खेळ....
भाग ३...
स्मिता......
अस का होतंय? ती मुलगी फक्त आजीला च का दिसत होती इतरांना का दिसत नव्हती? हा प्रश्न आजीला भेडसावत होता. तिथे आजोबांच्या शेजारी दात विचकत उभी होती.
आजी त्या दिवशी दिवसभर झोपून होती. रात्र झाली आजोबांनी पण त्या दिवशी सुट्टी घेतली होती ते आजीच्या उशाला बसून तिची काळजी घेत होते. घरातली काम करायला सासूबाई होत्याच ना....
आजीला जाग आणि आजोबांनी तिला पाणी दिलं. आजोबांना समोर पाहून तिला बरं वाटलं तिने खोलीतून चौफेर नजर फिरवली आणि ती कुठे दिसतेय का बघितलं पण ती त्या खोलीत नव्हती. आजीला वाटलं हीच योग्य वेळ आहे आजोबांना विश्वासात घेऊन सगळं काही सांगायची. आजी त्यांना म्हणाली, अहो मला तुमच्यासोबत महत्वाचं बोलायचं आहे. ते म्हणाले अग थेट बोल ना काय असेल ते. मग आजीने चप्पलच्या गोष्टीपासून ते काल शेजारी येऊन त्या मुलीने लग्न लावून दे म्हणेपर्यंत सगळा घटनाक्रम सांगितला. हे सगळं ऐकून आजोबांचा चेहरा गंभीर झाला. आणि त्यांच्या डोक्यात विचार आला,सगळं गाव ह्या घराला भुताच घर म्हणत, जागा झपाटलेली आहे असं म्हणत पण मला इथे काही जाणवलं नाही कारण मी जास्त वेळ घरी नसायचो,ही जास्तवेळ घरी होती आणि खरचं घरात अस काही असेल तर मग लवकरात लवकर हे घर सोडावं लागेल. आजोबांनी त्या जागेचा इतिहास शोधायचं ठरवलं. त्यांनी गावात चौकशी करायला सुरुवात केली आणि त्यात त्यांना यश आले. गावातल्या एका जुन्या जाणकाराने त्यांना त्यांच्या आधी जे कुटुंब तिथे राहायचे तेव्हा तिथे एक नोकर काम करीत होता त्याचं नाव व पत्ता सांगितला. धनाजी यादव त्या नोकराच नाव पण तो नोकर पन्हाळ्यात राहत नव्हता तो मुळगाव त्याच होत गडहिंग्लज. आजोबांच्या हातात पत्ता तर होता फक्त त्यांना गडहिंग्लज ला जायचं होतं. दुसऱ्या दिवशी त्यांनी गडहिंग्लज ला जायचं ठरवलं आणि एका दिवसात परत यायचं ठरवलं. दुसऱ्या दिवशी गाडी आणि सोबत तो गावातला गडी घेऊन आजोबा गडहिंग्लज ला निघाले. जवळपास दोन तासांच्या प्रवासानंतर ते गड ला पोहोचले. पत्ता होता त्यामुळे इकडेतिकडे कोणाला विचारायची गरज त्यांना पडली नाही. त्यांची गाडी थेट धनाजी च्या दारात जाऊन थांबली. गाडीचा आवाज ऐकून एक म्हातारी आजी बाहेर आली. आजोबा गाडीतून उतरुन त्या म्हातारीपाशी गेले आणि म्हणाले, आजी धनाजीराव आहेत का घरात? म्हातारी काही न बोलता घरात निघून गेली आणि जाता जाता दरवाजात थांबून तिने आजोबांना आत येण्याचा इशारा केला. आजोबांनी त्या गड्याला खुणावलं गडी पण गाडीतून उतरून त्यांच्या मागे चालू लागला. आजोबा त्या घरात आले घर तस छोटेखानी होत घर कसलं झोपडी म्हणा हवं तर. शेणाने सारवलेली जमीन, मातीच्या भिंती त्यांचे जागोजागी पोपडे निघाले होते तशी आत मधून पार च घराची अवस्था बिकट होती. आजोबा खालीच जमिनीवर बसले. तेवढ्यात आतल्या खोलीतून एक माणूस खोकत दमखात बाहेर आला आणि आजोबांकडे पाहून म्हणाला, साहेब काय काम काढलत गरिबांकड काय चुकलं माकल का आमचं? हात जोडत तो म्हणत होता. आजोबा हसत म्हणाले, अस काही नाही मला जरा माहिती हवी आहे बस्स बाकी काही नाही. धनाजीला जरा हायस वाटलं तो म्हणाला, कसली माहिती साहेब? आजोबांनी त्याला विचारलं, तुम्ही पन्हाळ्याला होतात ना? त्यावर धनाजी हो उत्तरला. तेव्हा तुम्ही 'स्मिता' बंगल्यात नोकर होता अस ऐकलं आहे मी मला त्या बंगल्याबद्दल माहिती हवी आहे,जेव्हा तुम्ही तेथे कामास होता तेव्हा तिथे कोण कोण राहत होत त्याची माहिती हवीये. धनाजीला त्या बंगल्याच नाव काढताच दरदरून घाम फुटला..तो म्हणाला,साहेब त्या घरापायी मी बरच काही गमावलं आहे मला आता तो विषय नकोय बास. आजोबा थक्क झाले ते म्हणाले अहो मी त्या घरात आता राहत आहे आणि माझी पत्नीला दिवस गेले आहेत तेव्हापासून की त्याच्या आधीपासून तिला कसले कसले भास होतात. ती म्हणते, तिला कोणी मुलगी दिसते. धनाजी आजोबांना थांबवत म्हणाला, म्हंजी ती हायच का तिथं आजूक? आजोबा अवाक् झाले आणि म्हणाले ती म्हणजे कोण? धनाजी उत्तरला,स्मिता?
धनाजी पुढे सांगू लागला,
१९६५ साली म्हणजे दहा वर्ष झाली बर या गोष्टीला. गौतम मोहिते नावाचे तुमच्यासारखेच एक सरकारी साहेब पन्हाळ्याला आले.त्यांच्या दिमतीला मी होतोच. त्यांला सरकारी घरात जागा भेटली होती. सोबत त्यांच्याबर त्यांची बायको,पोरगी आणि एक पोरग . पण पोरगी एका पायानी अधू होती. तिला एक पाय नव्हता. लहानपणी तिचा म्हणे अपघात झालता आणि त्यात ती पाय गमावून बसली अस बाईसाहेब मला म्हणाल्या होत्या, जेव्हा मी त्यांना तिच्याबद्दल विचारलं होतं. तिच्यापायीच त्यांनी पुणे सोडून इथं बदली करून घेतली होती वाटतं. तिथं तिला त्रास होयचा माणसं काहीबाही बोलायची तिला. लग्नाचं वय झालं होत तिचं पोरगी २१ वर्षाची तर असल ती. दिसायला तर लय देखणी, मनमिळाऊ स्वभाव होता पर एक गोम होती तिच्यात तिला जी आवडल ना ती ते करायची मग ते चांगलं असलं काय आणि वाईट असलं काय...साहेबाची लाडकी लेक त्यामुळं कोणीबी काय बोलत नव्हतं तिला. एक दिवस तिला गच्चीवरून फिरताना खाली जंगल दिसलं एकदम सुंदर हिरवंगार पाहताच क्षणी कोणीही त्या जागेच्या प्रेमात पडावं अस. आणि आता जिथं बंगला आहे ना ती जागा तिला लय आवडली. तेव्हा ती जागा भुताची नव्हती. आणि एवढी जास्त दाट पण नव्हती. गावातली माणसं गुरेढोरे घेऊन त्या वाटेने चरायला डोंगरावर आणायची. त्यामुळं तिथं काय बी भय नव्हतं. तिनं त्या रात्रीला त्या जागेबद्दल साहेबांसोबत चर्चा केली वाटतं.स्मिता तेव्हा साहेबाना म्हणली होती की मला तिथं आपलं घर पाहिजे आपण इथल्या गर्दीतून तिथे जाऊ. आणि त्याचवेळी आजोबांना आजी त्यावेळी पहिल्यांदा त्या जागेबद्दल काय बोलली होती ते आठवलं.
धनाजी पूढे म्हणाला, साहेब तिच्यावर जाम चिडले आणि तिथून निघून गेले. हिकडं पोरीन खाणंपिन सोडलं. कोणासोबत बोलत नव्हती काही खात नव्हती. सायेब आणि बाईसाहेब काळजीत पडल्या, हिला नेमकं झालं काय? आणि त्यांच्या ध्यानात आलं की तिला त्या जागेवर घर हवंय. साहेब एक दिस कामावरून घरी आल्यावर थेट स्मिता जवळ गेले आणि त्यांनी कसलातरी कागद तिला दावला. जागेचा कागद होता वाटत त्यो. त्यो कागद बघून पोरगी बापाच्या गळ्यात च पडली का नाही पडणार हो, बापाने तिच्या नावाने ती जमीन खरेदी केली होती.
१९६५ ते १९६७ बंगल्याच काम सुरू होतं. बंगला एकदम प्रशस्त बांधला होता. साहेबांनी स्वतः जातीने लक्ष्य देऊन काम करून घेतलं होतं. साहेबांनी बंगल्याची मोठी पूजा घालायची ठरवली. पूजेचा दिवस ठरला साहेबांनी सगळे त्यांचे नातेवाईक, मित्रमंडळ सगळे जण बोलावले होते. सगळी मित्र मंडळी आली. त्यांच्या ऑफिसातली लोक आली होती.
मोहितेंनी बंगल्याचा नाव पण स्मिता ठेवलं. पूजेचा दिवस ठरला साहेबानी सगळे त्यांचे नातेवाईक, मित्रमंडळ सगळे जण बोलावले होते. सगळी मित्र मंडळी आली. त्यांच्या ऑफिसातली लोक आली होती. जेवण वैगैरे चालू होती. स्मिता कुबड्यांच्या आधारे का होईना सगळीकडे मिरवत होती. पूजा थाटात संपन्न झाली. सगळे नातेवाईक निघून गेले. काही जवळचे होते तेवढे राहिले होते त्यात साहेबांची एक लांबची बहीण होती. पूजेच्या दुसऱ्या सगळे खाली नाष्टा करत बसले होते. स्मिता खाली येत होती. त्याचवेळी ती बहीण म्हणाली, काय म्हणावं पोरीला दया येते तिची एवढं सहन करतेय ती, पण आता मोठी झाली पण तिचं लग्न कस होणार एवढी देखणी पोरगी आणि बिनलग्नाची राहणार. फक्त पायामुळेच ना?. तिने ते ऐकलं आणि ती आल्यापाऊली मागे फिरली आणि खोलीत जाऊन रडत बसली. आधीच अपघाताने तीच बालपण हिरावून घेतलं होतं. तिला पण वाटायचं आपण मनसोक्त जगावं, इतर मित्रमैत्रिणी प्रमाणे फिरावं आपलं पण लग्न व्हावं पण अस काही होणार नव्हतं हर तिला माहिती होतं आणि ती नशिबाला दोष देत तिथेच रडत बसली. तिला फक्त तिच्यावर प्रेम करणारा हवा होता तिला हवं तसं कबूल करणारा. पण तसा कधी तिला भेटणार होता का? झाले आता सगळे नातेवाईक निघून गेले. मोहिते कुटुंब तिथं स्थायिक झालं होतं. ,मुलगा छोटा होता त्याला शाळेला कोल्हापुरात ठेवलं होतं. हिच्या मनातून लग्नाचा विचार काही जात नव्हता. एक पाय अधू असल्याने कोणी तिला आपल्या घरची सून करून घ्यायला तयार नव्हत. अशातच साहेबांना एक वॉचमन पाहिजे होता. मी माझ्या पोराला साहेबांकडे विनंती करून बंगल्याच्या राखणीसाठी ठेवला. २६ वर्षाचा माझा तो मुलगा . नोकरी लागत नव्हती शिक्षणाभावी. स्मिता ची आणि त्याची नजरानजर होयची.
ते बोलू लागले. आणि अश्यातच ते दोघे एकमेकांच्या प्रेमात पडले. स्मिता दिसायला सुंदर होती. पण अधू होती तरी त्याला मंजूर होतं. पण हे फारकाळ टिकणार नव्हतं. दोघांच नात फार पुढे गेल होत. ही त्याला तिच्या खोलीतून इशारे करत असताना साहेबांनी त्यांना पकडलं आणि त्यांना सारं काही समजलं. त्यांनी त्या पोराला कामावरून हाकलून लावलं. त्याच्यावर आपल्या मुलीची छेड काढल्या प्रकरणी गुन्हा पण नोंदवला. पोलिसांनी मारून मारून पार माझ्या पोराची हाड खिळखिळी केली. आणि त्याला सोडून दिला. तो पोलीस स्टेशन मधून थेट त्या बंगल्याकडे गेला. मोहिते..... ओ..... मोहिते असा आवाज दिला. साहेब धावत बाहेर आले. पण तोवर माझ्या काळजाच्या तुकड्याने बाहेरच झाडाला फाशी घेतली होती. त्याच्या पाय आणि हातात तडफड दिसत होती. साहेब जवळ जाई पर्यँत ती पण थांबली. हे सगळं स्मिता ने वरून पाहिलं होतं. साहेबांनी स्मिता कडे पाहिलं स्मिता लगेच आत वळली. ते थक्क होऊन त्या लटकलेल्या पोराकडे च पाहत होते की तेवढ्यात त्यांना त्यांच्या मुलीचा जोरात किंचाळण्याचा आवाज आला त्यांनी खोलीकडे पाहिलं तर धूर येत होता स्मिताने स्वतःला पेटवून घेतले होते. वाचवा वाचवा अस ती ओरडत होती. मोहिते धावत तिच्यापाशी गेले. त्यांची पत्नी तिथेच उभी रडत रडत दार ठोठावत होती. पण दरवाजा आतून बंद. ते दरवाजा ला धक्के देत होते पण दरवाजा उघडत नव्हता आतून फार जोरजोरात आवाज ऐकू येत होता...
दहा मिनिटांनी तो आवाज बंद झाला. मोहितेंनी दरवाजा धक्का देऊन तोडला पण तोवर उशीर झाला होता. स्मिता आणि तिची खोली दोन्हीची राख झाली होती. साहेबांना एवढा जबर धक्का बसला होता की बस्स. कारण त्यांच्या समोर दोन जीव गेले होते आणि त्यात एक त्यांची पोटची मुलगी होती. मी मागच्या बाजूला होतो बाहेर पळत आलो तर माझं पोरग पुढं लकटलेलं दिसलं. मला पण काही सुधारत नव्हतं की बाईसाहेबांचा रडण्याचा आवाज ऐकू आला. मला तिकडे पण जाऊ वाटत नव्हतं. मी माझ्या पोराच्या तिथेच बसलो. पुढे काय पोलीस आले. काय क्रियाकर्म झालं माझ्या पोराची बॉडी दोन दिवसांनी हातात दिली. याच हातानी मी त्याच्या पार्थिवाला अग्नी दिला. आजोबा हे सगळं थक्क होऊन ऐकत होते. नंतर वाटत त्यांनी बंगला पण सोडला आणि पुढे काय झालं काही माहिती नाही मला. आजोबा त्यावर त्याला काहीच बोलले नाहीत.थोडेसे पैसे त्यांनी त्याच्या हातावर ठेवले आणि त्यांनी धनाजी चा निरोप घेतला. मध्यरात्र उलटून गेली होती आजोबांना पन्हाळ्यावर पोहोचायला. संपूर्ण प्रवासात तोच विचार आजोबांच्या मनात की खरच हिला स्मिता दिसत असेल का? आजोबा घरात गेले खालच्या खोलीत त्यांची आई झोपली होती तिनेच आत्ता दरवाजा उघडला होता. वरती खोलीत गेले आजी शांतपणे झोपली होती. ते देखील थकले होते त्यामुळे ते लगेच झोपी गेले. झोपता झोपता त्यांनी मनाशी ठरवलं जो पर्यंत आपल्या समोर काही येत नाही तोपर्यंत याच बंगल्यात राहायचं.....
आजोबांची ही एक चुक त्यांना खूप महागात पडणार होती याची त्यांना मुळीच कल्पना नव्हती.....
पुढील भाग लवकरच.......