इतकंच काय तर कधी कधी जिल्ह्यावरुनही बरचंस काम गजा नानाकडेच येई. निवडणुकीतलं सरकारी काम, वा विविध पक्षाचे बॅनर, बिल्ले, पत्रके सारं सारं गजा नानाकडेच होई. म्हणून नानांचे सरकारी अधिकारी, कर्मचारी, राजकारणी साऱ्यांशी संबंध होते. पण तरी गजा नाना कधीच कुणाशी स्वत:हून लगट करत नसत वा संबंधाचा उपयोग करत गैरकाम करत नसत. कमी बोलणं व जास्त काम तेही वाजवी दरात व वेळच्या वेळी प्रामाणिकपणे हा गजा नानांचा खाक्या. त्यामुळे गजा नानाचा एक रुतबा होता. साध्या राहणीतही त्यांच्या व्यक्तीमत्वाची एक वेगळीच छाप कायमच्या संबंध असणाऱ्या व्यक्तींवर पडे. एवढं असुन ही खाजगी प्रकाशनाची पुस्तकं छपाईचं कामही नानाच्या छापखान्यात चाले.
हल्ली संगणक युग आलं. इंटरनेट, प्रिंटर, स्कॅनर आलं तसं त्यांच्या धंद्यातही बदल होणं त्यांना गरजेचं वाटू लागलं. म्हणून नंदा बी.ए. एम. एस. असुनही त्यांनी तिला दवाखाना न थाटता तिच्याच मर्जीनं सायबर कॅफे सुरु करुन दिलं व आपल्या व्यवसायाचं अपडेशनही केलं. मुलगी डाॅंक्टर झाली तरी दवाखाना न टाकता सायबर कॅफे टाकल्यावर लोक हुशार नानास वेड्यात ही काढू लागले. पण तोंडावर बोलण्याची कुणाची हिंमत होईना. नानांनाही कोण काय म्हणतंय याची तमा नव्हती.
एका वर्षापासून नंदानं जुन्या व्यवसायातील साऱ्या जबाबदाऱ्या अंगावर घेत, शिकून नवीन कॅफेत विविध संगणकीय कोर्स ही सुरू केले. आठ माणसं रात्रंदिवस राबत. साठी ओलांडू पाहणारे नानाही घडीभर रिकामे बसत नसत. पण हल्ली त्यांना आपली एकटी मुलगी नंदाचं लवकरात लवकर हात पिवळे करायची घाई झालेली होती. धंद्यात तिच्यानंतर सायबर कॅफे सांभाळणारी माणसं ही त्यांनी तयार ठेवले होते. पुतण्या बालाचं जुळलं म्हणून ते ही आता नंदासाठी वर संशोधन करू लागले.
नंदा आज सकाळीच सोनगडला निघाली होती. झेराॅक्ससाठी लागणारा जे के पेपर संदर्भात तिला काम होतं. प्रवासात ती रात्रीचा प्रसंगच पुन्हा पुन्हा आठवत होती. व तो आठवता आठवता तिची स्मृती दौलताबाद पर्यंत मागे मागे घरंगळत होती.
बालानं नवीन नंबरवर पत्रिकेचं प्रुफ टाकावयास लावलं. त्यासाठी तिनं तो नंबर सेव्ह केला. त्या नंबरचा डिपी पाहताच नंदाला जोराचा झटका बसला. रात्रीत ती थरथरली. डिपीतला फोटो पाहताच तिला किल्ल्यावरील तो प्रसंग आठवला. त्याच प्रसंगाचा फोटो होता तो. पण हा फोटो बालाच्या मित्राच्या डिपीवर कसा? तोच असावा का तो? तिच्या सर्व अंगात विजेची हवी हवीशी वाटणारी लहर सळसळली. सुखद शहारा. पण तोच जर असेल तर तो बालाचा मित्र कसा? शक्यच नाही.पण खात्री पटण्यासाठी नंदानंही तिच्याकडील तसाच फोटो जो तिच्या मेडीकल काॅलेजमधल्या मुलींनी त्यावेळी काढला होता व नंतर तिला चिडवत फाॅरवर्ड केला होता तोच फोटो तिनंही डिपीत ठेवला. ती वाट पाहू लागली. जर बालाचा मित्र तोच असेल तर डिपी पाहताच रिप्लाय करेल काही तरी. बराच वेळ जाऊन ही रिप्लाय आला नाही. नंतर Thanks मॅसेज आला. नंदानं ओळखलं हा मॅसेज बालाचा नसावा.कारण उशीरानं आलाय म्हणजे ज्याचा मोबाईल त्यानं डिपी पाहून केला असावा. तिच्यात आनंदाच्या लहरी संचारू लागल्या नं पुन्हा ओळख देण्यासाठी तिनं *माकड* लिहीत इमोजी पाठवली. ती जागत उत्तराची वाट पाहू लागली. पण उत्तरादाखल रागाची इमोजी येताच ती चपापली. कोण सांगावं बालाकडंच मोबाईल असला तर? शिवाय तो फोटो संगणकावरही उपलब्ध असेल तर त्यानं तो डिपी सहजही ठेवला असावा? कारण किल्ल्यावरचा मुलगा असता तर आपण डिपी बदलवला व ओळख म्हणून माकड लिहीताच त्याचा रिप्लाय आला असता! म्हणून तिनं रात्री तो विचार झटकत झोपणं पसंत केलं.
गाडीनं धुळं टाकलं व सोनगडकडं धावू लागली.वातावरणात मान्सुन येण्याची चिन्हे दिसू लागली. तिचा डोळा रात्रीच्या जागरणानं लागू लागला. पण रात्रीचा प्रसंग आठवताच तिच्या काळजात आठवणीच्या सुखद लहरी उठू लागल्या.
माकडं पाहताच आपण किती घाबरलो होतो! जवळच्या मैत्रिणी तर केव्हाच चिमण्यांगत पसार होत दूर पळालेल्या. कठडा धरून डोळे मिटून आपण जिवाच्या आकांताने ओरडू लागलो व मदतीला कोण येतय म्हणून डोळ्याची उघडझाप करू लागलो. पण कुणीच येत नसतांना शांत रहावयास लावत व पेरू असलेली पर्स फेकावयास लावणारे त्याचे डोळे आपणास शाश्वतता व दिलासा देऊ लागले. त्या वेळेस त्याचा आपणास किती दिलासा वाटला. त्यानं प्रसंगावधान दाखवत फरसाणची पिशवी फेकत माकडांना दूर करताच व त्याच्या खांद्यावरील माकड उतरताच आपण क्षणात त्याला बिलगत त्याच्या मिठीत विसावलो. त्या मिठीत ना माकडाची भिती होती ना सभोवतालचं अस्तीत्व! अनामिक, अनंत काळाची मिठी!
किल्ल्याच्या चढाईनं व माकडाच्या भितीनं आपलं सर्वांग घामानं डबडबलं असुनही मिठीत आपणास मृद् गंध परमळल्याचं जाणवत होतं. नानाच्या संस्कारांनी व भितीनं कुणाशी बोलायलाही घाबरणारे आपण. पण त्यावेळी भितीच्या संस्काराच्या साऱ्या बेड्या बेगड्या ठरत त्याची मिठीच एक अंतिम शाश्वत सत्य असल्यागत आपण समाधीस्थ झालो. त्या समाधीतच किल्ला उतरत आपण बसजवळ आलो. एकदम सुध हरपल्यागत. सोबतच्या मैत्रिणींना ही माकडांना घाबरलीय म्हणुन अशी वागतेय वाटत होतं. पण मृद् गंधाचा परिमळ आपणास बेधुंद करुन गेला.
त्या धुंदीतून बाहेर येईपर्यंत तो मित्रांसह निघून ही गेला.नंतर काॅलेज झालं व भुसावळला आपण कामात मग्न झालो. पण तरी तो मनाच्या गाभाऱ्यात अजुन ही हलायला तयार नाही. घरात लग्नाची बोलणी सुरू झालीत पण आपणास आताशी लग्नाचीच धास्ती वाटायला लागलीय. पण त्यालाही आपल्यासारखं वाटत असेल का? का ती एक प्रसंगानुरुप घडलेली प्रतिक्षिप्त प्रतिक्रिया होती. व तो विसरला ही असावा.
रात्रीच्या प्रसंगानं तर तोच प्रसंग जसाचा तसा जिवंत झालाय. काहीही असो पण जर तोच असेल तर बाला आज घरी आलाच असेल. तो जर बालासोबत आला असेल तर होईल का भेट? किंवा प्रवासात उतरला असेल तर ? विचारावं का बाला भेटल्यावर? पण लगेच "नंदा तू इतकी वाहवत चाललीय? ती एक घटना होती व घडून गेली. त्याच्या मनात काही असतं तर या सोशल मिडीयाच्या युगात त्यानंही तुला शोधण्याचा प्रयत्न केलाच असता !" नंदा मनातल्या मनात विचार झटकू लागली.
नंदानं सोनगडमधलं सारं काम आटोपतं घेतलं व ती लगोलग माघारी फिरली. घरी यायला तिला रात्रीचे अकरा वाजले. बजा काकांकडचा नंदानं कानोसा घेतला. घरात लग्नाची गडबड चालली होती. पण त्या गडबडीत तिला जे जाणून घ्यायचं होतं ते कळालंच नाही.फक्त सकाळीच येणारा बाला रेल्वे उशीरानं आल्याने सायंकाळी आला व प्रवासानं झोपलाय इतकंच समजलं. जास्त चौकशी करणं मनात असुनही तिला उचीत वाटलं नाही म्हणून ती ही झोपली.
.
.
क्रमशः....
वा.....पा.....