श्रीनृसिंहसरस्वती स्वामी दत्त महाराज हे आत्यंतिक कनवाळू आणि प्रेमळ असे आहेत . कधीही कोणाला टाकून बोलले नाहीत ,रागावले नाहीत. मदोन्मत्त विप्रांचा अपवाद सोडल्यास महाराजांचे रागावणे म्हणजे काय हेच भक्तांना ठाऊक नव्हते (आणि आजही नाही ). महाराजांची वत्सलमूर्ती समोर आली कि भक्त आत्यंतिक प्रेमाने भावविभोर होत असत आणि त्यातही गुरुमहाराजांनी प्रेमाने हाक मारली कि जन्माचे सार्थक झाल्याचा आनंद होत असे .
साठ वर्षे वयाच्या गंगा स्त्रीने महाराजांच्या आशीर्वादाने अपत्यप्राप्ती (कन्या ) होताच दहा दिवसांनी सुस्नात होऊन त्या लेकराला गुरुमहाराजांसमोर ठेवले . महाराजांनी अत्यंत प्रेमाने ,कौतुकाने त्या दुपट्यात गुंडाळलेल्या कन्येला कडेवर घेतले . कडिये घेतले प्रीतीसी ll कन्येचे भविष्य कथन करीत त्यांनी गंगा स्त्रीला म्हटले ,हि कन्या पतिव्रता आणि शतायुषी होईल ,हिच्या घरी अष्टैश्वर्य नांदेल ,दक्षिण दिशेचा राजा हिच्या दर्शनार्थ येईल .
सायंदेव पंधरा वर्षांनी गाणगापूरला गुरुमहाराज आहेत हे कळताच आला ,सद्गदीद होऊन महाराजांना नमस्कार केल्यावर आशीर्वचन देत महाराज म्हणाले ,स्नान आणि अश्वत्थ पूजन करून त्वरित मठासी यावे ,भोजनास आमच्या पंगतीस असावे . भोजन होताच सायंदेवाची गुरुमहाराजांनी प्रेमाने चौकशी केली ,कुठे असतोस ?? पुसती क्षेम समाधान ll सायंदेवाला धन्य वाटले असेल . देवाने आपले क्षेम कुशल विचारावे यासारखा आनंद नाही .
यवन राजा दर्शनार्थ आला तेव्हा हा आपला पूर्वजन्मीचा रजक भक्त आहे हे पाहताच गुरुमहाराजांनी हाक मारली ,का रे रजका कोठे अससी l बहुत दिवसी भेटलासी ll म्लेंच्छ राजाला हि हाक ऐकताच पूर्वजन्मीचे ज्ञान झाले आणि -- सद्गदीद झाले अंतःकरण l अंगी रोमांच उठोन l आनंद बाष्पे रुदन करी ll आनंद बाष्पे म्हणजे आनंदाश्रू आले ,डोळे भरून आल्याने बाष्प जसे येताच धूसर दिसते तसे गुरुमहाराज दिसले . जन्मोजन्मी आठवण ठेऊन हाक मारून क्षेम कुशल विचारणारा परमात्मा किती प्रेमळ आणि करुणामूर्ती आहे !!
काही चूक झाल्यास दटावणारे ,रागे भरणारे दत्त महाराज हे शरण जाताच अत्यंत प्रेमाने जवळ घेतात ,समजावतात . एकदा आपला भक्त म्हणून महाराजांनी आपलं म्हटलं कि पाहायलाच नको . सर्व भार ते घेतात आणि आपण निर्धास्त होतो . श्री गुरुदेव दत्त !!! --- अभय आचार्य