🙏अखेरची वारी🙏
"पोरी असं नको करू,तुझ्या बा ला पाठवते मी आज शाळेला."
नारू गोधडीतून सारं ऐकत होता.पण परिस्थितीच अशी आली होती की तो ही काही करू शकत नव्हता.
गेल्या वर्षी पडलेल्या दुष्काळानं काहीच पिकलं नव्हतं.कोरडवाहू तीन एकरातुन जे टाकलं ते तर परत आलंच नाही पण त्याचं भांडवल बोकांडी बसलं होतं.दोन वर्षांपूर्वी बहिणीचं लग्न केलं त्या वेळेस लहान भाऊ-भावजईनं काख्या वर करत साफ धुडकावलं होतं. नारूला दोघं नोकरीला असल्यानं त्यांच्याकडुन मोठी आशा होती म्हणुन बहिणीसाठी चांगलं स्थळ पाहिलं पण ऐन वक्ताला भाऊ- भावजईनं आम्हास भले शेत नकोय पण पैशेही मागू नका म्हणत उडवलं.लग्न तर ठरलं काय करावं?.संतापात नारुनं शेत नानु सेठ कडं गहाण ठेवत कर्ज काढलं व लग्न केलं. ते कर्ज तसच असतांना गेल्या वर्षीचं भांडवल व व्याज बोकांडी बसलं.
या वर्षी पावसाळ्याच्या सुरुवातीला पावसानं हजेरी लावताच आशा पल्लवीत झाल्या.बियाण्यासाठी नारुनं रात्रभर पारीची मनधरणी केली.पारीच्या कानातलं किडुक मिडुक मोडत बियाणं, खत आणलं.त्या दिवशी पारी दिवसभर रडली.कापुस लावला, ज्वारी पेरली नी पावसानं ताणुन दिली.लावणी पेरणीनंतर पाऊस न झाल्याने व जमिनीतल्या गरमाईनं सरकी रुजताच रुजता सडली.जी उगली ती ही तीन चार दिवसात माना टाकू लागली.येणाऱ्या प्रत्येक दिवशी नारू मरणाऱ्या कापसाच्या व ज्वारीच्या कोंबाकडं पाहत आशेनं आभाळाकडं डोळे फाडून फाडून पाहू लागला.मात्र पांढरेफट गुब्बाऱ्याचे ढग निघत व वलाटीतून खलाटीकडे पाण्याचा टिपूसही न गाळता पळत निघून जात.तसा नारूचा धीर सुटू लागला.दुबार पेरणी अटळ आहे हे कळुन चुकताच आता कुणाकडं हात पसरावेत या धास्तीनं तो झुरत होता.तोच काल पारीनं एकादशी जवळ येत असल्यानं डोकं लावलं होतं.कारण कानातले डाग मोडताना नारूनं तिला पेरणी आटोपुन एकादशीला पंढरपूरला सोबतीनं जाण्याचं आमिष दाखवलं होतं.त्यावेळेस त्यानं अंदाज बांधला होता की पाऊस चांगला झाला शेतात कच्चा पाला दिसू लागला तर एखाद्या अडत्याकडंनं उचल घेऊन जाता येईल पंढरपुरला.कारण लग्नानंतर बाहेर असं पारीला त्यानं फिरवलंच नव्हतं.भाऊ-बहिणीचं शिक्षण व नंतर लग्न यातच तो गुरफटला पण भावानं साफ दगा दिल्यावर त्याला आताशी पारीला बाहेर फिरवावं वाटत होत.पण पाऊसच झाला नाही तर कोण अडत्या उभं करणार? शिवाय दुबार पेरणीसाठी बियाणं कुठून आणणार?या विवंचनेत काल पारीनं शेजारचे एकादशीला पंढरपुला चाललेत इतकं बोलताच"मग मला सावकाराकडं गहाण ठेव व तु ही जा खुशाल"तोही संतापात बोलला.तोच पारी घडाघडा रडायला लागली.त्यानं तो पाझरला.आपण एवढं ताठर नको व्हायला हवं होतं याची त्याला जाणीव होताच "पारी मी तरी काय करू गं!"म्हणत त्यानं तिचे खांदे पकडले.
पारी विरघळली"मला तसं नव्हतं हो म्हणायचं मी फक्त सांगत होते"
हे सारं आठवताच त्यानं गोधडी झटकली व तो उठला.
पारीनं पाण्याचा तांब्या देत पोरांच्या शाळेत जाऊन मास्तरांना सांगायचं सुचवलं.
"अंजी,तू मंजी व दिनूला ने शाळेत मी येतोच."सांगत त्यानं पोरांना शाळेत काढलं.अंजीनं रडत बाबा ती बाई बाहेर काढेन मला.नक्की या बरं"म्हणत विनवत निघाली.
नारूला माहित होतं मागच्या वर्षाची तिन्ही पोरांची जवळपास पंचवीस हजार फी तटलीय व या वर्षाची अलग.आपण जाऊन कितीही विनवण्या केल्या तरी फरक पडणार नाही.तरीही तो गेला.तोच अंजी रडत व्हरांड्यातच भेटली.त्यानं तिला शांत करत कोपऱ्यात थांबावयाला लावलं.तो मुख्याध्यापकास भेटला.विनवणी करून पाहिली पण व्यर्थ.नाईलाजानं त्यानं दाखला द्या मी सरकारी शाळेत टाकतो पोरांना . नाही ऐपत माझी .तोच आधी मागची फी भरा मगच दाखला मिळेल म्हणताच तो उखडला बाचाबाची झाली.त्यानं तिघा पोरांना घेत घरचा रस्ता पकडला.
घरात येताच नानु सेठ घरात बसलेला त्याला दिसला.त्याचं घरात पाऊल पडणार तोच पारी घरातून रडत बाहेर पडली.झाल्या प्रकारानं तो जागेवरच बेफान झाला.तोच पारीनं त्याचा हात पकडत शांत केलं नानु सेठनं" पैशाची तजवीज कर नाही तर शेतावर जप्ती पक्की समज"म्हणत धमकी दिली.पारीनं "आख्खं शेत तुझ्या मढ्यात घाल पण इथनं चालता हो म्हणत नानुला हाकलून लावलं.
दुपारी पोरांना जेवू घातलं पण दोघं जेवलेच नाही.गावात पावसासाठी सप्ताह चालू होता.जेवण करून पोरं मंदीरात पळाली.
नारुनं ओसरीवर बाज पडली होती तिच्यावर अंग टाकलं.तोच पोष्टमन ने टपाल आणुन दिलं.कोकणात नोकरीला असणाऱ्या भावानं आपला वडिलोपार्जित शेतातला हिस्सा मागणारी नोटीस पाठवली होती.ज्या भावाला शिकवलं,ज्यानं बहिणीच्या लग्नात एक पै ची मदत न करता मला हिस्सा नको म्हणत मदत नाकारली तोच भाऊ बाईचं ऐकून नोटीस पाठवतो यानं त्याचा धीर खचला.त्यानं त्या नोटीशीच्या फाडुन चिंध्या करत वाऱ्यावर उडवल्या.उउशी ओली होऊ लागली.कसला कागद आलाय म्हणुन पारी बाहेर निघणार तोच शेजारची सखू लोणच्याची वाटी घेऊन ओसरी चढली.
"पारी तू लोणचं नाही घातलं अजून?का गं उशीर या वर्षी?हे घे पोरांना."
"नाही हो घालणारच होते पण या बाजाराला जमलंच नाही पाहू पुढच्या बाजाराला म्हणत पारी विषय बदलू लागली. विषया मागं विषय काढत सखुनं "आपल्या माहेरी भावकीतला चुलत भावानं लई वंगाळ केलं गं पारी.कर्जापायी विहीर जवळ केली. दहा-बारा दिवसांपूर्वी.पण साऱ्या कुटुंबाचं कल्याण झालं.पाच लाखाची सरकारी मदत मिळाली, बॅंकेचं कर्ज माफ, शिवाय बाईला ही नोकरी देणार आहेत म्हणे" सांगत लगेच निघून गेली.
नारू बाजल्यावर पडून सारं ऐकत होता.त्याच्या डोळ्यात आगळीच चमक आली.त्यानं मनात काही आखलं.संध्याकाळी पाचला तो उठला व "येतो गं शेतात चक्कर मारुन"सांगत घरातनं बाहेर पडला.
शेतात उरले सुरले कापसाचे कोंबही केव्हाच जळले होते.पण नारुला सखूचं वाक्य आठवू लागलं,' गेला पण कुटुंबाचं कल्याण करून गेला'.अंजीची फी, शेताचा नानुचा ताबा, भाऊच्या हिस्सा मागणी नोटीशीचे तुकडे..
त्यानं किसना पाटलाच्या मळ्यातील गोठ्यातील बोल सोडून देत दावणं सोबत घेतली.आपल्या शेतातल्या लिंबाच्या झाडावर चढला व फांदीला जोराचा हिसका बसला.खेळ खल्लास.सात वाजता किसना पाटलाचे मोकळे बैल रानात फिरू लागताच खलाटीच्या नाल्याकडंनं टिटवी जोरात आरडू लागली.टिटवीचा आवाज मोठा मोठा होत गाव जवळ करू लागला.तो ऐकताच पारी पचकन थुंकली.धनी अजुन का परतला नाही म्हणुन ती धास्तावली.तोच एकच गलका उठला जो तो नारुच्या शेताकडं धावला.
दुसऱ्या दिवशी आमदार खासदारांनी मदत जाहीर केली.नानु सेठ भाऊबंदकीच्या कानाला तोंड लावत कर्ज माफ करून वरून मोठ्या मनानं मदत दिली.शाळेच्या चालकानं मागची फी जमा झाल्याचं सांगत अंजी मंजी दिनूच्या शिक्षणाची जबाबदारी उचलली.भावानं दिनुला मांडीवर घेत तीन एकर तुझंच आहे बाळा!म्हणत भावाच्या नावानं दिखाऊ हंबरडा फोडला.साऱ्याच्या मिळणाऱ्या प्रेमाच्या ओलाव्यानं अजाणती पोरं किलवान्या तोंडानं आईकडं पाहु लागली.
"किती मतलबी!एकटेच वारीला निघून गेलेत.नाही येऊ दिलं सोबत.आता तर पोरासाठी .......कशी येऊ मी वारीला????पारीनं झिंज्या तोडत आभाळाकडं पाहीलं नी जोरदार पावसाला सुरवात झाली.
✒वासुदेव पाटील.